केशवराव धोंडगे : ‘मन्याड’चा थकलेला वाघ!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण बर्दापूरकर   
  • महात्मा गांधी मिशन रुग्णालयात केशवराव धोंडगे, सोबत त्यांच्या पत्नी सौ. प्रभावती
  • Sat , 01 October 2022
  • पडघम कोमविप केशवराव धाेंडगे Kesharao Dhondge शेकाप Shekap शरद पवार Sharad Pawar

जाणीव-नेणीव आणि स्मरण-विस्मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या वयोवृद्ध केशवराव धोंडगे यांची नुकतीच भेट झाली. महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारा अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणाऱ्या केशवरावांचं वय १०५ आहे; दस्तुरुखुद्द ते आणि त्यांच्या कुटुंबियांचा दावा आहे. मात्र, विधिमंडळाच्या सदस्य परिचय पुस्तिकेत त्यांची जन्मतारीख २५ जुलै १९२२ असल्याची नोंद आहे. वयाचा वाद सोडून देऊ, पण आंध्र प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातून आलेल्या केशवरावांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं, यात शंका नाही.

केशवरावांचं व्यक्तिमत्त्व अस्सल मराठवाडी ग्रामीण ढंगातलं. ते राजकारणात आले, तेव्हा महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचा बोलबाला होता. याच पक्षाचे विधानसभा सदस्य म्हणून ते सहा वेळा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून एक वेळा विजयी झालेले आहेत. (आजच्या माध्यमांच्या भाषेत सांगायचं तर ते ‘विधानसभेचे आमदार’ होते. विधिमंडळाचा सदस्य म्हणजेच आमदार आणि संसदेचा सदस्य म्हणजे खासदार असतो, हे आपल्या माध्यमांना जणू ठाऊक नाही. जर प्रकृतीनं ठणठणीत असते, तर माध्यमांच्या या भाषक दारिद्रयाबद्दल केशवरावांनी चांगलंच बोचकारून काढलं असतं!) शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांची होती, तशीच केशवरावांचीही साम्यवाद, मार्क्सवाद एकाच वेळी श्रद्धा आहे. एकाच वेळी महात्मा गांधी आणि क्रांतीवर श्रद्धा असणारा पाहण्यात आलेले केशवराव हे माझ्या पत्रकारितेतले एकमेव राजकारणी आहेत!

मध्यम चण, किचिंत गव्हाळ वर्ण आणि डोक्यावरच्या केसांनी बंड केलेलं म्हणजे ते विस्कटलेले, धोतर आणि साधारण किचिंत ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता, कपाळावर टिळा, असं केशवरावांचं व्यक्तिमत्त्व तब्बल तीन दशकं विधानसभेत गाजलं. खणखणीत आवाज, बोलण्याची बोचरी शैली, त्या शैलीला मराठवाडी बोलीची ‘भरजरी’ किनार आणि जे काही बोलायचं ते रोखठोक, असं केशवरावांचं वागणं असायचं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिवाय कुणी अंगावर आलं की, शिंगावर घेतल्याशिवाय त्यांनी सोडलं नाही. किती बोचरं आणि किती रोखठोक असावं, तर त्याची एक आठवण सांगतो- केशवरावांचा वयाची शंभरी पार केल्याचा सत्कार (बहुधा नांदेडला) देशातले एक ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्या हस्ते झाला. तेव्हा ‘शरदरावांची बारामती म्हणजे भानामती’, ‘माणसं फोडण्यात पवार अत्यंत कुशल’, ‘नारदमुनीही पवारांची बरोबरी करू शकणार नाही’, ‘पवार म्हणजे बिनचिपळ्यांचे नारद’, अशा इरसाल शब्दांत केशवरावांनी ‘पवार-स्तुती’ केली होती आणि पवारांनीही केशवरावांच्या म्हणण्याला भरभरून दाद दिली होती!

आलेल्या माणसाचं स्वागत उजव्या हाताच्या पालथ्या मुठीवर अत्तर लावून आणि समोरचा जास्तच जवळचा असेल तर त्याच्या भालप्रदेशाचा मुका घेऊन करायचं, हेही केशवरावांचं एक वैशिष्ट्य अनेकांना ठाऊक असेल, अनेकांना नाही. अत्तर लावून आणि प्रेमभरे मुका घेऊन स्वागत झालेले पवार केशवरावांच्या या इरसालपणावर तसंही काय बोलणार होते म्हणा!

छगन भुजबळांची मफलर सध्या राजकारणात एक सिम्बॉल झाली आहे, पण आमदार असताना केशवरावही अनेकदा गळ्यात मफलर घालत आणि ती बहुधा प्लेन किंवा प्रिंटेड लाल रंगाची असे. हा रंग त्यांची क्रांतीवर असणारी श्रद्धा दर्शवत असे. थोडक्यात, महाराष्ट्राच्या राजकारणातील मफलर-संस्कृतीचे खरे जनक केशवराव धोंडगे आहेत.

पत्रकारितेतली माझी पिढी खरंच भाग्यवान होती. बहुसंख्य लोकप्रतिनिधी वर्तन आणि व्यवहारात साधे होते, धनसंचय करण्याची वृत्ती त्यांच्यात नव्हती आणि जनतेच्या प्रश्नाबद्दल त्यांना डोहखोल तळमळ होती. या तळमळीपोटी विधिमंडळात हे बहुसंख्य लोकप्रतिनिधी केवळ एक रुपयाची कपात सूचना मांडून सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढत, जनतेचे प्रश्न मांडत असत. शिवाय स्थगन प्रस्ताव आणि शून्य प्रहरातही सरकारची सालटी सोलण्याची एकही संधी तेव्हाचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी कधीच सोडत नसत. विधिमंडळाचं अधिवेशन पूर्ण मुदतभर आणि अनेकदा तर रात्री  उशिरापर्यंत चालत असे.

अधिवेशन सुरू होण्याआधीच ‘कामकाज चालू देणार नाही’, अशी सरकाराच्या सोयीची भूमिका घेणारे विरोधी पक्ष तेव्हा जन्मालाच यायचे होते. त्यामुळे सभागृहाचं कामकाज ‘उरकून’ टाकण्याची हिंमत सत्ताधारी पक्षाला मुळीच होत नसे, कारण विरोधी पक्षातील या बहुसंख्य सदस्यांचा नैतिक आणि सात्त्विक धाक सरकारला वाटत असे. ही मंडळी साधी होती म्हणजे किती साधी होती, तर ते चक्क एसटी महामंडळाच्या साध्या बसनं सर्वसामान्य माणसांसोबत प्रवास करत. (तशाही तेव्हा वातानुकूलित बसेस आणि कार नव्हत्याच म्हणा!) केशवराव ‘त्या’ जातकुळीचे लोकप्रतिनिधी म्हणून कायमच वावरले.

या पार्श्वभूमीवर विद्यमान बहुसंख्य लोकप्रतिनिधी एकतर भोंगे वाजवतात, नाही तर ‘हनुमानचालीसा’ म्हणतात, नाही तर सत्तालोभासाठी मुंबई ते सुरत-गुहाहाटी-गोवा-मुंबई असा प्रवास करताना दिसतात. अशा वेळी केशवराव आणि त्यांच्या पिढीच्या लोकप्रतिनिधींमधल्या तळमळ आणि साधेपणाला  सलाम केल्याशिवाय पर्यायच उतरत नाही...

या व्यतिरिक्त केशवरावांचा वाचन-व्यासंगही भरपूर होता. ते एका साप्ताहिकाचं प्रकाशनही करत. ‘गुराखी साहित्य संमेलना’सारखी एक वेगळी वाट त्यांची चोखाळली. वृत्तपत्र आणि ग्रंथवाचनामुळे केशवरावांचं भाषण म्हणजे संदर्भाचा मसाला असे. खणखणीत आवाजात, चुरुचुरुपणे ते बोलत आणि प्रतिस्पर्ध्यांचे वाभाडे काढत. चौफेर वाचन, जीभेला धार आणि कष्टकरी तसंच तळागाळातल्या जनतेशी जोडलेली नाळ, या मिलाफातून प्रसिद्धी मिळवण्याची विलक्षण हातोटीही केशवरावांनी प्राप्त केलेली होती. बोलण्याच्या या असोशीतून वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून केशवराव स्वत:ला अनेकदा आवरू शकले नाहीत.

महात्मा गांधी मिशन रुग्णालयात त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली. डिस्चार्ज मिळण्याआधी त्यांना भेटायला गेलो. रुग्णशय्येवर पडलेल्या केशवरावांचा आवाज याही वयात तेवढाच खणखणीत आहे. या वयात ही शस्त्रक्रिया जोखमीची होती, पण ते आव्हान महात्मा गांधी मिशनमधील डॉक्टरांनी यशस्वीपणे पेललं. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारली आणि केशवरावांनी त्यांच्या सवयीला साजेसं बंड, गावी जाण्यासाठी पुकारलं. बारा तास ते चक्क मौनात गेले. आरोग्यविषयक सर्व निकष योग्य, पण केशवराव मात्र मौनात. अखेर रात्री उशिरा मौनभंग करून गावी जाण्याची आस त्यांनी व्यक्त केली. भाषेबद्दल केशवराव याही वयात किती आग्रही आहेत, तर डिस्चार्जपूर्वी उपचारांबद्दल महात्मा गांधी मिशनच्या कमलकिशोर कदम, अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्याप्रती त्यांनी ऋण व्यक्त करताना ‘आभार’ हा शब्द त्यासाठी कसा योग्य नाही, हे आवर्जून सांगितलं .

दोन-एक महिन्यापूर्वी आजारी होईपर्यंत ‘म्हातारा न तुका’ या बाण्याला स्मरून केशवराव जगत होते. दूध आणि रस यावर ते ठणठणीत असत. श्रवणवशक्ती क्षीण झालेली आणि स्मरणशक्ती विस्मरणाशी खेळत असलेली, तरी सकाळी वृत्तपत्रांचं नियमित वाचन, मग त्यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या गावातील संस्थांचा फेरफटका, लोकांच्या गाठीभेटी असा त्यांचा दिनक्रम राहिला. या वयात स्मरण-विस्मरणाचा ऊन-सावलीचा खेळ अपरिहार्यच असतो, पण काही नावं मेंदूत किती पक्की रोवलेली असतात, याचा अनुभवही आमच्या या भेटीत आला. माझ्यासोबत प्राचार्या  डॉ. रेखा शेळके आणि प्रा. जयदेव डोळे होते. जयदेवचं ‘डोळे’ हे आडनाव ऐकताच केशवरावांच्या डोळ्यात एकदम चमक आली आणि ते ना.य. डोळे समजून जयदेवशी बोलू लागले. ना.य. डोळे म्हणजे तळमळीचा शिक्षक, मोठा माणूस, क्रांतिकारक, महापुरुष असं  बरंच काही केशवराव म्हणाले. बाय द वे, प्रा. जयदेव डोळे हा ना.य. डोळे यांचा पुत्र आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘सुपरकॉप’ म्हणून ओळखले जाणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जे. एफ. रिबेरो यांच्या ‘बुलेट फॉर बुलेट’ या पुस्तकात केशवराव धोंगडे यांचा उल्लेख असल्याचं आठवतं. रिबेरो हे १९६९ साली नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते, तेव्हाची ती आठवण आहे. त्या वेळी मन्याड खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी केशवराव यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. ते आंदोलन कसं आटोक्यात आणावं, असा प्रश्न सरकारला पडल्याचं रिबेरो यांनी नमूद केलं आहे. ते आंदोलन अखेर यशस्वी ठरलं. तेव्हापासून केशवरावांना ‘मन्याड खोऱ्याचा वाघ’ म्हणूनही ओळखलं जात असे. तेव्हा केशवराव आमदार होते. एखादा आमदार आपल्या मतदारसंघातील जनतेच्या जगण्याबद्दल किती संवेदनशील असतो, याचं नेमकं उदाहरण म्हणजे ते आंदोलन होतं.

त्यांचा मुलगा पुरुषोत्तम यांनी सध्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं, हा माझा प्रश्न मोठ्ठ्या आवाजात विचारला आणि केशवरावांनी तत्परतेनं साभिनय उत्तर दिलं. ‘राजकारणाबद्दल बोलण्यासारखं आता काहीच नाही. बोलणं बंदच करायला पाहिजे. उत्तर एकच- तोंडावर हात आणि कानावरही हात, हेच आजच्या राजकारणावरचं उत्तर आहे’, असं केशवराव म्हणाले. अन्यही काही विषयावर ते बोलले, पण त्यात संगती नव्हती शिवाय काही वेळ बोलल्यामुळे त्यांना थकवा जाणवू लागला असल्याचं जाणवलं आणि आम्ही रुग्णालयाच्या त्या  खोलीतून बाहेर पडलो.

एकूण काय तर, मन्याड खोऱ्यातील एकेकाळचा वाघ आता वृद्धत्वामुळे थकला आहे.

विद्यमान राजकारणात असे वाघ आहेत कुठे?

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......