सिग्नलवर लहान मुलं खेळणी, कापड, पेन विकताना; भीक मागताना दिसतात. बांधकामाच्या ठिकाणी रेती उचलताना दिसतात. तुम्हीही ही दृश्यं पाहिली असतीलच
पडघम - देशकारण
अंजली प्रविण
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 20 June 2023
  • पडघम देशकारण १२ जून आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन बालकामगार बालमजुरी

नुकताच म्हणजे १२ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन’ साजरा झाला! म्हणजे जगभरच्या विविध सामाजिक आणि सरकारी संस्थांनी बालमजुरी विरोधी पोस्टर आपापल्या कार्यालयाबाहेर लावून कर्मचारी आणि अधिकारी यांनी छायाचित्रं काढली. त्यानंतर चहा मागवला. थोड्या वेळातच त्या कार्यालयामध्ये छोटू/ चिंटू / बंटी / पिंकी नामक १२ वर्षांचा लहान मुलगा चहा घेऊन आला!

शहरातल्या कोणत्याही सिग्नलवर आपल्याला लहान मुलं खेळणी, कापड, पेन इत्यादी विकताना, गाडीची काच साफ करताना किंवा भीक मागताना दिसतात.

जर शहराबाहेर एखाद्या इमारतीचं बांधकाम काम सुरू असेल, तर सर्रास १२-१४ वर्षांची मुलं माती/ रेती उचलताना दिसतात.

लहान मुली वेश्या व्यवसाय करताना दिसतात.

तुम्हीही ही दृश्यं पाहिली असतील, पाहत असालच…

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

‘बालमजुरी’ हा गुन्हा आहे, हे आपल्यापैकी बहुतेक सर्वांना माहिती असतं. तरी आपण काय करतो? या बालमजुरांकडे पाहून आपल्याला अनेकदा वाईट वाटतं, चुकचुकत आपण पुढे चालतो… आणि हा विषय तिथंच सोडून देतो. पण त्यातूनच अनेक प्रश्न उपस्थित होतात -

आपण बालमजुरी विरोधी सजग आहोत का?

बालमजुरी विरोधात पुरेशी जनजागृती झालेली नाही का?

आपल्याला या समस्येचं गांभीर्य कळलंय का?

२०२०मध्ये ‘वेरिक्स मॅपलक्रोफ्ट’ या आंतरराष्ट्रीय संस्थेनं जगभरातील बालकामगारांची आकडेवारी, त्यांच्या कामाचं स्वरूप आणि परिस्थितीचा अभ्यास केला होता. या अहवालानुसार चीन, भारत, बांग्लादेश आणि तुर्कस्तान, या चार देशांत सर्वाधिक बालमजूर आहेत. आणि त्यांची परिस्थितीही अत्यंत भयावह आहे.

या संदर्भातील आलेख पुढीलप्रमाणे -

भारतात बालकामगार संदर्भात ‘CENSUS’ने २००१मध्ये शेवटचा सर्व्हे केला. १९७१ ते २००१ या वर्षांतली आकडेवारी नीट पहिली, तर बालकामगारांची झपाट्यानं वाढ होताना दिसते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि बिहार या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक बालमजुरी वाढलेली दिसते. पहिल्या १० राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे. मुंबईसारख्या ‘मेट्रो सिटी’मध्ये बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून बालमजुरांचं स्थलांतरण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. 

‘NCRB’ (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) २०२१च्या आकडेवारीनुसार बालगुन्हेगारीचं प्रमाण १६.२ टक्के वाढलं आहे. ३६.५ टक्के बाललैंगिक शोषणाचे गुन्हे वाढले आहेत. म्हणजे १,४९,४०४ केसेस फक्त बाललैंगिक शोषणाच्या आहेत. बालमजुरांच्या वाढत्या प्रमाणाचा परिणाम बालगुन्हेगारीत दिसून येत आहे. २०११ची जनगणना आणि NCRBच्या आकडेवारीनुसार १००पैकी ७ मुलं गुन्हेगारीमध्ये समाविष्ट आहेत.

ही आकडेवारी labour.gov.in या सरकारी वेबसाईटवरूनच घेतली आहे. पहा लिंक- https://labour.gov.in/childlabour/census-data-child-labour

लहानपणीचे शाळेतले, खेळण्याचे किस्से किंवा गमतीजमती आठवल्यावर आजही आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. ‘लहानपण देगा देवा!’ असं अनेक जण बोलतात. एवढंच काय, त्यावर आजवर सुभाषितं, कविता, ललित… काय काय लिहिलं गेलंय! पण ज्यांच्या वाटेला लहानपण येतंच नाही, त्यांचं आयुष्य कसं असेल, याचा विचार आपण कधी करतो?

ना खेळ,

ना शाळा,

ना मनासारखे जगणं- खाणं- पिणं,

ना शुद्ध हवा-पाणी,

कधी कधी तर कुटुंबापासूनही दूर ठेवलं जातं.

त्यांच्या नशिबी फक्त दिवसभर काम, तेही कमी मजुरीत.

शिवाय शारिरीक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक त्रास व शोषण होतं, ते वेगळंच.

लहानपण जगायला मिळण्याआधीच त्या नाजूक खांद्यावर आणि मनावर जबाबदाऱ्यांचं जोखड ठेवलं जातं. भारतातील २००१ची आकडेवारी सांगते की, साधारणतः १ कोटी २६ लाख मुलांचं बालपण हिरावून घेतलं गेलं. हा आकडा सुन्न करणारा आहे. गेल्या २२ वर्षांत त्यात किती भर पडली असेल?   

भारत सरकारने बालकामगार विरोधी कायदे आणि तरतुदी केलेल्या आहेत, पण अंमलबजावणी आणि जनजागृती या पातळीवर फारसं गांभीर्य दाखवलं जातं, असं दिसत नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

भारतात बालकामगार विरोधी कायद्यात कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत, ते पहा -

१) बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६. या कायद्यानुसार १४ वर्षांखालील मुलांना मजुरी करायला लावणं बेकायदेशीर ठरवण्यात आलेलं आहे.

२) भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद २३ मुलांना धोकादायक उद्योग आणि कारखान्यांमध्ये काम करण्यास परवानगी देत ​​नाही.

३) कलम ४५ अंतर्गत देशातील सर्व राज्यांना १४ वर्षांखालील मुलांना मोफत शिक्षण देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे.

४) १४ वर्षांखालील मुलांना कौटुंबिक वा मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची सवलत देण्यात आलेली आहे. पण उद्योग जोखमीचे असू नयेत. मुलांनी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त किंवा सुट्टीच्या दिवशी  काम करण्याला सवलत आहे.

हे वरील नियम भंग करणाऱ्यांना तीन महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत तुरुंगवास आणि रुपये १० ते २० हजार रुपये दंड होऊ शकतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

वाढती महागाई, गरिबी, दारिद्रय आणि बेरोजगारी जितक्या झपाट्यानं वाढत आहे, तितक्याच झपाट्यानं बालमजुरीही वाढत आहे. योग्य शिक्षण आणि अनुभव घेऊन स्वतःला घडवण्याच्या वयातच मुलांना गरिबी आणि दारिद्रयामुळे मजुरीच्या विळख्यात अडकवलं जात आहे. काही मुलं शाळा सांभाळून वा शाळा सुटल्यानंतर, तर अनेक मुलं पहाटे चारपासून रात्रीपर्यंत भंगार उचलताना, चहा किंवा भाजीपाला विकताना दिसतात. त्यांच्यापुढे पर्यायही नसतो, कारण त्यातूनच त्यांच्या कुटुंबाला रोजीरोटी मिळते. पण अशा प्रकारे पोटाची खळगी भरताना त्यांच्या निसटत चाललेल्या बालपणाची भरपाई कधी होणार? करोनानंतर बेरोजगारी आणि दारिद्रयाचा वणवा जसजसा वाढत आहे, तसतशी बालमजुरीही वाढते आहे. 

आपल्या आजूबाजूच्या बालकांचं अशा प्रकारे बालपण हिरावून घेतलं जात असेल, तर त्या विरोधात जरूर ते प्रयत्न करा. जवळील पोलीस स्टेशन किंवा चाइल्डलाइनच्या १०९८ या टोल फ्री नंबरवर जरूर कळवा. तिथं माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जातं.

नोंदवलेल्या तक्रारीवर त्वरित कारवाई केली जाते. त्या बालकाला ‘रेस्क्यू’ करून गरजेनुसार मदत केली जाते. आरोग्य तपासणी आणि समुपदेशन केलं जातं. कुटुंबाची माहिती घेऊन त्याला घरी सोडलं जातं. त्याच्या कुटुंबियांचं समुपदेशन केलं जातं. त्याच्या शिक्षणासाठी पाठपुरावा केला जातो.

बालमजुरीचा विळखा थांबवण्यासाठी आपलं एक पाऊलही खूप मोलाचं ठरू शकतं.

.................................................................................................................................................................

लेखिका अंजली प्रवीण नेशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली इथं ‘फेअर ट्रायल फेलोशिप प्रोग्रॅम’मध्ये ‘डेटा विश्लेषक’ म्हणून कार्यरत आहेत. तसंच ‘क्रिमिनल जस्टीस सिस्टीम’च्या अभ्यासक आहेत.

amkar.anju@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख