‘इंडिया’ आघाडीची बैठक महाराष्ट्रात यशस्वीरित्या पार पडत असली, तरी ‘इंडिया’च्या झोळीत महाराष्ट्र किती जागा टाकणार?
पडघम - राज्यकारण
सुहास कुलकर्णी
  • ‘इंडिया’ आघाडी, काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची बोधचिन्हे. सोबत शरद पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे.
  • Thu , 31 August 2023
  • पडघम राज्यकारण इंडिया INDIA काँग्रस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP शिवसेना Shivsena शरद पवार Sharad Pawar सुप्रिया सुळे Supriya Sule नाना पटोले Nana Patole पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan अशोक चव्हाण Ashok Chavan उद्धव ठाकरे Uddhav Thackeray

मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत व्हायच्या त्या विषयांवर चर्चा होतील, निर्णय होतील. काही विषय पुढच्या बैठकीसाठी ठेवले जातील. काही राज्यांत जागावाटपाबाबत आघाडीतील पक्षांमध्ये वाद-ताण आहेत. ते विरोधी पक्षांच्या व्यापक एकजुटीच्या आड येऊ नयेत, म्हणून तो विषय कदाचित पुढेही ढकलला जाईल. पण काही राज्यांमध्ये आघाडीतील घटक पक्षांमध्ये आपसांत मतभेद नसले, तरी तिथे आघाडी भाजपसोबत सामना करायला पुरेशी सक्षम नाही, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्र हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल.

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हे पक्ष एका बाजूला तर एमआयएम, मनसे आणि आणखी काही छोटे पक्ष वगळता उर्वरित सर्व विरोधी पक्ष दुसऱ्या बाजूला असं चित्रं असण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांनी आपला निर्णय अजून जाहीर केलेला नाही. पण येती निवडणूक भाजप आणि मोदींचं काय करायचं, या प्रश्नाभोवती फिरणार असल्याने हे पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता कमीच आहे.

याचा अर्थ महाराष्ट्रात व्यापक ‘इंडिया’ आघाडी उभी राहील. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), डावे पक्ष आणि त्यांचा प्रागतिक विचार मंच, असे अनेक पक्ष या आघाडीच्या छताखाली असतील. त्यांच्यातील स्पर्धा, वाद, रुसवे-फुगवे चर्चेमार्फत सोडवता येतील, इतपतच असतील कदाचित. पण प्रश्न त्या पलीकडचा आहे. भाजपने एकनाथ शिंदे आणि विशेषत: अजित पवार यांना आपल्या गोटात ओढून घेतल्यानंतर भाजप आघाडीची ताकद कमालीची वाढलेली दिसते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

हे तीन पक्ष निवडणूक एकत्र लढवणार असल्याने जागा वाटपावरून त्यांच्यातही स्पर्धा, वाद, ताणतणाव आणि रुसवेफुगवे घडणार आहेत. पण नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्यांना मतं मिळणार असल्याने भाजपचे नवे मित्र पक्ष फार ताणून धरू शकणार नाही, हे उघड आहे.

भाजप आघाडीची जमेची बाजू म्हणजे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या मूळ पक्षातील बहुतेक आमदार-खासदार आलेले असल्यामुळे त्यांना निवडणूक लढवणं तुलनेने सोपं असणार आहे. त्यांच्याकडे संघटनात्मक रचना आणि शक्ती असल्यामुळे त्यांना नव्याने फार काही करण्याची गरज नाही. भाजपसोबत वाटाघाटी करणं आणि आपापले उमेदवार निवडून आणणं, एवढंच त्यांना करायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या निवडणुकीत भाजप आघाडीचं पारडं जड असणार, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ऐनवेळी पाडापाडीचा खेळ झाला आणि जुने हिशेब चुकते करण्याचा विचार बळावला, तर बात अलाहिदा.

या पार्श्वभूमीवर, भाजप आघाडीचा सामना करण्यासाठी व्यापक ‘इंडिया’ आघाडी उभी राहिली आणि त्यांनी आपला ताळमेळ नीट बसवला, तरी त्यांच्या यशाची कुणी खात्री देऊ शकत नाही. याचं कारण एकाही घटक पक्षाची परिस्थिती आलबेल नाही.

काँग्रेस

आजघडीला ‘इंडिया’ आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष काँग्रेस आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडण्यापूर्वी हा आघाडीतील सर्वांत छोटा पक्ष होता. या पक्षाची ताकद राज्यभर इतस्त: विखुरलेली आहे. प्रभावक्षेत्र नावाची गोष्ट आता शिल्लक राहिलेली नाही. कोकणातून हा पक्ष जवळपास उखडला असून अन्य विभागांतही एखाद-दुसऱ्या जिल्ह्यात अस्तित्व टिकवून आहे. त्या त्या जिल्ह्यातील लोकसभेच्या जागा निवडून येतीलच, अशी खात्री कुणी देऊ शकत नाही.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपेतर विरोधी पक्ष एकत्र, आता या विरोधकांची भाजपविरोधातील प्रत्यक्ष लढाई सुरू होईल...

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – ‘इंडिया’

विरोधी ऐक्यातील सर्वांत कमजोर कडी अन्य कुणी नसून ‘काँग्रेस’च आहे

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – मोदी म्हणजे भाजपच!

..................................................................................................................................................................

पक्षाकडे स्वत:चा असा ठोक पाठीराखा वर्गही राहिलेला नाही. मुस्लीम हा एकच घटक काँग्रेसकडे खात्रीने आहे. अन्यथा तथाकथित सवर्ण, मराठा, अन्य मागास, मागास आणि आदिवासी या सर्वच घटकांत विविध पक्षांनी यशस्वी शिरकाव केलेला आहे. त्यामुळेच या एकेकाळच्या सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रात गेल्या वेळी जेमतेम १६ टक्के मतं मिळाली होती आणि एकच खासदार दिल्लीत पोहोचला होता.

पक्षात पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात वगैरे नेते मंडळी मुबलक असली, तरी त्यांच्यात समन्वय नाही. किंबहुना गटबाजीच अधिक आहे. कोल्हापूरचे सतेज पाटील, भोर-पुण्याचे संग्राम थोपटे, अमरावतीच्या यशोमती ठाकूर, लातूरचे अमित देशमुख, सोलापूरच्या प्रणिती शिंदे, सांगलीचे विश्वजीत कदम, मुंबईतील बाबा सिद्दिकी, संजय निरुपम, भाई जगताप, अस्लम शेख असं स्थानिक पातळीवरचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे. पण या सर्वांना एकत्र बांधून, त्यांना आणखी शक्ती देऊन पक्षाची ताकद वाढवणारं नेतृत्व नाही.

नाना पटोले यांच्याकडे राहुल गांधी-मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रदेशाध्यक्षपद सोपवलेलं असलं, तरी त्यांच्या कार्यशैलीवर अनेक नेते नाराज आहेत. पटोले व अन्य नेत्यांनी महाराष्ट्रातील ‘भारत जोडो’ यात्रा यशस्वी करून दाखवली खरी, पण त्यातून तयार झालेली ऊर्जा गटबाजीपायी ते राखू शकले नाहीत. आता पक्षातर्फे ३ ते १७ सप्टेंबर ‘जनसंवाद यात्रा’ चालवली जाणार आहे. पण त्यातूनही खूप काही साध्य करण्यासाठी महत्प्रयास होईल, असं दिसत नाही.

‘इंडिया’ आघाडीतील सर्वांत मोठ्या पक्षाची अवस्था ही अशी आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस हे तर एक न सुटणारं कोडंच बनलं आहे. कधी पक्षात फूट पडलेली नाही, असं म्हटलं जातं आहे; तर कधी निवडणूक आयोग फुटीचा निर्णय करेल, असं म्हटलं जात आहे. पवारांच्या दोन गटांकडे किती आणि कोणते आमदार आहेत, हे अजूनही विधानसभेत अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. अजित पवार आणि त्यांच्या गटाला शरद पवार यांनीच भाजपकडे पाठवलं आहे की, खरोखरच अजित पवार यांचा गट शरद पवार यांच्या विरोधात गेला आहे, हे अद्याप कळलेलं नाही.

भाजपसोबत कधीही जाणार नाही, असं शरद पवारांनी अनेकदा जाहीर केलेलं असलं, तरी ते अजित पवार समर्थक तीन डझन आमदारांविरुद्ध कारवाई करायला तयार नाहीत. शरद पवार नाशिक, बीड, कोल्हापूर वगैरे ठिकाणी जंगी सभा घेऊन टीका करत असले, तरी अजित पवार यांच्याबद्दल ते बोलायला तयार नाहीत. कदाचित सुप्रिया सुळेंना बारामतीतून निवडून आणण्यासाठी त्यांना अजित पवार यांची मदत लागणार असल्यामुळे ते टीका करत नसावेत, असं म्हटलं जातं. त्यामुळे राष्ट्रवादीची वैचारिक आणि व्यावहारिक भूमिका वेगवेगळी दिसते आहे. परिणामी त्यांच्यावर भाजपविरोधी मतदार किती विश्वास ठेवेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे बहुतेक लोकप्रतिनिधी आणि पक्ष संघटना अजित पवारांकडे गेलेली असल्याने शरद पवार यांना पहिल्यापासून सुरुवात करावी लागत आहे. त्यांचं वय आणि तब्येत पाहता वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची शारीरिक ऊर्जा त्यांच्याकडे असेल, असं मानणं त्यांच्यावर अन्यायकारक असेल. जितेंद्र आवाड वगळता तडफदार शिलेदार त्यांच्या हाताशी नाही. खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपसोबत जाणार अशा वावड्या अधूनमधून उठत असतात.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

सुप्रिया सुळे या खासदार असल्या तरी त्यांचा महाराष्ट्रभर प्रभावी वावर नाही. अजित पवार यांच्याएवढा त्यांचा स्थानिक नेते-कार्यकर्त्यांसोबत संवाद-संपर्कही नाही. अजित पवार कार्यकर्त्यांना नाना पद्धतीने मदत करून बांधून ठेवतात. ती सुप्रिया सुळेंची शैली नाही. शिवाय पक्षात बंड झाल्यानंतर त्यांचा आवाज मुखर झाल्यामुळे त्यांना नेतृत्व प्रस्थापित करायला वेळही मिळालेला नाही. राजेश टोपे, अनिल देशमुख, अमोल कोल्हे यांचाही प्रभाव मर्यादित क्षेत्रात आहे. त्यामुळेच सर्वस्व पणाला लावून पुन्हा एकदा पक्षबांधणी करण्याशिवाय पवारांना पर्याय उरलेला नाही.

एकीकडे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना साद घालण्यापासून एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांना पक्षात जबाबदारी देण्यापर्यंत सर्व पातळ्यांवर त्यांना हालचाल करावी लागत आहे. पण निवडणूक तोंडावर असताना पक्ष नव्याने उभा करणं शरद पवारांसारख्या अनुभवी आणि मातब्बर नेत्यालाही तेवढंसं शक्य नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस हा जिल्ह्या-तालुक्यातील सरदार-शिलेदारांची मोट बांधून उभा केलेला पक्ष होता. ते सारे रातोरात पसार झाल्यानंतर शरद पवार तरी नवे नेते कुठून आणणार? गेल्या निवडणुकीत पक्ष एकसंध असतानाच पक्षाला फक्त १५.६ टक्के मतं मिळाली होती. त्यातली किती मतं शरद पवारांकडे उरली असतील हा प्रश्नच आहे.

त्यामुळे शरद पवार राष्ट्रीय पातळीवरील ‘इंडिया' आघाडीचे महत्त्वाचे नेते, सूत्रधार, समन्वयक असले, तरी त्यांच्या पक्षाची राज्यातली परिस्थिती नाजूक आहे, हे नाकारण्यासारखं नाही.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपेतर विरोधी पक्ष एकत्र, आता या विरोधकांची भाजपविरोधातील प्रत्यक्ष लढाई सुरू होईल...

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – ‘इंडिया’

विरोधी ऐक्यातील सर्वांत कमजोर कडी अन्य कुणी नसून ‘काँग्रेस’च आहे

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – मोदी म्हणजे भाजपच!

..................................................................................................................................................................

शिवसेना

या दोन पक्षांची अवस्था पाहता ‘इंडिया’ आघाडीतील शिवसेना हा पक्षच तुलनेने सुस्थितीत आहे,  असं म्हणावं लागेल. या पक्षाचे बहुतेक आमदार पक्ष सोडून गेलेले असले, तरी ‘ब्रँड ठाकरे’ अजून कायम आहे हे उद्धव ठाकरे यांच्या उत्स्फूर्त, सळसळत्या सभांमधून स्पष्ट होत आहे. ठाकरे यांना ज्या रितीने पायउतार केलं गेलं आणि नंतर पक्षात फूट पाडली गेली, त्यामुळे राज्यभर शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे. या असंतोषाची धगच उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचं इंधन असणार आहे. मात्र यंदा ठाकरे यांना एकाच वेळीस फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी लढायचं आहे.

शिंदे गटातील नेत्यांना अजित पवार यांच्याशी जुळवून घेणं अवघड झालं आणि त्यांच्यासमोर आगामी संधींबाबतचे प्रश्न निर्माण झाले, तर त्यातील काही मंडळी शिवसेनेकडे परतूही शकतात. पण त्यामुळे ही लढाई सोपी होणारी नाही.

या आधी म्हटल्याप्रमाणे पक्षांतर करून नेतेमंडळी पलीकडे गेलेली असली, तरी सामान्य शिवसैनिक ठाकरे यांच्यासोबतच राहिलेले दिसतात. हीच पक्षाची ताकद असणार आहे. पण ती निवडणुकीत पुरेशी ठरेल का, याचा अंदाज अजून कुणाला आलेला नाही. राज्यात महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या असत्या, तर कदाचित त्यातून काही अंदाज आला असता. पण तसं घडलेलं नाही. त्यामुळे राज्यभर फिरत राहायचं आणि शिवसैनिक व पारंपरिक मतदारांना हाक देत राहायची, असं सूत्र उद्धव ठाकरे यांनी अवलंबलेलं दिसतं.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना अभंग होती आणि त्यांची भाजपसोबत युतीही होती. त्यामुळे लोकसभेच्या लढवलेल्या २३ पैकी १८ ठिकाणी त्यांना विजय मिळाला होता आणि मतं २३.५ टक्के. आता परिस्थिती बदलली आहे. पक्षात फूट पडली आहे आणि भाजपसोबतची युती संपलेली आहे. त्यामुळे समर्थक सोबत असले तरी लढाई परीक्षा घेणारी असणार आहे.

थोडक्यात, ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत जवळचे आणि दूरचे महत्त्वाचे निर्णय होणार असले तरी त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलणारी नाही. तूर्त ‘इंडिया’ आघाडीची बैठक महाराष्ट्रात यशस्वीरित्या पार पडत असली, तरी ‘इंडिया’च्या झोळीत महाराष्ट्र किती जागा टाकणार, याबाबत शंकाच आहे. डाव्या आणि प्रागतिक पक्षांनी एक सप्टेंबरपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत शेतकरी, कामगार आणि अन्य वंचित घटकांसाठी व्यापक धडक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यातून राज्यात काही घडामोड घडते का, लोकांमधील सरकारविरोधी भावना एकवटली जाते का, आणि ‘इंडिया’ आघाडीला काही टोकदार कार्यक्रम मिळतो का बघायचं.

अन्यथा ‘इंडिया’त महाराष्ट्र क्वचितच दिसण्याची शक्यता अधिक आहे.

.................................................................................................................................................................

लेखक सुहास कुलकर्णी ‘अनुभव’ मासिकाचे आणि ‘समकालीन प्रकाशना’चे मुख्य संपादक आहेत.

samakaleensuhas@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा