जगातील दोन अब्ज लोकांचे वास्तव्य असलेला दक्षिण आशिया करोनाचे पुढचे केंद्र ठरू शकतो?
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
जोआना स्लेटर आणि निहा मासी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 23 March 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

गेल्या २५-३० वर्षांत नव-उदारमतवादी धोरणाचा स्वीकार मागास तसेच सर्वच विकसनशील देशांनी केला. त्यांना तो बऱ्याच प्रमाणात स्वीकारावा लागला हेही तितकेच खरे आहे. जागतिक बँकेने ऐंशीच्या दशकापासून आर्थिक संकटात असलेल्या देशांना नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार करण्यास भाग पाडले.

थोडक्यात, समाजवाद ते नव-उदारमतवाद असा प्रवास झालेल्या देशांची सरकारे सार्वजनिक क्षेत्रामध्ये कमीत कमी गुंतवणूक करण्यावर भर देऊ लागली. रोजगार, शिक्षण, आरोग्य या महत्त्वाच्या क्षेत्रांवरील आपला खर्च या देशांतील सरकारांनी कमी केला. आज याच कमकुवत यंत्रणा करोनाच्या लढ्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका पार पडणार आहेत.

परंतु नागरिकांनी जनता कर्फ्यू आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी टाळ्या, घंटानाद, तसेच ताटे वाजवण्याच्या पलीकडे आरोग्यसेवा, गरिबांना आर्थिक मदतीचे उपाय, हे जगभरातील आतापर्यंतच्या या लढ्यात असलेल्या देशांपासून शिकावे लागेल. केरळ या राज्याने उचलेली ठोस पावले म्हणजे जाहीर केलेली आर्थिक मदत, त्याचबरोबर कॅनडा व सिंगापूर यांच्या राष्ट्रप्रमुखांनी जाहीर केलेली मदत तेथील लोकांसाठी आशादायी आणि आश्वासक असून सरकारवरील विश्वास वाढवणारी आहे.

अशाच धोरणात्मक उपायांच्या आधारे चीनने करोनाची सुरुवात ज्या वूहानमध्ये झाली, तिथे प्रादुर्भावर नियंत्रण मिळवले आहे, ही गोष्ट जगाला सकारात्मक संकेत देते.

अनुवाद - नितीन सोनावणे, प्रज्ञा सोनावणे (ई-मेलneetinks@gmail.com)

.............................................................................................................................................

करोना वायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत दक्षिण आशियातील देश त्यांच्या काही बाबींमुळे विशेष महत्त्वाचे ठरतात. या भागातील शहरे गर्दीने गजबजलेली असून, तेथील कमकुवत आरोग्यसेवा यंत्रणा, तसेच गरीब-श्रीमंत यांच्यातील विशाल दरी आणि परिणामी, त्यांच्यातील सामान्य जनतेला प्राप्त न होऊ शकणाऱ्या आरोग्य सेवा यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

दक्षिण आशिया हा जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या घनता असलेला देशांचा समूह आहे. तसेच येथे जगातील एक चतुर्थ्यांश लोकांचे वास्तव्य आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदिव्ज या देशांचा समावेश होतो. या सर्व देशांची एकूण लोकसंख्या जवळ जवळ २ अब्ज इतकी आहे.

या आठ देशांमधील एकूण बाधितांची संख्या ६०० असून ती इतर बाधित देशांमधील बाधितांच्या संख्येच्या तुलनेत कमी आहे. तसेच या देशांनी काही महत्त्वाची पावले उचलली असून तशी खबरदारी अमेरिकेनेदेखील अद्याप घेतलेली नाही.

भारत सरकारच्या म्हणण्यानुसार अजून या विषाणूचा फारसा प्रसार लोकांमध्ये झालेला नाही. परंतु अत्यंत कमी प्रमाणात चाचण्या होत असल्याने तज्ज्ञांनी वरील दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते भारत आणि शेजारील देश येणाऱ्या काळात अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचणार असून, त्यात या विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल आणि कमकुवत वैद्यक यंत्रणेवर याचा कैक पटीने ताण वाढणार आहे. भारतीय विषाणूतज्ज्ञ टी. जेकब जॉन यांच्या मते, येणाऱ्या दिवसांमध्ये विषाणूबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत जाणार असून अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवणार आहे.   

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना ‘वर्क फ्रोम होम’ करण्याच्या सूचना दिल्या, तसेच १४ तासांचा जनता-कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले, ज्याला त्यांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याच्या तयारीचा भाग म्हणून सूचित केले.

जर विषाणूचा प्रादुर्भाव झाला तर दक्षिण आशियावर गंभीर स्थिती ओढवणार आहे. आतापर्यंतच्या सर्व बाधित देशांपेक्षा सर्वांत कमी तयारी असणारे हे देश आहेत. आरोग्य क्षेत्रातील अल्प गुंतवणूक आणि आरोग्य सेवा प्राप्त करण्याच्या संधी अत्यंत असमान आहेत (global rankings of quality of health careच्या यादीनुसार श्रीलंका आणि मालदिव्ज हे अपवाद आहेत).

The Organisation for Economic Cooperation and Development (OECD)च्या माहितीनुसार भारतामध्ये प्रत्येक १००० व्यक्तीसाठी ०.५ हॉस्पिटल बेड्स आहेत. या तुलनेत इटलीकडे ३.१ तर दक्षिण कोरियाकडे १२ हॉस्पिटल बेड्स आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकत्याच असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशी चिंता व्यक्त केली आहे की, ‘विषाणू प्रसार झाल्यास समस्या वाढतील. त्याला सामोरे जाण्यासाठी आमच्याकडे तशी क्षमता नाही आणि त्यासाठी लागणारी संसाधनेदेखील नाहीत.’

पाकिस्तान याबाबतीत विशेष काळजीचे कारण बनला आहे. २०० दशलक्ष लोकसंख्या आणि अतिशय दुबळी आरोग्य सेवा यंत्रणा असलेल्या या देशात, गेल्या काही दिवसांत करोना बाधितांची संख्या दहापट वाढली आहे. म्हणजेच केवळ एका आठवड्यात ही संख्या २८ वरून ३२६वर पोहोचली. करोना बाधितांमध्ये सर्वांत जास्त संख्या पाकिस्ताच्या सीमेला लागून असलेल्या इराण या देशातून परत आलेल्यांची आहे. मागील आठवड्यात पाकिस्तानने सर्व शाळा बंद केल्या तसेच सार्वजनिक जमावबंदी लागू केली.

श्रीलंकेतदेखील करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या शेवटी ही संख्या ६ वरून ५३ वर पोहोचली. सर्वाधिक पर्यटक पसंती असलेल्या श्रीलंकेने मंगळवारी त्यांच्या देशात येणारी सर्व उड्डाणं थांबवली. पुढील दोन आठवडे पर्यटक या बेटाबाहेर जाऊ शकतील, परंतु आत प्रवेश करू शकणार नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाच्या विभागीय संचालिका पूनम खेतरपाल यांच्या मते भारत आणि शेजारील देश यांना उच्च धोका संभवतो. त्यांनी या देशांना विषाणूबाधित व्यक्ती शोधण्याचे आणखी व्यापक प्रयत्न करण्याचे, तसेच इस्पितळे सक्षम करण्याचे आव्हान केले आहे.

काही तज्ज्ञ भारताने शीघ्र कृती केल्याबद्दल, त्याचबरोबर वाढत्या रुग्णांच्या संख्या मोकळेपणाने जाहीर केल्याबद्दल सरकारला श्रेय देतात. भारताने सीमारेषा पार करण्यावर बंदीची घोषणा केली आहे. देशात येणाऱ्या सर्व प्रवाश्यांचे व्हिसा रद्द केले आहेत आणि २२ मार्चपासून संपूर्ण देशात येणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. थोडक्यात आणखी प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःला अधिकाधिक प्रमाणात जगापासून बंद केले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार गुरुवारपर्यंत भारताने १२,४०० व्यक्तींवर करोना विषाणूच्या चाचण्या केल्या आहेत. या चाचण्या सरकारी प्रयोगशाळेत मोफत केल्या गेल्या असून, सदर चाचण्यांचा दर हा एक दशलक्ष रहिवाशांसाठी ९ असा आहे. हाच दर अमेरिकेमध्ये अंदाजे ११४, तर दक्षिण कोरियामध्ये ६००० इतका आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत १६३ व्यक्तींना या विषाणूची लागण झाली आहे. परंतु भारत सरकारने या रोगनिदान चाचण्या मर्यादित स्वरूपात केल्या आहेत. यामध्ये बाधित देशांमध्ये प्रवास करून आलेले व अशांच्या संपर्कात आलेले, तसेच ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळतात एवढ्याच लोकांच्या चाचण्या केल्या. याबद्दल भारतीय आरोग्य मंत्रालयातील एक अधिकारी लव अग्रवाल असे सांगतात की, व्यापक चाचण्यांमुळे निष्कारण भीती पसरण्याचा धोका संभवतो. त्यांच्या म्हणण्यानुसार विषाणूचा प्रादुर्भाव समाजात पसरला आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी देशभरात श्वसनाचे आजार असणाऱ्यांच्या चाचण्या आमचे अधिकारी करत आहेत आणि त्याचे परिणाम आजपर्यंत निगेटिव्ह आलेले आहेत.

या विषाणूला काही आवश्यक अटकाव करणे पुण्यासारख्या ठिकाणांवर अवलंबून आहे. कारण तेथील लोकसंख्या पाच दशलक्ष असून हे शहर भारताची आर्थिक राजधानी मुंबईपासून तीन तासाच्या अंतरावर आहे. पुणे शहरात सात, तर उपनगरात ११ रुग्ण आढळले असून हे सर्व लोक परदेशातून प्रवास करून आलेले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार अजून या विषाणूचा फारसा प्रसार लोकांमध्ये झालेला नाही.

पुणे शहराच्या पिंपरी-चिंचवड उपनगरात प्रशासन जे बाधितांच्या संपर्कात आले होते, अशा २०० जणांवर लक्ष ठेवून आहे, तसेच संशयित बाधितांचे विलगीकरण करण्यासाठी सुविधा सज्ज केली आहे. “आम्ही प्रसार होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेत आहोत. आम्ही सगळ्यांना घरी राहण्याचे आव्हान केले आहे”, असे पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.   

संदीप बेलसरे हे येथील एका ऑटोमोबाईल पार्टसच्या कारखान्याचे मालक तसेच लघुउद्योग उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या सद्स्यानुसार सुमारे १५ टक्के कामगार - ज्यातील अनेक भारताच्या इतर भागातील स्थलांतरित मजूर आहेत -  गेले दोन दिवस कामावर गैरहजर आहेत. बेलसरे यांच्या म्हणण्यानुसार भीतीचे वातावरण किती पसरले आहे, हे या वरून लक्षात येते. मजुरांचे कुटुंबीय त्यांना घरी परतण्यास सांगत आहेत.  

प्रामुख्याने भारतातील गर्दीने गजबजलेल्या शहरांमधील प्रशासनाने सध्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ म्हणजेच प्रत्येकाने इतर कुणाशीही ठराविक अंतर ठेवणे असे उपाय पाळण्यास सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार दिल्ली हे जगातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असून, यामध्ये मुंबई हे सातव्या क्रमांकावर येते. (बांगलादेशातील ढाका नवव्या क्रमांकावर येते.) संपूर्ण भारतामधील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मोठ्या सभा/कार्यक्रम आणि मॉल्स बंद करण्याचे आदेश मोठ्या प्रमाणावर दिले गेले आहेत. देशातील प्रमुख पर्यटनस्थळे – उदा. ताजमहल ओसाड पडला आहे, तर कायम गर्दी असणारे मुंबईतील समुद्रकिनारे निर्मनुष्य झाले आहेत.

परंतु बहुतांश भारतीयांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून कार्यालयीन काम करणे, तसेच ‘सेल्फ क्वारनटाईन’ म्हणजेच विलगीकरण, हे प्रकार विचार करण्याच्या पलीकडचे आहेत. तमिळनाडू येथील डॉक्टर विजयप्रसाद गोपीचंद्रन यांनी त्यांचा एका ग्रामीण भागातील छोट्या क्लिनिक- मधील करोनासारखी लक्षणे असलेल्या एका रुग्णाच्या बाबतीतला अनुभव सांगितला. ही महिला एका छोट्या खोलीच्या झोपडीत तीन अन्य लोकांसोबत राहते, तसेच आपले पोट भरण्यासाठी तिला रोज काम करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत ‘सोशल डिस्टन्सिंग’सारख्या कल्पना ‘अव्यवहारी’ व ‘परकीय’ वाटतात, असे ते म्हणतात.

भारतात तसेच शेजारील देशांत अत्यावश्यक क्वारनटाईन, तसेच ‘सोशल डिस्टन्सिंग’सारख्या उपाययोजना कितपत प्रभावीपणे राबवल्या जातील, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. मुंबईमध्ये लोकांनी सूचनांचे उल्लंघन करू नये म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी क्वारनटाईनमध्ये असणाऱ्या लोकांच्या हातावर शिक्के मारण्यास सुरुवात केली आहे. परंतु बुधवारी, असेच हातावर शिक्के असलेल्या चार व्यक्ती ट्रेनमध्ये सापडल्या आणि त्यांना तिथून उतरवले गेले.

भारत आणि शेजारील देशामध्ये लागण झालेल्यांमध्ये मोठी वाढ झाल्यास येथील आरोग्य सेवा अतितणावाखाली ढासळून जातील. मुंबईस्थित प्राध्यापक, भूलतज्ज्ञ आणि ‘इंडियन जर्नल ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीन’चे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या मते देशात अतिदक्षता सेवा बेड्स व व्हेंटिलेटर यांच्या उपलब्ध संख्येबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. अशा प्रकारचे अतिदक्षता विभाग हे मोठ्या शहरांमध्ये एकवटलेले आहेत आणि ते शक्यतो नफा तत्त्वावर चालणाऱ्या दवाखान्यांमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे. हे उपचार बहुतांश भारतीयांना परवडणारे नाहीत.

करोनाविरुद्धच्या लढाईत दक्षिण आशियाकडे काही जमेच्या बाजू आहेत. जसे की प्रामुख्याने युवा वर्गातील लोकसंख्या आणि मोठे जनरिक औषध उद्योग क्षेत्र. या विषाणूने जर सर्वसामान्य फ्लूप्रमाणे वाटचाल केली, तर मे-जून महिन्यांमध्ये तापमान वाढीमुळे विषाणू बाधितांची संख्या ओसरेल आणि जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा उद्भवेल.

सध्या दक्षिण आशियाई देश या संसर्गावर अटकाव करण्यासाठी सगळी ताकद लावत आहेत, ते या आशेवर की, एवढे पुरेसे आहे. एक रुग्ण आढळलेल्या भूतानने सर्वत्र बंदी जाहीर केली आहे. प्रचंड मोठी लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक असलेल्या बांगलादेशने केवळ १९ रुग्ण आढळल्यानंतर सर्वत्र निर्बंध जाहीर केले. मात्र बांगलादेशचे वायरोलॉजी विभाग प्रमुख सैफ उल्लाह मुन्शी म्हणतात की, ‘हे सांगणे अवघड आहे की, आमची तयारी पूर्ण आहे किंवा नाही. कारण हा विषाणू कुठल्याही क्षणी लोकसमूहामध्ये पसरू शकतो.’

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी वृत्तलेख ‘द वाशिंग्टन पोस्ट’ या दैनिकात २० मार्च २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेख पाहण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

हेही पाहा, वाचा

जगातील दोन अब्ज लोकांचे वास्तव्य असलेला दक्षिण आशिया करोनाचे पुढचे केंद्र ठरू शकतो? - जोआना स्लेटर आणि निहा मासी

https://www.aksharnama.com/client/article_detail/4116

लोकांच्या राष्ट्रवादी आकांक्षांकडे पुरोगाम्यांनी दुर्लक्ष केल्यानं हा देश रसातळाला जाण्याची वेळ आली आहे, एवढा धडा करोनापासून आपण शिकायला हवा! - सुनील तांबे

https://www.aksharnama.com/client/article_detail/4115

करोना व्हायरस : कुठलाही आजार काही प्रमाणात जैविक, तर काही प्रमाणात सामाजिक-सांस्कृतिक असतो. - अनुज घाणेकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/4114

 

करोना व्हायरस : अफवा, गावगप्पा आणि व्हॉटसअ‍ॅप युनिव्हर्सिटीवरील ‘फॉरवर्ड’ नावाची फेकमफाक यांच्यापासून सावध रहा - टीम अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/4108

करोना व्हायरस : तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात, ते आणि तेवढंच ऐका; अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका

https://www.aksharnama.com/client/article_detail/4106

साथीचे आजार आणि जागतिकीकरण यांचा संबंध आता अधिक गुंतागुंतीचा बनला आहे!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4103

करोना विषाणूमागे षडयंत्र असणार आणि या संकटाला कोणीतरी जबाबदार असणार, ही जनभावना आहे!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4099

फक्त ‘साथीच्या रोगाने येणारे मरण’ आपल्याला एकत्रित आणू शकते?

https://www.aksharnama.com/client/article_detail/4107

करोनाचा तात्पुरता ‘साईड इफेक्ट’ : पर्यावरणपूरक जीवनशैली

https://www.aksharnama.com/client/article_detail/4100

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा