अनिल अवचट : उपेक्षित विषयांना समाजमनाच्या पृष्ठस्तरावर आणणारा लेखक
ग्रंथनामा - झलक
सुशील धसकटे
  • अनिल अवचट (जन्म - १९४४, मृत्यु - २७ जानेवारी २०२२)
  • Fri , 28 January 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली अनिल अवचट Anil Awachat

डॉ. अनिल अवचट हे नाव महाराष्ट्राला सर्वपरिचित आहे ते दोन गोष्टींमुळे : एक, त्यांच्या खास ‘अवचटी शैली’तील ‘रिपोर्ताज’ या ललित गद्यलेखनामुळे आणि दोन, पुण्यात त्यांनी उभ्या केलेल्या ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्रामुळे.

माझा त्यांचा प्रत्यक्ष फार परिचय नसला तरी, अवचट मला भेटले ते मी विद्यार्थी असताना, म्हणजे पहिल्यांदा शाळेत असताना पाठ्यपुस्तकांमधून. माझी आठवण बरोबर असेल तर त्या पाठाचं नाव होतं - ‘अनिकेत.’ या ‘अनिकेत’नं एक अनामिक हुरहुर त्या वेळी लावली होती. पुढे बीएला त्यांचा ‘माणसं’ हा लेखसंग्रह अभ्यासाला होता आणि तिथंच खर्‍या अर्थानं त्यांच्या लेखनाशी चांगला परिचय झाला. अभ्यासाच्या निमित्तानं ‘माणसं’ अनेक वेळा वाचलं. एमएला असताना अख्खाच्या आख्खा एकेक लेखक वाचून काढायचा असं ठरवून आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर, रा. रं. बोराडे, भालचंद्र नेमाडे, जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर, भास्कर चंदनशिव, बी. रघुनाथ, दुर्गा भागवत आदी अनेक लेखक अक्षरश: झपाटून वाचून काढले. त्यातलं अनिल अवचट हे एक नाव!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अवचटांच्या सामाजिक पोत असलेल्या ललित गद्यपर लेखनानं त्या वेळी मला प्रचंड झपाटून टाकलेलं होतं. एखादी सामाजिक घटना वा प्रश्‍न/समस्या घेऊन, त्याच्याशी संबंधित सर्व तपशीलवार माहिती गोळा करून तिचा नीट अभ्यास करायचा, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधितांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायचा, आणि मग खास ‘अवचटी शैली’त त्याचं संगतवार विश्‍लेषण करणारा दीर्घ लेख लिहायचा, असं सर्वसाधारण त्यांच्या लेखनाचं स्वरूप म्हणता येईल. असा ‘रिपोर्ताज’ हा लेखनप्रकार मराठीत त्यांनी रुजवला.

तरल व संवेदनशील मन, शोधक दृष्टी, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती, असे उपजत गुण असलेल्या अवचटांचा मूळ पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा. डॉ. बाबा आढावांसारख्या अनेक ज्येष्ठांसमवेत ते महाराष्ट्रभर खेडोपाडी वावरले-फिरले. एवढेच नव्हे तर एसेम जोशी, जेपी यांच्यासोबत त्यांनी बिहारमधल्या पूर्णिया जिल्ह्याचा दौराही केलेला आहे. पूर्णियात काही काळ राहून तिथल्या एकंदर सामाजिक प्रश्‍नांचा व स्थितीचा अभ्यासही केलेला आहे. ‘पूर्णिया’ला नरहर कुरुंदकरांची दीर्घ व विवेचक प्रस्तावना आहे. समाजातील विविध प्रश्‍नांवर, घटनांवर, समस्यांवर लिहिताना त्यांच्यातील ‘सच्चा’ सामाजिक कार्यकर्ता जागृत होतो. हाच ‘सच्चा’ कार्यकर्ता त्या त्या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन खर्‍या वास्तवाचा शोध आणि वेध घ्यायला त्यांना प्रवृत्त करतो. त्यांचं सबंध लेखन म्हणजे सर्वसामान्य उपेक्षित, पीडित आणि बहुजन माणसांसाठी काहीतरी करू पाहणारं, तळमळणारं, धडपडणारं एका ‘सच्च्या’ कार्यकर्त्याचं मन आहे.

ज्या विषयाकडे एरव्ही कुणाचं सहज म्हणून लक्ष जात नाही, आणि समजा गेलंच तर, ते त्यांना फार महत्त्वाचं वाटत नाही, अशा अनेक अत्यंत महत्त्वाच्या उपेक्षित विषयांना अवचटांनी समाजमनाच्या पृष्ठस्तरावर आणून ठेवलेलं आहे. विजय तेंडुलकर लिहितात, ‘‘किंबहुना त्याची भोवतालच्या घटनांकडे किंवा माणसांकडे बघण्याची नजर विलक्षण चौकस, शोधक आणि मुळात शंकेखोरच आहे.’’

त्यांच्या एकूण लेखनावर एक नजर टाकल्यास हे स्पष्टपणे दिसते. उदा. ‘माणसं’, ‘वस्त्या माणसांच्या’, ‘अंधेर नगरी निपाणी’ (माणसं); ‘बावड्याचा बहिष्कार’, ‘पारधी मेळावा’, ‘मराठवाडा दंगल : दोन घटना’, ‘सत्यभामेची विटंबना’, ‘पोलीस कोठडीतील मृत्यू’ (कोंडमारा); ‘अंधश्रद्धांचे गुरू’, ‘अंधश्रद्धांची केंद्रे’, ‘अंधश्रद्धांचे बळी’ (संभ्रम); ‘वस्त्या वेश्यांच्या’ (धागे उभे आडवे); ‘बस्तरचं अरण्यरुदन’ (प्रश्‍न आणि प्रश्‍न) इत्यादी इत्यादी.

या सर्वांमधून अवचट अन्यायग्रस्तांचे, पिचलेल्यांचे, नाडलेल्यांचे आणि महत्त्वाचे म्हणजे जगण्यासाठी केविलवाणी धडपड करणार्‍यांचे अक्षरश: कितीतरी ‘प्रश्‍न आणि प्रश्‍न’ उपस्थित करतात. हे सगळं वाचल्यावर आपल्यासमोर नक्कीच एक प्रश्‍न उभा राहतो की, अवचट हे जे मांडतायत ते आपल्याच देशातील-समाजातील आहे काय? किंवा भारतातलं, नव्हे महाराष्ट्रातलंच आहे काय? याचं उत्तर ‘होय.’

आपल्याच देशातील व समाजातील या दुसर्‍या चित्राशी आपण किती अनभिज्ञ असतो, हे अवचटांचे लेखन वाचल्यावर जाणवते आणि असा प्रश्‍न आपल्यासारख्या ‘सुरक्षित व स्व-कोषात असणार्‍या’, ‘आत्ममग्न जीवनशैली’त मश्गूल असणार्‍यांच्या मनाला पडणंही साहजिक आहे. कारण आपल्या भोवती, समाजात जनावराचं जीवन जगणारे कुणीतरी आहेत, दोन घासांसाठी परिस्थितीशी नाना तर्‍हेने संघर्ष करणारे कुणीतरी आहेत किंवा एकूण समाजव्यवस्थेच्या दृष्टीनं घातक असणारं काहीतरी समाजात घडतंय, याची कानोकानी खबरही आपल्याला नसते. किंबहुना ‘जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय?’, या खुशाल वा बेफिकीर वृत्तीतून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो.

अवचटांच्या दृष्टीनं ही स्थिती अतिशय अस्वस्थ करणारी असते आणि याच अस्वस्थतेतून ते सामाजिक बांधीलकीच्या नात्याने तटस्थपणे या सर्व समस्यांची, प्रश्‍नांची उकल करू पाहतात. त्यांच्या मुळाशी जातात. प्रत्यक्ष भिडतात. अशोक शहाणे यांनी अवचटांच्या लेखनाचं एका वाक्यात मार्मिक विश्‍लेषण केलंय, ‘‘त्याच्या एकेका प्रसंगातून जीवघेणी कोंडी उभी राहते नि तिला संदर्भ निव्वळ सामाजिक उरत नाही.’’

.................................................................................................................................................................

डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://bit.ly/2FJw7OZ

.................................................................................................................................................................

‘माणूस’ हा अवचटांच्या विचारांचा, चिंतनाचा आणि लेखनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. माणसांविषयी त्यांना कमालीची आस्थाही आहे. माणूसपणाच्या व माणुसकीच्या उत्कट ओढीतूनच ते माणसांविषयी पोटतिडिकीनं लिहितात. त्यामुळे त्यांचं लेखन जिवंत, प्रसंगी धगधगीत वाटतं. पण या धगधगीतपणामध्ये नुसत्याच ज्वाळा आहेत का, तर नाही, त्याला लालित्याची व बोलभाषेची जोड आहे; व्यापक दृष्टी व अभ्यास आहे; परखडपणा आहे; तटस्थवृत्तीनं केलेलं विश्‍लेषण व निरीक्षण आहे.

हे सर्व करताना अवचट त्यात एका विशिष्ट मर्यादेपर्यंत गुंतलेले असतात - त्यात ते अडकून पडत नाहीत. त्यातूनच वाचकांना खिळवून ठेवणारी त्यांची म्हणून स्वत:ची एक लेखनशैली तयार झालेली आहे. अवचटांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका हाही एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा आहे. अर्थगर्भ व सूचक भाष्य करणार्‍या अर्पणपत्रिकेच्या ओळी मनाला स्पर्शून व खूप काही सांगून जाणार्‍या आहेत. उदा. ‘समाजाने ज्यांना भटकंती बहाल केली त्या सर्व उपर्‍यांना अपराधी भावनेनं अर्पण’ (माणसं); ‘नशिब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणार्‍या भारतातल्या (तरुण) भाग्यविधात्यांना... काळजीपूर्वक’ (अमेरिका); ‘गावागावांतल्या दहशतीविरुद्ध एकाकी लढणार्‍या अप्रसिद्ध कार्यकर्त्यांना - हा थोडा हातभार’ (कोंडमारा) इत्यादी इत्यादी. ‘तेच ते’ अशा प्रकारची टीका त्यांच्या लेखनावर झाली खरी, पण एक गोष्ट मोकळ्या मनाने मान्य करावी लागते, ती म्हणजे अवचटांचं लेखन हा मराठीतील एक महत्त्वाचा सामाजिक व वाङ्मयीन दस्तऐवज आहे. त्यांच्या लेखनाने मराठी वाङ्मयात निश्‍चित अशी चांगली भर घातली, हे निर्विवाद.

अवचटांनी ‘स्वत: विषयी’ही मनमोकळेपणे लिहिलंय. पत्नी सुनंदा यांच्याबद्दल लिहिताना अवचटांमधील खोल अंतरीची भावनिक ओल प्रकर्षानं जाणवते. एखादा संवेदनशील पुरुष आपल्या पत्नीवर किती भरभरून आणि निस्सिम प्रेम करू शकतो, तिच्या विषयीच्या आठवणी किती हळुवारपणे, पण रसरसून व्यक्त करू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अवचट होय!

येथे मला डॉ. आ. ह. साळुंखे यांची तीव्रतेनं आठवण होतेय. डॉ. साळुंखे यांनीही ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ या पुस्तकात आपल्या पत्नीविषयी अतिशय समरसून लिहिलंय. या पुस्तकाची फार चर्चा झाली नाही. मात्र प्रत्येक पुरुषानं (आणि स्त्रीवादींनीसुद्धा) अवचट यांचं ‘स्वत:विषयी’ आणि साळुंखे यांचं ‘तुझ्यासह तुझ्याविना’ ही दोन पुस्तकं आवर्जुन वाचली पाहिजेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

- अवचट भाषणं करतात, व्याख्यानं देतात, परंतु ती रूढार्थानं भाषणं नसतात : आपुलकीनं लोकांशी साधलेला ‘संवाद’ असतो.

- संत कबीर हा त्यांच्या मनस्वी चिंतनाचा व आस्थेचा विषय आहे : कधी कधी ते जाहीरपणे कार्यक्रमांमधून कबीर यांची कवनंही गातात.

- अवचट चित्रकारही आहेत : हातात कागद व पेन्सिल घेऊन पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये चित्रे रेखाटण्यात मग्न अवचटांना मी कैक वेळा पाहिलंय.

- अवचट उत्तम ओरिगामी करतात : अनेक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर जेव्हा इतरांची भाषणं चालू असतात, तेव्हा अवचटांचे कान त्या भाषणांकडे व डोळे हातातल्या ओरिगामी-कागदावर!

एक स्वच्छंदी, आनंदी आणि भरभरून आयुष्य जगणारा व माणसांवर उत्कट प्रेम करणारा माणूस - अनेकांसाठी ‘बाबा’ असलेला.

संदर्भ :

१. अवचट, अनिल (२००६) : वेध, ‘प्रस्तावना’ : विजय तेंडुलकर, पृ. ५,   दुआ. फेब्रुवारी, नीलकंठ प्रकाशन, पुणे.

२. शहाणे, अशोक (२००५) : नपेक्षा, ‘बांधिलकी- मागे वळून’, पृ. ५०,   पआ. एप्रिल, लोकवाङ्मय गृह, मुंबई.

(‘जे आहे ते’ या सुशील धसकटे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखसंग्रहातून साभार)

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

अनिल अवचट खरंच आपले कोण लागतात? त्यांचं आणि आपलं नातं नेमकं काय आहे?

डॉ. अनिल अवचट - बहुतेकांचा ‘बाबा’!

बाबा ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण तो फटकून राहणारा नाही, तर बरोबर घेऊन जाणारा आहे!

तुम्ही काही म्हणा, जोपर्यंत लिहावंसं वाटतंय, तोपर्यंत सुचेल तसं, सुचेल ते मी लिहीत राहणार आहे!

.................................................................................................................................................................

लेखक सुशील धसकटे कादंबरीकार आणि प्रकाशक आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.

hermesprakashan@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......