शांता गोखलेकृत मराठी कादंबरीचा फसवा आढावा हा साहित्यातल्या अदृश्य ‘शीतयुद्धा’चाच परिपाक आहे…
पडघम - साहित्यिक
राकेश वानखेडे
  • दै. ‘लोकसत्ता’च्या रविवारच्या पुरवणीमधील शांता गोखले यांच्या ‘श्रेष्ठतम कादंबरीची प्रतीक्षाच’ या लेखाचे कात्रण
  • Mon , 12 September 2022
  • पडघम साहित्यिक शांता गोखले Shanta Gokhale मराठी कादंबरी Marathi Novel वि. का. राजवाडे V. K. Rajwade भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade श्याम मनोहर Shyam Manohar

दै. ‘लोकसत्ता’च्या रविवारच्या पुरवणीमधील - ‘लोकरंग’, २८ ऑगस्ट २०२२ - शांता गोखले यांचा ‘श्रेष्ठतम कादंबरीची प्रतीक्षाच’ हा लेख वाचला. सदर लेख मराठी साहित्यातल्या गटबाजी आणि कंपूशाहीचा नमुना आहे. गेली अनेक वर्षं होत आलेल्या या आरोपात सत्यांश आहे, हे सिद्ध करणारादेखील आहे. आपल्या जाणिवांचा सांस्कृतिक अहंकार सत्याचा विपर्यास करणारा असतोच, पण वर्तमानपत्राची जागा वाया घालून वाचकांची निराशा कशी करावी, हा धडा देणारासुद्धा हा लेख आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, आपल्या तुटपुंज्या वाचनाची कबुली गोखले यांनी स्वतःच या लेखात दिली आहे.

या लेखाला दोन लेखांचा आधार आहे. पहिला, वि.का. राजवाडे यांचा १९५०पर्यंतच्या कादंबरीचा आढावा घेणारा निबंध व दुसरा म्हणजे नेमाडे यांनी १९५० ते ७५ या कालखंडाचा चिकित्सक मूल्यमापन (त्यांच्या विशिष्ट सिद्धान्तावर आधारित) करणारा लेख. यालाच दुसऱ्या शब्दात ‘अवास्तव कादंबरी’ आणि ‘वास्तव कादंबरी’ असे किंवा सरळ सोप्या शब्दांत ‘ब्राह्मणी कादंबरी’ आणि ‘अब्राह्मणी कादंबरी’ असेही म्हणता करता येईल. गोखले यांना बहुधा मराठी साहित्य व्यवहाराच्या केंद्राशी कलावादी - ब्राह्मणी - अवास्तव कादंबरी पुन्हा आणायची आहे. शैलीची कलात्मकताच कादंबरीचं श्रेष्ठत्व वाढवते, असं रंजकतेची कास धरणाऱ्यांच्या अनुषंगानं गोखले सुचवून जातात, तेव्हा त्यांचा हेतू लपून राहत नाही.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठीत कादंबरीतलं शीतयुद्ध काय आहे? गेली पन्नास वर्षं डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या प्रभावाला शह देण्यासाठी काही समीक्षक, पत्रकार, प्रकाशक हे श्याम मनोहर यांना कुबड्या देऊन उभे करू पाहतात. गेली अनेक वर्षं चाललेला हा आचरट प्रयत्न फसला आहे, हे सांगण्यासाठी गोखले यांच्या या लेखाची उपयोजना असावी असं वाटतं.

दुसऱ्या बाजूला श्रेष्ठतम कादंबरीची आजही प्रतीक्षाच आहे, असं म्हणून गोखले यांनी नेमाडे यांनादेखील पुसून टाकलं आहे. म्हणजे हा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचाही प्रकार दिसतो. अर्थात तो गरजेचा आणि आवश्यकदेखील आहे. मात्र ते करत असताना फुले-शाहू-आंबेडकर हा महाराष्ट्राचं सेंद्रियत्व असणारा विचारव्यूह विचारकेंद्राभोवती गोखले यांनी आणला काय? परिवर्तनवादी, समतावादी हा प्रवाह सतत दुर्लक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि या मोठ्या प्रवाहास अनुल्लेखानं मारण्याचाही. गोखले यांनीही तेच केलं आहे. आणि यातच या लेखाचा फसवेपणा दडला आहे. गोखले वाचकांना चकवा देण्यासाठी शब्दबंबाळ, अनाठायी आणि बी.ए., एम.ए.च्या विद्यार्थ्यानं घ्यावा तसा अर्धवट माहितीच्या आधारे आढावा घेतात.

मराठी साहित्यातल्या ‘त्या’ तथाकथित शीतयुद्धात तटस्थ असलेली मात्र नेटानं काम करणारी तिसरी बाजू वाचकांपुढे कधी येणार, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गोखले यांच्या अर्धवट माहितीमुळे अनुवादित कादंबरीच्या यादीतही गफलती झाल्या आहेत. अन्यथा त्यांच्या यादीत शरणकुमार लिंबाळे यांचं नाव सर्वांत आधी दिसलं असतं. कारण लिंबाळे यांची कोणतीही कादंबरी मराठीत प्रकाशित होताच, चार अन्य भारतीय भाषांत अनुवाद होते. अशा प्रकारे तत्परतेने अनुवादित होणारा हा मराठीतला आजचा आणि आजवरचा एकमेव लेखक आहे. पण मराठी साहित्यविश्व लिंबाळे यांना किती दिवस अनुल्लेखानं मारत राहणार, हा खरा मुद्दा आहे.

गोखले यांच्या परिवर्तनवादी कादंबरीच्या आढाव्यात बाबुराव बागुल, बा.स. हाटे यांचा उल्लेख नाही. मार्क्सवादी कादंबरीत शरच्चंद्र मुक्तीबोध यांच्या कादंबरीत्रयीचा उल्लेख नाही. फडके-खांडेकर यांच्या रंजनप्रधान कादंबरीच्या आधी फक्त ह.ना आपटे, ना.ह. आपटे लिहीत नव्हते, तर २५पेक्षा जास्त कादंबऱ्या लिहिणारे मामा वरेरकरदेखील होते. ते सुधारणावादी काँग्रेसी दृष्टीकोनाचा (?) प्रचार-प्रसार करत. त्यांना ‘प्रचारकी’ म्हणून प्र. के. अत्रे हिणवत असले तरी मराठी कादंबरी-वाचकाच्या पायाभरणीच्या काळात साधी साधी आशय सूत्रं असणाऱ्या, वरेरकरांसारख्या अनेक कादंबरीकारांच्या कादंबऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.

गोखले यांच्या लेखात मराठवाड्यातले बाबू बिरादर कुठे आहेत? याशिवाय अर्नाळकर- काकोडकर- वि.आ. बुवा- प्रभाकर बागुल- आनंद यादव- बाबा कदम यांना आपण अजून किती दिवस गिनणार नाही? या कादंबरीकारांनी किरण नगरकर यांच्यापेक्षा वाचकांना प्रभावित करणाऱ्या, वाचकाश्रय असणाऱ्या चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या, पण ‘एलिट क्लास’च्या लेखनाचंच कौतुक पिढ्यानपिढ्या सुरू आहे.

गोखले यांनी उल्लेखलेल्या अपवाद वगळता सर्वच कादंबऱ्या या पॉप्युलर, मौज, (पुन्हा इथं सोयीस्करपणे विलास सारंग यांना वगळून) देशमुख अँड कंपनी, कॉन्टिनेन्टल, राजहंस, ग्रंथाली या भोवती फिरणाऱ्या आहेत. या प्रकाशकांच्या पलीकडे मराठीत खूप काही होत आहे. श्रमव्यवस्थेतून आलेल्या लोकांच्या कादंबऱ्यांचं योगदानाचं काय? गोखले यांचा ‘सोयीस्कर दृष्टीकोन’ तिथपर्यंत पोहोचू शकत नसावा. शिवाय त्यांच्या कादंबरी-वाचनाचीही बरीच बोंब दिसते.

त्यांच्या लेखात आलेलं मराठी कादंबरी-विश्व मृत झालेलं आहे. ‘सत्यकथा’ विरुद्ध ‘लिटिल मॅगझिन’वाले असं कालबाह्य शीतयुद्ध किती दिवस रंगवून सांगणार? पुढच्या दारावर दगड मारून मागच्या दारानं प्रवेश करून तिथंच लब्धप्रतिष्ठा पावून विसावले आहेत. ‘लिटिल मॅगझिन’वाल्यांची बंडखोरी परिवर्तनासाठी नसून गृहप्रवेशासाठी होती. तो प्रवेश सुखनैव झाल्यानंतर दोन्ही एकाच पदरात  एकजिनसीपणाच्या घट्ट गाठीनं बांधले गेले आहेत. त्यामुळे मराठी विचारविश्व आणि समूहाच्या दृष्टीनं हे दोन्ही प्रवाह कालबाह्य झालेले आहेत.

गोखले यांचा बाराशे ते पंधराशे शब्दांचा लेख तीन भागांत विभागलेला दिसतो. सुरुवातीचे ५०० शब्द कादंबरीची उत्पत्ती (जी आजकाल कुठेही वाचायला मिळू शकते.), पुढचे ५०० शब्द मराठी कादंबरीचा आढावा (जो तोच तोच असतो - ययाती, स्वामी, कोसला इत्यादी.) आणि तिसरा, वाचलेल्या कादंबऱ्या.

चांगल्या लेखामध्ये लेखकाची विचक्षण दृष्टी वा दृष्टीकोन, निरीक्षणं असावी लागतात. सार्वकालिक विधान करावं लागतं. तसं काहीही या लेखात नाही. मराठी समूहमनाला, विचारविश्वाला मराठी कादंबऱ्यांनी वळण दिलं का? किती प्रमाणात वाचकांचं, मराठी समूहाचा सामाजिक-आर्थिक-राजकीय मतप्रवाह या कादंबऱ्यांनी तयार केला? एखादं सर्वमान्य असं कथन (नॅरेशन) प्रस्थापित केलं का- जे पाच-पन्नास वर्षं टिकलं? यांबाबत गोखले यांचा लेख पूर्णपणे मौन बाळगतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘कादंबरी’ या साहित्य प्रकारची ताकद समजून न घेता असे आढावे (जे मराठी साहित्यिकांचे नसून मराठी ‘सारस्वतां’चेच असतात.) घेऊन काही साधत नाही. ब्राह्मणी कादंबरीला खोडून मराठी साहित्यविश्वाच्या केंद्राभोवती गोखले कोणाला आणतात, या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक आहे. निव्वळ ‘एलिटीझम’ जपण्यात आयुष्य व्यतीत करणारे गोखले यांच्यासारखे लोक कधी सामग्ऱ्याने विचार करणार?

मराठी साहित्यातल्या या शीतयुद्धाबाबत फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे स्कॉलर, अकॅडेमिशियन पूर्णतः अनभिज्ञ आहेत. त्यांनी प्रतिवाद करण्याची आपली ताकद पूर्ण गमावली असल्यानं असे फसवे आढावे यापुढेही येतच राहणार...

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा