अजूनकाही
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
भारताच्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांच्या जंत्रीत अशा काही घटना आहेत की, त्यांनी हिंदू आणि मुस्लीम या दोन्हीही समाजांच्या मनात काही असाध्य दुखऱ्या जागांच्या स्वरूपात घर करून ठेवले आहे. त्यामुळे कालौघात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा या दुखऱ्या जागा या दोन्ही समुदायांच्या मनात नव्या जोमाने ठसठसू लागतात आणि एकमेकांवर सूड उगवण्यासाठी प्रयत्न करत असतात. या दोन्ही समाजांतील संख्येने अल्प असलेले धार्मिक मूलतत्त्ववादी या सूडाच्या भावनेला इतिहासाच्या नावाखाली सतत प्रज्ज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
ज्यांनी वर्तमान आणि भविष्यावरील विश्वासच गमावलेला असतो, त्यांना भूतकाळात रमणे फार आवडते. इतिहास ही अशी गोष्ट आहे की, ती अनेकांना विविध प्रकारांनी भुरळ घालत असते. त्यातूनच भूतकाळाबद्दलचे आकर्षण, अद्भुतरम्यता वाढत असते, परंतु कोणताही माणूस सदासर्वकाळ भूतकाळ जगू शकत नाही. तसेच कोणत्याही माणसाला इतिहासापासून पळूनही जाता येत नाही. अशा वेळी माणसे एका चमत्कारिक स्थितीत अडकतात. यातून त्यांना बाहेर पडण्याचा एकच मार्ग असतो. तो म्हणजे भूतकाळाचे सम्यक आकलन करून घेणे आणि त्या आधारे वर्तमानकाळ व्यवस्थित समजावून घेणे. असे झाले नाही, तर भूतकाळच माणसांची शिकार करण्याची शक्यता अधिक असते.
मानवी विकासक्रमात प्रत्येक समाजाचे प्रश्न कालानुक्रमे बदलत गेलेले असतात. जुन्या प्रश्नांची जागा नवे प्रश्न घेतात आणि त्यांच्या सोडवणुकीचे प्रकारही नवे असतात. प्रत्येक व्यक्ती, मग ती सामान्य असो की, असामान्य; प्रत्येक समाज, मग तो मागासलेला असो की सुधारलेला; ते सर्व इतिहासाची अपत्ये असतात आणि आपल्या वर्तमानातील परिस्थितीत ते आपल्या विवेकाच्या सहाय्याने हस्तक्षेप करून नवा इतिहास घडवत असतात. परंतु त्यासाठी इतिहासात रमणे किंवा त्याचा अधिक्षेप करणे फारसे फलदायी ठरत नसते. त्यासाठी आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या कर्तृत्वावर, त्याच्यातील सर्जनक्षमतेवर अतूट विश्वास असावा लागतो किंवा तो निर्माण करावा लागतो.
या विश्वास आणि भरवशामुळेच अनेक मागासलेले समूह कालौघात प्रभावशाली बनलेले जगाने पाहिले आहेत आणि त्यांनी पुढील पिढ्यांना आदर्श ठरावा, असा इतिहास घडवलेलाही जगाने पाहिला आहे. त्यासाठी विवेकशक्तीची जागृती आणि तिच्याद्वारे इतिहासाचे सम्यक आकलन या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
हल्ली धार्मिक ध्रुवीकरण करून सत्ताकारण जपणाऱ्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक मोहम्मद गजनीने हजार वर्षांपूर्वी केलेल्या सोमनाथ मंदिराचा विध्वंस आणि लुटीचा इतिहास उकरून काढत हिंदूंच्या अस्मितांना गोंजारण्याचे काम करत आहेत. परिणामी सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला झाल्याच्या घटनेला १००० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘१००० वर्षांचे स्वाभिमान पर्व’ या नावाचा लेख लिहून शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
जर त्यांनी त्यांची मातृसंस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांचे सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाशी संबंधित विचार ऐकले असते, तर हा लेख लिहिला असता का, हा प्रश्नच आहे. ‘ऑर्गनायझर’ या संघाच्या मुखपत्राच्या ४ जानेवारी १९५०च्या अंकामध्ये गोळवलकर गुरुजींनी लिहिले आहे –
“हजार वर्षांपूर्वी आपल्याच लोकांनी (म्हणजे हिंदुंनी) परकीय आक्रमकांना (म्हणजे मुस्लीम) हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचे आमंत्रण दिले, हे ऐतिहासिक सत्य आहे. सोमनाथचे मंदिर कोणी कसे उदध्वस्त केले? सोमनाथचे वैभव आणि तेथील संपत्तीचा झगमगाट या विषयी गजनीच्या महंमुदला माहिती होती. त्या संपत्तीच्या लोभाने प्रेरित होऊन तो खैबरखिंड पार करून हिंदुस्थानवर चालून आला. सोमनाथवर हल्ला करण्यासाठी राजस्थानच्या वाळवंटातून जात असताना त्याच्यावर आणि त्याच्या सैन्यावर पिण्याच्या पाण्याअभावी तहानेने व्याकूळ होऊन तडफडायची वेळ आली होती. वाळवंटातून जाताना तापलेल्या वाळूचे चटके आणि उन्हाच्या झळांमुळे तो आणि त्याचे सैन्य तडफडून मेले असते, पण तसे झाले नाही. कारण महंमुदने तेथील स्थानिक राजांना फितविण्यात यश मिळविले. सौराष्ट्रातील काही राजे सोमनाथवर हल्ला करण्याचा विचार करीत असल्याची त्याने अफवा पसरविली व मी तुम्हास मदत द्यायला तयार आहे, असे अमिष दाखविले. हिंद राजे महंमुदच्या अमिषाला बळी पडले आणि ते सर्वजण महंमुदला जाऊन मिळाले. महंमुदने सोमनाथवर हल्ला केला, त्यावेळी आघाडीच्या फळीवर हिंदूच होते. आपल्याच हाडामांसाचे आणि आपल्याच रक्ताचे ते हिंदूच होते. सोमनाथच्या मंदिराचा विध्वंस हिंदूंच्या कृतिशील सहभागानेच झाला आहे. हे इतिहासाच्या पानावर ठळकपणे लिहिले गेलेले एक विदारक सत्य आहे.” (पृष्ठ क्रमांक १२ ते १५)
भारतावर आक्रमण केलेल्या मुस्लीम आक्रमकांनी हिंदूंची देवळे लुटली, मूर्तीची विटंबना केली, देवळातील अगणित संपत्तीची लूट केली, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. साऱ्या जगाचा इतिहास धर्मांध आक्रमकांनी त्यांची धर्ममते न मानणाऱ्या आणि त्यांची सत्ता न मानणाऱ्या लोकांवर अनन्वित जुलूम, अत्याचार, देवळे, प्रार्थनास्थळे यांचा विध्वंस, संपत्तीची लुटमार केल्याच्या घटनांनी भरलेला आहे. हिंदुस्थानातही हिंदू राजांनी जैन आणि बौद्धांवर अनन्वित अत्याचार केल्याची आणि त्यांची मंदिरे, विहार उदध्वस्त करून त्यांच्या देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना केल्याच्या अनेक घटनांची इतिहासात नोंद आहे.
कोणत्याही आक्रमकाचे उद्दिष्ट ज्यांच्यावर धाड घालायची तेथील सत्ताधीश आणि त्याची प्रजा यांच्यावर दहशत बसवून त्यांची सत्ता व संपत्तीची केंद्रे नष्ट करणे, हा असतो. मंदिरे ही त्या काळातील हिंदूंच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची महत्वाची केंद्रे होती. शिवाय मंदिरात सोन्या-चांदीच्या मूर्ती तर असतच, शिवाय जड-जवाहिरे, हिरे माणके, सुवर्णमुद्रा इ. स्वरूपात अफाट संपत्ती साठवलेली असे. त्या काळातील मंदिरे गुप्त सल्लामसलती आणि कटकारस्थानाची केंद्रेही होती. त्यामुळे स्वाभाविकच धर्मांध मुस्लीम आक्रमकांची मंदिरे लक्ष्य ठरली.
असे असले तरी धार्मिक श्रद्धास्थाने मंदिरे, प्रार्थनागृहे, चर्चेस मशिदी इ. उदध्वस्त करणे, हे केव्हाही धार्मिक असहिष्णुतेचेच लक्षण मानले पाहिजे. त्यामुळे अशा कृत्यांचे कोणीही समर्थन करता कामा नये. म्हणूनच एका कालखंडात हिंदूंची देवळे उदध्वस्त करणाऱ्या मुस्लीम आक्रमकांचा निषेध करताना हिंदू राजांनी अनेक जैन मंदिरे, बौद्ध विहार उदध्वस्त केले, याचाही निषेध केला पाहिजे.
हिंदूराजांनी बौद्ध आणि जैनांवर इतके दारुण अत्याचार केले की, जैन आणि बौद्ध धर्म हिंदुस्थानातून जवळपास लुप्त झाले. शेकडो जैन मंदिरांचा विध्वंस करून त्या जागी हिंदूराजांनी शिवमंदिरे बांधली. पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या जागी पूर्वी बौद्ध मंदिर होते. त्याचे आणि तशाच इतर अनेक बौद्ध मंदिरांचे नंतरच्या काळात हिंदूकरण करण्यात आले आहे, असे स्वामी विवेकानंदांनीच म्हटले आहे. (‘दी सेजेस ऑफ इन्डिया समग्र विवेकानंद’, अद्वैत आश्रम कलकत्ता, पृष्ठ २६४)
बंकिमचंद्रांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतही बौद्ध मठांचे हिंदूकरण करण्यात आल्याचा उल्लेख आहे. ‘चतुरंग दल सिद्ध करून मी बौद्ध धर्माचा उच्छेद करेन’ अशी प्रतिज्ञा करून मोहिमेवरून परत आल्यावर ‘पाटलीपुत्रपासून (पाटणा) पुष्पपूर (पेशावर)पर्यंतचे सर्व बौद्ध विहार मी उदध्वस्त केले’ असे अभिमानाने सांगणाऱ्या हिंदू सम्राट पुष्यमित्राचाही निषेध झाला पाहिजे.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
‘यो मे श्रमणं शिरम् दास्यति, तस्याहं दीनार शतं ददामि’ म्हणजे एका बौद्ध भिक्षुचे मस्तक आणून देणाऱ्याला शंभर सुवर्णमुद्रा देणाऱ्या पुष्यमित्राला काय हिंदूधर्माच्या सहिष्णुतेचा आदर्श मानायचे? ‘शंकर दिग्विजय’ या आद्य शंकराचार्याचे चरित्रग्रंथात सुधन्ना या हिंदूराजाने शंकराचार्यांच्या इच्छेनुसार बौद्धांचा संहार करण्यासाठी आपल्या काही खास माणसांची नियुक्ती केली होती, असा उल्लेख आहे. रामेश्वरपासून हिमालयापर्यंतच्या भागात लहान-मोठ्या बौद्धांची नावनिशाणीही दिसता कामा नये, असा राजा सुधन्नावाने हुकूम दिला होता.
लंकेचा (सिंहद्विप) राजा जयसिंह याने लंकेतील बौद्धांचा अनन्वित छळ करून बौद्धांचा नि:पात केला. शिवाय हिंद राजांनीच हिंदूंची देवळे, श्रद्धास्थाने उदध्वस्त करून तेथील संपत्तीची लूट केल्याचे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत. प्रसिद्ध कवी कल्हणने काश्मीरमधल्या हिंदूराजांनी काश्मीरमधील हिंदूंची असंख्य देवळे उदध्वस्त करून, त्यातील मूर्तीची विटंबना करून, संपत्तीची लूट केल्याची सविस्तर माहिती त्याच्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथात दिली आहे.
या इतिहासावरून आपल्या लक्षात येईल की, मंदिरांच्या विध्वंसामागे नुसता धर्मद्वेष नव्हता, तर आर्थिक संबंधसुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते. म्हणून एखाद्या जनसमुदायाच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला कायदेशीर हक्क प्रस्थापित करण्याचा अत्युत्तम मार्ग आहे, असे दुसऱ्या एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे, असे समजले पाहिजे. कारण धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नसतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तसे सोडवायचा प्रयत्न केला, तर देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल?
मोदींनी त्यांच्या लेखात ११ मे १९५१ रोजी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत झाला, असेही म्हटले आहे. या विधानावरून कोणाला असे वाटेल की, केंद्र सरकारने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला होता, पण वास्तव तसे नाही. राजेंद्र प्रसाद यांनी या सोहळ्याला राष्ट्रपती म्हणून उपस्थित राहू नये, अशा अर्थाचे पत्र नेहरूंनी त्यांना लिहिले होते. त्यात ते म्हणतात,
“शासनाने या कामावर खर्च करणे केव्हाही अनुचितच म्हटले पाहिजे, कारण आपले शासन हे धर्मनिरपेक्ष आहे. अशा परिस्थितीत आपण सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून त्याचे अध्यक्षपद भूषवणे योग्य होणार नाही. आपण इतर वेळी केव्हाही मंदिरात जाऊ शकता. परंतु उद्घाटनाचे अध्यक्षस्थान आपण स्वीकारण्याचे इतर काही दूरगामी परिणाम होऊ शकतात, हे मी आपल्या निदर्शनाला आणू इच्छितो. म्हणूनच आपण समारंभाला उपस्थित राहू नये, हे मी पुन्हा आग्रहाने सुचवू इच्छितो.”
जवाहरलाल नेहरूंच्या या भूमिकेला चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी पाठिंबा व्यक्त केला होता, पण राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांनी नेहरूंच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांच्या या कृतीवर गुजरातमधील अनेक वृत्तपत्रांनी टीकाही केली होती.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, भारतीय स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्यावर के. एम. मुन्शी यांच्या सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मोहिमेला वेग आला होता. इतकेच नव्हे, तर देश स्वतंत्र झाल्यावर भारत सरकार मंदिरांच्या जीर्णोद्धाराची जबाबदारी स्वीकारेल, अशी हवा निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला होता. त्या वेळी म. गांधींनी याविषयी भारत सरकारची भूमिका काय असावी, या विषयी २८ नोव्हेंबर १९४७च्या प्रार्थना सभेत निःसंधिग्धपणे सांगितले होते-
“सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारच्या तिजोरितून खर्च करावा काय, असा प्रश्न एकाने मला पत्र पाठवून विचारला आहे. यावर माझे उत्तर असे आहे की, आपले सरकार धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे हे सरकार सर्वांचे आहे. कोणा एका धर्माचे नाही. त्यामुळे धार्मिक आधारे ते कोणा एकाच धर्मासाठी सरकारच्या तिजोरीतला पैसा खर्च करू शकत नाही. आपण सर्व भारतीय आहोत, पण प्रत्येक जण आपापल्या धर्मानुसार आचरण करू शकतो.”
यानंतर सरदार पटेलांची आणि म. गांधींची भेट झाली. त्या वेळी गांधींनी सरदारांजवळ सोमनाथ मंदिराच्या संदर्भात ‘मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करणार अशी बातमी कानावर येत आहे, ती खरी आहे काय?’ असा प्रश्न विचारला. त्यावर पटेलांनी खुलासा केला होता की,
‘‘सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारी तिजोरीतून एक पैसाही खर्च केला जाणार नाही. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हिंदूंनीच पैसे गोळा केले पाहिजे. मंदिरासाठी ते रकम गोळा करू शकत नसतील, म्हणजे ते जर इतके कंजुष असतील, तर मंदिर सध्या ज्या स्थितीत आहे, तसेच राहिल. आतापर्यंत दीड लाख रुपये जमा झाले आहेत आणि जुनागडच्या जामसाहेबांनी स्वतःचे एक लाख रुपये दिले आहेत. शिवाय ते स्वतः पैसे गोळा करण्यात गुंतले आहेत.” (समग्र गांधी, खंड ९०, पृ. १२७, ‘धर्म और राजनीति’ मधु लिमये पृ. ७६-७७) या उताऱ्यावरून हे स्पष्ट होते की, केंद्र सरकारचा सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराशी काहीही संबंध नव्हता.
सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्या मोदींना हा इतिहास माहीत नाही काय?
................................................................................................................................................................
लेखक जगदीश काबरे विज्ञानप्रसारक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
jetjagdish@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment
Gamma Pailvan
Fri , 16 January 2026
भले पूर्वी काही हिंदू राजांनी तुरळक अत्याचार केले असतील. पण त्यामुळे आज सोमनाथचं पुनर्निर्माण अतिरंजित कसं ठरतं बुवा?
-गामा पैलवान