नामदेव ढसाळ : नोबेल पुरस्काराच्या तोडीचा मराठीतला धगधगता कवी आणि बंडखोर, लढाऊ लेखक
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • नामदेव ढसाळ (१५ फेब्रुवारी १९४९-१५ जानेवारी २०१४)
  • Wed , 15 February 2023
  • पडघम साहित्यिक नामदेव ढसाळ Namdeo Dhasal गोलपिठा Golpitha

आज कविवर्य नामदेव ढसाळ यांची ७४वी जयंती. नुकतीच त्यांची (१५ जानेवारी) नववी पुण्यतिथी झाली. अलीकडच्या काळात म्हणजे २०१७ साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचं संपूर्ण लेखन ‘समग्र नामदेव ढसाळ’ (भाग १ व २) या दोन खंडांद्वारे उपलब्ध करून दिलंय. यातला पहिला खंड मोठ्या आकारातील ६३४, तर दुसरा ५६६ पानांचा आहे. नुकतंच त्यांच्याविषयी ज्येष्ठ लेखक मोतीराम कटारे यांचं ‘नामदेव साळुबाई ढसाळ’ आणि ढसाळांच्या पत्नी मलिका अमर शेख यांचं ‘नामदेवसाठी’, अशी दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अलीकडच्या काळात ढसाळांच्या काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्याही शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे ढसाळांचा एकत्रित आणि स्वतंत्रपणे जवळपास सगळं लेखन सध्या बाजारात उपलब्ध आहे.

नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुण्याजवळील पूर या छोट्या गावी झाला. त्यांच्या आईचं गाव कनेरसर. ही दोन्ही गावं नदीच्या दोन्ही तीरावर आहेत, पुण्यापासून ४० किमी अंतरावर. ढसाळ लहानपणीच वडिलांसोबत मुंबईत आले. इथल्या गोलपिठात त्यांनी वास्तव्य केलं. त्यांचे वडील खाटीकखान्यात खाटीक म्हणून काम करत. ढसाळांचं पाचवीपासूनचं शिक्षण मुंबईतच झालं. दहावीनंतर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. सुरुवातीच्या काळात ढसाळांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं, वेश्यावस्तीतही काम केलं. याच काळात चळवळीकडे ते वळले.

१७-१८व्या वर्षांपासूनच ढसाळांनी कविता लिहायला सुरुवात केली. टॅक्सी ड्रायव्हर असताना ढसाळ एकदा एका कविसंमेलनाला गेले होते. ते साल होतं १९७०. तेव्हा ढसाळ २१ वर्षांचे होते. मुंबईत ललितलेखक व कवी अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन सुरू होतं. त्यात अनेक मान्यवर कवी सहभागी झालेले होते. संमेलन रंगात आलेलं, तेवढ्यात प्रेक्षकांतून एक चिठ्ठी व्यासपीठावर गेली. ती ढसाळांनी पाठवली होती. म्हटलं होतं - ‘मलाही कविता वाचायचीय’. हा गबाळा मुलगा काय कविता वाचणार, असं वाटून संयोजकांनी ‘वेळ थोडा उरलाय, अजून काही निमंत्रित कवी बाकी आहेत’, असे आढेवेढे घेतले. पण श्रोत्यांनी ‘त्याला वाचू द्या’ असं सांगितल्यावर संयोजकांना नाईलाजाने परवानगी द्यावी लागली. मात्र ढसाळांच्या कविता ऐकून सगळे अवाक झाले. नंतर ग. दि. माडगूळकर म्हणाले, ‘आता रसाळ नामदेवांचा (संत नामदेव) काळ संपून ढसाळ नामदेवांचा काळ सुरू झालाय.’

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

विद्रोहाच्या प्रखर व तीव्र स्वर असलेल्या त्यांच्या कवितेनं सर्व साहित्य-जगताचं लक्ष वेधून घेतलं. ‘गोलपिठा’ (१९७२) या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मुंबईचं अधोविश्व आणि दलित समाजाच्या व्यथा-वेदना त्यांनी अतिशय रांगड्या, जोशपूर्ण आणि कळकळीनं आपल्या कवितेतून मांडल्या.

‘गोलपिठा’तल्या सगळ्याच कवितांनी आणि त्यातल्या धगधगीत वास्तवानं मराठी साहित्याला आणि मराठी समाजाला हलवून सोडलं. ‘मंदाकिनी पाटील’ ही त्यातली अशीच एका वेश्येची कहाणी सांगणारी दाहक कविता. ‘गोलपिठा’ला विजय तेंडुलकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. (त्या वेळी ढसाळ तेंडुलकरांना ‘सर’ म्हणत, पण नंतर त्यांचे संबंध तणावपूर्ण झाले. तेंडुलकरांची ‘कन्यादान’, ‘कमला’ ही नाटकं दलितविरोधी, त्यांची मानहानी करणारी आहेत, असं वाटून ढसाळ त्यांचे विरोधक बनले. त्यांचा तो राग तेंडुलकरांच्या निधनापर्यंत कायम राहिला.)

ढसाळांनी ‘आंधळे शतक’ या पुस्तकात एके ठिकाणी म्हटलंय की, ‘‘जगातला सर्वांत जुना व्यवसाय हा वेश्याव्यवसाय समजला जातो. देहविक्री करून चरितार्थ चालवणं हे पाश्चात्त्यांत प्राचीन काळी गलिच्छ मानलं जात नव्हतं. मुंबईतला प्रतिष्ठित वेश्याव्यवसाय १७ व्या शतकातच सुरू झाला असं मानलं जातं.”

मुंबईतला रेड लाइट एरिया म्हणजे कामाठीपुरा, फोरास रोड, पूर्वीचा फॉकलंड रोड, गोलपिठा, जमना मॅन्शन, ग्रांट रोड पूल... या एरियातल्या प्रत्येक गोष्टीविषयी ढसाळांना तपशीलवार माहिती होती. ‘आंधळे शतक’मध्ये त्यांनी लिहिलंय, “प्रत्येक मालकिणीच्या मागे माफिया असतो. कामाठीपुऱ्यात अशा १६ टोळय़ा आणि १०० मनीलेंडर्स आहेत. रेड लाइट एरियावर नियंत्रण ठेवणारी व्हिजिलन्स ब्रँच देहापासून दिडकीपर्यंत सर्व प्रकारचे हप्ते राजरोस उकळत असते. ते पोलीस अधिकाऱ्यापासून उच्चाधिकाऱ्यापर्यंत जातात.”

ढसाळांचं ‘पिला हाऊस’शी जवळचं नातं होतं. त्यांची ‘पिला हाऊसचा मृत्यू’ नावाची कविताही आहे. त्यावर त्यांनी लेखही लिहिलेत. ‘कामाठीपुरा’, ‘संत फॉकलंड रोड’, ‘भेंडी-बाजार’ या काही कविताही अशाच.

मलिका अमरशेख यांच्याबरोबरचं नामदेव ढसाळ यांचं आयुष्यही बरंचसं वादळी राहिलं. १९८०च्या दशकात काही काळ ते वेगळेही राहिले आहेत. मलिकाताईंनी मला ‘उद्ध्वस्त व्हायचंय’ या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्याविषयी फार उघडपणे लिहिलंय. मात्र त्यांचा मुलगा आशुतोषनं त्यांना पुन्हा एकत्र आणलं.

राजकीय चळव

ढसाळांनी ९ जुलै १९७२ रोजी कवी ज. वि. पवार यांच्यासह ‘दलित पँथर’ या लढाऊ संघटनेची स्थापना केली. १९७५-८० दरम्यान शिवसेनेचा ‘टायगर’ (बाळासाहेब ठाकरे), फॉरवर्ड ब्लॉकचे ‘लॉयन’ (जांबुवंतराव थोटे) आणि दलितांचा ‘पँथर’ (नामदेव ढसाळ) अशा तीन शक्ती तोडीस तोड मानल्या जायच्या. ‘तुमचा टायगर तर आमचा पँथर’ अशा घोषणा पँथरचे कार्यकर्ते द्यायचे. पण दशकभरातच या संघटनेत फूट पडली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ढसाळ यांचं आणीबाणीला उघड उघड समर्थन होतं. त्यांनी ‘आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र-प्रियदर्शिनी’ नावाची एक दीर्घ कविता इंदिरा गांधींवर लिहिली आहे. दरम्यान, काही काळ ढसाळ यांनी काँग्रेसमध्येही काम केलं. मग नंतरच्या काळात नामदेव ढसाळ राजकारणापासून काहीसे बाजूला  पडले. १९९०नंतर ढसाळ पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. १९९२ साली नामदेव ढसाळ खासदार होते. त्याआधीही एकदा खेडमधून, तर एकदा मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती. अलीकडच्या काळात ढसाळांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. एवढंच नव्हे, तर त्यांच्या राजकीय भूमिका नंतरच्या काळात सातत्यानं वादग्रस्त ठरल्या.

साहित्य चळवळ

शेवटी शेवटी ढसाळ मुंबईत ‘इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिव्हल’ भरवत होते. पण पैशाअभावी त्यात सातत्य राहिलं नाही. एका वर्षी गुंथर ग्राससारख्या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाला बोलावण्यात आलं होतं, परंतु काही कारणानं ते येऊ शकले नाहीत.

त्रिनिदादमध्ये वास्तव्यास असलेले पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल जेव्हा जेव्हा भारतात, विशेषत: मुंबईत येत, तेव्हा तेव्हा ढसाळांना सोबत घेऊन फिरत. ढसाळांकडून त्यांनी कामाठीपुऱ्यापासून अनेक गोष्टी समजावून घेतल्या, पण त्याविषयी दूषित नजरेनं लिहिलं. ढसाळांचा त्यांच्याबरोबरचा अनुभव काही चांगला नाही. ढसाळ त्यांना ‘त्रिनिदादचा ब्राह्मण’ म्हणत.

दिलीप चित्रे यांनी गौरी देशपांडे यांच्या घरासमोर ‘साहित्य सहवासा’त धरणं आंदोलन केलं होतं. त्यात ढसाळ सहभागी झाले होते. नंतर एकदा चित्रे यांनी ‘साहित्य सहवासा’तील दडपशाहीविरुद्ध आंदोलन केलं, तेव्हा ढसाळ यांनी चार-पाच लॉऱ्या भरून पँथर कार्यकर्ते आणि भाई संगारेसह पाठिंबा दिला होता.

लेखन

डिसेंबर १९८०मध्ये ढसाळ आजारी पडले. जानेवारी १९८१मध्ये त्यांना ‘मायस्थेनिया ग्रेविस’ हा आजार असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर गेली ३०-३२ वर्षे ते या आजाराशी लढत होते. पण या काळातही त्यांनी तेवढ्याच जोमानं कवितालेखनही केलं.

ढसाळ यांचे आतापर्यंत ‘गोलपिठा’, ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले’, ‘आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र :  प्रियदर्शिनी’, ‘तुही यत्ता कंची तुही यत्ता’, ‘खेळ’, ‘गांडू बगिचा’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे’ आणि ‘निर्वाणा अगोदरची पीडा’ असे नऊ स्वतंत्र कवितासंग्रह; ‘तुझे बोट धरूनी चाललो आहे मी’, ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ आणि ‘चिंध्यांची देवी आणि इतर कविता’ असे तीन निवडक कवितांचे संग्रह मिळून एकंदर बारा संग्रह प्रकाशित झाले आहे. ‘हाडकी हाडवळा’ आणि ‘निगेटिव्ह स्पेस’ दोन कादंबऱ्या आणि ‘आंधळे शतक’, ‘आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट’, ‘सर्व काही समष्टीसाठी’ – भाग १ व २, ‘बुद्ध धर्म आणि शेष प्रश्न’ आणि ‘दलित पँथर – एक संघर्ष’ हे पाच लेखसंग्रहही त्यांच्या नावावर आहेत.

ढसाळांचा स्वतंत्र म्हणावा असा शेवटचा संग्रह म्हणजे ‘निर्वाणा अगोदरची पीडा’. या संग्रहातील ढसाळांची कविता ही विद्रोहाची नसून ती समष्टीच्या सनातन दु:खाविषयी बोलणारी आहे. व्यक्तिगत व सामाजिक विद्रोहापासून समष्टीच्या दु:खापर्यंत झालेला ढसाळ यांच्या कवितेचा प्रवास या संग्रहातील कवितांमध्ये दिसतो. त्याचबरोबर ‘चिंध्यांची देवी आणि इतर कविता’ या निवडक संग्रहातली कविताही ढसाळांच्या रूढ प्रतिमेपेक्षा वेगळी आहे. या संग्रहात त्यांच्या ‘गोलपिठा ते निर्वाणा अगोदरची पीडा’ या नऊ संग्रहातील स्त्रीविषयक कवितांचा समावेश आहे. या कवितांची जातकुळी वेगळी आहे, त्यातील संवेदनशीलता वेगळी आहे. अशी संवेदनशीलता केवळ दलित असण्यातून येत नाही, तर अनुभवांच्या, विचारांच्या ‘घडले’पणातून येते, आत्मिक, भावनिक, वैचारिक संघर्षातून येते. एरवी एखाद्या धारदार शस्त्रासारखी कापत जाणारी ढसाळांची कविता प्रसंगी किती मृदू, मुलायम, कारुण्याने भरलेली आहे, हे हा संग्रह वाचताना जाणवतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

‘आज दिनांक’मध्ये ‘माहौल’ नावानं त्यांनी सदर लिहिलं होतं. त्यातल्या जहाल, रोखठोक आणि आगपाखड करणाऱ्या भाषेमुळे ते चांगलंच गाजलं. त्याचंच पुढे ‘आंधळे शतक’ हे पुस्तक आलं. ‘सामना’ या दैनिकात त्यांनी प्रदीर्घ काळ ‘सर्व काही समष्टीसाठी’ हे सदर लिहिलं. त्यातील निवडक लेख नंतर दोन भागांत पुस्तकरूपानं प्रकाशित झाले.

ढसाळांनी ‘सत्यता’ या साप्ताहिकाचंही काही काळ संपादन केलं. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्रजी तसेच अन्य भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या कवितांच्या इंग्रजी अनुवादाला २००७चा ब्रिटिश कौन्सिलचा पुरस्कार मिळाला आहे.

इतर

ढसाळांचा ‘तृष्णा’ या नावानं गाण्याचा अल्बमही येणार होता. त्यातली गाणी शंकर महादेवनसारख्या नामवंतांनी गायलीत. या अल्बमचं रेकॉर्डिगही झालंय, पण अजून तो काही आलेला नाही. त्याच्या रेकॉर्डिगच्या सी. डी. ढसाळांच्या घरी धूळ खात पडल्यात.

ब्रेख्त हा नाटककार म्हणत असे, ‘फॅसिस्ट कवी-लेखकांना पहिले ठार मारतात, पण आता काळ बदललाय, फॅसिस्टही बदललेत. आता ते कवी-लेखकांना जिवे मारत नाहीत. अनुल्लेखानं, बहिष्कृत करून मारतात.’ एके काळी हा प्रयोग या मनोवृत्तीच्या लोकांनी भाऊ पाध्ये यांच्यावर केला होता. त्यानंतर तो ढसाळ यांच्यावर केला गेला, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ढसाळांची कविता भारतभर आणि जगातही अनेक ठिकाणी पोचली, वाखाणली गेली. ढसाळ सगळ्यांना पुरून उरले!

शेवटच्या काळात ढसाळ अंधेरी-मालाड लिंक रोडवर ‘मोगल दरबार’ नावाचं छोटंसं हॉटेल चालवत होते. आजच्या मराठी समाजात कवी-लेखकांना सुखा-समाधानानं जगणं महाकठीण. ढसाळांनीही त्याचा अनुभव घेतला. पण या समाजावर बहिष्कार टाकण्याएवढय़ा टोकाला जाण्याइतपत ते कधी कडवट झाले नाहीत. त्यांच्या राजकीय भूमिका बदलल्या, उदरनिर्वाहासाठी त्यांना काहीबाही उद्योग करावे लागले, पण त्यांनी कधीही लेखनाकडे व्यावसायिक वृत्तीनं पाहिलं नाही. स्वत:ला ते प्रज्ञावंत-निष्ठावंत लेखक-कवीच मानत. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय-सामाजिक कार्यकर्ता वजा केला, तर उरतो तो फक्त लेखक-कवीच. त्यांच्या राजकीय-सामाजिक भूमिका काळाच्या ओघात विसरल्या जाऊ शकतात किंवा त्यावर वादही घालता येऊ शकतात, पण त्यांच्या कवितेबाबत सहसा कुणाचंच दुमत झालेलं नाही… ती कायम ‘अस्सल’च राहिली, राहील…

साहित्य अकादमी या भारतीय साहित्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय संस्थेनं आपल्या सुवर्णमहोत्सवानिमित्त भारतभरातल्या साहित्यिकांमधून नामदेव ढसाळ यांची ‘सहस्त्रकातला लेखक’ म्हणून निवड केली. ढसाळांना मराठीतला नोबेल पुरस्काराच्या तोडीचा लेखक-कवी मानलं जातं. त्यांच्या मोजक्याच कवितांचा इंग्रजीत अनुवाद झाला असला, तरी जगभरातल्या नामवंत साहित्यिकांना नामदेव ढसाळ त्यांच्या हलवून टाकणाऱ्या कवितांमुळे माहीत आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Vishnu Date

Fri , 24 February 2023

एक बहुआयामी व्यक्तिमत्व नामदेव ढसाळ ! राजकारण, साहित्य, उद्योग, सर्वच क्षेत्रांत त्यांचा वावर!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा