नव्या ‘गाळीव इतिहासा’चे धडे आणि ‘त्यांचे’ वर्गातील ‘पाठ’!
संकीर्ण - व्यंगनामा
जयदेव डोळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 06 April 2023
  • संकीर्ण व्यंगनामा गाळीव इतिहास Galiv Itihas बापू Baapu महात्मा गांधी Mahatma Gandhi छ. संभाजी महाराज Sambhaji Maharaj चुगल-ए-आझम Chughal-E-Azam बेबी का मकबरा Beby Ka Maqbara

भाग पहिला

गोळ्यांचा आवाज कोणी ऐकला नव्हता. पिस्तुलाच्या नळीस ध्वनिरोधक बसवलेला होता. बापूंच्या तोंडी आधी ‘आ…’ असा आवाज निघाला. मग ते खाली पडले. सर्वांनी वर पाहिले. गोळ्या कोणीकडून आल्या असतील, याचा अंदाज त्यांनी घेतला. बापूंच्या रोजच्या प्रार्थनेच्या वाटेवर जी समीप क्षेत्रचित्रण करणारी उपकरणे बसवण्यात आली होती, त्यातील एका उपकरणाची जागा त्या भयंकर खुनी हत्याराने घेतल्याचे दिसले. कोणी तरी अत्यंत हुशार, चतुर, बुद्धिमान, चाणाक्ष व धाडसी आणि कल्पक व्यक्तीने उपकरणाच्या जागी दूरनियत्रंणाद्वारे झाडता येईल, असे एक पिस्तुल बसवलेले होते.

म्हणूनच कोणाला काही कळायच्या आत, आणि समोर कोणीही नसताना गोळ्या झाडल्या गेल्या व बापू कोसळले. आपला कोणाचाच हात या खुनात नाही, म्हणून जमलेल्या साऱ्यांना हायसे वाटले. सर्व जण त्या उंच जागी अजिबात संशय येणार नाही, अशा ठिकाणी जाऊन हत्यार ठेवणाऱ्याचे कौतुक करू लागले.

अशा प्रकारे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक बापू धारातीर्थी पडले. आपल्या हातून भारताचे राज्य हिसकावून घेणाऱ्या बापूंचा असा निकाल इंग्रजांशिवाय अजून कोण लावू शकले असते, अशी कुजबूज लगेच सुरू झाली. ब्रिटिश साम्राज्य असे दुष्ट आणि कावेबाज होते.

भाग दुसरा

धाकले महाराज यांना कैद कोणी केले? त्यांची जीभ कोणी कापली? त्यांचे डोळे कोणी फोडले? अखेरीस या शूर छत्रपतीच्या मृत्युस जबाबदार कोण होता?.... विद्यार्थ्यांनो, या प्रश्नांनी आमच्यासारखे इतिहासशिक्षक आजही बुचकळ्यात पडले आहेत. ते नक्कीच दरवडेखोर असतील. ठगसुद्धा असतील. कदाचित महाराज घुडसवारी करत असताना समोरील झाडेझुडपे त्यांना दिसली नसतील. कदाचित त्यांच्या समोरील घुडसवार आज अचानक ब्रेक लागल्यावर ट्रकवर मागून मोटारकार आदळते, तद्वत एकदम थांबला असेल आणि त्याच्या पाठीवरील भात्यातील तीर महाराजांच्या नेत्रांत घुसले असतील. त्या घुडसावर मावळ्याच्या पाठीवरील ढाल महाराजांच्या तोंडावर आपटली असेल. त्याने त्यांची जीभ कापली असेल.

कैदेत त्यांना ठेवायचा विचारही कोणी करू शकणार नाही, एवढी महाराजांची दहशत होती. त्यांना नक्कीच आज पक्षांतरामुळे होतो, तसा दगाफटका झालेला असणार. किंवा पुतीन त्यांच्या राजकीय विरोधकांचा जसा काटा काढतात, तसा एखादा ‘पुतीन’ महाराजांवर चाल करून गेला असेल.

काय सांगता येते का इतिहासाचे? इतिहासासारखी चंचल गोष्ट दुसरी कोणती नाही. आज इथे तर उद्या तिथे. विद्यार्थ्यांनो, ‘हलता इतिहास’, ‘सरकता इतिहास’ आणि ‘फिरता इतिहास’ आपल्याला चक्रावून सोडतो. त्यामुळे तुम्हाला जेवढे वर्गात शिकवले तेवढ्याचीच उत्तरे लिहा. तुम्हाला उत्तीर्ण केले जाईल.

भाग तिसरा

मुलांनो, आज मी तुम्हाला भारतीय चित्रपटांच्या इतिहासात महान कामगिरी बजावणाऱ्या एका चित्रपटाची माहिती देणार आहे. त्या थोर चित्रपटाचे नाव आहे- ‘चुगल-ए-आझम’! एका गावात एक मुलगा राहात होता. तो सारखा चहाड्या करी. चहाड्या म्हणजे हिंदीत ‘चुगली’. असा तो चुगलबहाद्दर होता. गावातल्या सर्वांच्या चुगल्या त्याने केलेल्या असल्याने त्याला ‘चुगल-ए-आझम’ असा किताब गावकऱ्यांनी दिलेला होता.

चुगलीखोर असला तरी हा मुलगा आजच्या भाजपच्या नेत्यांसारखा फार हुशार, सेवाभावी, राष्ट्रभक्त आणि शुद्ध चारित्र्याचा होता. त्याच्या बुद्धीवर आणि चुगली करण्याच्या धैर्यावर एक सुंदरी भाळली. ही सुंदरी गौतमीसारखी डान्स करून पोट भरी.

ती आपल्या मुलावर प्रेम करते, हे चुगलखोर सलीमच्या वडिलांना सहन होईना. त्यात सलीमही त्या नर्तकीच्या म्हणजे अनारकलीच्या प्रेमात पडला होता. या दोघांच्या प्रेमावर रचण्यात आलेले ‘जब प्यार किया तो, डरना क्या’ हे काव्य त्या काळी पंचक्रोशीत गाजू लागले होते. व्हायरल झाले होते, असेच म्हणा ना.

आज जशी एखादी व्हिडिओ क्लिप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये येऊन पडते, तशी सलीम व अनारकली यांची चोरटी भेट अवघ्या जनतेला आधीच माहीत होत असे. ही नाचरी मुलगी सलीमला त्याच्या वडिलोपार्जित धंद्यापासून दूर नेते आहे, असे वाटल्याने सलीमचे वडील अनारकलीस भिंतीत चिणून टाकतात.

त्या काळी लढायांमुळे कबरस्ताने गच्च भरल्याने, अशी उभी पुरण्याची नवी योजना सरकारने राबवायला सुरुवात केली होती. सलीम खूप रडला. त्यानेही ‘जिंदाबाद, जिंदाबाद, ये मुहब्बत जिंदाबाद’ असे करुण गीत गात प्राण सोडले.

अशा महान प्रेमकथेवरचा ‘चुगल-ए-आझम’ हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीत मानाचे स्थान टिकवून आहे. म्हणून मुलांनो, चुगली, चहाडी वाईट नसते. ते एक राष्ट्रकर्तव्य असून आजचे पत्रकार जसे भाजपचे काँग्रेसला व काँग्रेसचे भाजपला कळवतात, तसे तुम्ही करत राहिले पाहिजे.

भाग चौथा

हा पाहा मुलांनो, ‘बेबी का मकबरा’. रात्रीच्या वेळी किती छान दिसतो ना तो! त्या उंच मिनारांवर, त्या जाळीच्या खिडक्यांत कसे एलईडी चमकत आहेत… तर ही जी बेबी होती, ती म्हणजे आजची जी ‘बेटी बचाव, बेटी पढ़ाव’ योजना आहे, तशाच एका योजनेत शहीद झालेली बेबी. म्हणजे त्या काळी बायकांची फार वाईट स्थिती होती. युवक-युवती प्रेमात पडायचा तो काळ. विद्यार्थी परिषदेत जसे दादा व ताई यांचे नाते जपावे लागते, तसे त्या काळी सरकारने तमाम युवापिढीला राष्ट्रहितार्थ, राष्ट्ररक्षणार्थ भावनांच्या पाशात न अडकण्याचे आवाहन केलेले होते.

एकीकडून चीन, दुसरीकडून पाकिस्तान, तिसरीकडून ‘क्लायमेंट चेंज’ आणि चौथीकडून ‘दानीबानी’… असा आपला देश बेजार झालेला होता. सरकार म्हणत होते, ‘नोकऱ्यांची काळजी करू नका, बेकारीची भीती घेऊ नका… या… राष्ट्राच्या उभारणीसाठी सरकारचे हात बळकट करा. आधी लगीन ‘कोंडाळ्या’चे.’

त्याप्रमाणे सारी युवा पिढी राष्ट्रकार्यास लागली. नव्या राष्ट्रनिर्मितीस जुंपली. तरीही एक जोडपे कमी धीराचे निघाले. नवा देश जन्माला घालण्याऐवजी त्यांनी एका ‘बेबी’ला जन्म दिला. त्यांची सर्वांनी छी-थू केली. त्यांना प्रचंड पश्चात्ताप झाला.

अखेरीस त्या बेबीला त्यांचे दु:ख पाहावेना. ती स्वत:हून दूर निघून जाते म्हणाली आणि कंसमामाच्या तुरुंगात कृष्णाच्या बहिणी जशा अंतर्धान पावत, तशी ती झाली. तिच्या या त्यागाच्या स्मरणार्थ हा ‘बेबी का मकबरा’ तयार झाला.

बघा, किती त्यागी आहे आपला इतिहास!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......