आजच्या पिढीचे मेंदू विकृत विचारांनी भरून आणि भारून टाकण्याच्या मोहिमा जगभर जोरात सुरू आहेत. सामाजिक विद्वेषाची ही दुकाने बंद पाडण्याची तातडीची गरज आहे
पडघम - देशकारण
हरिहर सारंग
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 15 June 2023
  • पडघम देशकारण ब्रेन वॉशिंग धर्म राष्ट्रवाद जात देशप्रेम हिंदू मुस्लीम

प्रास्ताविक

आज सामान्य माणसाचे ‘ब्रेन वॉशिंग’ करण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. या लेखाच्या संदर्भात, ‘ब्रेन वॉशिंग’ म्हणजे मानवी मनात किंवा मेंदूत शिरलेली किंवा जाणीवपूर्वक रुजवलेली  तर्कदुष्ट, अ-वैज्ञानिक आणि सामाजिक विद्वेष निर्माण करणाऱ्या विचारांची जळमटे दूर करून त्या जागी वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि मानवी मूल्यांवर आधारलेले विचारव्यूह पुनर्स्थापित करणे होय. 

तसे पाहिले तर मानवी संस्कृतीच्या पहाटेपासूनच  अज्ञान, वृथा अभिमान, स्वार्थ अशा बाबींमुळे आपले विचार, विश्वास, संकल्पना प्रदूषित झालेल्या असतात. हे प्रदूषण सकारण आणि विवेकी नसल्याने आणि माणसाच्या न कळत होत असल्याने प्रदूषणाची ही प्रक्रिया सावकाश आणि कमी प्रमाणात होत आलेली आहे. त्यामुळे माणसाचे आजच्या अर्थाने ‘मेंदू प्रदूषण’ होत नव्हते. कारण काळानुसार जुने विचार खोटे ठरून विचारांत उत्क्रांती होण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहत असे. पण आधुनिक काळात प्रदूषणाची ही प्रक्रिया विशिष्ट उद्देशाने जाणीवपूर्वक घडवून आणली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तिचा वेग आणि प्रमाण अफाट असल्याचे दिसून येते.

विशिष्ट उद्देश असल्याने या प्रदूषणाचे शास्त्र बनलेले आहे. जगभरात जात, धर्म, वंश, भाषा, प्रांत अशा कृत्रिम आधारांवर बनलेल्या अनेक टोळ्या अशा प्रदूषणाच्या मोहिमा चालवत आहेत. या प्रदूषणाच्या प्रक्रियेत प्रथम आपले मूळ विचार, विश्वास, आपले स्वत्व यांच्यावर हल्ले चढवले जातात. या हल्ल्यांचा परिणाम म्हणून माणूस आपले व्यक्तित्व, आपले स्वत्व गमावून बसतो. मग त्याच्यावर नवीन विचार, विश्वास, संकल्पना बिंबण्याचे काम सुरू केले जाते.

स्वत्व गमावलेला माणूस अशा बिंबण्याच्या प्रक्रियेला सहजपणे बळी पडतो. असे नवीन विचार, विश्वास, श्रद्धा, कल्पना या स्वत्वहिन माणसांच्या मनांत ठसवण्याचे काम मोठ्या कौशल्याने केले जाते. या प्रक्रियेतून विकृतींनी युक्त असा एक नवीनच मेंदू घडवला जातो. हेच आजचे  ‘ब्रेन वॉशिंग’ असल्याचे मानले जाते. प्रत्यक्षात हे खऱ्या अर्थाने मेंदूचे प्रदूषण म्हणावे लागेल. आपल्याला या अर्थाने ‘ब्रेन वॉशिंग’ अर्थात ‘मेंदू प्रदूषण’ नको असले पाहिजे.   

आजच्या पिढीचे मेंदू अशा विकृत विचारांनी भरून आणि भारून टाकण्याच्या अशा मोहिमा जगभर  सध्या जोरात सुरू आहेत. भारतही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. विशिष्ट विचारधारांचे कट्टर पोथीपूजक यातूनच तयार होत आहेत. खरे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतात ‘मेंदू प्रदूषणा’ची ही मोहीम सुरू आहे. मात्र आता ती युद्ध पातळीवर सुरू असल्याचे आपल्या नित्य अनुभवला येत आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

या मोहिमेला उत्तरे देणारे आणि आपल्या भूमिकेची विधायक मांडणी करणारे लोक आतापर्यंत तरी  एकटे-दुकटेच आढळत आलेले आहेत. साहजिकच या एकट्या-दुकट्यांच्या प्रयत्नांना अद्यापि प्रतीमोहिमेचे स्वरूप येऊ शकले नाही. कदाचित जे सत्य आहे, ते ओरडून सांगण्याची काय गरज आहे, अशी त्यांची भूमिका राहिलेली असावी. पण त्यामुळे ज्यांना खोटेनाटे पसरावयाचे होते, त्यांनी मात्र ते मोठमोठ्या आवाजात आणि पुन्हा पुन्हा सांगितले.

कधी कधी ते रहस्यमयतेचे आणि मोहमयी माधुर्याचे अवगुंठन पांघरून कुजबुजीच्या आडही सांगण्याचे प्रयत्न केले. या मोहिमेमुळे लोकांची मने बऱ्यापैकी प्रदूषित करण्यात या प्रदूषकांना यश मिळाले. सध्याच्या त्यांच्या योजनाबद्ध प्रयत्नांमुळे आणि त्यांच्याकडे विपुल प्रमाणात असलेल्या संसाधानांमुळे त्यांचे हे  यश अधिक परिणामकारी म्हणून मानवी विकासाला हानिकारक ठरत आहे.

या प्रदूषणाच्या मोहिमेला सामूहिक प्रयत्नांद्वारे योजनाबद्ध आणि अभ्यासपूर्ण उत्तरे देणे, ही काळाची गरज आहे. अशा प्रयत्नांद्वारे मेंदूतील या विकृती नष्ट करून तो स्वच्छ करून त्यामध्ये मानवतावादी मूल्यांच्या आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या कसोटीवर टिकणाऱ्या विचार, विश्वास, कल्पना यांचे संस्कार करण्याची आत्यंतिक गरज आहे. अन्यथा भविष्यकाळ आपल्याला क्षमा करणार नाही. त्यासाठी या देशातील लोकांना, विशेषतः युवकांना छोट्या-छोट्या गोष्टी गंभीरतेने समजावून सांगण्याची गरज आहे.

काय असू शकतात या गोष्टी!

स्व-समूह श्रेष्ठतावाद (Ethnocentrism)

आपण ज्या समूहात जन्म घेतो आणि वाढतो, त्याच समूहाचे विचार आणि आदर्श आपल्याला योग्य आणि श्रेष्ठ वाटतात. असे वाटण्याला वास्तवाचा आधार असेलच, असे नाही. धर्माधारित समूह हे याचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक धर्माच्या कट्टर अनुयायाला आपलाच धर्म आणि आपलेच धर्मानुयायी श्रेष्ठ वाटतात. आधुनिक ज्ञानाच्या प्रकाशात सगळेच धर्म विशिष्ट देश-काल-स्थितीमध्ये सामाजिक गरज म्हणून अस्तित्वात आलेले आहेत, हे आता आपल्याला समजले आहे. म्हणूनच ते बदलत्या काळात निर्माण झालेल्या नवीन गरजांची पूर्ती करू शकत नाहीत, हे आपण मान्य करायला हवे.

त्यांतील सिद्धान्त, विश्वास, श्रद्धा, संकल्पना यांना त्या त्या काळाच्या मर्यादा असतात. बदलत्या काळात निर्माण झालेल्या नवनवीन प्रश्नांना कोणत्याही धर्मांकडे चपखल उत्तरे असू शकत नाहीत. कारण वैज्ञानिक प्रगतीमुळे आज आपल्याला ज्या ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, ते ज्ञान प्राचीन काळी उपलब्ध नव्हते. त्यामुळे कोणताही धर्म विज्ञानाच्या कसोटीवर टिकू शकत नाही, हे आपण स्वीकारले पाहिजे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

धर्म किंवा इतर कोणत्याही संस्थेच्या या मर्यादा लक्षात घेतल्यास, आपल्या समूहाच्या विचार किंवा मते किंवा आदर्श यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता कामा नये, हे आपल्याला सहजच पटेल.  आणि त्यामुळेच एका समूहाने इतर समूहांचा आणि त्या समूहांतील लोकांचा द्वेष करणेही निराधार असल्याचे लक्षात घ्यावे.

जन्माधारित श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व

जात, धर्म, वंश, लिंग यांच्या आधारावर कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरू शकत नाही. या गोष्टी  आपल्याला जन्माने प्राप्त होत असून, त्यात आपल्या कर्तृत्वाचा किंचितही वाटा नाही. म्हणूनच जन्माने मिळणाऱ्या अशा उपाधींचा अभिमान बाळगणे किंवा त्याबद्दल हीन भावना ठेवणे निरर्थक आहे. जगाच्या इतिहासाने श्रेष्ठत्वाचे हे तथाकथित निकष अवैज्ञानिक आहेत, हे सिद्ध केलेले आहे. मानवतावादी मूल्यांच्या कसोटीवरदेखील असे विचार टिकणारे नाहीत.

खरे तर मानवी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याच्या मार्गातील हे अडथळे आहेत. म्हणूनच धर्म किंवा वंश या आधारांवर राष्ट्रवादाची मांडणी करणाऱ्या प्रवृत्ती आपल्या विरोधाचे विषय असले पाहिजेत. त्यामुळे हिंदू वा मुसलमान जेव्हा आपल्या जन्माधारित समूहनिष्ठेवर आधारित राष्ट्रवादाचा प्रसार करतात, तेव्हा त्यांना मुळीच थारा देता कामा नये.

याचाच एक भाग म्हणून जात, धर्म यांच्या आधारे निश्चित केल्या गेलेल्या श्रेष्ठ-कनिष्ठत्वाला आधार देणाऱ्या धर्मग्रंथ आणि शास्त्रांना नकार दिला पाहिजे. असे शास्त्र आणि धर्मग्रंथ मानवी मूल्यांच्या कसोटीवर पारखले गेल्यास असे करणे शक्य होईल.

गुंतागुंतीचे वास्तव

आपल्याला जे वास्तव किंवा सत्य समजले आहे, असे वाटते, ते तसे असेलच असे नाही. सत्याला अनेकविध पैलू असल्यामुळे जास्तीत जास्त पैलू समजून घेतल्याशिवाय आपल्याला सत्याच्या जवळपासही जाता येत नाही. हत्तीची केवळ शेपूट किंवा पाठ किंवा सोंड पाहून किंवा ते अवयव  कितीही बारकाईने समजावून घेतले, तरी त्यामुळे हत्तीचे  आकलन होते, असे मानणे ‘आंधळेपणा’चेच  लक्षण नाही काय?

शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटींसारख्या काही लुटी केलेल्या असल्यामुळेच केवळ  ग्रांट डफने त्यांची ‘लुटारू’ असल्याची प्रतिमा रेखाटण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या स्वराज्य स्थापण्याच्या मागील प्रेरणा आणि धोरण समजण्यासाठी महाराजांच्या चरित्र आणि चारित्र्याचा सर्वंकष अभ्यास करण्याची गरज होती. केवळ सुरतेच्या किंवा इतर लुटी लक्षात घेऊन महाराज खऱ्या अर्थाने  समजावून घेता येत नाहीत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

महापुरुषांच्या विशिष्ट कृती-उक्ती तत्कालीन देश-काल-स्थिती यांच्या पार्श्वभूमीवर समजावून घेतल्या पाहिजेत. म्हणूनच एखाद्या ऐतिहासिक घटनेचा एखादाच पैलू, महापुरुषाची एखादीच कृती किंवा उक्ती किंवा विचार एवढ्यावरच आपले भाष्य मांडून लोकांचा बुद्धिभ्रम करणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहण्याची गरज आहे. 

सध्या व्हॉटसअ‍ॅपवर अशा मोहिमा सुरू असल्याचे आपण बघतो. अशा अपूर्ण आणि संदर्भरहित विकृत अशा संदेशांकडे केवळ दुर्लक्ष करून भागणार नाही, तर अशा संदेशांची चिरफाड करून, असे  संदेश प्रसारित करणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. वास्तवासंबंधी तत्काळ निष्कर्ष काढण्याऐवजी ते वास्तव संपूर्णपणे समजून घेण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे.

इतिहासाच्या आकलनाची समस्या

ऐतिहासिक घटना, महापुरुषांची व्यक्तिमत्त्वे विविध प्रकारचे विचारव्यूह यांची घडण आणि स्वरूप गुंतागुंतीचे असते. ऐतिहासिक व्यक्तित्व, घटना किंवा विचार यांची घडण होताना त्यांच्यावर त्या त्या काळाचे, परिस्थितीचे आणि स्वतः त्या व्यक्तित्वांचे वेगवेगळे प्रभाव कार्यरत असतात. त्यामुळे हे सगळे प्रभाव समजून घेतल्याशिवाय कोणत्याही घटना, व्यक्तित्वे किंवा विचार यथार्थपणे समजावून घेणे शक्य नसते. कितीही चिकित्सक अभ्यासक असला तरी ऐतिहासिक व्यक्तित्व, घटना आणि विचार यांच्या स्वरूपाचे अचूक आणि परिपूर्ण आकलन होणे सोपे नसते.

एकाच व्यक्ती, घटना, विचार यांच्याबाबत निरनिराळ्या अभ्यासकांची निरनिराळी मते असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे एखाद्या विषयासंदर्भात आपलेही आकलन चुकू शकते, हे आपण समजावून घेतले पाहिजे. ज्ञानप्राप्तीमध्ये दुराग्रह उपयोगाचा नाही, हे आपल्याला समजू शकते. तसेच आपले मत मांडताना दुसऱ्याचेही मत समजावून घेतलेच पाहिजे हेही पटू शकते. ही गोष्ट आपलेच आकलन वाढवणारी आणि आपल्या आणि मानवी समाजाच्या ज्ञानात भर टाकणारी ठरत असते.

राष्ट्रघातक द्वेष

कोणत्याही कारणासाठी का होईना, दुसऱ्या व्यक्ती किंवा समूहाचा द्वेष करण्यातून अंतिमतः आपले अहितच होणार असते. द्वेषाचा वास्तविक असा आधारच नसतो. जागतिकीकरणाच्या या काळात आपण कोणत्याही व्यक्तीचा किंवा समूहाचा संपर्क, सहकार्य आणि सहवास पूर्णपणे टाळू शकत नाही. आपले एकत्र राहणे अपरिहार्यच असल्यामुळे एकमेकांचा द्वेष करून काहीही साध्य होणार नाही, हे आपण समजून घ्यायला हवे.

उलट द्वेष आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष यांमुळे शांतता आणि सुव्यवस्थेला बाधाच पोचते. मानवी प्रगतीसाठी सामाजिक सामंजस्याला पर्याय नाही, हे आपण जाणतोच. आपल्या देशात सध्या मुस्लीमद्वेष मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आपल्या प्रत्ययाला येत असते. असा द्वेष करून आपण काय साध्य करणार आहोत, यावर आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. मुस्लिमांचा द्वेष करून कोणत्याही ठरावीक गटाला आपल्या देशातील त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणता येणार नाही, हे उघड आहे. तसेच त्यांना आपल्या देशातून हद्दपारही करता येणार नाही. जास्तीत जास्त नियोजित हिंदू राष्ट्रात त्यांच्या नागरिकत्वाला दुय्यम स्तरावर आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण अशा प्रयत्नांना आपली घटना सद्य स्वरूपात यशस्वी होऊ देणे शक्य नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

मग काय आपण राज्यघटना बदलणार आहोत? काहीही करून आपण मुस्लिमांना दुय्यम स्थानावर आणण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या देशात शांतता, सुव्यवस्था आणि सामंजस्य टिकू शकणार नाही. आणि त्यामुळे आपल्या सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न अधिकाधिक दूर जाण्याचीच शक्यता निर्माण होणार आहे. याचा अर्थ एवढाच की, सध्या चालू असणाऱ्या मुस्लीमद्वेषाच्या मोहिमांनी भारतीयांचे कोणतेही कल्याण होणार नाही. केवळ राजकीय नेत्यांना सत्तेचे सोपान चढण्यासाठीच त्याचा उपयोग होऊ शकतो. सामान्य माणसांनी राजकीय पक्षाचे हे  डावपेच लक्षात घ्यावेत.

याबरोबरच, केवळ इतर समूहांचा द्वेष करणे एवढेच आपल्यासाठी घातक ठरते, असे नाही, तर विशिष्ट समूहाचे लांगूलचालन करणेही घातक ठरत असते. भारतीय घटना सर्वोच्च असून तिच्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्यांची जोपासना हे आपल्या प्राधान्यक्रमावर असण्याची गरज आहे. या मूल्यांना बाधक ठरणारे कोणतेही अधिकार किंवा सवलती कोणत्याही समूहाला देता कामा नयेत.

त्याऐवजी घटनात्मक मुल्ये, वैज्ञानिक दृष्टीकोन, आधुनिक मानवी मूल्ये यांचा प्रसार होण्याच्या दृष्टीकोनातून आपली धोरणे आणि कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी सक्षम, पारदर्शी आणि निपक्षपाती शिक्षणव्यवस्था उभारण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल समूहांच्या उन्नतीसाठी जात, धर्म लक्षात न घेता प्रयत्न केले पाहिजेत.

शासनव्यवस्थेची आणि राजकीय पक्षांची पारख ते द्वेषाऐवजी वरील उपाय योजण्याचा इरादा व्यक्त करतात की नाही  याच आधारांवर केली पाहिजे. थोडक्यात, कोणत्याही समूहाचा द्वेष करण्याऐवजी आपापसात सहिष्णुता निर्माण होण्यासाठी ‘अनुकंपा’ (Sympathy) आणि ‘सहानुभूती’ (Empathy) या भावना वृद्धिंगत करणे आवश्यक आहे.

आत्मघातकी सूडाचा प्रवास

सूड किंवा प्रतिशोध घेण्याची वृत्ती अंतिमतः सर्वनाश घडवून आणते. हा केवळ सुविचार नसून ते एक सातत्याने घडून येत आलेले भयंकर वास्तव आहे. महात्मा गांधीच्या ‘An eye for an eye makes the whole world bilind’ या विधानात हे वास्तव दिग्दर्शित होते. सूडाचा अंत कोणावर सूड उगवल्याने होऊ शकत नाही. त्याचा अंत करण्यासाठी क्षमा हीच परिणामकारक ठरत असते. मुस्लीम सत्तेने शेकडो वर्षे हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचा सूड घेण्याचा विचार हा आपल्या मेंदूत भरवला जाणारा  महाविखार आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तसेच करायचे ठरल्यास ब्राह्मणी धर्मसत्तेने धर्मग्रंथांच्या मान्यतेने बहुजनांवर आणि दलितांवर  केलेल्या अत्याचारांचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण होऊ शकेल.

पूर्वजांच्या पापांना आजच्या पिढीला दोषी ठरवणे, हे अपरिपक्वतेचेच  लक्षण आहे. त्यामुळे ही सुडाची भावना आपल्या डोक्यातून विसर्जित करून सुडाची ही परंपरा आता खंडित करणे, हेच आपल्या हिताचे ठरणार आहे. सुडाचे राजकारण आणि समाजकारण करणारे लोक हे आपल्या देशाचे खरे  दुश्मन आहेत, यात शंका बाळगू नये. अशा लोकांच्या प्रचारतंत्रांना बळी न पडता आपण त्यांना  एकटे पाडण्याची गरज आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

सांस्कृतिक विकासाचे मारक आणि कारक घटक-जातीव्यवस्था

जगाच्या सांस्कृतिक इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास सहकार्य, सहिष्णुता, प्रेम या भावनाच संस्कृती विकासाला अधिक उपयुक्त ठरलेल्या आहेत, हे आपल्या लक्षात येण्यासारखे आहे. परस्परसहवास  आणि बंधुता यांचा अभाव, संघर्ष आणि विद्वेष यामुळे कोणत्याही संस्कृतीचा विकास होऊ शकत नाही. आपल्या येथील जातीव्यवस्था विषमता, वर्चस्वाची भावना, श्रेष्ठत्व- कनिष्ठत्व, परस्परसंबंधांचा अभाव या वैशिष्ट्यांनी युक्त असल्यामुळे भारतीय समाजातील विविध समूहांत एकत्वाची, प्रेमाची आणि सहकार्याची भावनाच निर्माण होऊ शकली नाही.

त्यामुळे जेव्हापासून जातीव्यवस्था अधिक बलवत्तर आणि कठोर झाली, विशेषतः मध्ययुगापासून, आपली भौतिक प्रगती जणू काही थांबलेली असल्याचे आपल्या लक्षात येते. प्राचीन काळात खगोलशास्त्र, गणित आणि वैद्यक शास्त्रांत आपल्या प्रगतीचा वेग हा पाश्चात्यांपेक्षा अधिक असल्याचे आपणास इतिहास सांगतो. मध्ययुगानंतर हा वेग कुंठीत झाल्याचे दिसून येते. आणि त्याच वेळी युरोप पाहता पाहता आपल्या कितीतरी पुढे गेल्याचे दिसून येते.

जातीव्यवस्थेने निर्माण केलेल्या कप्पेबंद समाजव्यवस्थेमुळे समाजातील ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचे योगदान देशाच्या आणि संस्कृतीच्या विकासात आपल्याला लाभलेले नाही. त्यामुळे परस्परांविषयीच्या उदासीनतेऐवजी सहकार्य, आपापसातील शत्रुत्वाऐवजी सहिष्णुता आणि द्वेषाऐवजी प्रेम यांना उत्तेजन देण्याची गरज पूर्वी केव्हा नव्हती, तेवढी आज निर्माण झालेली आहे.

त्यासाठी सामाजिक विद्वेषाची दुकाने बंद पाडण्याची आवश्यकता आपल्याला पडली पाहिजे. आपला सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सहिष्णुता, सहकार्य, प्रेम, परस्परविश्वास यांना पर्याय नाही, हे आपल्या मेंदूत स्थापित करण्याची गरज आहे. जी विचारसरणी प्रेम, सहिष्णुता, मानवता, शोषितांच्या उद्धाराची भावना या बाबींना चालना देते, तीच विचारसरणी मानवाच्या उज्ज्वल भविष्याचा आधार आहे.

सरकार म्हणजे राष्ट्र नव्हे

देश म्हणजे देशातील लोक. खेड्यापाड्यांत, दऱ्याखोऱ्यांत, रानावनांत राहणारी गरीब, पीडित, शोषित जनता यांचाही या लोकांत समावेश होतो. म्हणूनच या लोकांवरील प्रेम आणि निष्ठा हेच खऱ्या देशभक्तीचे आधार आहेत. सरकार हे लोकांवर अवलंबून असून ते लोकांमुळेच आणि लोकांसाठीच  अस्तित्वात आलेले आहे. म्हणूनच केवळ सरकार म्हणजे देश नक्कीच नाही. म्हणूनच सरकारवरील टीका म्हणजे देशावरील टीका नव्हे, याचे भान ठेवले पाहिजे.

लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करणे आवश्यक असून अशी टीका देशद्रोह नसून ती लोकशाही परिपक्वच करत असते. त्यामुळे सरकारवरील टीका ही देशावरील टीका असल्याचा भ्रम पसरवणाऱ्या लोकांचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. असे करून ते आपल्याच हिताच्या इतर  गोष्टींवरून आपले ध्यान विचलित करीत आहेत. म्हणूनच देशद्रोहाच्या या भ्रामक कल्पना किंवा अपसमज आपल्या डोक्यातून काढून अशा भ्रमाचा प्रसार करणाऱ्या प्रवृत्तींवर मात केली  पाहिजे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

देशभक्तीचे कर्मकांड

देशातील यच्चयावत लोकांमध्ये सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि सवलती यांचे न्याय्य वितरण घडवून त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणारी कोणतीही कृती, हे देशभक्तीचे द्योतक असली पाहिजे. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने त्याच्यावर सरकारने किंवा समाजाने सोपवलेले कर्तव्य प्रामाणिकपणे, संपूर्ण क्षमता वापरून, समर्पण वृत्तीने आणि परिणामकारकरित्या पार पाडणे, म्हणजेच आपल्या देशाप्रती भक्ती व्यक्त करणे होय.

परंतु सध्याच्या काळात देशभक्ती करण्यासाठी एवढे सायास करावे लागत नाहीत. ‘भारत माता की जय’ असा आग्रही जयघोष करणे, राष्ट्रध्वजाचा सन्मान दाखवण्याचे कर्मकांड करणे, घरावर राष्ट्रध्वज फडकावणे आणि समाजमाध्यमावर आवर्जून तसा ‘डीपी’ मिरवणे असे काही कर्मकांड पार पाडले की, देशभक्तीची परमावधी होते, याबद्दल आमची खात्री होते. हे कर्मकांड करणेही महत्त्वाचे आहेच, पण केवळ तेवढेच केल्याने देशभक्ती पूर्ण होत नाही. वर म्हटल्याप्रमाणे देशाप्रती आपली कर्तव्ये पार पडण्यातूनच देशभक्तीचा सार व्यक्त होतो. त्यामुळे केवळ देशभक्तीचे कर्मकांड करणाऱ्या आणि त्याचा फायदा घेणाऱ्यांपासून सावध राहायला हवे. देशभक्तीचे खरे रहस्य समजावून घेतल्यास आपल्याला या कर्मकांडी लोकांचे गूढ समजण्यास मदत होईल.

दिखावू वृत्तीपासून सावधानता

सध्या कशाचाही ‘इव्हेंट’ करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. असे ‘इव्हेंट’ करून विकास, भव्यता, आनंद, उन्माद, प्रेम, सहानुभूती यांचे केवळ प्रदर्शन मात्र करायचे असते. त्याद्वारे जनमत अशा ‘इव्हेंट’कडे  आणि त्याद्वारे आपण आणि आपली संघटना यांच्याकडे वेधून घ्यायचे असते. असे करून जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून त्यांचे लक्ष विचलित करणे हाही त्यामागील उद्देश असतो. त्यासाठी  यांच्या या  दिखावू अभिव्यक्तीला भाळून जाणे कटाक्षाने टाळले पाहिजे. या ‘इव्हेंट’मधून धार्मिक कट्टरतेलाही चालना देण्याचा प्रयत्न होत असतो.

अशा वेळी या ‘इव्हेंट’च्या पार्श्वभूमीवर कट्टरता वाढवणाऱ्या प्रवृत्तींच्या पुढे वारंवार सामाजिक, आर्थिक प्रश्नांची मांडणी करून कट्टरतेला संदर्भहीन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांना महागाई, बेरोजगारी, दारिद्र्य अशा मूलभूत प्रश्नांविषयी जाब विचारण्याची गरज आहे. सरकारच्या कार्यक्रमांची परिणती सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे दुर्बल घटकांमध्ये न्याय्य वितरण घडून येण्यात  होत आहे किंवा नाही हे पाहिले पाहिजे. ‘इव्हेंटस’, गप्पा, बढाया, आश्वासने यांच्याऐवजी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या व्यक्ती आणि विचार यांच्यावरच विश्वास ठेवायला हवा. म्हणूनच ‘इव्हेंटस’च्या भूलभुलैयाला आपल्या मेंदूचा कब्जा घेण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे. असा भूलभुलैया फक्त आपले मेंदू प्रदूषित करण्याचे काम करतो, हे आपण थोड्या क्षणांसाठीदेखील विसरता कामा नये.

इतिहासाचा गैरवापर

इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे. वर्तमान नीटपणे समजून घेण्यासाठी इतिहास हे एक उत्कृष्ट साधन आहे. इतिहासातून धडे घ्यायचे असतात,  असेही काहींचे म्हणणे असते. परंतु इतिहासातून सूड भावना घ्यायची असते, असे आत्मघातकीच म्हणू शकतात. एवढेच नव्हे तर वेळ पडल्यास इतिहासाचे विकृतीकरण करूनही त्यातून काही लोक सुडाचीही प्रेरणा घेतात. इतिहासाचा असा गैरवापर आपण समजून घ्यावा आणि त्यापासून सावध राहावे. सोयीचा इतिहास मांडणे, इतिहासाची मोडतोड करणे, गैरसोयीचा इतिहास लपविणे, संदर्भ तोडून ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण करणे अशा विकृत प्रयत्नांवर सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे.   

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

अशा प्रयत्नांना बळी न पडता खऱ्या इतिहासासाठी पर्यायी साधनांचा  वापर करण्याची प्रवृत्ती निर्माण करण्याची गरज आहे. आजकाल महात्मा गांधी, विशेषतः नेहरू, यांच्याबाबतीत असे फार मोठे प्रयत्न, नव्हे मोहिमा चालू असल्याचे आपल्याला प्रत्यही जाणवत असते. अशा मोहिमांचा आपल्या बुद्धीवर अनिष्ट परिणाम होऊ न देण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. असे केले तर आपल्या डोक्यातील अनेक भ्रामक समजुती सहज नाहीशा होऊ शकत असतात.

प्रतिमाभंजनाचा धोका टाळण्यासाठी सर्वंकष अभ्यासाची गरज

महापुरुषांच्या जीवनातील सुट्या घटना, सुटी वक्तव्ये, सुटे विचार आणि सुटे निर्णय यांच्यावरून केवळ त्यांचे मूल्यमापन करता कामा नये. प्रत्येक घटनेचे भिन्न संदर्भ असतात, हे लक्षात घ्यायला हवे. महापुरुषांचे मूल्यमापन करण्यासाठी त्याचे एकूण चरित्र आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान काय आहे, हे साकल्याने जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि तरच या महापुरुषांचे मानवतेला एकंदर काय योगदान आहे, हे आपल्या लक्षात येऊ शकते. अन्यथा कारस्थानी लोकांचे  निवडक घटना पुढे करून आपल्या नेत्यांचे महिमामंडन आणि विरोधी नेत्यांचे प्रतीमाभंजन करण्याचे प्रयत्न यशस्वी होण्याची  शक्यता असते. एखाद्या नेत्याचा खरा, खोटा फोटो दाखवून, त्यांच्या संदर्भरहित कृती-उक्तींचे संदर्भ देऊन त्या नेत्याचे सर्वंकष मूल्यमापन होऊ शकत नाही, ही अगदी उघड बाब आहे. त्यामुळे अशा उथळ प्रयत्नांचा आपल्यावर किंचितही परिणाम होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे.

परंपरा आणि आधुनिकता

सगळ्याच परंपरा आधुनिक मूल्यांशी सुसंगत नसतात. त्यामुळे सरसकट परंपराभिमानाचे गोडवे गाणाऱ्यांपासून सावध राहायला हवे. अशा प्रयत्नांमधून हे लोक जुनी सांस्कृतिक मुल्यव्यवस्था, परंपरा आणि संकल्पना आपल्यावर लादण्याची शक्यता असते. अशा परंपरा स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद आदी मूल्यांना विरोधी असू शकतात, याकडे लक्ष ठेवले पाहिजे. त्यामुळे अशा मूल्यव्यवस्थेने आपले मेंदू प्रदूषित होणार नाहीत, हे डोळ्यात तेल घालून पाहिले पाहिजे. याचा अर्थ स्वतःला परंपरेपासून संपूर्णपणे तोडायलाच पाहिजे, असे नाही. आधुनिक मानवी मूल्यांशी  अनुकूल अशा समांतर परंपरा आपल्या देशातही विकसित होत गेलेल्या आहेत.

भगवान महावीर, भगवान बुद्ध, महात्मा बसवेश्वर, चक्रधरस्वामी, संत कबीर, महाराष्ट्रातील संत मंडळी यांच्यात आपल्याला अशा परंपरा शोधता येतात. अशा परंपरांचा शोध घेऊन, त्यांची सुव्यवस्थित मांडणी करून या परंपरांशी आपण जोडून घेतले पाहिजे. आपल्या पुरोगामी कृती, विचार, आपले कार्यक्रम यांच्यासाठी या परंपरांतून आपल्याला आधार सापडू शकतात. आपल्याला योग्य दिशेने प्रेरित करण्यासाठी, आपल्या विचारांना दृढ ठेवण्यासाठी, आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याला लोकांशी जोडून ठेवण्यासाठी अशा परंपरा  आवश्यकच असतात. परंतु असे करताना मानवी मूल्यांशी विसंगत परंपरांची या मानवतावादी परंपरेत भेसळ होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

या सांस्कृतिक परंपरा आणि प्राचीन वारसा यांचे महत्त्व लक्षात घेऊन काही लोक पंडित नेहरू कसे हिंदू धर्माविरुद्ध होते, असे सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु नेहरूंच्या चरित्र आणि साहित्याचा अभ्यास केल्यास त्यांना आपल्या ऐतिहासिक वारशांचे किती कौतुक आणि अभिमान होता, हे सहजपणे लक्षात येते. त्यांची आधुनिकता ही प्राचीन परंपरेच्या पूर्णपणे विरुद्ध उभी राहत नव्हती. उलट त्यांच्या आधुनिकतेने सातत्याने परंपरेशी नाते सांगितले आहे. त्यांच्या ठिकाणी असणारी इतिहासविषयक चिकित्सक आणि विवेचक बुद्धी, वैज्ञानिक दृष्टी आणि धर्मनिरपेक्षतेचा दृष्टीकोन यांमुळे हे नाते स्वाभाविक आणि नव्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेच्या प्रस्थापनेसाठी उपयुक्त ठरलेले आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

ही वस्तुस्थिती जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून काही लोक नेहरूंना ‘धर्मा’विरुद्ध ठरवून त्यांना  सामान्य लोकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या प्रतिगामी धारणा जनतेच्या मनांत रुजवण्यासाठी आपल्या विरुद्ध असलेल्या विचार परंपरांना बदनाम करणे एवढाच त्यामागचा उद्देश असतो. आपण हे डावपेच सातत्यने लक्षात ठेवल्यास आपली दिशाभूल आणि त्यामुळे होणारे आपल्या मेंदूचे प्रदूषण आपल्याला टाळता येणे शक्य होईल. 

