द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...
पडघम - देशकारण
अतिष नागपुरे
  • बिल्कीस बानो, कथुआ, हाथरस हत्याकांड, मणिपूर आणि महिला कुस्तीपटू या घटनांची छायाचित्रं
  • Sat , 22 July 2023
  • पडघम देशकारण बिल्कीस बानो कथुआ kathua हाथरस हत्याकांड Hathras Gangrape case मणिपूर Manipurमैतेई Meitei कुकीKuki महिला पैलवानांचे आंदोलन Women Wrestler's Protest लैंगिक शोषण Sexual abuse

‘गिधाडे’ हे विजय तेंडुलकरांचं नाटक सत्तरच्या दशकात मराठी रंगभूमीवर आलं होतं. त्या वेळी त्यातील हिंसा आणि संवादांमुळे मोठा गहजब माजला, त्यावर बंदीची मागणी होऊ लागली. या नाटकाच्या अनुषंगानं एका नव्या वादाला तोंड फुटलं होतं. ते म्हणजे, हिंसा ही मनुष्यात उपजत असते की नसते. त्यावर तेंडुलकरांचं म्हणणं होतं की, प्रेम आणि अन्य भावनांप्रमाणे हिंसा हीदेखील मनुष्यात निसर्गत:च असते. आज तेंडुलकर शत-प्रतिशत खरे ठरत आहेत.

द्वेष आणि द्वेषावर उभारलेला भारतीय समाज हिंसा-क्रौर्याची सीमा ओलांडत आहे. स्त्रीवर बलात्कार, अत्याचार आदिम काळापासून सुरू आहेत. पण आजचं दुर्दैव असं आहे की, इथं महिलांवरील बलात्कार\अत्याचार यांचं उघड समर्थन करणारे, त्याला छुपा पाठिंबा देणारे, मूकसंमती दर्शवणारे किंवा आतून सुखावलेले पण नाईलाजानं लोकलाजेस्तव मिळमिळीत निषेध करणारे हात बहुसंख्य होत चालले आहेत.

तेंडुलकरांच्या भाषेत ही सर्व गिधाडे आहेत, पण खरं तर ती यांच्यापेक्षा फार बरी असतात; कारण ती फक्त मृत जनावरांचेच लचके तोडतात. मात्र इथं जिवंत स्त्रीला नागवलं जातंय, तिच्या देहाची सरेआम विटंबना केली जातेय. युद्धात पराभूत झालेल्या परधर्मीय विरोधकांच्या स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणाऱ्या शिवाजी महाराजांपेक्षा त्यांच्या या उदात्त-महान विचारांना ‘सद्गुणविकृती’ म्हणणाऱ्यांना या देशात सन्मानाचं स्थान मिळवतंय, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते!

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

गेल्या दशकभरात घडलेल्या काही घटनांकडे बारकाईनं पाहिल्यास स्थळ-काळ यांत विविधता असली, तरी द्वेषाचं समान सूत्र सर्वत्र आढळतं. पुढील काही उदाहरणं तर आपल्या सगळ्यांना ज्ञात असतीलच-

कथुआ प्रकरण

जम्मूतील कथुआमध्ये एका आठ वर्षीय चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अनेक दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. अपहरण करून तिला मंदिरात ठेवण्यात आलं होतं. या घटनेत तिचा मृत्यू झाला. परंतु या घटनेनंतर जे काही घडलं, ते ‘न भूतो...’ असं होतं. या घटनेतील आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले. यात भाजपच्या राज्य सरकारातील दोन मंत्र्यांचाही समावेश होता. धक्कादायक म्हणजे, न्यायाची जबाबदारी असलेले वकीलही यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

हाथरस हत्याकांड

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका १९ वर्षीय दलित महिलेवर उच्च जातीतील चार जणांनी निर्घृण बलात्कार केला. त्यानंतर तिच्या हत्येचाही प्रयत्न करण्यात आला. अखेर काही दिवसांनी दिल्लीतील एका रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. उच्चवर्णीयांनी कमकुवत समाजातील मुलींवर बलात्कार\अत्याचार करणं, यात काही नवं नव्हतं; पण या घटनेनंतर जे घडलं, ते अधिक भयावह होतं. पीडितेच्या कुटुंबाला घरात डांबून मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलिसांनी त्या मुलीवर अंत्यसंस्कार करून टाकले. कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत पत्रकार-सामाजिक कार्यकर्ते-विरोधी पक्षांचे नेते, यांना पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास मज्जाव केला गेला. आणि त्याच वेळी, उच्चवर्णीय समाजाच्या सभा झाल्या. सत्ताधारी भाजपचा माजी आमदार राजवीर सिंग पहलवानने आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.

बिल्कीस बानो प्रकरण

२००२च्या गुजरात दंगलीदरम्यानची ही हृदयद्रावक घटना. या दंगलीत काही नराधमांनी बिल्कीसवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केली. त्या वेळी बिल्कीसचं वय २१ वर्षं होतं. ती गरोदर होती आणि तिला तीन वर्षांची एक मुलगीही होती. ती मुलगीही या घटनेत दगावली.

या घटनेतील ११ आरोपींची काही महिन्यांपूर्वी मुक्तता करण्यात आली. अशा अमानुष, नृशंस प्रकरणातील आरोपींची मुक्तता ही घटना तर दुर्दैवी आहेच, पण तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचा झालेला सत्कार म्हणजे नीचपणाचा कळस आहे. या आरोपींना ‘संस्कारी ब्राह्मण’ ठरवत भाजपच्या आमदाराने त्यांचा जाहीरपणे सत्कारही केला.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

महिला कुस्तीपटू प्रकरण

ही तर अगदी अलीकडची घटना. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असलेल्या महिला कुस्तीपटू अनेक दिवसांपासून दिल्लीत उपोषणाला बसल्या आहेत. राष्ट्रीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंहने आमच्यावर अत्याचार केले, असा त्यांचा आरोप आहे. पोलिसांनीही आपल्या आरोपपत्रात त्यात तथ्य असल्याचं म्हटलं आहे. हा ब्रिज भूषण भाजपचा खासदार आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात आहे. नुकताच त्याला न्यायालयाने जामीनही दिला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतातला ‘गोदी मीडिया’ या पीडित खेळाडूंनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करत आहे.

...आणि आता मणिपूर

शेवटचं प्रकरण म्हणजे, कालपरवा उघडकीस आलेली मणिपूरमधील दोन महिलांच्या नग्न धिंड आणि सामूहिक बलात्कारची घटना. त्यावर गेल्या दोन-चार दिवसांपासून सोशल मीडियावर भरपूर बोललं जात असल्यामुळे इथं त्याविषयी अधिक बोलण्यात अर्थ नाही.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

असिफाची हत्या आणि बलात्कारावर ‘चुप’ राहणाऱ्या लोकांचा नेता कोण आहे?

हाथरस गँगरेप : सत्याच्या दरवाजावर षडयंत्राचे पोलादी पडदे टाकण्याचा प्रयत्न

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ‘चोराला सोडून संन्याशाला फाशी’ ही म्हण सरकारने प्रत्यक्षात आणली आहे की काय? 

या मुली संविधानावर आणि न्यायालयावर विश्वास ठेवून लढत आहेत. त्यांनी लढावे, त्या लढतील... 

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

या सर्व घटना वेदनादायी आहेतच; पण त्यानंतर पसरलेली स्मशानशांतता अधिक वेदनादायी आहे. तसं म्हणायला काही घटनांनंतर तुरळक निषेध मोर्चे निघाले. पण बहुतांश भारतीय नागरिकांनी शांत राहणंच पसंत केलं. पीडितेची आणि आरोपींची जात, धर्म ही कारणं या शांततेमागे आहेतच; पण एका विशिष्ट विचारसरणीविषयी असलेलं आकर्षणही आहे.

म्हणूनच, मणिपूर प्रकरणावरून सरकारची कानउघडणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयावरच टीका करण्याची हिंमत भाजपचा एक आमदार करतो.

म्हणूनच, पीडितांची बाजू लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना माध्यमं ‘देशद्रोही’ म्हणण्यापर्यंत खालच्या पातळीला जातात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

ही शांतता निव्वळ ‘शांतता’ नाहीये, ती शस्त्रं आहेत आणि तो स्त्रीविरोधी विकृतीला मूक पाठिंबाही आहे.

हे नवे ‘शांततादूत’ केरळमध्ये हत्तीण मेल्यावर चुकचुकतात, पण एखाद्या महिलेवर अनन्वित, अमानुष अत्याचार झाले, तरी त्यांच्या तोंडून ‘ब्र’देखील निघत नाही. हे ‘शांतता’दूत स्वतःच्या विकृतीचं समर्थन करण्यासाठी ते असल्या ‘मसाल्या’ची वाटच पाहत असतात.

निर्भया बलात्कार आणि हत्याकांड घडलं, १६ डिसेंबर २०१२ रोजी. या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली, संतप्त नागरिकांनी निदर्शनं केली. विविध शहरांत मेणबत्ती मोर्चे निघाले. त्यात महिला, पुरुष, वृद्ध अशा सर्वांनीच सहभाग घेतला. त्यात मोठ्या प्रमाणात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग होता. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात दिव्यांचा तो मिणमिणता प्रकाश जखमांवरची निव्वळ फुंकर नव्हती, तर तो आशेचा एक किरण होता. या देशातील नागरिक आणि विशेषतः संवेदनशील तरुण पिढी न्यायासाठी बांधील आहे, लढणारी आहे, अशी आशा देणारी ती दृश्यं होती.

पण त्या वेळी पेटलेल्या मेणबत्त्या कधीच विझून गेल्यात. सध्या तर आशेचा एखादा किरण सापडणंही कठीण झालंय. द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय.

.................................................................................................................................................................

अतिष नागपुरे

a5nagpure@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा