इतिहास खरे तर सक्षमीकरणाचे, उन्नतीचे आणि सुधारणांचे ‘हत्यार’ असायला हवे; पण हल्ली आपण त्याच्याकडे ‘बंदिवासाचे साधन’ म्हणून बघतो आहोत!
पडघम - सांस्कृतिक
नितीन देशपांडे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 23 November 2023
  • पडघम सांस्कृतिक इतिहास विद्यापीठ तरुणाई तरुण पिढी

“The past is a place of reference, not a place of residence; the past is a place of learning, not a place of living.”

- Roy T. Bennett

इतिहास ‘सामाईक’ असतो, भूतकाळ ज्याचा त्याचा ‘व्यक्तिगत’ असतो. इतिहास हा नक्कीच भूतकाळाचा भाग असतो. भूतकाळ बदलता येत नाही, पण आजकाल इतिहास ही एक आपापल्या सोयीने बदलण्याची आकृती झालीय. इतिहास खरे तर सक्षमीकरणाचे, उन्नतीचे आणि सुधारणांचे ‘हत्यार’ असायला हवे; पण हल्ली आपण त्याच्याकडे ‘बंदिवासाचे साधन’ म्हणून बघतो आहोत.

‘जे इतिहासाकडून काहीच शिकत नाहीत, त्यांच्या नशिबी इतिहासाची पुनरावृत्ती असते’, असा एक वाक्प्रचार आहे. इतिहास हा कायम एक प्रभावी शिक्षकाचे काम करत आलाय. भूतकाळात काय काय शक्य व साध्य झाले आणि कोणत्या गोष्टी प्रयत्नपूर्वकही गंतव्यस्थानी पोहोचू शकल्या नाहीत आणि का, यांचा तो एक ‘कच्चा चिठ्ठा’ असतो. त्यातून समाजाच्या भरभराटीचे नवनवे मार्ग दिसायला हवेत.

त्याच वेळी जुन्या ‘नॅरेटिव्ह’मध्ये डुंबण्यात धन्यता मानण्यापेक्षा, स्वतःवर चिखलफेक करण्यापेक्षा, आपले इतिहासविषयक ज्ञान आपल्या सद्यकृतींना पाठबळ देणारे आणि नवे भवितव्य कोरणारे होते आहे का, हेही तपासायला हवे. श्रेष्ठ नेतृत्व भूतकाळाला शिक्षकाचा दर्जा देते आणि त्यापासून वर्तमानाकडे आणि उद्याकडे बघण्यासाठी एक विधायक नजर विकसित करते.

अलीकडच्या काळात अनेकांनी इतिहासाचा वापर (?) आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विचारक्षेत्रांत होत असल्याबद्दल भयसूचक भोंगे वाजवण्यास सुरुवात केली आहे. आपली विद्यापीठे संशोधन, नवनिर्मितीचे कारखाने होण्याऐवजी हिंसाचार, व्यक्तिविद्वेष यांचा प्रचार करण्यात मग्न झाली आहेत. समाजमाध्यमे आणि व्यक्तिगत वर्तनाचे जे परिपाठ दृगोच्चर होताहेत, ते कोठेतरी इतिहासाच्या चुकीच्या आकलनाने होताहेत की काय, अशी शंका येते आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तरुणांना इतिहासाचे अयोग्य दाखले देऊन भडकावले जात आहे. पंथ/जात/धर्म यांवर आधारित भेदभाव, हिंसा, सत्तेसाठीची हातघाई आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची मानसिकता, यांतून आपली सामाजिक-सामायिक ओळख दोन कप्प्यांमध्ये - अत्याचार/जुलूम करणारे आणि पीडित/अत्याचारग्रस्त/जुलूम मुकाटपणे सहन करणारे - होत आहे. हे एकमेकांवर हात उगारून शांतता प्रस्थापित करण्यासारखे आहे!

अनेकांना भूतकाळात विशेषाधिकार मिळाले असतील, अजूनही मिळत असतील. असमानतेच्या एका कडेलोटापर्यंत आपला समाज कधीकाळी जाऊन आलाय, पण त्यापासून आपण शिकलोय, सतर्क झालोय हेही निश्चित! मात्र त्याकडे ‘इतिहासाचे कर्ज’ या भिंगातून पाहणे कितपत योग्य आहे?

दडपशाहीच्या इतिहासाने आपण जेव्हा झपाटून जातो, तेव्हा आपण भूतकाळाच्या सापळ्यात जखडले जाण्याची शक्यता दाट असते. आपण कोण आहोत आणि काय बनू शकतो, याचा निर्णय आपले चारित्र्य आणि कृती यांच्या आधारावर घेण्यापेक्षा आपण तो ‘इतिहासा’वर सोपवून टाकतो. त्यातून ‘बळी’ असल्याची मानसिकता वाढीला लागते आणि आपण शक्तिहीन होत जातो, बदलाच्या शक्यतांना नाकारतो. हे वागणे अनेकदा इतिहासातील पूर्वसुरींच्या कृत्यांबद्दल तिरस्कार, हिंसाप्रवण करणारे होऊ शकते.

इतिहासाचा हा ‘अवतार’ आपल्या मुळावर येऊ शकतो. काही जणांसाठी वर्तमानातील कृत्ये आणि काही निवडक व्यक्तींसाठी त्यांच्या पूर्वजांची कृत्ये, अशी फुटपट्टी समाजाचे सकारात्मक ताणेबाणे उदध्वस्त करायला सुरुवात करू शकतात.

“सद्यस्थितीत आपल्यापैकी बरेच जण इतर पुरोगामी मंडळींना त्यांच्या चुका दाखवण्यात मग्न आहेत. आपण विध्वंस जरूर करू शकतो, पण पुनर्निर्मितीचे काय? आपल्या हातांची ती सवय गेली आहे का? शैक्षणिक संकुलांमध्ये निषेधाचे मोर्चे काढण्यामध्ये आपल्याला यश मिळालंय, पण शैक्षणिक कार्यक्रम आपल्याला राबवता येतात का? विरोध करण्यामध्ये स्वारस्य असणे आणि अवघड समस्या सोडवण्याचे शिवधनुष्य उचलण्याचे धैर्य नसणे, अशी आपली अवस्था झालीय का? फक्त टीकेचे हत्यार परजता येतेय, पण सकारात्मक, विधायक असे काही जमत नाही, अशा स्थानकावर आपण येऊन ठेपलो आहोत का? निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी आवडतेय, पण नवा चांगला पदाधिकारी निवडण्याची कुवत आपल्यात उरली नाहीए. लोकांविरुद्ध आवाज उठवायला आपण नको तितके सक्षम झालो आहोत, पण लोकांना हात धरून वर काढणे मात्र शिकलो नाहीए. हे सत्य समाजांतर्गत धोके निर्माण करत आहे. बाह्य धोक्यांपेक्षा हे अधिक भयप्रद आहे.”

इतिहासात दडपशाही आणि अन्यायाचे अनेक दाखले सापडतात, मात्र त्याच वेळी कणखर, दणकट मनगटांचेही पुरावे आढळतात. आणि त्यांनीच नवसर्जनाला सदैव खतपाणी घातले, अनेक अडथळ्यांवर मात करत कर्तृत्वाची बाग फुलवली, समाजाप्रती योगदान दिले आणि इतिहासाला स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडले. मानवतेच्या उन्नयनाची ही बाजू आपण विसरू शकत नाही, नये.

दुर्दैवाने सध्याच्या शैक्षणिक दृष्टीकोनाने हातात त्वरित लाठ्याकाठ्या घेणारी पिढी जन्माला घातली आहे. त्यांच्यामध्ये करुणा, अनुकंपा आणि परानुभूती यांचा सर्रास अभाव आढळतो. वास्तव जीवनाच्या दैनंदिन खाचखळग्यांना तोंड देऊ शकणाऱ्या कौशल्यांची त्यांना क्वचितच तोंडओळख असते. त्यामुळेच बहुधा ज्वलंत, तप्त आणि ज्वालाग्राही पिढी तयार होणार की काय, अशी परिस्थिती दिसू लागली आहे. खरे तर आपल्याला समस्या-निवारक, नवउद्योजक आणि सर्जक हवे आहेत.

आपली शैक्षणिक तत्त्वे आशावादी, कृतज्ञ आणि सक्षम तरुण निर्मितीच्या वाटेने जाणे आवश्यक आहे. इतिहासाचे क्लिष्ट स्वरूप शांतपणे, विचारपूर्वक निरखून, पण सगळीकडेच ते लागू करण्याचा दुराग्रह न बाळगता पुढे जाण्याची मानसिकता आजच्या तरुण पिढीत विकसित करायला हवी. सकारात्मक आणि आवश्यक बदलांची गरज जाणवणारे आणि त्यांच्या प्राप्तीसाठी धडपडणारे तरुण आपल्याला हवे आहेत. त्यांना ‘पाय’बळ देणारी यंत्रणा उभारणे, हे अग्रक्रमाचे पाऊल असायला हवे. त्यासाठी आवश्यक असलेले खतपाणी आपल्या शिक्षणव्यवस्थेने पुरवायला हवे.

कित्येक धडपड्या आणि आपल्या क्षेत्रात शिखरावर पोहोचलेल्यांच्या यशोगाथा आपल्या आसपास आहेत. त्या सर्वांमध्ये एकच गोष्ट सामायिक आढळते- या व्यक्ती व्यथित, उद्विग्न आणि संतप्त न होता, संयमाचे हत्यार हाती घेतात आणि आपण कशाचे नियमन करू शकतो, यावर विचार करण्यात सदैव गढलेले असतात आणि मार्गातील ऐतिहासिक अडथळ्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे हात सदैव जोडलेले असतात आभारासाठी!

‘विचारांचे मुक्त अभिसरण हे आमचे ध्येय आहे’, असे जरी शैक्षणिक संस्था उघडपणे सांगत असल्या, तरी त्यांच्या ‘निवडक कारवायां’चा एक ‘छुपा अजेंडा’ सुस्पष्ट झालेला आहे. त्यामध्ये कथित नीतिमूल्ये आणि प्रत्यक्षातील कृती, यांच्यातील अमंगळ भेद लपून राहिलेला नाही. जेव्हा नामवंत शिक्षणसंस्था एकाऐवजी दुसऱ्या रूपातील अन्याय निवडतात आणि तेथे विद्यार्थ्यांची सुरक्षा पणाला लावली जाते, तेव्हा दांभिकतेचीच पायाभरणी होते! शैक्षणिक समूहांसाठी हा मार्ग केवळ सेवाभावाशी विसंगत नसून, त्यांच्या पायाभूत विचारसरणीशी, तत्त्वांशीही काडीमोड घेणारा ठरतोय. वैविध्य, सर्वसमावेशकता आणि सर्वांसाठी निःष्पक्ष शिक्षण, या तत्त्वांचा उदघोष करणाऱ्या संस्था नकळत त्यांच्या प्रतिमेला काळिमा फासताहेत.

या मानसिकतेची प्राथमिक मागणी आहे- इतिहासाकडे बघण्याची ‘नजर’ बदलणे. एकेकाला पकडून ‘बळी’ व्यवस्थेत अडकवणाऱ्या ‘नॅरेटिव्ह’मधून सुटका करून घेत आपल्याला इतिहासाचे योग्य धडे देणारे आणि भविष्यात वाढून ठेवलेल्या ज्ञात-अज्ञात समस्यांना सुहास्य वदनाने सामोरे जाणारे ‘नॅरेटिव्ह’ हवे आहे. 

इंग्रजीत एक म्हण आहे- ‘आतल्या जगात क्रोध नाही, म्हणजे बाहेरच्या जगात शत्रू नाही’. इतिहासाची आपल्या जीवनातील भूमिका सजगपणे समजून घेत, त्याला एका कोपऱ्यात जागा देत पुढे जाणे, जगाकडे बघण्याची ‘नवी नजर’ घेऊन ते तसे का बनले आहे, यावर भाष्य करत पण बंदिवान होण्याचे नाकारणे, हे पुढचे पाऊल असावे.

आपल्या शैक्षणिक संकुलांचे संपूर्ण शुद्धीकरण गरजेचे झाले आहे. गेल्या दशकभरातील आपल्या उच्चशिक्षणाची बदललेली संस्कृती तपासून बघू या. थॉमस सोवेल यांनी २०२२ साली असं मत नोंदवले आहे की, काही व्यक्तींना त्यांच्या जन्मापूर्वीच्या घटनांना जबाबदार धरणे आणि काहींना सध्या त्यांच्या हातून घडणाऱ्या घटितांना मात्र अजिबात जबाबदार धरायचे नाही, अशा विवेकशून्यतेच्या पातळीवर आपण येऊन ठेपलो आहोत की काय?

माझ्यासारखे अदमासे चाळीस वर्षांपूर्वी पदवीधर झालेले (सुदैवाने आमच्यापैकी काहींनी शिक्षकी पेशा स्वीकारला) उच्चशिक्षणाच्या परिघात झालेल्या खूपशा जादुई बदलांपासून अनभिज्ञ असतात. मोकळेपणाने मान्य करायचे झाले, तर शिक्षणसंस्थांमध्ये आवश्यक असलेल्या प्रबोधनाबद्दल आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या काही जागृत लोकांबद्दल सध्या उगाचच सत्याचा विपर्यास होत आहे, असे वाटायचे. पण ओटीटीवरील शैक्षणिक (?) वेबसिरीज डोळे उघडायला कारणीभूत झाल्या. या विषयावरील काही पुस्तके जेव्हा शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मुक्त अभिव्यक्तीवरची बंधने किंवा मूलभूत सामाजिक न्याय अशा विचारांवर प्रकाश टाकतात, तेव्हा सतर्क होण्यावाचून पर्याय नाही, याची खूणगाठ पटते. 

गेल्या तीन-चार दशकांमध्ये आपल्या उच्चशिक्षणयंत्रणेत काय बदल झालेले आहेत? दोन प्रघात प्रामुख्याने नजरेस पडताहेत. पहिला, विद्यार्थ्यांनी काय विचार करावा, यावर भर दिला जातोय, कसा विचार करावा यांवर नाही. तर दुसरा, मुक्ताविष्कारावर बंधने आणि आपल्याला हव्या त्या ‘नॅरेटिव्ह’वरच बोलण्याची सक्ती!

अनेक विद्यापीठांमध्ये आज ‘सामाजिक न्याय’ या विषयावर भर दिला जातोय, हे ग्राह्य आहेच, पण शैक्षणिक गांभीर्य तसेच बौद्धिक वाद-विवाद टाळून. यातूनच मूलतत्त्ववादी विचारसरणी भक्कम होत जाते. अशा तत्त्वज्ञानाला आव्हान दिले जात नाही की, त्याच्या उपयुक्ततेबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत, फक्त विश्वास ठेवला जातो!

या पुस्तकांमधील-वेबसिरीजमधील वास्तव आता विद्यापीठांमध्येही प्रत्ययास येऊ लागले आहे. विशेषतः काही प्रतिष्ठित नावे आता बदनाम होत चालली आहेत. शैक्षणिक संकुलांमधील राजकारणाचा शिरकाव धास्ती वाढवणारा आहे. इतके दिवस साखर कारखाने किंवा सूतगिरण्यांपर्यंत मर्यादित असलेले राजकारणी आता विद्यापीठांमधील विविध शैक्षणिक समित्यांवर स्वतः किंवा पत्नीला निवडून आणताहेत आणि त्या हस्तक्षेपाला एवढेच निमित्त की, ही मंडळी स्वतःला शिक्षणतज्ज्ञ-शिक्षणमहर्षी मानू लागलेली आहेत आणि स्वतःच्या संस्थांमार्फत विद्यापीठांवर कब्जा करू पाहताहेत.

गेल्या तीन-चार दशकांमध्ये आपल्या उच्चशिक्षणयंत्रणेत काय बदल झालेले आहेत? दोन प्रघात प्रामुख्याने नजरेस पडताहेत. पहिला, विद्यार्थ्यांनी काय विचार करावा, यावर भर दिला जातोय, कसा विचार करावा यांवर नाही. तर दुसरा, मुक्ताविष्कारावर बंधने आणि आपल्याला हव्या त्या ‘नॅरेटिव्ह’वरच बोलण्याची सक्ती!

अनेक विद्यापीठांमध्ये आज ‘सामाजिक न्याय’ या विषयावर भर दिला जातोय, हे ग्राह्य आहेच, पण शैक्षणिक गांभीर्य तसेच बौद्धिक वाद-विवाद टाळून. यातूनच मूलतत्त्ववादी विचारसरणी भक्कम होत जाते. अशा तत्त्वज्ञानाला आव्हान दिले जात नाही की, त्याच्या उपयुक्ततेबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत, फक्त विश्वास ठेवला जातो!

मग दोन गटांमध्ये सोयीस्कर विभागणी होते- पीडन करणारे आणि पीडित! आमच्या मानसिकतेमध्ये ते इतके घट्ट रुजवले जाते आहे की, वस्तुनिष्ठ सत्य आणि शक्तिमान विरुद्ध दुबळे या सत्तासंघर्षाच्या दोन घटकांची मीमांसा करणे अवघड होऊन जाते. सामाजिक न्यायाचे हे तत्त्वज्ञान हळूहळू पीडितांची संस्कृती बनत जाते, तेव्हा ऐतिहासिक दडपशाही तपासण्यासाठी निःष्पक्ष भिंग आवश्यक होते.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘महाराष्ट्राच्या मानगुटीचा समंध’ : शेजवलकरांचा ८१ वर्षांपूर्वीचा मौलिक लेख

‘लोकमान्य ते महात्मा’ : महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहासाचे पुनर्वाचन 

‘सेपिअन्स’ : मानवी इतिहासाची रंजक सफर घडवून आणणारं पुस्तक

इतिहासाकडे अधिक निकोप, चिकित्सक व विधायक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. अन्यथा, शेजवलकर म्हणतात तसे इतिहासाच्या ‘क्षीरा’ऐवजी दुरभिमानाचे काळेकुट्ट ‘नीर’च हाती येणार!

.................................................................................................................................................................

आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात हेही भरवले जाते आहे की, सूक्ष्म आक्रमकता, लिंगभेद, चुकीच्या शब्दांचा जाणूनबुजून वापर आणि अगदी उपेक्षितांच्या विचारांशी असहमती, ही हिंसेचीच उदाहरणे असतात. अशा नव्या तत्त्वांना निव्वळ प्रश्न विचारणेदेखील संस्थेच्या ‘विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता’ (DEI - Diversity, Equality & Inclusiveness) विभागाच्या दृष्टीने अधिक्षेप मानला जाऊ शकतो आणि कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

‘विचारांचे मुक्त अभिसरण हे आमचे ध्येय आहे’, असे जरी शैक्षणिक संस्था उघडपणे सांगत असल्या, तरी त्यांच्या ‘निवडक कारवायां’चा एक ‘छुपा अजेंडा’ सुस्पष्ट झालेला आहे. त्यामध्ये कथित नीतिमूल्ये आणि प्रत्यक्षातील कृती, यांच्यातील अमंगळ भेद लपून राहिलेला नाही. विरोधी विचार मांडणारे, ‘नॅरेटिव्ह’विरुद्ध आवाज उठवणारे ‘सेन्सॉरशिप’ला उघड बळी पडताना दिसतात. काही वेळा त्यांच्यावर कारवाईही होताना दिसते. याउलट ‘हो’ला ‘हो’ करणारे विद्वतजन (?) हिंसा, तिरस्कार पसरवणाऱ्या आणि इतर वादग्रस्त, प्रमाणित न झालेल्या संकल्पना सहजी मांडू शकतात. त्यांवर नियंत्रण नसते.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

कागदोपत्रीचे सिद्धान्त सुनियोजित पद्धतीने ‘ब्रेनवॉश’ करण्यासाठी वापरले जात आहेत. हीच यंत्रणा चुकीच्या शब्दांचा वापर म्हणजे ‘अस्वीकार्य हिंसा’ मानते, ती एखाद्या टप्प्यावर प्रत्यक्ष हिंसादेखील ठरू शकते. असे अतार्किक वर्तन अल्पसंख्याकांच्या मुळावर येऊ शकते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्यू समाज!

भारतातील प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमधील संचालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी नुकतीच इस्रायलमधली ७ ऑक्टोबरची घटना मार्गदर्शक ठरू शकते. त्या दिवशी विचारधारांचे पराभव करत वर्गांमध्ये हिंसा पसरली आणि अमेरिकेतील बहुतेक संस्थाचालक बघतच राहिले. स्वतःच्या बौद्धिक चौकटीत अडकलेले सारे जण इस्रायलला ‘वसाहतवादी’, ‘दडपशाही सरकार’ मानत आलेले आहेत. त्यामुळे पशुवृत्तीच्या अतिरेकी वर्तनाचे परिणाम समजून घ्यायलाही ते अक्षम ठरले आहेत. आपल्या ज्यू बांधवांच्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण अमानवी हिंसाचाराचे बळी ठरलेल्या व्यक्तींबद्दल त्यांनी सहानुभूती दाखवली नाही.

या शैक्षणिक समुदायांपैकी बऱ्याच जणांची पहिली प्रतिक्रिया होती - या अतिरेकी कारवायांचे समर्थन करणे, इतरांना समजावून सांगणे किंवा नागरिकांच्या शिरकाणाची (त्यांत स्त्रिया, मुले आणि लहान अर्भकेही आली. त्यांच्यावरील अत्याचार, अपहरण किंवा सामूहिक हत्या) गय करणे. याबाबतीत कोणतीही दयामाया दाखवण्यात आली नाही किंवा हत्याकांडाशी या ना त्या मार्गाने जोडल्या गेलेल्या संबंधितांच्या भावनिक उलाघालींची दखल घेण्यात आली नाही.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

इतिहासाच्या चुकीच्या अभ्यासाने अनेक मिथके तयार होतात. असहिष्णू समाजात अशा मिथकांचे प्रमाण जास्त असते

इतिहासाची भूतं हे न बदलणारं वास्तव आहे. ती प्रभावहीन करणं हाच व्यवहारी मार्ग आहे!

माणसांचे मुखवटे पांघरलेली भलतीच कुठली तरी जमात, माणसांना माणसांतूनच हद्दपार करत आहे. केवळ माणसांनाच नाही, तर त्यांचा वर्तमान, इतिहास आणि भविष्यकाळही

नव्या ‘गाळीव इतिहासा’चे धडे आणि ‘त्यांचे’ वर्गातील ‘पाठ’!

अन्य समाजाबद्दल सद्भाव बाळगणारा मध्यमवर्ग आता समाजात ‘फूट’ पाडण्याच्या, इतिहासाची ‘मोडतोड’ करण्याच्या आणि ‘खोटं’ बोलण्याच्या राष्ट्रकार्यात मग्न होऊन गेला आहे…

.................................................................................................................................................................

या घृणास्पद हत्याकांडाची चौकशी करण्याऐवजी सगळ्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधील व्यक्तिविशेषांनी अशांना सर्वाधिकार बहाल केले. सर्वसमावेशकतेचा जप करणारे आणि इतिहासाचे धोके दाखवणारे ज्यूविरोधी नृशंस अत्याचाराचे दुःख समजून घेण्यात अपयशी ठरले.

विशेषतः संस्थांच्या मार्गदर्शकांना याची निःसंदिग्ध आणि नैतिक जाण नसणे, हे पटण्यासारखे नव्हते. बऱ्याच शैक्षणिक संकुलांच्या प्रमुखांना या घटनेवर भाष्य करणे, मत नोंदवणे आणि गरजूंना मदतीचा हात देण्याची मानसिकता बोलून दाखवणेही जड गेले.

ज्या वर्गांमध्ये एकेकाळी वस्तुनिष्ठ विचारांचे पाठ दिले जायचे, ऐतिहासिक तथ्ये चर्चिली जायची आणि सत्याचा शोध घ्यायला शिकवले जायचे, तेथे आता निवडक ‘नॅरेटिव्ह’ अंगीकारण्याचा कल दारांवर धडाका देऊ लागला आहे.

जेव्हा नामवंत शिक्षणसंस्था एकाऐवजी दुसऱ्या रूपातील अन्याय निवडतात आणि तेथे विद्यार्थ्यांची सुरक्षा पणाला लावली जाते, तेव्हा दांभिकतेचीच पायाभरणी होते! शैक्षणिक समूहांसाठी हा मार्ग केवळ सेवाभावाशी विसंगत नसून, त्यांच्या पायाभूत विचारसरणीशी, तत्त्वांशीही काडीमोड घेणारा ठरतोय. वैविध्य, सर्वसमावेशकता आणि सर्वांसाठी निःष्पक्ष शिक्षण, या तत्त्वांचा उदघोष करणाऱ्या संस्था नकळत त्यांच्या प्रतिमेला काळिमा फासताहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पुढे काय?

विद्यार्थ्यांची एक अशी पिढी (जी मंडळी भावी संचालन, व्यवस्थापन आणि नेतृत्वही करणार आहे) तयार होतेय, ज्यांच्यासमोर आपण भूतकाळ निरखणारे भिंग ठेवतोय, दडपशाहीवर नको तितका भर देतोय आणि स्वतःच्या शब्दांशी प्रामाणिक राहण्याचा वसा म्हणजे काय, याचा अर्थ धूसर करतोय.

पुरोगामी राजकीय भाष्यकार आणि सुप्रसिद्ध लेखकी वॅन जोन्स यांनी स्वतःचा दृष्टीकोन तपासल्यावर असे मत मांडले आहे की, “सद्यस्थितीत आपल्यापैकी बरेच जण इतर पुरोगामी मंडळींना त्यांच्या चुका दाखवण्यात मग्न आहेत. आपण विध्वंस जरूर करू शकतो, पण पुनर्निर्मितीचे काय? आपल्या हातांची ती सवय गेली आहे का? शैक्षणिक संकुलांमध्ये निषेधाचे मोर्चे काढण्यामध्ये आपल्याला यश मिळालंय, पण शैक्षणिक कार्यक्रम आपल्याला राबवता येतात का? विरोध करण्यामध्ये स्वारस्य असणे आणि अवघड समस्या सोडवण्याचे शिवधनुष्य उचलण्याचे धैर्य नसणे, अशी आपली अवस्था झालीय का? फक्त टीकेचे हत्यार परजता येतेय, पण सकारात्मक, विधायक असे काही जमत नाही, अशा स्थानकावर आपण येऊन ठेपलो आहोत का? निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी आवडतेय, पण नवा चांगला पदाधिकारी निवडण्याची कुवत आपल्यात उरली नाहीए. लोकांविरुद्ध आवाज उठवायला आपण नको तितके सक्षम झालो आहोत, पण लोकांना हात धरून वर काढणे मात्र शिकलो नाहीए. हे सत्य समाजांतर्गत धोके निर्माण करत आहे. बाह्य धोक्यांपेक्षा हे अधिक भयप्रद आहे.”

आपली सद्य शिक्षणव्यवस्था विद्यार्थ्यांना हिंसेच्या (शारीरिक, मानसिक) नवनव्या रूपांची तोंडओळख करून देत आहे, पण नजरेसमोरील जीवनविषयक समस्यांकडे सहानुभूतीने बघण्याचा दृष्टीकोन, करुणा मात्र शिकवत नाहीए. अशा पिढीला आपण पोसतोय जी ‘बळीकेंद्रित’ विचारसरणी अंगिकारते आहे. खरे तर आपल्याला विधायक, ताज्या मनाने, सकारात्मक नजरेने पुढे येऊन समस्या निवारण्याची मानसिकता असलेले तरुण हवे आहेत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आपल्यातील शैक्षणिक अप्रामाणिकपणाचा बुरखा फाडायला हवा, पूर्वापार चालत आलेले पण आता हळूहळू अडगळीत निघालेले शिक्षणव्यवस्थेचे स्तंभ डागडुजीच्या प्रतीक्षेत आहेत, हे सत्य पटवून घ्यायला हवे. आपल्या बऱ्याच नामवंत शिक्षणसंस्था भावी ‘नेतृत्वनिर्मिती’मध्ये कमी पडताहेत, हे समजावून घेण्याची गरज, आवश्यकता आणि निकड आहे. त्यासाठी संचालक, शिक्षक आणि विद्यार्थीच जबाबदार आहेत, हे दुर्दैवी सत्य स्वीकारायला हवे!

काय करायला हवे? तर-

१) स्वतःला नव्याने शिकवा. समाजमन आणि आपल्या नेमक्या समस्या काय आहेत, यापासून सुरुवात करा.

२) आपल्या सामायिक सिद्धान्तांचा पुनर्विचार करत त्याला ‘मानवते’ची किनार द्या. विवाद आणि ‘बळीं’चे राजकारण थांबवा.

३) जोपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्था खराखुरा संरचनात्मक बदल करण्याची तयारी दाखवत नाहीत, तोपर्यंत त्यांना दिले जाणारे अनुदान थांबवा.

४) खुले आम व्यक्त व्हा. टोकाच्या राजकीय आणि वैचारिक भूमिका घेणाऱ्यांनी संवादाची सर्व दारे प्रदूषित केलेली आहेत. त्यांनी समाजात त्यांच्या विचारांना वाढता पाठिंबा मिळेल, अशी पार्श्वभूमी तयार करून ठेवलीय. आसपासचा सर्व ‘प्राणवायू’ ताब्यात घेत त्यांनी बहुसंख्याकांना भयभीत करून ठेवले आहे. अशांनी तोंड उघडण्याची वेळ आता आली आहे, कारण अतिशय क्लिष्ट विषयही मुळापर्यंत जाऊन हाताळायची क्षमता याच मूग गिळून बसलेल्या बहुसंख्याकांकडे आहे. विशेषतः असहिष्णुता आणि दंभाच्या विरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. ‘मुकी बिचारी कोणीही हाका’ ही प्रवृत्ती सोडून न पटणाऱ्या सगळ्या धोरणांविरुद्ध बोलण्याची हीच वेळ आहे.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. नितीन देशपांडे शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक आहेत! त्यांची आजवर चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

deshpandenh@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा