अजूनकाही
‘संस्कृती’ हा शब्द आपण किती सहजपणे वापरतो, पण ही ‘संस्कृती’ नेमकी कुणासाठी असते आणि कुणाला गप्प बसवते? परंपरेच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली आणि कधी ‘संरक्षणा’च्या नावाखाली आपण स्त्रियांभोवती इतक्या भिंती उभ्या केल्या आहेत की, त्यांचं स्वतःचं अस्तित्व, आवाज आणि विचार जणू त्या भिंतींमागे हरवून जातात. अशा काळात ‘हार्ट लॅम्प’ हे बानू मुश्ताक यांचं पुस्तक हळुवारपणे धर्म आणि संस्कृतीचं धोतांड समोर मांडतं.
हे पुस्तक वाचताना आपल्याला जाणवतं की, भारतीय मुस्लीम महिलांच्या कथा केवळ त्यांच्या धर्मापुरत्या मर्यादित नाहीत; त्या आपल्या समाजाच्या एकूणच स्त्री-अनुभवाशी जोडलेल्या आहेत. धर्माच्या नावाचं लेबल वेगवेगळं असलं, तरी प्रत्येक धर्मातील ‘स्त्री’ची परिस्थिती एकसारखीच दिसून येते.
बानू मुश्ताक या मूलतः कन्नड लेखिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या कथासंग्रहात १९९० ते २०२३ या काळातल्या एकंदर १२ कथांचा समावेश आहे. या कथांमधून एका पिढीचा अनुभव व्यक्त झाला आहे. मुस्लीम स्त्रियांबद्दलच्या पूर्वग्रहांना मोडत, या कथा त्यांच्या जगण्याचं अंतरंग दाखवतात. प्रत्येक कथेतील स्त्रिया धर्माच्या शिकवणीत, कौटुंबिक साखळ्यांत आणि सामाजिक नजरेत अडकलेल्या असल्या, तरी त्यांच्या आत कुठेतरी स्वतःला ओळखण्याची झुंज सतत सुरू असते. बानू मुश्ताक यांची लेखणी त्या झुंजीला आवाज देते, त्यांना बोलायला शिकवते.या कथांमध्ये कोणताही बंडखोरीचा गाजावाजा नाही. त्यांच्या कथा शांत, साध्या पण धारदार आहेत.
‘ब्लॅक कोब्रा’ या कथेमध्ये एक शिक्षित महिला स्वतःच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते, पण समाज आणि कुटुंब तिच्यावर ‘शालीनते’चे आणि ‘मर्यादे’चे शिक्के मारतात. शिक्षणाचा उपयोग तिच्या स्वातंत्र्यासाठी नाही, तर तिच्या संस्कारशीलतेचा दाखला म्हणून दिला जातो.
‘हाय हील्स शू’ या कथेत भौतिक स्पर्धा आणि पुरुषांचे अहंकार स्त्रियांना कशा प्रकारे सतत आपलं रूप, कपडे आणि आचरणात बदल करायला भाग पाडतात, हे दाखवते. इस्फा ही नायिका फक्त हाय-हील घालते म्हणून तिचं जीवन बदलत नाही, पण त्या जोडीचं वजन तिच्या ओळखीवर किती जड होतं, हे कथेमधून उलगडतं.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
‘हार्ट लॅम्प’ या शीर्षककथेत बानू मुश्ताक यांनी स्वतःच्या आयुष्यातील निरीक्षणं गुंफली आहेत. या संग्रहातल्या काही कथा कामाच्या ठिकाणी शोषण सहन करणाऱ्या गरीब स्त्रियांच्या आहेत. काही कथांमधल्या मध्यमवर्गीय स्त्रिया आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या निवडीसाठी करू पाहतात आणि काही उच्चभ्रू घरातील स्त्रिया सामाजिक दिखाऊपणाच्या कैदेत अडकलेल्या आहेत. पण त्या सगळ्यांच्या मनात एकच आकांक्षा दिसते. ती म्हणजे ‘स्वतःला ओळखण्या’ची. ही ओळख केवळ वैयक्तिक नाही; ती समाजाशी संवाद साधणारी आहे.
मुस्लीम स्त्रिया म्हणजे फक्त बुरख्यातील महिला अशी एक रूढ प्रतिमा भारतीय समाजात तयार झाली आहे, पण मुश्ताक यांच्या कथांमधल्या स्त्रिया स्वतः विचार करतात, चूक करतात, प्रेम करतात आणि प्रश्न विचारतात. त्यांच्या कथा सांगतात की, धर्म आणि परंपरेच्या चौकटीत राहूनही आत्मबोध आणि स्वातंत्र्याचा शोध घेता येतो. या कथांमधील स्त्रिया मोठमोठ्या घोषणा देत नाहीत, पण छोट्या छोट्या कृतींनी आपला संसार बदलतात. एकीकडे त्या घर चालवतात, मुलं सांभाळतात आणि दुसरीकडे स्वतःच्या निर्णयांचा शोध घेतात. प्रत्येक कथेतून समाजात दडलेलं एक वास्तव येतं. या कथांमध्ये पराभवही आहे, पण फक्त हार नाही.
हा कथासंग्रह आपल्याला विचार करायला भाग पाडतो. स्त्री म्हणून या कथा वाचताना मनात अनेक प्रश्न उठतात. आपण ज्या स्त्रीला सशक्त म्हणतो, ती खरंच स्वतःच्या निर्णयांची मालकीण आहे का? की अजूनही समाजमान्यतेच्या शोधात आहे? आपण संरक्षणाच्या नावाखाली स्त्रियांना किती वेळा बंधनात ठेवलंय? तुझ्यासाठीच / तुझ्याच भल्याचं सांगतो, म्हणत किती वेळा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे?
बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं.
‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते. तो दिवा कधी ज्ञानाचा असतो, कधी बंडखोरीचा, कधी फक्त आत्मविश्वासाचा. पण प्रत्येक दिवा एक गोष्ट सांगतो – ‘मी इथं आहे आणि मी स्वतःसाठी जळत आहे.’
या संग्रहाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची समाजशास्त्रीय दृष्टी. लेखिकेने प्रत्येक कथेत स्त्रियांच्या मनोवस्थेला सामाजिक रचनेशी जोडून पाहिलं आहे. ‘मुस्लीम महिला’ या ओळखीला केवळ बाह्य बंधन म्हणून न पाहता, त्याच्या आतल्या गुंतागुंतीत प्रवेश केला आहे. बानू मुश्ताक सांगतात, बदल बाहेरून नाही, तर आतून यायला हवा. स्त्रियांनी स्वतःच आपल्या जीवनाचे निर्णय घ्यावेत. तेच खरं सशक्तीकरण आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या कथा वाचताना कर्नाटकातील ‘बंडाया साहित्यपरंपरे’चा प्रभावही स्पष्ट दिसतो. १९७०च्या दशकात कर्नाटकात सुरू झालेली ‘बंडाय चळवळ’ (Bandaya Movement) ही केवळ साहित्यिक नव्हे, तर सामाजिक-राजकीय उठावाचीही चळवळ होती. ‘बंडाय’ या शब्दाचा अर्थ आहे- बंड, विद्रोह, अन्यायाविरुद्धचा आवाज. ही चळवळ समाजातील वंचित, दलित आणि स्त्रिया यांच्या अनुभवांना केंद्रस्थानी आणणारी होती.
बानू मुश्ताक त्या परंपरेने प्रेरित झालेल्या लेखिका आहेत. त्यांच्या लेखणीत धर्म, पितृसत्ता, आणि वर्ग यांचं नातं गुंफलेलं आहे. त्यांच्या लेखणीत रोष आहे, पण तो एका प्रगल्भ विचारातून आलेला आहे. त्या समाजावर राग करत नाहीत, तर त्याला आरसा दाखवतात. त्यांचा हेतू दोषारोप नाही, तर संवाद सुरू करणं आहे. आणि हेच या संग्रहाचं बळ आहे.
हा संग्रह भारतीय साहित्यातील स्त्री-अनुभवाला एक नवं परिमाण देतो. समाजात आजही ‘मुलींसाठी योग्य’ आणि ‘मुलींसाठी नको’ अशा गोष्टींची लांबलचक यादी आहे. अशा वातावरणात ‘हार्ट लॅम्प’सारखं साहित्य आपल्याला ‘आपण अजून किती मागे आहोत?’ याचा विचार करायला भाग पाडतं. कारण स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न फक्त धर्माशी संबंधित नाही; तो आपल्या मानसिकतेशी संबंधित आहे.
बानू मुश्ताक यांचं लेखन त्या मानसिकतेवर प्रकाश टाकतं, पण उपदेश देत नाही. ते ऐकायला लावतं, विचार करायला भाग पाडतं. त्यामुळे हे पुस्तक आरशासारखं आहे. आपल्या समाजात धर्मभेद नसले, तरी स्त्रीविरोधी संस्कार सर्वत्र सारखेच आहेत. घरातल्या मर्यादा, इज्जत, परंपरा या शब्दांनी किती आयुष्यं आणि पिढ्या गप्प झाल्या आहेत. बानू मुश्ताक यांच्या कथा सांगतात की, या मर्यादांमधून बाहेर पडणं म्हणजे समाजाच्या विरोधात जाणं नव्हे, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं. एका कथेतली नायिका म्हणते, “मी देवावर विश्वास ठेवते, पण देवाने मला विचार करण्यासाठी दिलेला मेंदू वापरणं माझं कर्तव्य नाही का?” या वाक्यात या संपूर्ण पुस्तकाचं सार दडलेलं आहे.
हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो.
.................................................................................................................................................................
लेखिका अंजली प्रविण NALSAR युनिव्हर्सिटी फेअर ट्रायल प्रोग्रॅममध्ये डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. क्रिमिनल जस्टीस सिस्टीमच्या अभ्यासक आहेत.
amkar.anju@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment