मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे
पडघम - देशकारण
सागर भंडारे
  • ‘व्हायरल’ व्हिडिओतील दोन प्रतिमा
  • Fri , 21 July 2023
  • पडघम देशकारण मणिपूर Manipur मैतेई Meitei नागा Naga कुकी Kuki

मणिपूरमधील दोन कुकी महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ ट्विटर-फेसबुक-व्हॉटसअॅपवरून चांगलाच ‘व्हायरल’ झाला. त्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वादंग माजलं आहे. प्रत्यक्षात मात्र हा व्हिडिओ ४ मे २०२३चा आहे. म्हणजे मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली, त्या दिवसांतला.

स्त्रीची विटंबना - मग ती मैतेई असो कुकी असो, नागा असो की अजून कोणी - हे अत्यंत निंदनीय असंच कृत्य आहे. महिलांची अशी क्रूर विटंबना करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.

हा बीभत्स घटनेचा व्हिडिओ आताच का बाहेर आला, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचे प्रमुख कारण म्हणजे संपूर्ण मणिपूर राज्यात केंद्र आणि राज्य सरकारने संगनमताने लादलेली इंटरनेट बंदी अर्थात इंटरनेट लॉकडाऊन. त्यामुळे सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असलेल्या मणिपूरच्या तरुणाईला पूर्ण लगाम घातला गेला.

या व्हिडिओतली घटना घडली, त्याच दिवशी अनेक मोबाईल कॅमेऱ्यांनी टिपली आहे. हा व्हिडिओ मोबाईलमध्ये असणारी व्यक्ती मणिपूरबाहेर आली आणि मग तो सोशल मीडियाद्वारे जगभर व्हायरल झाला. मणिपूरशी सीमा म्यानमारशी जोडले गेलेली आहे. त्या मार्गानंदेखील हा व्हिडिओ ‘लीक’ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

ही केवळ एक घटना आहे. कदाचित अशा शेकडो-हजारो कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटना इंटरनेट सुरू होण्याची वाट बघत असतील. जेव्हा इंटरनेट सुरू होईल, तेव्हा त्या बाहेर येऊन मणिपूरमधली रौद्र परिस्थिती समोर येईल. या घटनेवरून गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून मणिपूर हे राज्य कशा प्रकारे धगधगतंय याची लख्ख कल्पना येऊ शकते.

या सगळ्याला सुरुवात झाली, ती एका सामान्य घटनेवरून.

मणिपूर हे अवघ्या ३२ लाख लोकसंख्येचं राज्य आहे. इम्फाळ हा सपाट प्रदेश आहे आणि त्यात राहणाऱ्या मैतेई समाजाची लोकसंख्या आहे ६२ टक्के. या भागात आणि त्या अनुषंगानं सर्व सरकारी यंत्रणांवर याच समाजाचं नियंत्रण आहे. डोंगराळ भागात नागा, कुकी, चीन-कुकी, हमार अशा शेकडो आदिवासी जमाती आहेत आणि त्या प्रत्येकाची एक स्वतंत्र संस्कृती आहे.

मैतेई, नागा आणि कुकी यांचा परस्परांशी असलेला वाद खूप जुना आहे. जमिनीच्या वर्चस्वाचा वाद हा या सर्व जमातींमधील रक्तरंजित इतिहास आणि वर्तमानाचा एक भाग आहे. मात्र अलीकडच्या कित्येक दशकांत कुकी आणि मैतेई यांचे परस्परसंबंध शांततापूर्ण राहत आले होते. मात्र मणिपूरमध्ये भाजप सत्तेत आल्यापासून या राज्यातील परिस्थितीला हिंसक वळण लागलं आहे.

मैतेई हा हिंदू समाज, तर नागा आणि कुकी हे ख्रिश्चन. हिंदू धर्माचे तथाकथित रक्षक आणि केंद्र व राज्य दोन्हीकडे राजकीय नेतृत्व असतानाही त्यांना हिंदूंचं रक्षण करता आलेलं नाही, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

मणिपूरमध्ये मैतेई समाज बहुसंख्य असल्याने १५ टक्के आरक्षणाची मागणी तेथील उच्च न्यायालयाने मान्य केली होती. त्याविरोधात नागा, कुकी, हमार आणि इतर जमातींनी एक शांततापूर्ण मोर्चा काढला होता. त्यावर मैतेईंनी हल्ला केला, असा आरोप कुकींनी केला होता. वस्तुस्थिती अशी होती की, या मोर्च्याच्या बुरख्याखाली म्यानमारमधून आलेल्या कुकींनी (म्यानमारमध्येदेखील बरेच कुकी आहेत आणि ते भारतात विनापरवाना ये-जा करतात.) डोंगराळ भागांच्या जवळ राहत असलेल्या शेकडो मैतेई लोकांची घरं जाळली, तेथील १००पेक्षा जास्त मैतेई स्त्रियांवर बलात्कार केले आणि त्यांना मारून टाकलं.

मैतेई हे तसे शांतताप्रिय, पण कोणी त्यांच्या वाटेला गेलं, तर त्याला जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन मारतात, एवढी क्रूरतादेखील त्यांच्याकडे आहे. त्यामुळे या घटनांचे अत्यंत तीव्र प्रतिसाद उमटले आणि मैतेईंनी शस्त्रं हाती घेतली.

मणिपूरच्या कमिशनरने (जो कुकी होता) आवाहन करूनही कुकींनी ऐकलं नाही. आसाम रायफल्समधील लोकांना हाताशी धरून कुकींनी शस्त्रास्त्रं मिळवली आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी मैतेई वस्त्यांवर हल्ले करून गोळीबार करून लोकांना मारलं, स्त्रियांना उचलून नेलं. आजही मैतेई समाजाच्या जवळपास एक हजारपेक्षा जास्त तरुण स्त्रिया बेपत्ता आहेत आणि सीमा भागात राहणारे १९,०००पेक्षा जास्त मैतेईंची घरे जाळली गेल्यामुळे ते विस्थापित कॅम्पमध्ये राहत आहेत.

प्रस्तुत व्हिडिओ हा शेकडो मैतेई मारले गेल्यानंतरची प्रतिक्रिया आहे. कुकींनी मैतेई स्त्रियांची विटंबना केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मैतेईंनी कुकी स्त्रियांची विटंबना केली. मैतेई ६२ टक्के असल्यानं कुकींपेक्षा संख्येनं जास्त आहेत. ते पेटले, तर आपलं अस्तित्वही शिल्लक राहणार नाही, याची १४-१५ टक्के कुकींनाही कल्पना आहे. पण या हिंसाचाराचा वापर करून डोंगराळ भागात कुकींचं वेगळं सरकार स्थापन करून, ते सरकार आणि प्रशासन पाहील, ही मागणी कुकींना मान्य करून घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी नागा जमातीकडूनदेखील समर्थन मागितलं होतं, पण नागांना (जे बहुसंख्येनं नागालँड-मणिपूर डोंगराळ सीमा भागात राहतात) मैतेई काय करू शकतात, याची पूर्ण कल्पना असल्यानं त्यांनी कुकींना मदत करणं नाकारलं.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?

मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!

.................................................................................................................................................................

आसाम रायफल्स ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतली सैन्याची तुकडी आहे. तिने अप्रत्यक्षरित्या कुकींना मदत केली, अशी मैतेईंची प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित भूमिका आहे. कुकी आसाम रायफल्सच्या जवानांसमोर मैतेईंना उघडपणे गोळ्या घालून निघून गेले. त्यामुळे आसाम रायफल्सची भूमिका संशयास्पद झाली. तिने हे असं का केलं, माहीत नाही. नंतर केंद्र सरकारने सीआरपीएफच्या अनेक तुकड्या पाठवल्या, पण सैन्याचं नाव खराब झालं ते झालंच.

आसाम रायफल्समधील काही हितसंबंध वापरून म्हणा की, अजून कोणत्या प्रकारे म्हणा, पण कुकींकडे शस्त्रं आली आणि त्यांनी डोंगराळ भागांत हिंसाचार व बलात्कार यांचं थैमान माजवलं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मैतेईंनी उघड उघड सरकारी शस्त्रागारातून शस्त्रं उचलून नेली.

या प्रतिउत्तराला मैतेई प्रशासन असलेल्या सरकारचं एक प्रकारे मूक समर्थनच होतं. कारण त्यामुळे बहुसंख्याक मैतेईंची अस्मिता जपली जाईल आणि राजकीय फायद्याची गणितं जुळवता येतील, हा हेतू असावा. पण इंटरनेट बंदीमुळे मणिपूरमधल्या भाजप सरकारची प्रतिमा अत्यंत खराब झाली आहे. शिवाय कुकींना अडवण्यासाठी सरकार काहीच करत नाहीये. उलट स्थानिक संघटना कुकींना प्रतिउत्तर देऊन मैतेईंचं रक्षण करत आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारांना मणिपूरमधल्या हिंसाचाराला पायबंद घालणं सहज शक्य होतं, पण ते त्यांनी केलं नाही. त्यामागे कदाचित त्यांचं राजकीय फायद्याचं गणित असावं. केंद्र व राज्य सरकारने केलेला सर्वांत मोठा मूर्खपणा म्हणजे इंटरनेटवर घातलेली बंदी. फोन आणि एसएमएस सुरू आहेत, टीव्ही सुरू आहे, पण इंटरनेट बंद. कोणत्या आधारावर इंटरनेट बंदीमुळे अफवा पसरणार नाही, हा भ्रम सरकार बाळगून होतं, ते त्याचं त्यालाच माहीत. त्यामुळे झालं काय की, सोशल मीडियावर आणि ऑनलाईन रोजगाराच्या कामात व्यस्त असलेला ९५ टक्के मैतेई आणि कुकी तरुण वर्ग रिकामा झाला. आणि हिंसाचार-बलात्कार यात सर्वांत पुढे हाच वर्ग आहे.

आता तरी केंद्र व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानून ताबडतोब इंटरनेट सुरू करावं. त्यामुळे या ‘अनुशासनपर्व’ काळातील सत्य बाहेर पडेल. त्याचबरोबर मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे.

.................................................................................................................................................................

लेखक सागर भंडारे इतिहास, पुरातत्त्व, विज्ञान, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांचे अभ्यासक आहेत.

sagarbhandare@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा