दिल्लीच्या सीमेवरचे शेतकरी आंदोलन मुख्यतः पंजाबपुरतेच मर्यादित का आहे?
पडघम - देशकारण
प्रभाकर देवधर
  • दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाची छायाचित्रं आणि पंजाबचा नकाशा
  • Thu , 11 February 2021
  • पडघम देशकारण शेतकरी आंदोलन Farmers protest शेती farming शेतकरी farmer शेती सुधारणा बिल Farm Reform Bill

आजच्या पंजाबामधील कृषी उद्योगाची परिस्थिती जाणल्याशिवाय सध्या गाजत असलेले शेतीसुधार कायद्याच्या विरोधातले शेतकरी आंदोलन मुख्यतः पंजाब राज्यापुरतेच मर्यादित का आहे, हे समजणार नाही. पंजाबच्या मानाने इतर राज्यांतील शेतकऱ्यांनी नव्या कायद्याला विशेष विरोध केल्याचे दिसत नाही. असे का याचे उत्तर पंजाबमधील सामाजिक आणि शेतीबद्दलच्या सद्यस्थितीत लपलेले आहे.

मूलतः पंजाब राज्याचे तीन भाग आहेत - माळवा, माज्या आणि दोआबा. माळव्यात लुधियाना, पतियाळा, संग्रूर, भटिंडा आणि मोहाली ही मोठी शहरे आहेत. अमृतसर, गुरदासपुर आणि तरणतरण ही शहरे आहेत माज्या भागात आणि जालंदर, कपुरथला, होशियारपूर आणि फग्वारा दोआबात. सुपीक जमिनीमुळे या भागात कृषी उद्योग मोठा आणि महत्त्वाचा आहे. पंजाबमधील जमीन अतिशय सुपीक आहे. सारा प्रदेश हिरवागार! शिवालिक भाग सर्वांत निसर्गरम्य आहे.

या राज्यात २२ जिल्हे आणि लोकसंख्या अडीच कोटीच्या आसपास. ६० टक्क्यांवर लोक खेड्यात राहतात. जगातील अंदाजे अडीच कोटी शीख समाजापैकी ८३ टक्के भारतात राहतात. पंजाबमध्ये एकूण संख्येच्या अंदाजे ६६ ते ७० टक्के लोक शीख आहेत.

पंजाबमध्ये खलिस्तान हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याची व्याप्ती भारत-पाकिस्तानच्या प्रदेशात आहे. १९८० सालापासून या मोहिमेला जोर आला. १९७१च्या युद्धादरम्यान भूत्तोने त्यांना मदत करण्याचे वचन दिले होते. सध्या कॅनडात नागरिक असलेले शीख खलिस्तानचा जोरदार पाठपुरावा करतात. पंजाबात त्याचा विशेष प्रसार दिसत नाही. पंजाबात राहणारे शीख आणि भारतात इतरत्र राहणारे शीख यांच्या सामाजिक वागणुकीत खूप तफावत दिसते. दिलदारपणा आणि नि:स्वार्थी सेवा यासाठी सारे शीख इतर भारतीय समाजाला भावतात.   

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

पंजाब कृषी संपन्न असला तरी त्याचे राज्याच्या जीडीपीतील प्रमाण फक्त २४ टक्के आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात पंजाब देशातील एक अग्रणी राज्य आहे. वर्षभर जास्तीत जास्त कृषी उत्पादन करण्यासाठी तांदूळ आणि गव्हाची पिके काढण्यावर शेतकऱ्यांचा जोर असतो. त्यामुळे रासायनिक खतांचा प्रचंड वापर आणि भूगर्भ पाण्याचा प्रचंड उपसा केला जातो. दुसऱ्या पिकासाठी जमीन हवी म्हणून जमिनीवरील जुन्या पिकांचे अवशेष जाळण्यावर जोर दिला जातो. या हवरेपणामुळे जमिनीचा कस कमी झालाय आणि खोलवर असलेले भूगर्भातले पाणी उपसण्यासाठी पाण्याच्या पंपांचा वापर केला जातो. काही काळात याचे दुष्परिणाम पंजाबी शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. मान्सूनचे पाणी वापरण्यासाठी राज्य सरकारने नवीन कायदे केले आहेत.

राज्यातील जंगले वाढवण्यासाठी राज्य सरकारने कायदे केले, पण मोकळी जमीनच उपलब्ध नाही. त्यामुळे मिळेल त्या जमिनीत झाडे लावण्याची मोहीम चालू आहे. त्याचे अनिष्ट दुष्परिणाम शिवालिक टेकड्यातील जंगलांवर होत आहेत. जंगलांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. शिशु वृक्षांची संख्या रोडावली आहे. विशेषतः जंगलातील जमिनीची जैवविविधता सातत्याने कमी होत आहे. शेतीसाठी पाण्याचा होणारा उपसा धोकादायक सीमेवर पोहोचला आहे. तांदळाच्या पिकासाठी प्रचंड प्रमाणात पाणी वापरले जात आहे. सरकार यावर विविध उपाय योजतेय, पण ते वाढणाऱ्या कृषी उद्योगामुळे अशक्य होताना दिसत आहे.

पंजाबातील शहरीजीवन आहे मुख्यतः लुधियाना, अमृतसर, पतियाळा आणि जालंदर या मोठ्या शहरांत. खेड्यांतून शहरात येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. परिणामी या शहरांची लोकसंख्या खूप वाढली आहे. ही वाढती लोकसंख्या सामावून घेण्यात शहरी प्रशासन असमर्थ दिसत आहे. उपलब्ध होणारी घरे, पाणी पुरवठा, कचरा निर्मूलन, आरोग्यरक्षणार्थ घ्यायची खबरदारी ही प्रशासनाची जबाबदारी आहे, पण त्यात ते कमी पडत आहे. विशेषतः गरिबांच्या वस्त्यांत गलिच्छपणा वाढता आहे. अयोग्य नियमनामुळे आणि शेतकऱ्यांना वीज फुकट दिल्यामुळे विजेचे नियमन नाही आणि सर्वत्र विजेचा तुडवडा आहे. सरकारने सौर ऊर्जेला प्राधान्य दिले आहे.   

हरितक्रांतीच्या काळात पंजाब अग्रेसर होता आणि त्याचे मोठे कौतुक होत होते. पण गेल्या तीन-चार दशकांत पंजाबमध्ये अनेक धोक्याच्या गोष्टी घडत गेल्या आहेत आणि आजही होत आहेत. त्यामुळे आजचे आंदोलन समजण्यासाठी तेथील आजची परिस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

१९८०-८५पर्यंतचा पंजाब निराळा होता, सर्वांत श्रीमंत राज्य होते. तेथील लोकांचे दरडोई उत्पन्न देशात सगळ्यात जास्त होते. शेती उत्पादन सर्वांत पुढे होते. पंजाबी शेतकरी इतर राज्यांपेक्षा जास्त कष्टकरी आणि उद्योगशील समजले जात. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज पंजाब शेती उत्पन्नाच्या वाढीत इतर राज्यांपेक्षा खूप मागे पडला आहे. एकरी उत्पन्न आणि शेतकऱ्यांची उत्पादकता सातत्याने खूप कमी होत गेली आहे. राज्याची ही अधोगती होत असताना पंजाब सरकारनेही ती रोखण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. प्रामुख्याने या अधोगतीला कारण आहे, तेथील ग्रामीण भागातील तरुण वर्गात शेती उद्योगाला पर्याय नसल्याने वाढणारी बेरोजगारी.

आजकाल पंजाबची सर्वांत मोठी समस्या आहे- तरुण मंडळीत अंमली पदार्थांचे वाढते सेवन आणि अमली पदार्थांचा खुला व्यापार. तरुणांच्या मनोरंजनाचा तो भाग बनला आहे. हे भयानक प्रकरण आहे. एका पाहणीनुसार पंजाबच्या सीमेवरील भागात अंमली पदार्थाची चटक लागलेल्या  वयवर्षे १५ ते २५ असलेल्यांची संख्या ७५ टक्के आहे. खेडेगावातील एकंदर कुटुंबांपैकी ६७ टक्के घरात एक तरी व्यक्ती गन्जड आहे! ‘भुकी’ हा अमली पदार्थ पंजाबमध्ये सर्रास मिळतो. त्याने सुरुवात झाली की, मग मिळते पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानातून चोरटी आयात होणारे हिरोईन आणि ओपियम. पंजाबात मिळणाऱ्या दंतमंजनातही निकोटीन मोठ्या प्रमाणांत असते. चोरट्या मार्गाने आयात करून अमली पदार्थ विकणे हा अतिशय फायद्याचा व्यवसाय आहे! पंजाबी तरुणाच्या भविष्याची चिंता साऱ्या विचारवंतांना आहे.          

सरकारने शेतकऱ्यांना अनेक प्रकारे दिलेल्या सवलतींमुळे आज बरेच पंजाबी शेतकरी खूप श्रीमंत आहेत. शेतीमालाचे व्यापार करणारेही श्रीमंत आहेत. सध्याचे आंदोलन उचलून धरण्यात हे शेतकरी अग्रेसर आहेत.  

या आंदोलनामागचे एक कारण आहे - इतर राज्यांच्या मानाने गेल्या दोन दशकांत पंजाबमधील कृषी उद्योगाची वाढ खूप कमी आहे. शेतमालाच्या एकरी उत्पादनात वाढ नाही आणि होणारी आमदनीसुद्धा कमी आहे. तरुणांनाही शेतावर काम करण्यात रस नाही. वारेमाप उपसा केल्याने भूगर्भातील पाण्याचा साठा कमी झाला आहे, पण खोलवर बोअरवेल्स लावून त्याचा उपसा केला जातो आणि त्याचा खर्च फार मोठा असल्याने शेती खर्चिक झाली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढू लागल्या आहेत. तरुण शेती करण्यात राजी नसल्याने मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले आहे. यामुळेही बेकारी मोठ्या प्रमाणात आहे. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्याने पंजाबात उद्योगधंद्यांची वाढ खूप कमी आहे. लुधियानातील बरेच कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. १९९१मध्ये देशाची उद्योगनीती बदलल्याचा फायदा पंजाबी लोकांनी घेतला नाही. जे थोडे धंदे चालू झाले, त्यांना सरकारने पाहिजे तशी मदत केली नाही. सरकारचा जोर कृषी उत्पादनांवर होता. शेतकऱ्यांना वीज फुकट दिली, पण सामान्य उद्योगांना नाही. बहुतेक शेतकरी वर्षात दोन पिके काढतात. पाणी कमी असूनही चांगला भाव मिळत असल्याने तांदूळ आणि गहू अशी दोन उत्पादने शेतकरी घेऊ लागल्याने आणि कृषी व्यवसाय करणाऱ्यांना इन्कम टॅक्स नसल्याने श्रीमंत शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. 

गेल्या तीन शतकांत हजारोच्या संख्येने पंजाबी तरुण आणि कुटुंबेच्या कुटुंबे पंजाब सोडून परदेशात गेली. शेतीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्या नाहीत आणि इतर काम करण्यात नाराजी असल्याने तरुणवर्गात बेकारी वाढली. तरुण मोठ्या संख्येने नशेली बनले. गुन्हेगारी वाढली. सरकारी नोकरी जातीनुसार होण्यास सुरुवात झाली. जाट समाजाला खास वाव मिळू लागला. राज्यातील साडेतीन कोटी कामगार कृषी उद्योगांतून बाहेर पडले. कायदा सुव्यवस्था कमजोर झाल्याने आणि बेकारीमुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नशा करणाऱ्यांची संख्या वाढली. या बाबतीत सरकारनेही काही ठोस कार्यक्रम हाती घेतलेला नाही. सीमाभागातून होणारी अमली पदार्थांची तस्करी मोठी आहे.  

वर्षात तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन घेणारे पंजाबी शेतकरी मात्र आज श्रीमंत आहेत. त्याचा व्यापार करणारी ठेकेदार मंडळीही श्रीमंत आहेत. कृषीक्षेत्राचे योग्य नियमन करण्यासाठी केलेले कायदे या मंडळींना मिळालेले मोकळे रान सीमित करणारे आहेत. म्हणून त्यांना हे कायदे मान्य नाहीत. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर गेले काही महिने त्यांनी सुरू केलेले आंदोलन पुढे चालू ठेवण्यात त्यांना अडचण नाही.

..................................................................................................................................................................

लेखक प्रभाकर देवधर अ‍ॅपलॅब कंपनीचे संस्थापक आणि भारताच्या इलेक्ट्रॉनिक धोरणाचे प्रणेते आहेत.

psdeodhar@aplab.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा