असिफाची हत्या आणि बलात्कारावर ‘चुप’ राहणाऱ्या लोकांचा नेता कोण आहे?
पडघम - देशकारण
रवीश कुमार
  • असिफा
  • Tue , 17 April 2018
  • पडघम देशकारण कथुआ kathua असिफा Asifa

इंग्रजी साप्ताहिक OPENमधील राहुल पंडिता (http://www.openthemagazine.com/article) आणि ndtv.com वरील नजीर मसुदी (https://www.ndtv.com/blog) यांचे लेख वाचा. मी तुमची चुप्पी समजू शकतो. जनावर झाल्यावर तुमचं बोलणंही बेकार आहे. तुम्ही जर अक्षरांकडेही हिंदू-मुसलमानांसारखं पाहत असाल तर तुमच्याकडून कशी अपेक्षा केली जाऊ शकते की, तुम्ही पुढे केलेला खुलासा वाचाल म्हणून. प्रयत्न करा. मी राहुल पंडिता आणि नज़ीर मसुदी यांच्या लेखांचं सार या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

२०१०मध्ये मोहम्मद युसुफने आपल्या बहिणीची मुलगी, असिफाला दत्तक घेतलं होतं. बकरवाल घुमंतू समाजाच्या युसुफ जम्मूमध्ये स्थायिक झाला होता. जिथं गेल्या पाच वर्षांपासून या समाजाविषयी डोगरा हिंदूंच्या मनात भीती निर्माण केली जात होती. रोहिंग्या मुसलमानांना इथं वसवण्याच्या बातमीनं याला बढावा मिळाला की, आपलं स्थान धोक्यात येत आहे. तुम्हाला माहीत आहे की, ही भीती कोण निर्माण करतं. त्यामुळे त्यांच्या मनात द्वेषाची भावना वाढू लागली की, जम्मूही मुसलमानांनी भरला जाऊ नये. जणू काही देशात मुसलमानांना कुठली जागाच नाही. राहुल पंडितानं लिहिलं आहे – हिंदू-बकरवाल यांच्यात तणाव वाढू लागला. संशय आणि द्वेषानं आठ वर्षाची मुलगी, असिफाला आपलं लक्ष्य बनवलं. तुम्ही आरोपपत्र वाचलंत तर तुम्हाला त्या जमावाचा भेसून चेहरा दिसेल.

आरोपपत्रामध्ये लिहिलं आहे की, या हत्येत मंदिराचा ६० वर्षीय पुजारी सांझी राम आणि पोलिस ऑफिसर दीपक खजुरिया यांचाही हात आहे. या भागातून बकरवाल समाजाला पळवून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सांझी रामचा डोळा बऱ्याच दिवसांपासून असिफावर होता. ती नेहमी घोड्यांना चरायला घेऊन जात असे. सांझी रामनं ही योजना दीपक खजुरिया, आपला मुलगा आणि पुतण्या यांना सांगितली. हा पुतण्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. त्यामुळे इथं त्याला पुतण्याच म्हणूया, त्याचं नाव घ्यायला नको. तीन महिने आधी या पुतण्याला एका मुलीशी दुर्वर्तन केल्यामुळे शाळेतून काढून टाकलं होतं.

पोलिस ऑफिसर दीपक खजुरिया औषधांच्या दुकानातून गुंगीचं औषध आणतो. त्यानंतर पुतण्याला सांगतो की, त्यानं जर असिफाला पळवून आणलं तर तो छुप्या पद्धतीनं परीक्षा पास होण्यासाठी त्याला मदत करेल. पुतण्या त्याचा मित्र परवेश कुमारला सांगतो. ९ जानेवारीला पुतण्या आणि परवेश जातात आणि गुंगीच्या चार पुड्या विकत घेतात. मी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की, तिरस्काराचं हे राजकारण तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना खुनी बनवेल. पहा, दोन मुलांचा कसा वापर केला जातो आहे.

१० जानेवारीला पुतण्याला दिसतं की, असिफा कुणा बाईला तिच्या घोड्यांविषयी विचारत आहे. तो असिफाला सांगतो की, त्यानं जंगलात घोड्यांना पाहिलं आहे. परवेश आणि पुतण्या तिच्या बरोबर निघतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार असिफाला संशय येतो आणि ती पळायला लागते. पुतण्या तिला पकडतो आणि खाली पाडतो. तिला जबरदस्ती गुंगीचं औषध देतो. ती बेहोश होते. पुतण्या तिच्यावर बलात्कार करतो. त्यानंतर परवेशही बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो, पण करू शकत नाही.

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

असिफाला उचलून पुजारी सांझी रामच्या मंदिरात आणलं जातं. दुसऱ्या दिवशी दीपक खजुरिया आणि पुतण्या असिफाला पाहायला येतात. खजुरिया तिच्या तोंडात गुंगीच्या दोन गोळ्या घालतो. संध्याकाळी पुतण्या मिरतमध्ये कृषी पदवीचा अभ्यास करत असलेल्या सांझी रामच्या मुलाला फोन करतो. त्याला सांगतो की, अपनी प्यास बुझाना चाहते हो तो जल्द आओ. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल जम्मूला पोहोचतो. त्यानंतर दोन तासांनी असिफाला गुंगीच्या तीन गोळ्या दिल्या जातात. तोवर तिला काहीही खायला दिलेलं नसतं.

आता सांझी राम आणखी एका पोलिसाला, तिलक रामला विश्वासात घेतो. १२ जानेवारीला दुपारी आसिफाचे वडील मोहम्मद युनुस पोलिस केस दाखल करतात. पोलिस तपास सुरू होतो. त्या टीममध्ये दीपक खजुरिया आणि तिलक राम दोघंही असतात. त्यांना वाचवण्यासाठी भाजपचे दोन मंत्री आणि पक्षाचे नेते सीबीआयद्वारे तपास करण्याचं ढोंग रचतात. आणि तिथं हिंदू एकता मंचची निर्मिती होते, ज्यासोबत हे लोक असतात.

सांझी राम आपल्या बहिणीकडे जातो आणि सांगतो की, त्याच्या मुलानं एका मुलीला पुळवून आणलं आहे. त्याला वाचवण्यासाठी पोलिसांना लाच द्यायची आहे. बहिणीकडून दीड लाख रुपये घेऊन येतो आणि तिलक रामला देतो. एकूण पाच लाख देण्याचं ठरतं, ज्यात पोलिस अधीक्षक आनंद दत्तालाही भागीदार करून घेतलं जातं. आनंद दत्ताही एक आरोपी आहे.

१३ जानेवारीला लोहडीच्या दिवशी सांझी राम, त्याचा मुलगा आणि पुतण्या मंदिरात जातात, पूजा करतात. सांझी राम गेल्यानंतर त्याचा मुलगा असिफावर बलात्कार करतो. त्यानंतर त्याचा लहान भाऊ बलात्कार करतो. त्यानंतर आसिफाला गुंगीच्या तीन गोळ्या दिल्या जातात. पोलिसांनी उरलेल्या गोळ्या जप्त केल्या आहेत.

लोहडी या सणाच्या दिवशी म्हणजे १३ जानेवारीला संध्याकाळी सांझी राम सर्वांना सांगतो की, मुलीला मारण्याची वेळ आलेली आहे. त्या रात्री असिफाला एका नाल्याखाली नेलं जातं. तिथं खजुरिया येतो आणि सांगतो की, मारण्याआधी तो अजून एक बलात्कार करू इच्छितो. तो बलात्कार करतो. त्यानंतर आपल्या डाव्या जांघेत असिफाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. पण ते त्याला जमत नाही. सांझी रामचा पुतण्या आणि ओढणीनं तिचा गळा दाबतो. तिचे पाय पाठीमागून दाबून मोडतो. असिफा मेली आहे याची खात्री करण्यासाठी दोन वेळा दगड तिच्या डोक्यात घालतो.

असिफाचा मृतदेह पुन्हा मंदिरात आणला जातो. १५ जानेवारीच्या सकाळी जंगलात फेकून दिला जातो. नजीर मसुदीनं लिहिलं आहे की, न्यायालयात वकिलांनी एवढा गोंधळ घातला की, पोलिसांना आरोपपत्र दाखल करायला सहा तास लागले. एसएसपी रमेश जालानं सांगितलं की, ते दर आठवड्याला उच्च न्यायालयाला स्टेटस रिपोर्ट देत होते. काश्मीर माहिती असलेले पत्रकार राहुल पंडिता पुन्हा पुन्हा सांगतात की, रमेश जाला आणि त्याच्या टीमचं रेकॉर्ड चांगलं आहे. त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकत नाही. आता इथून स्थानीय समाज आपल्या मरणाचा हवाला द्यायला लागतो. युसुफ असिफाला आपल्या जमिनीत दफन करू उच्छितो. पण लोक करू देत नाहीत. असिफाला अल्लाहनं शेवटी दोन हाताएवढी जमीन दिली नाही आणि मंदिरात असलेल्या भगवाननं तिची अब्रु वाचवली नाही. आपण धर्माच्या नावावर हैवान होऊ लागलो आहोत. युसुफ आठ मैल दूरच्या गावात असिफाचा मृतदेह घेऊन जातो आणि तिथं तिला दफन करतो. तिथंच तुमचं-आमचं आंतरमनही दफन होतं.

कायद्यानुसार आत्तापर्यंतच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजपच्या दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवं होतं. सीबीआय तपासाची मागणी हे ढोंग होतं. ते भाजपचे उपाध्यक्ष अविनाश खन्ना आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही केलं. पण समाज चुप का आहे? तुम्ही पुढे वाचाल, तर कळेल. तुमच्या चुप्पीचं कारण पंतप्रधानांना नाही, स्वत:ला विचारा. तसं पंतप्रधानांनाही का विचारलं जाऊ नये की, तुम्ही चुप का आहात? देशात तेव्हाही हजारो बलात्कार होत होते, पण तुम्ही निर्भयाविषयी बोलला होतात की नव्हता? अशा लंपट तर्कांनी पंतप्रधानांचं घर भरलेलं राहावं, पण तुम्ही तुमचं घर भरू नका. तुम्ही विचार करा की, आसिफाविषयी का बोलू शकत नाहीत? तसंही पंतप्रधान काय बोलणार? त्यांच्या बोलण्यात खोटे अश्रू आणि नाटकीपणाशिवाय दुसरं काय असणार?

हे लोक तुम्हाला तिरंग्यामध्ये लपेटून हिंदुत्वाचं मनोवैज्ञानिक प्रशिक्षण देत होते, ते यासाठी नाही की, तुम्ही सात्त्विक आणि आध्यात्मिक बनावं. यासाठी की, कुणाच्या हत्येच्या वेळी तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर चुप राहणं शिकावं. तुम्ही प्रश्न विचारणं सोडून द्यावं, स्वत:लाही आणि त्यांनाही. यांना हिंदू धर्माशी काही देणंघेणं नाही, नाहीतर मंदिरात एका मुलीवर बलात्कार, पुन्हा पुन्हा बलात्कार आणि मग हत्येनंतर त्यांचं आणि तुमचं इमान जागं व्हायला हवं होतं. पण तसं झालं नाही. कारण ते तुम्हाला हिंदुत्वाच्या नावाखाली खुनी आणि खुन्याचे समर्थक बनवू इच्छित आहेत. ते तुमच्या चुप्पीनं सिद्ध केलं, तुम्ही झाला आहात. या हिंदुत्वामुळे ना तुम्हाला रोजगार मिळाला, ना मिळणार; ना दवाखाना मिळाला, ना मिळणार; नाही इमानदार पोलिस मिळेल, ना मिळाली आणि नाही निर्भीड आणि चांगली न्याय व्यवस्था मिळाली, ना मिळेल. फक्त एक जमाव मिळाला, जो दर आठवड्याला देशाच्या कुठल्या तरी भागात हातात तलवार घेऊन पळताना दिसतो.

हीच विचारसरणी तुम्हाला सगळीकडे दिसेल. त्यासाठी सैन्याचा वापर केला गेला. माजी सैनिकांना टीव्हीसमोर बसवून पाकिस्तानला समोर आणलं गेलं, कारण तुम्ही ‘पाकिस्तान पाकिस्तान’ करत आपल्या शेजारच्या मुसलमानांचा तिरस्कार करावा. तुम्ही त्या मुद्द्यांकडे वळून पाहिलंत तर तुम्हाला दिसेल की, त्या वाटेवर तुमच्या संवेदनांच्या मरणाच्या खाणाखुणा आहेत. गौरक्षेच्या नावाखाली गर्दीनं हत्या केल्या, तुम्ही चुप राहिलात. आता तुम्ही बोलला नाहीत, तिथं बोलला नाहीत, तेव्हा बोलला नाहीत, या सर्व प्रश्नांवरून स्वत:ला जमावाच्या खुनी मानसिकतेसोबत कायम ठेवा. सांगत रहा की, हा तुमच्या आस्थेचा\अस्मितेचा प्रश्न आहे. गौहत्या चालणार नाही. मानव हत्या चालेल? मंदिरही तुमच्या आस्थेचा प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये बलात्कार चालेल? तुमचं इमान जागं होत नाही, कारण तुम्ही खुनी झाला आहात.

तुम्ही तिरस्काराला समर्थनीय ठरवत ठरवत मरून गेला आहात. आता तुम्ही त्या जमावाशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही या जमावाशिवाय सत्तेच्या कल्पनेला घाबरता. काश्मिरी पंडितांच्या नावाखाली आपल्या मनात मुसलमानांविषयी विष भरवलं गेलं. रमेश कुमार जाला या धाडसी आणि चांगल्या पोलिस अधिकाऱ्यामुळे असिफाची हत्या आणि बलात्काराचं आरोपपत्र तयार झालं. तुम्हाला रमेश कुमार जालाबद्दलही तिरस्कार निर्माण झाला. असिफाच्या कुटुंबाला वकील मिळत नाही हे पाहून दीपिका राजावत पुढे आली, जी स्वत: काश्मिरी पंडित आहे. ज्या समाजानं अन्याय सहन केला, त्याला माहीत आहे तिरस्काराच्या नावाखाली न थांबणाऱ्या हत्यासत्राची वेदना. त्याच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी चार वर्षांत एकदाही काश्मिरी पंडितांचं नाव घेतलं नाही, बोलले तेही एका काश्मिरी पंडिताच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी. कमाल की राजनीति है. रायसीना हिल्स गुगलवर टाकून पाहा, तो तुमच्या कार तिथं पोहचवेल. पण त्याआधी तुम्ही स्वत:ला तिरस्काराच्या या राजकारणात टाकून पाहा. तुम्हाला तुमचा मृतदेह दिसेल. काही लोक दिसतील, जे म्हणत असतील, आता तुम्ही मेलेला नाहीत, कारण प्रश्न उपस्थित करणारे बंगालबद्दल बोलले नाहीत, केरळविषयी बोलले नाहीत, ते जर बोलले नसतील तर तुम्ही काय बोलणार? चुप रहा, कारण तुमची चुप्पी एका माणसाला हुकमत प्रस्थापित करण्यासाठी गरजेची आहे. असिफासाठी तुम्ही बाहेर पडू नका, एक दिवस ती तुमच्या घरात येईल. तिला माहीत आहे, कोणकोणत्या घरांत मृतदेह पुरलेले आहेत.

अनुवाद - टीम अक्षरनामा

.............................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख रवीश कुमार यांच्या ब्लॉगवर १३ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. तो पाहण्यासाठी क्लिक करा -

http://naisadak.org/who-is-leading-the-silence-on-brutual-murder-of-asifa/

.............................................................................................................................................

लेखक रवीश कुमार एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक आहेत.

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Fri , 27 April 2018


Sanket Shelke

Sat , 21 April 2018

आदित्य कोरडे, अजब तर्क आहे तुमचा. म्हणजे धर्माच्या नावाखाली दंगली, खून, बलात्कार करणाऱ्यांमुळे फूट पडत नाही, पण रवीश कुमार सारख्या निष्पक्ष पत्रकारांनी जर वास्तवाची जाणीव करून देताना समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातलं तर मात्र लगेच फूट पडेल.


ADITYA KORDE

Tue , 17 April 2018

जरा शांत बसायला काय घ्याल कि अक्कल गहाण टाकून आल्यासारखेच वागायचे ठरवलेय सगळ्यानी... एका ८ वर्षाच्या मुलीचा खून झालाय अनेक वेळा बलत्कार झाल्यावर आणि तुम्हाला तिच्या धर्माची बलात्कार करणार्याच्या धर्माची आठवण झालीच पाहिजे का का माणसाच्या धर्माप्रमाणे होणार्या यातना कमी जास्त होतात का तुम्हे तिला न्याय देऊ शकत नाही मान्य, आता तर ती गेलीच हे ही मान्य पण उभ्या देशात असले वंगाळ वागून फूट का पडताय का अजून काही धर्धार्माच्या ठेकेदाराच्या हाती कोलीत देताय पहा त्यांनी लगेच आगी लावायला सुरुवात केली देखील “आता बरा ह्याना हिंदुस्थान आठवला...इंडिया नाही” “हिंदुंच्या मुलीनवर मुसल्मानानी हात टाकले ते नाही दिसले...” काश्मिरी पंडित नाही आठवले मग कुणी शंकराच्या त्रिशुलाचे विकृतीकरण केले कुणी स्वर भास्करचे किंवा करीनाचे अर्धनग्न फोटो टाकून त्यांचे चारित्र्य हनन केले कुणी सानिया मिर्जाचा अपमान केला मदरशातून मशिदीतून झालेल्या बाल्त्काराच्या विनयभंगाच्या घटनांना प्रसिद्धी मिळाली. आता बदला घ्यायला कुणी उठले तर .... न्याय कुणालाच नाही मिळाला, नाहीच मिळणार, पण समाज मात्र मस्त दुभंगतोय , असीफा केवळ मुसलमान म्हणून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तीव्रता कमी जाणवायला लागलीये .... खोटे वाटत असेल तर आजूबाजूला डोळे उघडून बघा, ह्याला तुम्ही आणि तुमच्या बेजबाबदार प्रतिक्रिया जबाबदार आहेत , कायदा आणि न्यायालय काय करायचे ते करेलच, (भोतमांगे, नितीन आगे ह्याच्या प्रकरणात नाही का न्याय मिळाला....तसा तो १९८४ च्या शीख दंगलीतल्याना ही मिळाला...) तुम्ही कृपा करून गप्प बसा ... एवढे उपकार करा, तुंमच्या वागण्याने भावी रसिला, असिफा, निर्भया तयार होऊ देऊ नका ...गप्प बसा, काही करता येत नसेल तर गप्प बसा...


Prashant

Tue , 17 April 2018

Eye opener article.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......