देव-धर्माचे मानवी जीवनातील स्थान

देव, धर्म आदी अमूर्त संकल्पना या व्यक्तिगतच राहायला हव्यात. कारण त्या वस्तुनिष्ठ नाहीत. त्यांना रस्त्यावर आणणे किंवा दुसऱ्यांवर लादणे बंद केले पाहिजे. या कल्पना व्यक्तिगत असल्याने त्या  प्रत्येकाच्या बाबतीत वेगळ्या असू शकतात. त्या वैज्ञानिक निकषांवर टिकत नसल्यामुळे  आपण त्या मान्य केल्या नाहीत, तरी त्या तशा असण्याबद्दल आपण ‘सहिष्णू’ असले पाहिजे. परंतु त्यांचे व्यक्तिगत स्वरूप लक्षात घेता आपल्याच कल्पना किंवा सिद्धान्त बरोबर किंवा श्रेष्ठ असल्याचा अट्टाहास समंजस नाही, एवढे तरी समजून घ्यावे.

या कल्पनांचा व्यक्तिगत किंवा सामाजिक जीवनावर किंवा सामाजिक स्थैर्यावर किंवा मानवी प्रगतीवर विपरीत परिणाम होत असेल तर त्यांना विरोध करण्याचीही गरज आपण समजून घेतली पाहिजे. अशा कल्पनांच्या आधारांवर कोणी इतर व्यक्ती किंवा समूह यांना तुच्छ समजून त्यांचा तिरस्कार आणि द्वेष करीत असेल तर आपण ते सहन करता कामा नये. थोडक्यात, देव आणि धर्माला आपण आपल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनापासून अलग ठेवण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

विज्ञान आणि पारंपरिक मूल्यव्यवस्था

वैज्ञानिक दृष्टीकोन हा वस्तुनिष्ठ आणि विज्ञानावर आधारित असल्याने त्याची तपासणी कोणीही करू शकतो. आपल्या भौतिक आणि वैचारिक विकासाचा तो आधार असल्याचे कोणालाही अमान्य करता येणार नाही. विज्ञानाच्या आधारावर आपल्याला आपल्या पारंपारिक समजुती तपासता येतात. त्यामुळे आपल्यात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा, रूढी, अपसमज हळूहळू दूर होत आहेत. अनेक धर्म आणि धार्मिक नेतेही आपल्या धार्मिक संकल्पना विज्ञानाशी सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पारंपारिक समजुतीमुळे आपल्या मनावर अनेक अवैज्ञानिक अपसमज, श्रद्धा, कल्पना आदींचा पगडा बसलेला असतो.

अनेक नव्या कल्पना, वास्तव आणि जुन्या श्रद्धांची निरर्थकता यांचा स्वीकार करण्यात पारंपारिक श्रद्धा आणि अपसमज अडथळा निर्माण करतात. हे अडथळे दूर करणे आपल्या मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक समृद्धीसाठी आवश्यक आहे. ही प्रक्रिया सावकाशपणेच घडणार असल्याचे आपण मान्य केले पाहिजे. अन्यथा वाद, संघर्ष आणि दुराग्रह अधिकाधिक वाढण्याचीच शक्यता आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत आपली विज्ञानाधारित विवेकवादावरील निष्ठा डळमळीत होता कामा नये.

विज्ञान आणि धर्म

वर म्हटल्याप्रमाणे विज्ञान हे वस्तुनिष्ठ अनुभव आणि प्रयोग यांच्यावर आधारित असतो. परंतु  धर्म हा वस्तूनिष्ठतेऐवजी धार्मिक ग्रंथ, आप्तवाक्य, अनुभूती आणि श्रद्धा या व्यक्तीनिष्ठ बाबींवर आधारित असतो. त्यामुळे हे दोघेही समांतरपणे आपली वाटचाल करतात, हे खरे असू शकत नाही. त्यांच्या एकंदर स्वरूपामुळे ते बहुसंख्य वेळी परस्परांच्या सिद्धान्तांना खंडितच करत असतात.

डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्ताला पुराव्यांचा आधार आहे. उलट ईश्वरनिर्मित सृष्टी सिद्धान्ताला पुराव्याऐवजी केवळ श्रद्धेचा आधार आहे. त्यामुळे सध्या तरी आपल्याला विद्यार्थ्यांना डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धान्तच शिकवावा लागेल. तो अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचे प्रयत्न आपल्याला मध्ययुगाकडेच नेतील यात संशय नाही. आपण ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन वैज्ञानिक सिद्धान्त वगळण्याच्या प्रयत्नांना विरोधच केला पाहिजे. मेंडेलीफची मूलद्रव्यांची आवर्त सारणी दूर करून आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकांतून पंचमहाभूतांचा सिद्धान्त तर शिकवायचा नाही? तसे असेल तर पुढील पिढी आपल्याला कधीही माफ करू शकणार नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

धर्माच्या मर्यादा लक्षात घेतल्या तरी जीवनातील अनिश्चितता, वैश्विक घटनांचे अज्ञान, मृत्यूंचे भय आणि जीवनातील आकस्मिक संकटे यांच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने शतकानुशतके  धर्माचा उपयोग होत आलेला आहे. माणसाचे अज्ञान विज्ञानाने लक्षणीय स्वरूपात कमी केलेले असले तरी वर उल्लेखित इतर गोष्टींवर मात करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे  सामान्य लोकांची धर्मावरील श्रद्धा कमी  होण्याची शक्यता नसते. अशी श्रद्धा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून ती त्याच्या अस्मितेचा आधार बनून राहिलेली असते. त्यामुळे  बहुसंख्य धार्मिक कल्पना अवैज्ञानिक असल्या तरी त्यांच्यावर थेट हल्ला करणे उपयोगाचे ठरत नाही. अशा हल्ल्याने श्रद्धाळू माणसाच्या मेंदूतील या कल्पना नष्ट करता येत नाहीत. परंतु त्याच वेळी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचे रोपण करण्याचे प्रयत्न मात्र करता येणे शक्य आहे.

सोबतच समाजशास्त्र, इतिहास, विज्ञान यांच्या आधारे धर्माच्या सर्वंकष चिकित्सेचे प्रयत्नही सातत्याने चालू ठेवणे आवश्यक आहे. पण ‘अंधविश्वास दूर करण्यात जनमानसाचे सहकार्य मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही धर्मावर बोलणारच नाहीत’, हा दृष्टीकोन मात्र आपली बौद्धिक अप्रामाणिकताच दर्शवत असतो.  

आर्थिक धोरण आणि मानवी सौख्य

उदारीकरणाच्या धोरणाने आर्थिक विकास होत असला, तरी त्यातून पराकोटीची विषमता तयार होते. त्यातूनच असंतोष, तणाव आणि अशांतता जन्म घेते. त्याचसोबत या धोरणामुळे स्पर्धा, संघर्ष, उपभोगवाद, चंगळवाद फोफावत जातो. त्यामुळे निसर्गाचे अतिरिक्त शोषण होऊन पर्यावरणाचा नाश होतो. आपल्या अशा वर्तनाने आपण पुढच्या पिढीसाठी ही वसुंधरा सुस्थितीत ठेवण्यात असमर्थ ठरत आहोत. याचे कारण भांडवलशाही आणि ‘खाउजा’ धोरणे आपला जीवनविषयक दृष्टीकोनच बदलून टाकत आहेत.

या आर्थिक धोरणांमुळे पैशाला केवळ सर्वोच्च प्राधान्यच मिळत नाही, तर जीवनाच्या इतर क्षेत्राला दुय्यम-तिय्यम स्थानांवर ढकलले जात आहे. समाजातील बुद्धिमान वर्ग केवळ ज्या क्षेत्रातून पैसा आणि समृद्धी प्राप्त होते, त्या क्षेत्रातच आपले योगदान देतात. त्यामुळे सामाजिक क्षेत्रे, कायदा, इतिहास, राजकारण यांची गुणवत्ता सातत्याने उणावत असल्याचे आपल्याला जाणवत आहे. १९८०च्या पूर्वीची वैचारिक मीमांसा आपल्याला आजही थक्क करते, ते यामुळेच.

वरील विवेचनाचा उद्देश, उदार आर्थिक व्यवस्थेचे आर्थिक विकास आणि दारिद्र्यनिर्मूलनातील भरीव  योगदान नाकारायचे नसून, कोणतेही आर्थिक प्रतिमान सर्व देशांत आणि काळात सारखेच उपयोगी ठरत नाही, हे लक्षात आणून द्यायचा आहे. या दृष्टीने आपण स्वीकारलेले आर्थिक प्रतिमान हे गतिशील असले पाहिजे, असे म्हणता येईल. बदलत्या देश-काल-स्थिती यांच्याप्रमाणे त्यामध्ये सातत्याने बदल करता आले पाहिजेत. विशिष्ट आर्थिक धोरणांचाच सर्वकाळी कट्टरतेने पुरस्कार करणे, ही एक प्रकारची ‘पोथीनिष्ठा’च आहे. जीवनातील प्रसन्नता वाढवण्याला प्रगती म्हणावयाचे असल्यास मानवी जीवनाचे प्रत्येक क्षेत्र समृद्ध बनण्याची गरज आहे, हे आपल्याला समजले पाहिजे.

आर्थिक विकास, सामाजिक न्याय, काटकसर, मर्यादित उपभोग, पर्यावरणाचे संतुलन आदी बाबींना प्राधान्य देणारे आर्थिक प्रतिमान तयार करणे ही आजची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येकाने  अर्थसाक्षर होण्याला प्राधान्य देणे अधिक उपयुक्त आहे. म्हणजे मानवी समाजाला योग्य ठरणारे प्रतिमान विकसित करण्यात या ना त्या प्रकारे  प्रत्येकालाच  आपला सहभाग नोंदवता येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

संस्कृतीनुसार स्वाभाविक ठरणारी आचारभिन्नता

विभिन्न संस्कृतीनुसार लोकसमुहांच्या आचारात भिन्नता येणे स्वाभाविक आहे. सभोवतालची भौगोलिक स्थिती आणि नैसर्गिक संसाधनाची उपलब्धता यांतून त्या त्या प्रदेशातील अन्न, वेशभूषा आणि इतर दैनंदिन आचार आणि सवयी या बाबी विकसित झालेल्या आसतात. एवढेच नव्हे तर सभोवतालच्या एकंदर परिस्थितीचा शरीररचनेवर, वर्णावर आणि मूल्यव्यवस्थेवरही काहीसा परिणाम घडून येत असतो. त्यामुळे ‘आमचीच संस्कृती श्रेष्ठ’ अशी धारणा बनवणारे आणि ती दृढ करणारे अज्ञानाचे बळी आहेत, असे म्हणावे लागेल. संस्कृतीभिन्नतेची वरील कारणे समजावून घेतल्यास आपण या भिन्नतेच्या आधारे इतरांना आपल्याहून वेगळे, कनिष्ठ किंवा हीन समजणार नाहीत. एकमेकांना समजून घेऊन विविध समूहांत सहिष्णुता आणि आपुलकी वाढवण्याच्या दृष्टीने  सांस्कृतिक भिन्नतेची कारणे समजून घेणे आवश्यक आहे.

साधनशुचितेचे महत्त्व

साधनशुचितेचे तत्त्व हल्ली आपली प्रतिष्ठा गमावत आहे. बऱ्याच वेळा ते थट्टेचाही विषय ठरत आहे. आपली उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने साधनाचे स्वरूप लक्षात न घेता त्याची केवळ उपयुक्तता लक्षात घेतली पाहिजे, असे या विरोधकांचे म्हणणे असते. ‘The Ends Justfy the means’ हे मॅकियाव्हेलीचे विधान प्रसिद्धच आहे. परंतु याचे पूर्णपणे समर्थन करणे योग्य आहे, असे वाटत नाही.

चांगली उद्दिष्टे साध्य करण्यासाठीदेखील वाईट किंवा चुकीची साधने वापरताना आपण चांगलेपणाशी तडजोड केलेली असते. वाईट साधनांचा अवलंब करताना वाईटपणाचा आश्रय घ्यावा लागतो. साधनातील अयोग्यतेचा ते साधन वापरणाऱ्यावर आणि प्राप्त करण्यात येणाऱ्या  साध्यावर  अयोग्य  परिणाम होणे, स्वाभाविक आहे. एखादे साध्य प्राप्त करण्यासाठी आपण अयोग्य साधनाचा वापर केल्यास आपला त्या साधनाचा आपल्या मनावरही अनिष्ट परिणाम होणे शक्य आहे. आणि नंतर आपल्या त्या मानसिक अवस्थेचा  परिणाम आपल्या पुढील कृतींवर होणारच नाही, याची खात्री देता येणार नाही. मुळात चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठीसुद्धा वाईटाचा आश्रय घेणे तात्विकदृष्ट्या चुकीचेच ठरते.

दुसऱ्याची संपत्ती चोरून गरिबाला देणे, एखाद्या समाजद्रोही गुंडाला खोट्या चकमकीत मारणे या गोष्टी अंतिमत: समाजहितैषी ठरणार नाहीत. लोककल्याणासाठी एखाद्याला निवडून यायचे म्हटल्यावर त्याने त्यासाठी धार्मिक दंगलींचा वापर करणे, केव्हाच समर्थनीय ठरणार नाही. जनतेला खोटी आश्वासने देऊन सरकार टिकविणे किंवा राजकीय विरोधकांना धमक्या देऊन त्यांचा विरोध संपुष्टात आणणे, अशा कृतींचा आपले साध्य चांगले असले तरी ते प्राप्त करण्यासाठी सर्रास वापर करणे केव्हाच योग्य ठरू शकत नाही.

त्यामुळे मॅकियाव्हेलीच्या वर उल्लेखित विधानाचा आधार घेणाऱ्यांना आपला आधार देणे योग्य नाही. साधनांचा विवेक न करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आपण विरोधच केला पाहिजे. अशा अविवेकी विचारांनी आपला मेंदू ‘प्रदूषित’ होऊ देता कामा नये. अर्थात साधनशुचिता प्रत्येक वेळी समर्थनीय ठरतेच, असेही नाही. पण असे अपवाद थोडेच असणार आहेत. त्यामुळे अशा अपवादांच्या आधारे साधनशुचितेला नकार देणारा नियम बनवता येणार नाही, असे वाटते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

सद्गुणविकृतीची भ्रामक कल्पना

चांगले असावे, पण अति चांगले नसावे, असे विधान सर्रास ऐकायला मिळते. अशा विधानाला समर्थनही भरपूर मिळते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांच्या आदेशाने  सुरक्षितरित्या परत पाठवणे हे काही जणांना अति चांगले वागणे वाटत असून, ती ‘सद्गुणविकृती’ असल्याचे ते जाहीर करतात. आता एखाद्या गरजू मुस्लीम व्यक्तीला तिच्या अडचणीच्या वेळी मदत करणेहीदेखील सद्गुणविकृती ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

अशा मतांना कोणत्याही परिस्थितीत समर्थन देता कामा नये. चांगलेपणाची डिग्री ठरवण्याचे कोणतेही वस्तुनिष्ठ मानक उपलब्ध असल्याचे दिसत नाही. त्यामुळे किती प्रमाणातील चांगलेपणा विकृत ठरेल, हे सांगता येणार नाही. चांगलेपणा हा चांगलेपणाच असतो. तो कोणत्याही परिस्थितीत विकृत असण्याचे कारण नाही. आपल्या चांगलेपणाचा इतरांनी फायदा घेऊ नये, या हेतूने सद्गुणविकृतीचा विचार मांडल्या जात असावा. परंतु आपल्या चांगल्या वागण्याचा इतरांना  गैरफायदा घेता येऊ नये, यासाठी आपल्याला सावध राहता येणे शक्य आहे. त्यासाठी सद्गुणविकृतीचे असे तत्त्वज्ञान मांडण्याची आवश्यकता नाही.

वरवर बरोबर वाटणाऱ्या विचारांची आकर्षक मांडणी करून  सामान्य जनतेचे समर्थन मिळवणे, हा असे विचार मांडणाऱ्यांचा उद्देश असतो, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. जनतेमध्ये भ्रम पसरविण्याचाच  हा एक प्रकार आहे, यात शंका नाही.

हिंसा-अहिंसा विवेक

‘महाभारता’त ‘अहिंसा परमो धर्म । धर्म हिंसा तदैव च।’ असे एक वचन आहे. अर्थात, अहिंसा हा श्रेष्ठ धर्म असला तरी हिंसा हाही धर्मच आहे. थोडक्यात, हिंसा हा श्रेष्ठ धर्म नसला तरी अनेक वेळा हिंसा करणे अपरिहार्य ठरते. अशा वेळी हिंसा हाही धर्मच मानला पाहिजे.

अहिंसेची थट्टा आणि हिंसेचे महत्त्व सांगणाऱ्यांचा उद्देश महात्म्याच्या अहिंसेच्या तत्त्वावर टीका करणे, हाच असावा, असे वाटते. ‘महाभारता’च्या वरील उद्धरणाचा विचार केल्यास महाभारतकारांनी वर्तनाचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून अहिंसेचाच स्वीकार करण्याचे समर्थन केल्याचे दिसून येते. म्हणूनच ‘महाभारत’ अहिंसेला श्रेष्ठ धर्म म्हणून मान्यता देते. परंतु व्यवहारात प्रत्येक वेळी  अहिंसेला चिकटून राहता येत नाही. त्यामुळे एखाद्या प्रसंगी हिंसेचा आश्रय घ्यावा लागतो. म्हणून अशा अपवादभूत प्रसंगी हिंसा हे तत्त्व धर्म्य ठरू शकते, असे महाभारताला म्हणावयाचे आहे.

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘अहिंसा’ या तत्त्वाचा स्वीकार केल्यामुळे बऱ्याच प्रवृत्ती आपली नाराजी आणि कधी कधी संताप व्यक्त करतात. परंतु असे करताना ते तत्कालीन भारताची राजकीय, लष्करी आणि सामाजिक स्थिती लक्षात घेत नाहीत. राजकीयदृष्ट्या भारतीय जनता जवळपास निद्रित अवस्थेत असताना हिंसेचा प्रयोग स्वातंत्र्याच्या दृष्टीने घातकच ठरला असता, ही साधी गोष्ट या लोकांच्या का लक्षात येत नाही, हा प्रश्न आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

आणि आपल्या साध्यप्राप्तीत अहिंसेचा मार्ग हा आपल्या स्वातंत्र्याची गुणवत्ता वाढवणारा होता. या मार्गाने मिळवलेले स्वातंत्र्य चिरकाल टिकणारे ठरलेले आहे. आपली लोकशाही सुदृढ करण्यात आपल्या अहिंसेच्या मार्गाचे योगदान मोठे आहे, यात शंका बाळगण्याचे कारण नाही. त्यामुळे वारंवार हिंसेचे महत्त्व सांगणाऱ्या प्रवृत्तींपासून सदोदित सावध राहण्याची गरज आहे.

कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा तत्त्वज्ञान यांच्याविषयी कसा विचार करावा याचे वर दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांत अजूनही काही बाबींची भर टाकताच येईल. कोणत्याही गोष्टीचा विचार करताना तर्कशुद्धपणा, वैचारिक शिस्त, समतोलपणा, विवेक, वैज्ञानिक दृष्टीकोन, पूर्वग्रहरहितता आदी गुणांचा वापर  करणे आवश्यक आहे.  

एका पक्षाचे दोष दाखवले असता, त्या दोषांचे खंडन न करता आरोप करणारा पक्षच कसा दोषी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी सामान्यांनी जागरूक राहिले पाहिजे. जागरूक नागरिक पहिल्या पक्षाला, दुसऱ्या पक्षावर आरोप करण्याआधी, त्याच्या दोषांविषयी स्पष्टीकरण विचारील.

सामान्य लोकांनी विचार कसा करावा, त्यांच्या विचार करण्यात शिस्त कशी आणावी, हे निरंतर समजून सांगणे आवश्यक आहे. पण ते कसे करायचे, हा खरा प्रश्न आहे. सरकारकडे समर्थ आणि व्यापक अशी शिक्षणव्यवस्था आहे. पण ही व्यवस्था आपले कर्तव्य खऱ्या अर्थाने पार पाडत आहे काय, यावर संशय व्यक्त करण्यासारखी स्थिती आहे. सध्याच्या काळात तर ती ‘वैचारिक प्रदूषणा’त सक्रीय भाग घेते की काय, असे वाटण्याला वाव निर्माण झाला आहे. मग अशा प्रदूषणावर कोणते पर्यायी उपाय शोधता येतील आणि अशा उपायांद्वारे सामान्यांच्या ‘मेंदूंची स्वच्छता’ कशी साध्य करता येईल?

.................................................................................................................................................................

लेखिक हरिहर सारंग माजी राज्यकर उपायुक्त आहेत.

harihar.sarang@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा