पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…
ग्रंथनामा - झलक
नीतिन वैद्य
  • ‘वाचून उरणारी पुस्तकं’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 02 February 2026
  • ग्रंथनामा झलक ‘वाचून उरणारी पुस्तकं Vachun Uranari Pustake नीतिन वैद्य Nitin Vaidya

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

ग्रंथसंग्राहक आणि ग्रंथोपासक नीतिन वैद्य यांचं ‘वाचून उरणारी पुस्तकं’ हे नवं पुस्तक नुकतंच रोहन प्रकाशन, पुणेतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

वाचायचा नाद कधीपासून जडला हे आठवत नाही आता, पण वाचनावर लिहायला लागलो तेव्हा चाळीशीपार झालो होतो, त्याला मात्र जेमतेम दहा वर्षं झाली. आधी वाचायचो, क्वचित काही फार आवडले तर डायरीत आपल्यापुरते नोंदवून ठेवायचो. संपादनात पंधरा-वीस वर्षं गेली. त्यातही निमित्तापलीकडचे काही लिहिल्याचे आठवत नाही, स्थानिक वृत्तपत्रांत काही टिपणे लिहिली तेवढेच. अगदी फेसबुकवरही पहिली पाच-सहा वर्षं मूक प्रेक्षकच होतो. क्वचित वाचलेल्या पुस्तकांची नावं टाकायचो. पण कसे कुणास ठाऊक, राम जगताप यांना त्यांचे ‘अक्षरनामा’ हे वेब पोर्टल सुरू करताना माझी आठवण झाली. त्यांनी मी त्या पोर्टलवर सुरुवातीपासूनच नियमित लिहावे, असा आग्रह केला. तेव्हा त्या काळात वाचत होतो त्या इस्लाम आणि त्या आधारावर निर्माण झालेल्या पाकिस्तानशी संबंधित पुस्तकांवर एक लेख लिहिला. ‘अक्षरनामा’वर तो त्याच नावाने पहिल्या आठवड्यातच प्रकाशित झाला. दोन-तीन दिवसांत लेखाला चांगला प्रतिसाद मिळतोय, ट्विटरवर पण त्याची लिंक अनेकांनी रिट्विट केली, असे राम जगताप यांनी कळवले तेव्हा आनंदाइतकेच आश्चर्य वाटलेले. तेव्हा वाटलेल्या चिमूटभर आत्मविश्वासातून मग आवडलेल्या पुस्तकांवर लिहायला लागलो. सुरुवातीचे बहुतेक लेख ‘अक्षरनामा’वरच आले.

सोलापुरात तेव्हा ‘निहारिका पुस्तकप्रेमी’ या नव्याने सुरू झालेल्या अनौपचारिक गटाच्या मासिक बैठका होत. तिथे तासभर कुणी आवडलेल्या पुस्तकावर बोलावे न् मग त्यावर उपस्थितांत थोडी चर्चा असे. ऐकणारे पाच-सातपासून तीस-पस्तीसपर्यंत कितीही जण असत. सगळे ओळखीचेच. त्यामुळे छान अनौपचारिक टोन असे. तेव्हा मी इतकी पुस्तकं वाचलेली असत की, एखाद्या पुस्तकावर तासभर बोलण्यापेक्षा एकाच विषयासंदर्भातल्या चार-सहा पुस्तकांवर बोलायचो. अन्य कुणी बोलणार नसेल, तेव्हा माझी आठवण करा असे सांगूनच ठेवले होते तिथे. बोलण्याचा आत्मविश्वास नव्हता तेव्हा (आताही फारसा नाहीच) तर टिपणे काढायचो आणि ती समोर ठेवून बोलायचो. या पुस्तकात समाविष्ट काही लेख हे या टिपणांमधून नंतर तयार झाले. आधी ‘अक्षरनामा’वर आणि मग अन्यत्रही प्रकाशित झाले.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

औपचारिक प्रकाशन झाल्यानंतर लेखकाचे बोट सुटते, तशी जत्रेत आईचा हात सुटून गेलेल्या लेकरासारखी सैरभैर होतात पुस्तकं. त्यामुळे वाचकाला भेटतात तेव्हा संवादाचं बोट पकडण्यासाठी अतीव उत्सुक असतात ती. ‘क्वालिटी टाईम’ म्हणतो तसा वेळ दिला की, साहजिकच त्याच्याशी ती अधिक मोकळा, आतला जिव्हाळ संवाद करतात. वाचनात आपणही त्यांच्यासोबत ‘पूर्ण उपस्थित’ मात्र असायला हवे. हे इंगित असे शब्दांत मांडता येण्याइतके नव्हते मनात अजिबात, पण असंख्य पुस्तकांशी अनावर संवाद होत गेला तेव्हा जाणवलेले.

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी. त्यातून विंधणारे शारीर-मानसिक अनुभव सहजच मागे टाकता आले. या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याचा काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

तरी या लेखांचे पुस्तक होऊ शकेलसे वाटले नव्हते कधी. उलट फेसबुकवर लिहायचो त्या पुस्तकं आणि वाचनासंबधीच्या पोस्ट्स आणि डायरीतल्या नोंदी यांचच आधी पुस्तक आलं, ‘वाचनप्रसंग’ शीर्षकाने. लेखनाची अशीच अनावर असोशी असलेला तरुण लेखक प्रणव सखदेव याने या आणि अशा लेखांचे पुस्तक होऊ शकेल असे आधीच सुचवले होते. तरी मी बराच वेळ घेऊन हे बाड प्रदीप चंपानेरकर सरांकडे सोपवले, तेव्हा ‘रोहन’चा अलिकडचा लौकिक पाहता मनात धाकधूक होती. पण दरम्यान ‘रोहन साहित्य मैफल’मध्ये समकालीन पुस्तकांवर लिहिण्यासंदर्भात सरांशी संपर्क आणि काही संवाद झालेला. ‘आपण करू’ असे ते सहज म्हणाले, तेव्हा फार आनंद वाटलेला. मग रोहनच्याच संपादिका अनुजा जगताप यांच्या पारखी नजरेखालून हा ऐवज गेला, त्यांनी ते बारकाईने वाचून मौलिक सूचना केल्या.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आपण कितीही ताटस्थ्याचा आव आणला तरी प्रेमात असतो आपल्या निर्मितीच्या. असे कुणी वेगळ्या, समोरच्या नजरेने ते पाहणे गरजेचे असते. अनुजा यांच्या सूचना विचारात घेऊन लिखाण पुन्हा एकदा नजरेखालून घातले, काही बदल केले. काही त्यांनी सुचवलेले, काही परत वाचताना मलाच जाणवलेले. काही वगळलेही. आधी वाटले होते त्यापेक्षा पुस्तक आता अधिक आटोपशीर, पण सुघड वाटतेय ते त्यामुळे. अचूक मुद्रितशोधन करणारे रवींद्र पाथरे व नेहा वैशंपायन यांचे आभार.

कमी वेळेत जास्तीत जास्त चांगले टाईपसेटिंग करणारे अरविंद आरतीविष्णू राजंदेकर यांचेही आभार. ‘साहित्य मैफल’मध्ये प्रदीपसरांच्या प्रेरणेने तीन वर्ष सलग लिहिले त्यामुळे रोहन परिवाराचे आभार मानत नाही, त्यांच्याशी दीर्घकालीन संवादाची ही नवी सुरुवात आहे असे सोयीस्करपणे समजतो. लेखनातले नेमके मर्म जाणवणारा कलावंत मुखपृष्ठ मांडणीसाठी लाभावा याचा योग असावा लागतो. सतीश भावसार यांच्या रूपाने तो या पुस्तकाच्या कुंडलीत उगवला याचा आनंद आहे. पुस्तकाला सुशोभित करणारी समर्पक रेखाचित्रे साकारणारे चंद्रशेखर बेगमपुरे यांचेही आभार.

त्र्यं. वि. सरदेशमुख आणि निशिकांत ठकार दोघेही माझ्यासोबत कायमच असतात, लेखनात संदर्भ असो वा नसो. स्नेहा अवसरीकरचा पाठीवरचा हातही असाच मायेचा म्हणून गृहित धरलेला. नेत्रा आणि मुली याही निर्मितीत न सांगता आहेत, तसेच शिरीष घाटेही... आणि या सगळ्या आपल्यांपलीकडेही आहेत अथांग पसरलेली पुस्तकं. ती नसती तर मी ‘मी’ असतो का? नसतोच बहुदा...

‘वाचून उरणारी पुस्तकं’ - नीतिन वैद्य | रोहन प्रकाशन, पुणे | पाने – १६९ | मूल्य – ३५० रुपये

.................................................................................................................................................................

nitinvaidya2708@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......