सामाजिक-भावनिक शिक्षणामुळे आम्ही शिक्षक मुलांसाठी हात छडी घेऊन उभे असलेले ‘सर’ न राहता, त्यांच्या हातात हात घालून त्यांच्यासोबत प्रवास करणारे मित्र बनलो!
पडघम - सांस्कृतिक
प्रविण भिकले
  • लेखात उल्लेख असलेल्या उपक्रमांची तीन छायाचित्रं
  • Wed , 19 July 2023
  • पडघम सांस्कृतिक सामाजिक-भावनिक शिक्षण Social and emotional learning सेल SEL

रूपाली इयत्ता सातवीत शिकणारी विद्यार्थिनी. वर्गात कोणत्या ना कोणत्या कामात सहभाग घेणारी आणि सतत प्रश्न विचारणारी… पण वर्षभरापूर्वी असं नव्हतं. ती एकदम शांत असायची. काही कळत नसेल, तर गप्पच राहायची. उत्तर येत असलं तरी तिचा हात कधी वर नसायचा. मग एका वर्षात असं काय झालं की, रूपाली वर्गातील सर्वांत जास्त कार्यशील विद्यार्थ्यांपैकी एक बनली. त्याचं उत्तर आहे- सामाजिक आणि भावनिक शिक्षण (SEL) या संकल्पनेचा प्रयोग.

मी पुण्यातील सरकारी शाळेत सातवीच्या १०० विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवले. या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यात सर्वांत मोठी समस्या म्हणजे लॉकडाऊनमुळे दोन वर्षं शाळा बंद होत्या. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक-दरी निर्माण झाली होती.

करोनानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या, तेव्हा मी मुलांची वाचन आणि गणिती क्षमता तपासण्यासाठी एक पूर्वचाचणी घेतली. त्यातून फारच चिंताजनक निकाल हाती आले. ५७ टक्के विद्यार्थ्यांची वाचन आकलनक्षमता त्यांच्या इयत्तेपेक्षा तीन वर्षांनी कमी होती. एकही विद्यार्थी त्याच्या इयत्तेच्या पातळीवर नव्हता. यामागची कारणं जाणून घेण्यासाठी मी आणि माझा सहकारी, आम्ही दोघांनी मुलांना-पालकांना त्यांच्या घरी जाऊन भेटायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत चर्चा केल्यावर खालील मुद्दे समोर आले -

- मुलं भीतीमुळे शिक्षकांशी संवाद साधायला किंवा शंका विचारायला घाबरतात.

- मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणतंही व्यासपीठ नाही.

- विविध आकलनक्षमतेच्या वर्गात कमी हुशार मुलांमध्ये कमी आत्मविश्वास दिसला.

- मुलांच्या आकलनक्षमतेमागे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कारणीभूत होती.

या मुद्द्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण आणि विश्लेषण केल्यावर, विद्यार्थ्यांमध्ये ‘सामाजिक-भावनिक शिक्षण’ म्हणजेच ‘सोशल-इमोशनल लर्निंग’ची कमतरता आहे, हे स्पष्ट झालं. जर ‘सामाजिक-भावनिक शिक्षणा’ची अंमलबजावणी केली, तर त्याचा फायदा इतर शालेय विषयांतही होईल, असं आम्हाला वाटलं. मग मी माझ्या वर्गात प्रयोग सुरू केला.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

सामाजिक-भावनिक शिक्षण म्हणजे काय?

ही एक प्रक्रिया आहे, ज्या द्वारे मुलं स्वतःच्या भावना समजून घेऊन त्यांचं व्यवस्थापन करतात; अर्थपूर्ण वैयक्तिक आणि सांघिक उद्दिष्टं प्राप्त करतात, इतरांबद्दल अनुभूती दर्शवतात, सकारात्मक संबंध स्थापित करतात आणि जबाबदारीनं निर्णय घेतात.

CASELच्या मांडणीनुसार सामाजिक-भावनिक शिक्षण, पाच क्षमतेवर आधारित आहे. या क्षमता लहानपणापासूनच प्रभावित होत असतात. त्यावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या अशा -

- स्वजाण (Self Awareness)

- स्वव्यवस्थापन (Self Management)

- सामाजिक जागरूकता (Social Awareness)

- जबाबदारीनं निर्णय घेण्याची क्षमता (Responsible Decision Making)

- सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याची कौशल्यं (Relationship skills)

मी माझ्या वर्गात सामाजिक-भावनिक शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक बदल केले. त्यासाठी पाच नावीन्यपूर्ण अशा कृती करायला सुरुवात केली.

१) भावनिक साक्षरता - माइंडफूल सर्कल

मुलांना भावनिकदृष्ट्या सक्षम करणं गरजेचं होतं, पण हे नेमकं कसं करायचं हा प्रश्न होता. आम्ही त्यासाठी वेळापत्रकात एक महत्त्वाचा बदल केला. पहिली १५ मिनिटं ‘माइंडफूल सर्कल’ हा उपक्रम चालू केला. त्यात मुलांकडून पहिली पाच-सात मिनिटं ‘ब्रेथ एक्सरसाईज’ आणि ‘बॉडी स्कॅन’ या गोष्टी करून घेतल्या, तर आठ-दहा मिनिटं ‘भावनांचा कप’ ही कृती करून घेतली. त्यासाठी वर्गात आठ कप लावले. प्रत्येकावर एका भावनेचं नाव लिहिलं. मुलं त्यांच्या भावनेनुसार, त्या कपात त्यांच्या नावाची चिठ्ठी ठेवत. हे करण्याआधी त्यांची भावनिक साक्षरतेबाबत कार्यशाळा घेतली. प्रत्येक भावनेचा अर्थ, त्याची कारणं आणि परिणाम यावर त्यांच्याशी चर्चा केली. या उपक्रमामुळे मुलांमध्ये स्वजाण आणि स्व-व्यवस्थापन विकसित होत गेलं.

२) भीती आणि अपराधी भावना टाकण्याची पेटी

हा उपक्रम परिणामकारक ठरला. यात मी वर्गात एक मोठी पेटी ठेवली आणि त्यावर लिहिलं - ‘Fear and Guilt Disposal Box’ (भीती आणि अपराधी भावना टाकण्याची पेटी). मुलं सुरुवातीला थोडंसं घाबरत स्वतःच्या अप्रकट भावना, प्रश्न किंवा भीती एका कागदावर स्वतःचं नाव न लिहिता त्या पेटीमध्ये टाकू लागली. हळूहळू स्वतःची नावं लिहू लागली. मी आणि माझा सहकारी, दोघं आठवड्यातून एकदा ती पेटी उघडून, त्यातील मुलांची मनं जाणून घेऊ लागलो. ती आमच्यासाठी मुलांचं भावनिक विश्व उलगडणारी पेटी ठरली. त्यावरून आम्ही ठराविक विद्यार्थ्यांसोबत समुपदेशन सुरू केलं. यामुळे त्यांची शिक्षकांबद्दलची भीती गेली, पण त्याहीपेक्षा शिक्षक त्यांना मित्र वाटू लागला. याचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे मुलांनी त्यांच्या मनातील लिंगभाव आणि लैंगिक भावना यांच्याविषयीचे समज-गैरसमज सांगायला सुरुवात केली. स्व-जागरूकता, स्वव्यवस्थापन, स्वत:च्या भावनांबद्दलचे समज-गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम उपयोगी ठरला.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

३) शिक्षकांसाठीचे गुणफलक

‘अभिप्राय’ हा शिक्षणातील महत्त्वपूर्ण असा भाग आहे. आमचा असा विश्वास आहे की, अभिप्राय हे प्रेमाचं प्रतीक आहे, तुमच्या कामाबद्दलचं प्रेम. वर्गात ‘अभिप्राय-संस्कृती’ रुजवायची होती. वरील पेटीप्रमाणे आम्ही अभिप्राय घेत होतोच, पण हा अभिप्राय पारदर्शक असावा, असं वाटत होतं. आम्ही मुलांच्या प्रत्येक गटात एक गुणफलक लावला आणि त्यांना सांगितलं की, तास संपल्यावर तुम्ही मला १०पैकी गुण द्यायचे. तुम्हाला शिकवलेलं सर्व समजलं, तर १० गुण द्या नाही, समजलं तर शून्य गुण द्या. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. हळूहळू मुलं आणि आमच्यातली दरी कमी होत गेली. या दोन उपक्रमांमुळे मुलं आणि आम्ही म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये विश्वासाचं नातं निर्माण झालं.

४) शिकवण्यातील फरक

वर्गात वेगवेगळ्या आकलनक्षमतेची मुलं होती. त्यामुळे वर्गपातळीप्रमाणे शिकवणं, फक्त जास्त आकलनक्षमतेच्या मुलांसाठी सोयीचं होतं. मी सुरुवातीला आकलनपातळीप्रमाणे तीन वर्ग करून शिकवलं. त्यामुळे कमी आकलनपातळी असलेल्या मुलांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होण्याची भीती वाटू लागली. त्यावरून वर्गात ‘Learning Differentiation’ अमलात आणावं लागेल, याची जाणीव झाली. वेगवेगळ्या क्षमता असलेल्या मुलांना एकत्रित शिकवण्यासाठी इंग्रजीच्या तासात काही बदल केले. सर्वप्रथम वर्गात ‘buddy card’ची पद्धत सुरू केली. यात हुशार आणि कमी हुशार अशा मुलांची जोडी केली. प्रत्येक जोडीला एक कार्ड दिलं. त्यात दोघंही एकमेकांच्या भावनिक-शैक्षणिक प्रगतीसाठी बांधील राहतील, अशी व्यवस्था केली.

दुसरी गोष्ट, वर्गात शिकवण्यासाठी ‘लेसन प्लॅन’मध्ये एक बदल केला. एकाच पाठासाठी दोन वेगवेगळ्या ‘वर्कशीटस्’ बनवू लागलो. एक थोडी कठीण केली आणि दुसरी तुलनात्मकरित्या सोपे ते मध्यम स्वरूपाचे प्रश्न असलेली बनवली. जेणेकरून सर्व क्षमतेच्या मुलांना तो पाठ समजावा आणि अडचण येईल तिथं आपल्या जोडीदाराची मदत घेता यावी. यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य झाल्या. एक, मुलं आपल्या जोडीदाराबद्दल सहानुभूती दाखवू लागली आणि दुसरी, त्यांच्यामध्ये सहकाराची भावना निर्माण झाली.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

५) दप्तराशिवायचा दिवस

शाळेत मूल फक्त शिकायला येत नाही, तर त्याच्या आयुष्यातील सुंदर असे क्षण जगायलाही येतं. मुलांनी शाळेत येऊन अभ्यास करावा, पण त्याचसोबत धमालही करावी, या दृष्टीनं आठवड्यातील एक दिवस ‘NO SCHOOL BAG DAY’ सुरू केला. हा पूर्णपणे मुलांचा. या दिवशी मुलं स्वतः पुढाकार घेऊन चर्चासत्रं, वादविवाद सत्रं आणि विविध स्पर्धांचं आयोजन करत असतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि सृजनशीलता विकसित होण्यास हातभार लागला.

या सर्वांचा सकारात्मक परिणाम मुलांच्या शैक्षणिक आणि इतर बाबींवर झाला. वर्षाच्या सुरुवातीला ५७ टक्के विद्यार्थ्यांची वाचन आकलनक्षमता त्यांच्या इयत्तेपेक्षा तीन वर्षांनी कमी होती, तो आकडा ३८ टक्क्यांपर्यंत खाली आला. गणितात आधी ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले फक्त २८ टक्के विद्यार्थी होते, तो आकडा ६१ टक्क्यांपर्यंत पोहचला.

त्या व्यतिरिक्त मुलं स्वतःच्या भावना आणि कृती यांतला संबंध समजू लागली. स्वत:च्या मनातल्या भावना आम्हा शिक्षकांसमोर व्यक्त करू लागली. आम्ही शिक्षक त्यांच्यासाठी हात छडी घेऊन उभे असलेले ‘सर’ न राहता, त्यांच्या हातात हात घालून त्यांच्यासोबत प्रवास करणारे मित्र बनले...

.................................................................................................................................................................

लेखक प्रविण भिकले पाय जॅम फौंडेशन, पुणे येथे ‘शिक्षक-प्रशिक्षक’ म्हणून कार्यरत आहे.

bhikale.pravin@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा