दिवसा रझाकार यायचे, रात्री ‘ते’ यायचे : तेलंगणातील स्त्रियांच्या आठवणीतली ‘पोलीस ॲक्शन’
पडघम - सांस्कृतिक
ए. सुनीता
  • ‘पोलीस ॲक्शन’च्या काळातील भारतीय सैन्याचे दोन जवान
  • Wed , 11 October 2023
  • पडघम सांस्कृतिक खिडकी कलेक्टिव्ह Khidki Collective हैदराबाद संस्थान Hyderabad State निज़ाम Nizam मुक्तिसंग्राम एमआयएम MIM मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन All India Majlis-e-Ittehadul Muslimeen

‘खिडकी कलेक्टिव्ह’ (Khidki Collective) हा इतिहास, राजकारण आणि संस्कृती यांवरच्या सार्वजनिक चर्चेला प्रोत्साहन देणाऱ्या युवा इतिहासकारांचा एक संच\ग्रूप आहे. दख्खनचा बहुभाषिक-बहुधर्मीय इतिहास, संस्कृती आणि साधनं जपणं, हा त्यांचा उद्देश आहे. त्यांची सध्या हैदराबाद मुक्ती संग्राम आणि १९४८च्या पोलीस अ‍ॅक्शनवरील ‘एकच कथानक असल्याचे धोके’ ही मालिका ‘newsminute’ या इंग्रजी पोर्टलवर प्रकाशित होत आहे. ‘खिडकी कलेक्टिव्ह’च्या स्वाती शिवानंद, यामिनी कृष्ण आणि प्रमोद मंदाडे यांनी हे लेख एकत्र आणले आहेत. ही मालिका कन्नड, उर्दू, तेलुगूमध्येही प्रकाशित होत आहे. आजपासून ती ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होईल.

ही मालिका १९४८च्या पोलीस कारवाईबद्दल विविध पर्यायी दृष्टीकोन मांडण्याचे काम करते. हैदराबाद संस्थानाच्या ‘मुक्तीसंग्रामा’च्या स्वरूपातल्या प्रभावी मांडणीचा सध्याच्या द्वेषयुक्त राजकारणासाठी वापर होतो आहे. ही मालिका या ढोबळ मांडणीला आव्हान देऊन, या घटनेतील गुंतागुंत उलगडण्याचे काम करते.

या मालिकेतला हा पाचवा लेख...

.................................................................................................................................................................

हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी १९९८पासून ‘१७ सप्टेंबर’ हा दिवस ‘मुस्लीम असफजाही शासकांच्या क्रौर्याचा स्मरणदिन’ म्हणून साजरा करायला सुरुवात केली. तेव्हापासून तत्कालीन आंध्र प्रदेशात ’१७ सप्टेंबर’विषयी तीव्र पडसाद उमटत आले आहेत. अठराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या काळात या प्रदेशावर असफजाही घराण्याची सत्ता होती. त्यातला शेवटचा राज्यकर्ता होता उस्मान अली खान.

हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी ‘ऑपरेशन पोलो’ उर्फ ‘पोलीस ॲक्शन’ केली गेली. त्याला ‘हैद्राबाद मुक्ती’ असंही संबोधलं जातं. पण या सगळ्या घटनांच्या संदर्भचौकटीत त्या पोलीस ॲक्शनविषयीच्या आठवणी काय आहेत, ‘हैद्राबाद मुक्ती’ या अर्थाखेरीज इतर काही अर्थ त्या ॲक्शनशी निगडीत आहेत का, हे तपासण्याची संधी समोर आली. आणि मला १९९७-१९९८ साली तेलंगणातल्या वृद्ध स्त्रियांच्या मुलाखती आठवल्या. त्यांचे विविधांगी अनुभव तपासले, तर त्यांतून काही निराळं हाती आलं.

१९२०-३०च्या दशकांत जन्मलेल्या त्या स्त्रिया राजकारणामध्ये वा चळवळीत सहभागी झालेल्या नव्हत्या. पण हिंसेबद्दलच्या दैनंदिन अनुभवांविषयी बोलताना, ‘पोलीस ॲक्शन’, ‘रझाकार’, ‘बॉम्ब’ या गोष्टींचा उल्लेख ‘अपवादात्मक’ आणि ‘खळबळजनक घटना’ म्हणून त्यांच्याकडून पुन्हा-पुन्हा होत राहिला. वर्षानुवर्षं जंगलात राहावं लागण्यापासून ते महिनो न् महिने गोंधळाची परिस्थिती सोसत राहण्यापर्यंत, गावांत राखण करावी लागण्यापासून ते खून-हाणामार्‍या नेहमीच्या होण्यापर्यंत, अनेक प्रकारचे अनुभव ‘पोलीस ॲक्शन’च्या आठवणी’ या सदराखाली त्यांनी नोंदवल्या. ‘मुक्ती’, ‘स्वातंत्र्य’ वा ‘सार्वभौमत्व’ असे शब्द मी सुचवून पाहिले, मात्र ते त्या स्त्रियांनी वापरले नाहीत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गाड्यांमधून उडवल्या जाणार्‍या बंदुकीच्या फैरी आणि बॉम्बस्फोट

वारंगळ शहराला लागूनच वारंगळ किल्ल्याचा भाग आहे. तिथं सशस्त्र संघर्ष तीव्र होता. भीतीचं आणि दहशतीचं वातावरण असूनही तितले बरेच लोक गावात आणि गावाच्या जवळच राहिले होते, असं वारंगळमधल्या स्त्रियांनी सांगितलं. कारण त्यांना इतर कुठे जाणं परवडण्यासारखं नव्हतं.

शांतम्मा या एक मडिगा शेतमजूर. ‘रक्तपिपासू रझाकार’ येत असल्याची बातमी ऐकल्यावर त्यांच्या बरोबरचे मजूर पळून गेले, पण त्या मात्र थांबल्या. काम केलं नाही, तर पोट भरता येणार नाही, असं शांतम्मांनी त्यांना सांगितलं. पण त्यांना हाकलून देण्यात आलं.

एरम्मा या तेलगा शेतमजूर. त्यांच्या गावातल्या लोकांची पोटं मजुरीवर अवलंबून होती. त्यामुळे त्यांच्यापैकीही कुणी गाव सोडून गेलं नाही, असं त्या सांगत होत्या. ‘तुरकोल्लू’ (मुस्लिमांच्या पश्चिम आशियाई मुळांमुळे त्यांना उद्देशून वापरला जाणारा बोली भाषेतला शब्द) घरांची झडती घ्यायला येत असल्याचं पाहून अगदी घाबरून गेल्याचं एरम्मांना आठवतं. तरीही सगळे जण घर धरून राहिले. एरम्मांना आठवतं त्यानुसार गावाजवळच्या टेकड्यांवर बरेच बंदूकधारी लोक राहत होते.

अजून एक विचित्र बाब म्हणजे, एरम्मांच्या आठवणीनुसार फक्त मुस्लीम लोक गाव सोडून गेले. या स्त्रियांपैकी फक्त पोशम्मा या एरुकला बाईंची आठवण निराळी आहे. त्यांचं सगळं कुटुंब जंगलात पळून गेलं. ते गावात परत आलं, ते तब्बल दोन-तीन वर्षांनी – मधल्या काळात जन्मलेली दोन पोरं पदरात घेऊन. त्यांच्यापैकी बर्‍याच जणींना ‘वीदी मोटार्लू’ (रस्त्यांवरच्या गाड्या) आठवतात. सतत बंदुकांच्या फैरी झडत असत, बॉम्बचे स्फोट होत, पण थेट हिंसेचे अनुभव मात्र नाहीत. मात्र हे बरेच दिवस चाललं, असं त्यांना आठवतं.  

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

हैदराबाद-दक्खनमधील हिंदू-मुसलमान द्वंद्वाला छेद देणारा जातीय राजकारणाचा इतिहास

तेलुगू सिनेमांत हैदराबादच्या इतिहासाचे जाणूनबुजून विकृतीकरण केले जाते…

हैदराबादमधील ‘दलित रझाकार’ नावाचा त्रासदायक भूतकाळ, अल्पसंख्याकांची युती आणि ‘पोलीस ॲक्शन’

१९४८च्या ‘पोलीस ॲक्शन’चे ध्रुवीकरण केले जात आहे. या काळातली जातीय सलोख्याचीही कितीतरी उदाहरणे आहेत. ती उजागर करण्याची गरज आहे!

..................................................................................................................................................................

१९४७ ते १९४८ या दरम्यान ‘रझाकार चळवळ’ सक्रिय होती. हैद्राबाद पोलीस आणि सैन्यदल या दोघांना ती पूरक होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली संघर्ष करणार्‍या तेलंगणातल्या कार्यकर्त्यांवर आणि गावकर्‍यांवर रझाकार हल्ले करत, त्यांना ठारही मारत. भारतीय संघराज्याच्या सैन्यासह होऊ घातलेल्या लढ्यात हैद्राबाद सैन्याला मदत करण्याचा त्यांचा हेतू होता. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थानाने भारतीय संघराज्याच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली. त्याच दिवशी रझाकार चळवळही संपुष्टात आली.

मात्र भारतीय सैन्य पुढेही काही वर्षं तेलंगणामध्येच राहून तिथल्या खेडोपाड्यांमधल्या शेतकरी कार्यकर्त्यांची धरपकड करणं, मारझोड करणं इत्यादी कृत्यं करत राहिलं. तेलंगणा चळवळीशी काहीही संबंध नसलेल्या शेतकरी बायांच्या दृष्टीने ‘रक्तपिपासू रझाकार’, निजामाचे पोलीस, बंदुका झाडत फिरणार्‍या संघम टोळ्या (शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते) आणि भारतीय सैन्यातले जवान, हे सगळेच एकमेकांमध्ये मिसळून गेले होते. दिवस फार वाईट होते. दैनंदिन आयुष्य विस्कटून गेलं होतं. सगळीकडे दहशतीचं वातावरण होतं.

दिवसा रझाकार आले, रात्रीतेआले

इरावती ही गुंटूरहून महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बोधनजवळच्या एका गावात स्थलांतरित स्त्री. महाराष्ट्रामधल्या ‘इतर’ लोकांनी त्या काळात अनेक गावं लुटली, असं ती सांगत होती. गावकर्‍यांनी सहा महिने जागता पहारा ठेवला होता. इरावतीच्या म्हणण्यानुसार “ ‘त्या’ लोकांकडे बंदुका असायच्या. त्यांना दयामाया म्हणून अजिबात नव्हती.” त्यामुळे जवळच्या मोला-महागाच्या वस्तू रोज रात्री जमिनीत पुरून ठेवल्याची आठवण ती सांगत होती.

तिच्या शेजारच्या गावातल्या एका श्रीमंत बाईची आठवण तिला अजूनही आहे. तिला लुटून, मारहाण करून ठार करण्यात आलं. “ ‘रझाकार’ दिवसा यायचे, ‘ते’ रात्री यायचे...” असं सांगत ती पुन्हा-पुन्हा दोन्हींमधला फरक अधोरेखित करत होती. तिच्या आठवणीनुसार दिवसा येणारे लोक मुस्लीमही नव्हते. ते गणवेश घालणारे, ‘खालच्या जाती’चे, चाकरमानी लोक होते. तिच्या आठवणीनुसार त्यांना गावोगावी अन्न मागत फिरणं जमत असे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मग गावागावांतून रात्रीबेरात्री धाडी घालणारे ‘ते’ लोक कोण होते? जवळ-जवळ दशकभरानंतर माझ्या ध्यानात आलं. हैद्राबाद संस्थानात सगळीभर छावण्या टाकून बसलेले आणि संस्थान ‘मुक्त’ करण्यासाठी ‘गनिमी हल्ले’ करणारे हे लोक ‘स्वातंत्र्यसैनिक’ होते. रझाकार हैद्राबाद संस्थानचं सार्वभौमत्व राखायच्या प्रयत्नात होते, तर ‘स्वातंत्र्यसैनिक’ हैद्राबाद संस्थान ‘स्वतंत्र’ करण्याच्या. या दोहोंच्या संघर्षातून अराजक जन्माला आलं.

‘संस्थान’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या शेकडो लहान-मोठ्या सार्वभौम राज्यांचा ताबा मिळवण्याची जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात आलेल्या भारतीय शासनावर होती. इरावती ज्या ‘स्वातंत्र्यसैनिकां’विषयी सांगत होती, त्यांचा उदय या पार्श्वभूमीवर झाला. त्यांनी निजामाला शरणागती पत्करायला भाग पाडलं.

निझाम आणि भारतीय शासन यांच्यामध्ये परिस्थिती ‘जैसे थे’ राखण्याचा करार झाला होता, वाटाघाटी चालू होत्या. मात्र भारतीय शासनाचा पाठिंबा असलेल्या ‘काँग्रेस कार्यकर्त्यां’नी सगळ्या हैद्राबाद संस्थानात कशा छावण्या टाकल्या, दहशतीचं आणि गोंधळाचं वातावरण पसरवून अराजक कसं निर्माण केलं, हे खंडेराव कुलकर्णी आणि पी. ए. रामाराव यांनी त्यांच्या लेखनामध्ये नोंदवलं आहे. १९४८मध्ये भारतीय शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये याच अराजकाकडे लक्ष वेधण्यात आलं. कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्यात हैद्राबाद सरकारला आलेल्या अपयशाचं कारण देऊन ‘पोलीस ॲक्शन’ करण्यात आली.

इरावतीच्या आठवणीप्रमाणे हल्ले जसे एकाएकी सुरू झाले होते, तसेच एके दिवशी थांबले. त्या दिवशी रझाकारांचे गणवेश, चाकू आणि बंदुका गावाभोवती ढिगाऱ्याने पडलेल्या सापडल्या. सैन्याने पुष्कळ मुस्लिमांना रांगेत उभे करून बेदम मारहाण केली. पुढच्या काही काळात नांदेडमधून पळून येणाऱ्या मुस्लिमांचा ओघ चांगलाच वाढला. हे लोक पुढे किरकोळ नोकऱ्या आणि बारीकसारीक व्यवसाय करू लागले.

इरावतीला एका मासेविक्रेत्याची आठवण आहे. त्याने तिला सांगितलं की, त्याची स्वतःच्या मालकीची गिरणी होती. त्यात साठेक जण कामाला होते, पण त्याला लुटून हाकलून देण्यात आलं. कितीतरी मुस्लीम लोक आपलं घरदार, मुलंबाळं आणि आप्त गमावून बसले.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

हैदराबाद-दक्खनमधील हिंदू-मुसलमान द्वंद्वाला छेद देणारा जातीय राजकारणाचा इतिहास

तेलुगू सिनेमांत हैदराबादच्या इतिहासाचे जाणूनबुजून विकृतीकरण केले जाते…

हैदराबादमधील ‘दलित रझाकार’ नावाचा त्रासदायक भूतकाळ, अल्पसंख्याकांची युती आणि ‘पोलीस ॲक्शन’

१९४८च्या ‘पोलीस ॲक्शन’चे ध्रुवीकरण केले जात आहे. या काळातली जातीय सलोख्याचीही कितीतरी उदाहरणे आहेत. ती उजागर करण्याची गरज आहे!

..................................................................................................................................................................

उस्मान अली खान मरण पावला आणि माझ्या नवर्‍याची नोकरी गेली

खिला वारंगळमधल्या स्त्रियांनी स्वतःहून पोलीस कारवाईचा विषय काढला नाही. त्यांना खोदून विचारल्यावर त्यांनी त्याबद्दलचे अनुभव सांगितले. मात्र जुन्या हैद्राबादमधल्या मुस्लीम महिलांनी त्यांच्या कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल विचारताच तत्काळ पोलीस ॲक्शनबद्दल बोलायला सुरुवात केली. मी ज्या दहा जणींशी बोलले, त्यांपैकी पाच जणी शहरात स्थलांतरित झालेल्या होत्या, किंबहुना बिदर जिल्ह्यातल्या कल्याणमधून त्या पळून आलेल्या होत्या. ‘पोलीस ॲक्शन’चं भीषण संकट त्यांच्यावर कोसळलं आणि त्यांच्या आयुष्याची वाताहात झाली.

मुस्लीम पुरुषांना त्यांच्या शेता-शेतांतून कसं ओढून नेण्यात आलं आणि ठार करण्यात आलं, ते आयशा बी यांनी सांगितलं. त्यात नवरा, दीर आणि सासरा यांना ती गमावून बसली. त्यांचं घर-दार, मालमत्ता, अगदी दारातल्या आंब्याची झाडंही बळकावण्यात आली. शहरातून पळून जाऊन ती बहादूर यार देवडीच्या आश्रयाला गेली. पुढे तिनं विड्या वळण्याचं काम पत्करलं.

अमीना बी एका शिंपी कुटुंबातली. तिचीही कहाणी काहीशी अशीच आहे. तिच्या चुलत सासर्‍याला उभ्या ज्वारीच्या पिकातून खेचून नेण्यात आलं. पुढे त्याचा काहीच पत्ता लागला नाही. तिचं कुटुंब शहरातून कसंबसं पळून गेलं. या सगळ्या गदारोळात जरीना बेगमचे बरेच पुरुष नातलग ठार झाले.

चांद बी एका शेतकरी मजूर कुटुंबातली. घरातले बरेचसे पुरुष ठार झाल्यावर तिचंही कुटुंब शहरातून परागंदा झालं.

‘एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या दोन समूहांमधली दंगलसदृश परिस्थिती’ असं वर्णन या बायांच्या बोलण्यात आलं नाही. कोणत्याही कारणाविना ‘हिंदूं’नी केलेला एकतर्फी हल्ला आणि हिंसा, असंच हे वर्णन होतं. हल्लेखोरांचं वर्णन करताना ‘हिंदुवा’ याखेरीज इतर कुठलीही लक्षणं या बायांना जाणवली नाहीत, तसाच हल्लेखोरांच्या हेतूंचाही अंदाज आला नाही. त्यांचं या लोकांशी काही नातं नव्हतं, ओळखपाळख नव्हती, वैर तर दूरच राहिलं.

गावातली मुस्लीम घरं टिपून जाळपोळ आणि मारझोड करणारे हे हल्लेखोर कोण, हे या बायांना सांगता आलं नाही. “ते लोक दुसर्‍या कुठल्या तरी गावातून आले. कोण होते, त्यांनी असं का केलं, आम्हांला माहीत नाही”, हाच सूर पुन्हा पुन्हा ऐकू येत राहिला. त्यांच्या आठवणी घरादाराशी, सणासमारंभांशी, लग्नाबारशांशी निगडीत होत्या. त्यात कुठल्याही सार्वजनिक वा राजकीय घटनेची आठवण नव्हती.

मात्र भारतीय सैन्याचं आगमन, दंगली-‘झगडे-पंचंडा’ (तंटेबखेडे), ‘गदर’ (विश्वासघात), ‘भागमभाग’ (पळून जाणं)... हा सगळा विध्वंस या दोहोंमध्ये स्पष्ट आणि सरळसरळ दुवा असल्याचं त्यांना जाणवतं. त्यांना जेव्हा दिलासा हवा होता, तेव्हा भारतीय शासन गायब होतं. जमीनदारांच्या खाजगी देवड्यांमधून आणि हैद्राबादमधल्या मशिदींमध्ये त्यांना जवळपास वर्षभर ठेवण्यात आलं. घरदार, गाव, पुन्हा कधीही नजरेसही पडू शकलं नाही. या सगळ्या उलथापालथीमध्येच त्यांच्या आजच्या दारिद्र्याची आणि दुःखाकष्टांची मुळं आहेत, असं त्यांना वाटतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या सगळ्यामागे अनेक घटक होते. ‘स्वातंत्र्यसैनिकां’चा सुकाळ होता. हैद्राबाद संस्थानाच्या आणि तेलंगणातल्या ग्रामीण भागातल्या जमीनदारांच्या रक्षणासाठी रझाकारांचा झगडा चालू होता. हैद्राबाद संस्थान मुस्लीम सम्राटाच्या पकडीतून ‘मुक्त’ करण्यासाठी सशस्त्र भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचा लढा चालू होता. हिंसक गुंडांनी पोलीस ॲक्शननंतरच्या या नव्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला आणि मुस्लिमांचा नायनाट करून ‘हिंदू’ सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला.

सर्वसामान्य स्त्रियांसाठी पोलीस ॲक्शन ही एक त्रासदायक, दहशत पसरवणारी, वेदनादायी आणि अंदाधुंदीची घटना होती. लिंग-जातीच्या उतरंडीत या बायांचं जे स्थान होतं, त्यानुसार त्यांना या घटनेची झळ लागली. १७ सप्टेंबरचा दिवस साजरा केल्याची आठवण इरावतीला होती, पण इतर स्त्रियांनी मात्र अशी आठवण नोंदवली नाही. ‘स्वातंत्र्य’ आणि ‘सार्वभौमत्व’ हे दोन शब्द त्यांच्या वर्णनात कुठेच नसल्याचं ठळकपणे लक्षात येत होतं.

खिला वारंगळमधल्या स्त्रियांकरता पोलीस ॲक्शनची वर्षं मोठी खडतर होती. पण बिदरमधल्या बायांचं आयुष्य मात्र पोलीस कारवाईच्या घटनेमुळे दुःखा-कष्टात आणि दारिद्र्यात लोटलं गेलं. त्या अक्षरशः उघड्यावर आल्या.

गावागावांमधल्या शेतकरी स्त्रियांच्या आठवणी ‘रझाकारां’भोवती फिरणार्‍या आहेत. निझामाबादमध्ये स्थलांतरित झालेल्या उच्चवर्णीय स्त्रियांची आठवण ‘आपलं’ सैन्य येईपर्यंत आत्मसंरक्षण केल्याची आहे. दोहोंमध्ये एक गोष्ट सामाईक आहे. त्या मुस्लिमांना ‘परकं’ ठरवण्यात आलं. मुस्लीम स्त्रियांच्या आठवणींमधून या निरीक्षणाला पुष्टी मिळते. पोलीस ॲक्शनचा त्यांचा अनुभव अनाकलनीय, अतर्क्य, अकल्पनीय अशा हिंसेचा होता.   

मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद – मेघना भुस्कुटे

.................................................................................................................................................................

मूळ इंग्रजी लेखासाठी पहा -

https://www.thenewsminute.com/telangana/razakars-came-in-the-day-they-at-night-telangana-women-recall-the-police-action

.................................................................................................................................................................

लेखिका ए. सुनीता लिंगभाव, अल्पसंख्याक, स्थलांतर आणि लैंगिकता यातल्या परस्परसंबंधांविषयी संशोधन करतात. सध्या त्या तेलगू प्रदेशातल्या मुस्लीम राजकारणावरच्या पुस्तक लिहीत आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारताच्या पंतप्रधानपदाचा हा ऱ्हास देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की करणारा आहे. आणि खरे देशभक्त, खरे राष्ट्रप्रेमी, खरे राष्ट्रवादी व लोकशाहीची चिंता वाहणारे नागरिक यांचा आत्मविश्वास डळमळीत करणारा आहे

आपल्या देशात राष्ट्रपती देशाचा प्रमुख असतो, लोकसभा व राज्यसभा यांच्या अध्यक्षांना विशेष मान असतो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनाही वेगळे महत्त्व असते आणि मुख्य निवडणूक आयुक्ताला खास असे स्थान असते. मात्र देशाचा पंतप्रधान जेव्हा कार्यक्षम असतो, सुसंस्कृत असतो, दूरदृष्टी (व्हिजन) असलेला, मूल्ये (व्हॅल्यूज) जपणारा असतो, तेव्हा वरील सर्व महनीय पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष इज्जत अ.......