‘बोले तैसा न चाले’च्या परंपरेला शरद पवार जागले!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
  • Sat , 06 May 2023
  • पडघम राज्यकारण शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस NCP भाजप BJP उद्धव ठाकरे Uddhav Thackeray काँग्रेस Congress

गेल्या आठवड्यात चार दिवस महाराष्ट्र ‘शरद पवारमय’ झालेला होता, त्यांनी (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो नक्की मागे घेतला जाणार यांची खात्री होती, कारण जे बोलायचं तसं वागायचं नाही, हा पवारांचा लौकिक आहे. त्याला त्यांनी याही वेळी तडा जाऊ दिलेला नाही.

पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाची निमंत्रणपत्रिका बघायला मिळाली, तेव्हाच एखाद्या नियोजनबद्ध खेळीची ही तयारी आहे, अशी शंका आली होती. सुधारित आवृत्तीत मूळ पुस्तकाला जेमतेम ७०-७५ पानांची जोड होती; म्हणजे काही फार मोठी सुधारणा नव्हती. देशातल्या राजकारण, समाजकारण, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग अशा अनेक क्षेत्रांतलं प्रकाशनासाठी पवारांचं वादातीत ज्येष्ठत्व लक्षात घेता, त्यांच्यापेक्षा २२-२५ वर्षांनी लहान असणारे पत्रकार प्रमुख पाहुणे असणं, हे फारच आश्चर्याचं होतं.

राष्ट्रीय वलय लाभलेल्या पवारांना या प्रकाशनासाठी अगदी पंतप्रधानांसकट कोणीही राष्ट्रीय नेता सहज उपलब्ध झाला असता, पण ते टाळण्यात आलेलं होतं (एक मात्र खरं पत्रकार गिरीश कुबेर यांचं कार्यक्रमातलं भाषण वेधक झालं.) शिवाय राज्यभरातील महत्त्वाच्या कार्यकर्ते व नेत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचा सांगावा धाडण्यात आलेला होता.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

याचा अर्थ या कार्यक्रमात काहीतरी ‘घडवून’ आणलं जाणार आहे, अशी शंका किमान मला तरी आली होती आणि घडलंही तसंच. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत वावरणाऱ्या पवारांना तिथून निघून जाणं सहज शक्य होतं, पण ते त्यांनी टाळलं आणि पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या घोषणेवर काय प्रतिक्रिया उमटतात, हे ते बघत बसले. नुसतेच बघत बसले नाही, तर एखाद्या वाद्यवृंदाचा संचालक ज्या पद्धतीने वाद्यांचा मेळ जुळवून आणतो, तसं संचालन अधूनमधून दीड पवार करत होते. याचा अर्थ प्रतिक्रिया काय होते, याचा अंदाज त्यांना घ्यायचा  होता.

दुर्मीळ अपवाद वगळता आजकाल राजकारणात कोणाचेच हात तसे स्वच्छ नाहीत. कोणत्या ना कोणत्या दगडाखाली बहुसंख्य राजकारण्यांचे हात अडकलेले आहेत आणि त्याचाच वापर केंद्रातलं भाजप सरकार वेगवेगळ्या चौकशांचा ससेमिरा मागे लावून पक्षवाढीसाठी करून घेत आहे. राष्ट्रवादीत या आणि काहींच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळेही अस्वस्थता आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षातील आमदारांचा एक गट भाजपच्या वाटेवर असल्याच्या उघड चर्चा आहेत. त्यांच्या मागे राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार आहेत. त्यातच दस्तुरखुद्द अजितदादांनीही मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा लपवून ठेवलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून त्यांची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होणं शक्य नाही. किमान महाराष्ट्राच्या राजकारणात तरी काकानं पुतण्याला राजकीय वारसदार नेमण्याची परंपरा नाही. म्हणूनच मुख्यमंत्रीपदासाठी वेगळं एखादा समीकरण जुळवून आणणं अजितदादांना आवश्यक आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पवार कसलेले राजकारणी आहेत. महाराष्ट्राचं राजकारण गेली पाच दशकं कायमच त्यांच्याभोवती फिरत आहे. पक्षातला असंतोष म्हणा की अस्वस्थतेची, जाणीव पवारांना लागणार नाही, हे शक्यच नाही. ते म्हणजे उद्धव ठाकरे नव्हेत. शिवसेनेतले बहुसंख्य आमदार बंडखोरीच्या तयारीत आहेत, याची गंधवार्ताही ठाकरेंना लागली नाही, तसं पवारांच्या बाबतीत घडणं शक्यच नव्हतं. काही आमदारांशी बोलल्यावर लक्षात आलं की, पवारांनी पक्षातल्या असंतोषाची खातरजमा अनेकांना फोन करून घेतलेली होती. मात्र बहुसंख्य आमदार जरी अजितदादांसोबत असले तरी पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या बाजूने आहे, याची पक्की जाणीव पवारांना होती. अशा परिस्थितीत भाजपत जाऊ इच्छिणाऱ्यांना शह देण्याची जाहीर खेळी खेळणं आवश्यक होतं आणि ती ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनच्या निमित्तानं पवार खेळले.

राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या त्यागाच्या घोषणेनंतर पवारांना अपेक्षित असणारा पाठिंब्याचा जोरदार आणि काहीसा भावनिकही कल्ला झाला. हा भाजपच्या वाटेवर असणाऱ्या पक्षातील आमदारांना देण्यात आलेला खास पवार शैलीतला ‘कात्रजच्या घाटा’त पकडणारा शह होता. ‘तुम्हाला जिथे कुठे जायचं, तिथे तुम्ही तुमच्या बळावर जा. पक्ष आणि कार्यकर्ते मात्र माझ्या बाजूने आहेत’, असा इशारा असंतुष्टांना देऊन टाकला.

याचा एक परिणाम असा होईल की, भाजपात जाण्याच्या संदर्भात ज्यांच्या मनात चलबिचल आहे, ते त्यांच्या निर्णयाचा नक्कीच फेरविचार करतील, कारण ज्याची स्वबळावर निवडून येण्याची ताकद नसेल, तो जर दुसऱ्या पक्षात गेला, तर त्याचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाची ताकद पुरेशी असेल.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पवारांनी भाकरी फिरवण्याची घोषणा केली होती, नवीन भाकरी थापण्याची नाही, हे या काळात विविध माध्यमातून व्यक्त होणाऱ्या कोणत्याही राजकीय विश्लेषकानं लक्षातच घेतलं नाही. त्यामुळे ‘बोले तैसा न चाले’ या परंपरेला जागून पवारच पक्षाध्यक्षपदी कायम राहतील, ही शक्यता लक्षातच घेण्यात आली नाही. याचा अर्थ या पिढीतीलही पत्रकारांवर पवारांचं गारुड आहे, असा होतो. त्यातूनच राष्ट्रवादी राष्ट्रीय (?) नेतृत्व सुप्रिया सुळे आणि राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे दिलं जाईल, अशी अतार्किक मांडणी माध्यमांकडून केली गेली.

माझ्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार सातत्याने सांगत की, ‘पवार काय करतील याचा थांगपत्ता कधीच कुणाला लागत नाही.’ त्यासाठी १९७८च्या पुलोदसह अनेक घटनांचा दाखला ते देत. पत्रकारांच्या माझ्या पिढीनंही तोच अनुभव घेतला. सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा मांडून काँग्रेसमधून फुटून वेगळी चूल मांडणारे पवार निवडणुका संपताच काँग्रेससोबत राज्यातच नाही, तर केंद्राच्याही सत्तेत टुण्णकन उडी मारून सहभागी कसे झाले, हे माझ्या पिढीनं बघितलं आहे. त्यामुळे राजीनामा ही केवळ घोषणा आहे, हे उघड होतं.

आणखी एक मुद्दा म्हणजे पवारांना भाजपशी थेट हातमिळवणी करायची नाहीये, पण भाजपला थेट शिंगावरही घ्यायचं नाहीये, हेही आजवर अनेकदा दिसलं आहे. शिवाय ते आणि त्यांच्या पक्षातले बहुसंख्य फार काळ सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. महाराष्ट्रात ‘पुलोद’च्या प्रयोगात भाजपचा सत्तेतला सन्माननीय सहभाग पवारांनीच करवून दिलेला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ‘राष्ट्रीय आपत्ती आयोगा’चं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे आणि २०१४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नियोजित सरकारला बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला होता. दत्ता मेघे यांना भाजपनी राज्यसभेची उमेदवारी दिली होती (तेव्हा मेघे राष्ट्रवादीतच होते.) पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मेघे विमानानं दिल्लीहून मुंबईला पोहोचेपर्यंत ती उमेदवारी पवारांनी भाजपमधील त्यांची सूत्रं वापरून कशी रद्द करवून घेतली, याचा विसर अनेकांना पडलेला नाही.

सांगायचं तात्पर्य हे की, पवारांची भाषा जरी भाजपच्या विरोधात असली तरी वर्तन मात्र भाजपपूरक असतं. म्हणूनच चार दिवसांच्या नाट्यातून राष्ट्रवादीतल्या ज्यांना भाजपत जायचं आहे, त्यांना ‘तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा’, असा संकेत देतानाच  पवारांनी पक्षावरची त्यांची असली-नसलेली पकड आणखी घट्ट केली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

चार दिवसांच्या खेळीनंतर सांगितलं गेलं की, पवारांना म्हणे पक्षात नवीन नेतृत्व तयार करायचं आहे. सर्व संमतीनं वारसदार नेमायचा आहे आणि तरुणांना संधी द्यायची आहे. हे खरं आहे असं क्षणभर मानू. मग प्रश्न उरतो तो हा की, हे सर्व करायला त्यांना नाही कुणी म्हटलं होतं. राजीनाम्याची घोषणा न करताही हे सर्व करणं शक्य होतं की! ते तर पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, पण त्यांनी ते केलं नाही, कारण शह-काटशहाच्या खेळात तरबेज असलेल्या पवारांना केवळ भाजपत जाऊ इच्छिणाऱ्यांना इशाराच द्यायचा होता. तो देण्याचं राजकारण करण्यात पवार यशस्वी झाले, यात शंकाच नाही, पण त्यासाठी त्यांना त्यांच्या ‘बोले तैसा न चाले’ या परंपरेची बेडी तोडताच आली नाही!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......