राजद्रोहाचं राजकारण!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा
  • Sat , 07 May 2022
  • पडघम राज्यकारण नवनीत राणा Navneet Rana रवी राणा Ravi Rana राजद्रोह Sedition

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचं समर्थन करता येणार नाही, असं गेल्या स्तंभात जे म्हटलं होतं, तसंच निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे; हे निरीक्षण निकालात उमटतं का, त्यावर लक्ष ठेवायला हवं. देशातील ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनी दुसऱ्या एका संदर्भात या कायद्याबाबत असंच मतप्रदर्शन केलं आहे.

माध्यमांनी या संदर्भात (नेहमीप्रमाणं) अतिउत्साह दाखवत राजद्रोहाचा गुन्हा दाखल होणारं लोकमान्य टिळक यांच्यानंतरच राणा दाम्पत्य पहिलंच असल्याचा निर्वाळा देणं, ही शुद्ध बौद्धिक दिवाळखोरी आहे. समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्यांकडून अशी दिवाळखोरी म्हणा की, उतावीळपणा होणं, यात आश्चर्य नाही, पण मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल माध्यमांकडूनही असंच घडावं, या माध्यमांत आता जाणते लोक उरलेले नाहीत, तसंच ‘अभ्यासोनि प्रकटावे’ ही वृत्ती लोप पावली आहे, असा याचा अर्थ आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

कन्हैयाकुमार असो की, हार्दिक पटेल यांच्या विरोधात भाजपच्या सरकारांनी राजद्रोहाचं हत्यार वापरल्यानं भरपूर टीका झाली आहे. याचा अर्थ दीर्घकाळ सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाची सरकारं याबाबतीत सहिष्णू, सौजन्यशील, निष्पक्ष होती, असं समजण्याचं काहीही कारण नाही. गृहखात्याच्या अखत्यारीतील सीबीआय आणि गुप्तचर यंत्रणांसकट सर्वच दलांना कायम सत्ताधाऱ्यांच्या बोटावर नाचवण्याची सवय प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसनं कशी लावली, हे या देशानं अनुभवलेलं आहे. (पक्षी- ‘काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ किंवा ‘काँग्रेसच्या पिंजऱ्यातील पोपट’ इत्यादी!)

खरं तर, टीकेचा म्हणा की, सरकार विरोधाचा आवाज काहीही करून बंद करणं, हे आपल्या देशातील सर्वपक्षीय सरकारांचं व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. उदारमतवादी आणि सच्चे लोकशाहीवादी म्हणून आजही आदरणीय असलेले पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना बिहारमधल्या ‘सर्चलाईट’ या दैनिकाविरुद्ध १९५९ साली हक्कभंग मांडला गेला आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कमोर्तब केलेलं होतं (संदर्भ- ऑल इंडिया रिपोर्टर १९५९; सर्वोच्च न्यायालय-३९५), हे तर आज अनेकांना आठवतही नसेल.

केवळ महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर राजद्रोहाचा लोकमान्य टिळक यांच्यानंतरचा पहिला गुन्हा ज्येष्ठ पत्रकार, लोकप्रिय लेखक शिरीष कणेकर आणि ते तेव्हा ज्या वृत्तपत्रात काम करत होते, त्या ‘इंडियन एक्सप्रेस’विरुद्ध ‘द रेप मोस्ट फाऊल’ या बातमीबद्दल दाखल झाला होता. महाराष्ट्र पोलिसांनी या हत्याराचा वापर पत्रकारांविरुद्ध करण्याचा तो पहिला प्रसंग होता. नंतर औरंगाबादचे एक उर्दू दैनिक, ‘लोकसत्ता’ची नागपूर आवृत्ती आणि सोलापूरच्या एका पत्रकाराविरुद्धही हाच वरवंटा फिरवला गेलेला आहे, हे पत्रकारांना ठाऊक नसावे. आणि ठाऊक नसेल तर त्याची माहिती करून घ्यावी, असं कुणाला वाटलेलं नाही.  

माध्यमं हे तर या हत्याराचं कायमच आवडतं लक्ष्य ठरलेलं आहे. सरकार, प्रशासन आणि न्याययंत्रणा हे तीनही स्तंभ, माध्यमं या हत्याराच्या धाकाखाली कशी कायम वावरतील, याची कटाक्षानं काळजी घेत असतात. केवळ सरकारंच नाही तर प्रशासनही राजद्रोह केल्याच्या या हत्याराचा बेगुमान वापर करून माध्यमांची मुस्कटदाबी कसं करत असतं, याचा ‘फर्स्ट हॅन्ड’ अनुभव एक संपादक म्हणून मी घेतलेला आहे. पोलीस अधिकारी कशी दडपशाही करतात, याचाही तो अनुभव एक मासलेवाईक नमुना आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मी तेव्हा नागपूरला संपादक होतो. एक दिवस सायंकाळी आमच्या मुख्य वार्ताहराचा फोन आला, तेव्हा मी प्रवासात होतो. नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त यांच्यात कसा बेबनाव आहे आणि त्यामुळे पोलिसांची कशी ससेहोलपट होतेय, याची बातमी त्यानं सांगितली. त्या दोघांतील परस्परांवर कुरघोडी करण्याचे मुख्य वार्ताहरानं सांगितलेले काही प्रसंग अर्थातच बातमीचं समर्थन करणारे होते. ती बातमी अतिशय काळजीपूर्वक करावी, कारण तेव्हा नागपूरचे पोलीस आयुक्त असलेले एस. पी. एस. यादव हे एक अतिशय ‘टफ’ अधिकारी आहेत, असं बजावून सांगितलं, शिवाय वृत्तसंपादकाला फोन करून त्याबाबत सूचना दिल्या.

चमचमीत लिहिलेली ही बातमी दुसऱ्या दिवशी प्रकाशित झाली. योगायोगाचा भाग म्हणजे सहआयुक्त दलबीर भारती हेही एक ‘यादव’च होते. दोन्ही आयपीएस अधिकारी यादव असल्यानं बातमीच्या शीर्षकात नागपूर पोलीस दलात ‘यादवी’ असा सूचक शब्दप्रयोग आला. ही बातमी प्रकाशित झाल्यावर खूप चर्चा झाली. अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी ती बातमी वस्तुस्थितीचं अचूक निदर्शन आहे, हे आवर्जून पण अर्थातच खाजगीत सांगितलं.

यादव यांची माझी फारशी ओळख नव्हती; अगदीच जुजबी दोन-तीन भेटी विमानात झालेल्या होत्या. त्या भेटी किमान चांगली ओळख होण्यासाठी पुरेशा नव्हत्या, पण त्यांचं ‘पोलिसिंग’ मी पाहत आलेलो होतो. औरंगाबादला असताना कॉलेज प्रवेशासाठी राजकारण्यांकडून घेतल्या जाणाऱ्या देणग्यांचा विषय त्यांनी मोठ्या धाडसानं उचलला होता. त्यामुळे त्यांच्याविषयी तेव्हा मी प्रशंसापर लिहिलंही होतं. या बातमीमुळे यादव अस्वस्थ झाले आहेत, ‘यादवी’ हा शब्द त्यांनी ‘बंड’ या अर्थानं घेतला आहे, हे आम्हाला कळलं नाही. या प्रकरणात फिल्डवर असणारा आमचा मुख्य वार्ताहर मात्र फारच गाफील निघाला.

आमच्याविरुद्ध राजद्रोहाचा खटला दाखल करण्याच्या सूचना यादव यांनी दिल्याचं पोलीस आयुक्तालयातील माझ्या हितचिंतकांनं एक दिवस अचानक कळवलं. मुंबईला लीगल सेलशी बोलल्यावर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात आलं आणि आम्ही हादरलोच, कारण गुन्हा अजामीनपात्र (नॉन बेलेबल) होता. ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांनाही बराच मन:स्ताप सहन करावा लागलेला आहे. म्हणजे टिळक आणि कणेकर यांच्यानंतर अस्मादिकच ही त्यातल्या त्यात सुखावणारी बाब होती!) त्यात आमचा प्रकाशक पक्का अमराठी; एकही मराठी शब्द न समजणारा... इतका ठार अडाणी. त्यामुळे त्याला समजावताना त्रेधा उडाली. अटकपूर्व जामीन घेण्यासाठी आमची बरीच धावपळ झाली.

बातमीच्या शीर्षकानं केलेला घोळ मराठी असलेल्या न्यायाधीशाच्या चट्कन लक्षात आला अन गालातल्या गालात हसत त्यांनी जामीन लगेच मंजूर केला. नंतर चौकशी अधिकाऱ्यानं अटकेची तलवार टांगती ठेवत, या प्रकरणात अध्यक्ष विवेक गोएंका आणि संपादक कुमार केतकर हेही ‘इन्व्हॉल्व’ असल्याचं वदवून घेण्याचा खूप प्रयत्न केला. वस्तुस्थिती तशी मुळीच नसल्यानं मी तो डाव यशस्वी होऊ दिला नाही.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

मग मी या संदर्भात तत्कालिन गृहमंत्री, मित्रवर्य आर. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला. ‘हा अधिकारी कुणाचंच ऐकत नाही’, अशी हतबलता आबांनी व्यक्त केली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि माझे दीर्घकालीन स्नेही विलासराव देशमुख यांनी, ‘जामेण मिळालाय ना, सध्या फेस करा. यादवची बदली झाली की, ‘सी समरी’ करायला सांगू’, अशा शब्दांत असहाय्यता व्यक्त केली. अखेर मी अरविंद इनामदार यांना मध्ये टाकलं. ‘प्रवीण इज नॉट नोन फॉर इररिस्पॉन्सीबल जर्नालिझम’ अशी ग्वाही त्यांनी दिल्यावर यादव जरा मवाळ झाले, पण मी पूर्वग्रहदूषित असल्याचं मत त्यांनी अनेक बातम्यांचा हवाला देत इनामदार यांच्याकडे व्यक्त केलं. मग सरळ यादव यांना भेटून मी त्यांच्या संदर्भात पूर्वग्रहदूषित कसा नाही, पूर्वी त्यांच्याविषयी कसं प्रशंसापर लिहिलंय, याची कात्रणं देऊन पटवून दिलं. अखेर ‘तुमच्या अटकेचा आग्रह धरणार नाही आणि केस लावून धरणार नाही’ असं यादव यांनी कबूल केलं.

नागपूरहून बदली झाल्यावर चार्ज सोडण्याआधी यादव यांनी फोन करून तो गुन्हा ‘सी समरी’ म्हणजे बंद करण्याचे आदेश दिले असल्याचं सांगितलं. नंतर एकदा चौकशी अधिकारी भेटले. खरं तर, ते माझ्या लेखनाचे चाहते होते, पण या प्रकरणात चौकशीच्या काळात बिलकूल ओळख न देता सतत दाबात घेण्याचा प्रयत्न करायचे, अटकेची धमकी द्यायचे. त्यांनी सांगितलं ‘तुमच्याशी काहीही बोलोत सीपीसाहेब, आम्हाला मात्र ते खडसावून सांगायचे, त्यांना चांगला धडा शिकवा, गजाआड टाकाच एकदा’. राजद्रोहाच्या हत्याराचा वापर करून करण्यात आलेली ही चक्क मनमानी होती आणि त्यापुढे मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री अगतिक होते!

नंतर एका दोस्त आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलं की, औरंगाबादला असताना एस. पी. एस. यादव यांनी याच कलमाखाली एका उर्दू दैनिकाच्या पत्रकाराला ‘बुक’ केलेलं होतं. अशी कलमं शोधून ती लावणं हा यादव यांचा छंदच आहे! हा खटला न्यायालयात टिकणार नाही, असा निर्वाळा आमचे वकील अनिल मार्डीकर देत. नंतर काही वर्षांनी दिल्लीच्या एका गरमागरम दुपारी जुन्या महाराष्ट्र सदनाच्या उपहारगृहात यादव एकटे जेवताना दिसले. त्याचं एकटेपण फारच केविलवाणं होतं, मग सामोरं जाऊन मी ओळख करून देत त्या प्रकरणाची आठवण त्यांना करून दिली, तेव्हा ते फारच ओशाळवाणं हंसले, पण ते असो.

२०१६च्या सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्रा आणि न्या. यु. यु. ललित यांनी ‘सरकारवर कितीही कडवट टीका केली तरी तो राजद्रोह होऊ शकत नाही’, असं स्पष्ट केलंय. कितीही कठोर टीकास्त्र सोडलं गेलं तरी ती सरकारची बदनामी ठरू शकत नाही, असंही या न्यायमूर्तीद्वयीने स्पष्ट केल्यानं या देशात अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक अजूनही आहेत हा दिलासा मिळाला. लेखन किंवा वक्तव्यानं हिंसाचार झाला किंवा उफाळला तरच राष्ट्रद्रोह होईल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला असल्यानं सत्तेच्या उन्मादात कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात यापुढे उभं करता येणार नाही, असं जे वाटत होतं त्याला राणा प्रकरणामुळे तडा गेला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

इंग्रजानी त्यांच्या सोयीसाठी हा कायदा त्या काळात लागू करून स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या भारतीयांची मुस्कटदाबी केलेली होती, भारतीयांना कायद्याच्या चिमटीत पकडून धाकाखाली ठेवलेलं होतं. देश स्वतंत्र झाल्यावर या कायद्यात केंद्र सरकारनं भारतीय लोकशाहीला अनुकूल अशा मोठ्या सुधारणा करणं अपेक्षित होतं, पण तसं उदारमतवादी पाऊल प्रदीर्घ काळ सत्ता भोगताना, ना काँग्रेसनं उचललं, ना तसं काही करण्याची इच्छा देशभक्तीचे ढोल पिटणाऱ्या विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या सरकारची आहे. कारण सत्ता राबवताना विरोधकांचे आवाज दाबून टाकण्यात या हत्याराचा वापर करण्याबद्दल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष दोन्ही पक्षात जणू राष्ट्रीय एकमत आहे; सत्ता बेगुमान राबवायची असेल तर राजद्रोहाचं हे हत्यार हातात असायलाच हवं, ही या दोन्ही पक्षांची अव्यक्त ठाम धारणा आहे. म्हणूनच आजवर अनेकदा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या संदर्भातील निवाडे आणि निर्वाळ्याकडे सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे.

खरं तर, समाज जाती-धर्मात विभागला जातोय, गाव-खेड्यात, पाडे-तांड्यांत विविध रंगाच्या झेंड्यानी गट-तट वाढवलेले आहेत, विद्वेषाचा विखार दाटून आलाय  आणि हे आव्हान राजद्रोहापेक्षा जास्त गंभीर आहे, पण त्याची तमा राज्यकर्त्यांना नाही. राजद्रोहाचंही राजकारण करण्यातच राज्यकर्त्यांना रस आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......