भय इथं पुन्हा दाटून आलंय...
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 30 April 2022
  • पडघम राज्यकारण भोंगे Loudspeaker हनुमान चालिसा Hanuman Chalisa उद्धव ठाकरे Uddhav Thackeray राज ठाकरे Raj Thackeray नवनीत राणा Navneet Rana

साधारण १९८६-८७ ते १९९६-९७ या सुमारे दहा वर्षांतलं देशातलं वातावरण आठवतं का? पंजाब, काश्मीर, आसाम, नागालँड, पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यांत अस्वस्थता होती; हिंसक कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यातच ‘हम मंदिर वहीं बनाऐंगे’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणांचा महापूर आलेला, ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’, असं आणि असं बरंच काही लिहिलेल्या टोप्या घातलेल्या लोकांनी तो महापूर देशभर आणलेला…

रामाच्या नावानं यात्रा, रथयात्रा, शीळा पूजन, आरत्या, महाआरत्या असं ते वातावरण होतं. ते तापवत ठेवून देशात हिंस्त्र धार्मिक द्वेषाची दरी निर्माण करण्यात आली. समाज ‘आपण’ विरुद्ध ‘ते’, असा विभागला गेला. बाबरी मशीद पाडल्यावर तर ‘अयोध्या तो सिर्फ झाँकी हैं, काशी-मथुरा बाकी हैं’ असा उन्माद देशात माजवला आणि पसरवलाही गेला. पुढे देशभरात बॉम्बस्फोटाच्या असंख्य घटना घडल्या. दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईला पोहोचले…

अशा किती घटना सांगायच्या? देशात त्या काळात भयाचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं होतं… त्याची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागली आहे. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

त्या सुमारे दहा वर्षांच्या काळात मी नागपूरला होतो; ‘लोकसत्ता’चा मुख्य वार्ताहर होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्यामुळे हे शहर तर भयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या परिवाराच्या हालचालींचं मुख्य केंद्र बनलेलं होतं. पत्रकारांना अविश्रांत काम करावं लागण्याचे ते दिवस होते.

‘महाराष्ट्र टाइम्स’चा धनंजय गोडबोले आणि मी वेगवेगळ्या ‘बिटविन द लाईन’ बातम्या, दुवे, धागेदोरे शोधण्यासाठी सतत धावपळीत असायचो. तेव्हा नुकतेच निर्वतलेले आणि ‘तरुण भारत’ या दैनिकाचे सेवानिवृत्त मुख्य संपादक दि. भा. उपाख्य मामासाहेब भुमरे भेट झाली की, सांगत- ‘काही तरी फार मोठं आणि महाभयंकर घडणार आहे’. पोलीस, गुप्तवार्ता विभागाचे अधिकारीही काय घडणार आहे, याच्या शोधात होते. त्यांच्याशीही अनेकदा होणाऱ्या गप्पांतून बरीच माहिती मिळत असे. पुढे धनंजय गोडबोलेनं त्या कटाची सविस्तर माहिती देणारी बातमीच प्रकाशित केली होती.

एक भयसूचक अस्वस्थता देशात पसरलेली होती. (‘भगवी माया’ अशी एक प्रतिमा कवीश्रेष्ठ ग्रेस यांच्या ‘भय इथले संपत नाही’ या कवितेत आहे, किती सूचक आहे ती प्रतिमा, नाही का?) त्यातूनच पुढे जे काही घडलं, ते आता आठवलं, तरी अंगावर शहारे येतात. तसंच म्हणजे, कविश्रेष्ठ ग्रेस यांचे शब्द बदलून सांगायचं  झालं, तर ‘भय इथं पुन्हा दाटून आलंय...’ असं वातावरण आता पुन्हा एकदा जाणवतं आहे. राष्ट्रवादाला लोकशाहीच्या नव्हे तर धर्मांध चौकटीत बंदिस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

........................................................

मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल या राज्यांत कोणत्या ना कोणत्या देवाच्या वा कोणाच्या तरी जयंतीच्या काळातच नेमका हिंसाचार उफाळून आलेला (आणलेला!) आहे. मध्य प्रदेश आणि दिल्लीतल्या जहांगीरपुरीत तर सत्ताधाऱ्यांनी निरपराध्यांवर चक्क पुन्हा-पुन्हा बुलडोझर घातले, आणि तेही न्यायालयाचा आदेश झुगारून. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशावर लादल्या गेलेल्या आणीबाणीच्या काळात दिल्लीत ज्या पद्धतीने वस्त्या-वस्त्यांवर अमानुषपणे बुलडोझर चालवले गेले, त्याची आठवण करून देणाऱ्या या घटना आहेत. कर्नाटकात हिजाबवरून वाद उफाळतो आणि तो पाहता पाहता राज्यव्यापी उद्रेकात परावर्तित होतो, हे काही एका रात्रीत घडू शकत नाही.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

इकडे तलवारी सापडल्या, तिकडे सापडल्या, अशा बातम्या दररोज वाचनात येताहेत. विशिष्ट धर्मीय व्यापाऱ्याकडूनच खरेदी करावी किंवा वसाहती-वसाहतीत कोणाकडे कोणत्या जाती-धर्माचा गडी-बाई काम करत आहे, याची माहिती मिळवण्याच्या अतिशय शांतपणे सुरू असलेल्या हालचाली वाटतात तितक्या साध्या नाही, तर तेही एक भयसूचनच आहे. त्यासाठी दीर्घ नियोजन लागतं आणि हे नियोजनकर्ते कोण-कोणत्या धर्मांध गटांचे आहेत, हे काही या देशाला ठाऊक नाहीत असं नाही.

दोन्ही बाजूंच्या धर्मांध गटांना उन्मादित होऊन हैदोस घालण्यासाठी नेमकी ज्या पद्धतीनं अनुकूलता निर्माण करायची असते, अगदी तश्शीच ही परिस्थिती आहे. हे इथे थांबणार नाही तर हा वणवा आणखी पेटत जाईल. ‘त्या’ दहा वर्षांतील घटनांचे आधार घेतले तर तशी भीती आता वाटू लागली आहे. समाजात फूट पाडून त्याआधारे वर्चस्व निर्माण करण्याची चटकच दोन्ही गटातील धर्मांधांना लागलेली आहे.

........................................................

महाराष्ट्रही या भयसूचनाला अपवाद नाही आणि ते सूचन चिरडून टाकण्यात राज्य सरकारला अपयश येत आहे किंवा सत्ताधारी पक्षच त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा जास्त प्रयत्न करत आहेत, हे चिंतनीय आहे. कोण खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा? हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवणारे ‘जाणते’ मात्र ‘हनुमान चालिसा’ प्रकरण घडलं, तेव्हा आपण नाही त्या गावचे, या आविर्भावात होते. राणा दाम्पत्याला अटकच करायची होती, तर प्रकाश वृत्तवाहिन्यांच्या माध्यमांतून दोन दिवस वातावरण तापत ठेवण्याची आणि शिवसैनिकांना घामाच्या धारा झेलत भर उन्हात बसवून ठेवण्याची गरजच काय होती, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलं नाही. ते देणारही नाहीत आणि कुणी पत्रकारांनीही त्यांना तसा प्रश्न विचारला नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

राणा दाम्पत्याच्या ‘हनुमान चालिसा’च्या प्रकरणात उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यासारखे नाही, तर पक्षप्रमुखासारखे वागले. या दाम्पत्याला अमरावतीच्या घरातून बाहेरच पडू दिलं नसतं आणि तिथेच अटक केली असती, तर चालिसातील हनुमानाच्या तणावाची शेपटी अमरावती ते मुंबई अशी पसरली नसती. मुख्यमंत्री काय किंवा गृहमंत्री काय किंवा राज्याचे पोलीस प्रमुख काय, राणा दाम्पत्याच्या घराभोवती पोलिसांचा नाही तर शिवसैनिकांचा पहारा बसवतात, याइतकी पोलिसी दिवाळखोरी या राज्यात यापूर्वी कधीच अनुभवायला मिळाली नव्हती. हे सरकार सोबतच पोलिसांचं अपयश आहे व ते मुळीच समर्थनीय नाही. राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचतं, हे पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग कुंभकर्णी झोपेत आहे, याचंच लक्षण आहे.

‘बाबरी मशीद पाडणारे माझे शिवसैनिक असतील, तर त्यांचा मला अभिमान आहे’ असं म्हणणारा पक्ष आज राणा दाम्पत्याला ‘हनुमान चालिसा’ आणि राज ठाकरे यांच्या मशिदीवरील ध्वनिक्षेपकाला (लाऊड स्पीकर – भोंगा या यंत्रणेचा एक भाग आहे) बंदीला विरोध करतो, हे तर आपले राजकीय पक्ष सत्तेसाठी भूमिका बदलण्यात किती निगरगट्ट झालेले आहेत, याचं लक्षण समाजायला हवं.

उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत आणि मवाळ प्रतिमेचे धनी आहेत (असं मीही एकेकळी म्हणत असे). एकाच प्रार्थनास्थळावरचा नाही, तर शांतताभंग करणाऱ्या, लोकांना आवाजाचा त्रास होणाऱ्या, राज्यातल्या प्रत्येक प्रार्थनास्थळावरच्या लाऊडस्पीकरचा आवाज नियंत्रणात आणला जाईल, अशी सर्वसमावेशक भूमिका घेण्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील पूर्ण अपयशी ठरले आहेत. त्यांनी जर राज्यातील सर्व प्रकारच्या ध्वनिक्षेपकाचा आवाज नियंत्रणात आणण्यासाठी निर्णायक पावलं उचलली असती, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचा पाठिंबा राज ठाकरे यांना नव्हे, तर उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांना मिळाला असता.

पण तसं झालं नाही आणि हा प्रश्न अधिकच चिघळत चालला आहे. त्याचा लाभ उठवणाऱ्या विरोधी पक्षांना दोष देता येणारच नाही. राज्यकर्त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा म्हणा की, गैरफायदा उचलणं हेच विरोधी पक्षाचं काम असतं. सत्ताधारी नेतृत्वाच्या कणखर नसण्याच्या वृत्तीमुळे ध्वनिक्षेपक (भोंगा) प्रकरणात राज ठाकरे नेते म्हणून आणि त्यांचा पक्ष ‘लार्जर दॅन लाईफ’ झाले असून प्रसिद्धीचा सगळा झोत त्यांच्याकडे वळला आहे.

आणखी एक स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे – राणा दाम्पत्यावर दाखल झालेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्याचं समर्थन करता येणार नाही. राजकारणातील कार्यकर्त्यांवर असे गुन्हे दाखल करणं ही दडपशाही आहे, ते हुकूमशाहीचं निदर्शन आहे. देशातील एक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्याबाबत सूचकपणे नाराजी व्यक्त केली आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. 

........................................................

मी अधार्मिक आहे, देव मानत नाही हे माहिती असूनही एक चिवट हिंदूरक्षक भेटायला आले. त्यांना मंदिरावर लावायच्या ध्वनिक्षेपकासाठी वर्गणी हवी होती. त्यांना म्हटलं, ‘सर्वच प्रार्थनास्थळांवरचे ध्वनिक्षेपक बंद करणारी चळवळ उभारणार असाल तर तुम्ही मागाल त्याच्या दुप्पट वर्गणी देतो.’

‘हिंदूंच्याच भोंग्यांना तुमचा विरोध आहे का?’ असा प्रश्न त्यांनी चिवटपणा न सोडता विचारला.

हा मिळालेला फुलटॉसच होता. मी उत्तर दिलं, ‘सर्वच प्रकारच्या मोठ्ठ्या आवाजाचा मला त्रास होतो.  त्यातही दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेताना हिंदी चित्रपटांच्या गाण्याच्या चालीवर बेसूर भजनं म्हणणाऱ्या ध्वनिक्षेपकावरून येणाऱ्या आवाजाचा तर खूपच त्रास होतो, म्हणून तर ध्वनिक्षेपकांना आणि कर्णकर्कश्श हॉर्न वाजवणाऱ्या सर्व वाहनांना माझा सरसकट विरोध आहे!’

‘अहो, ‘हिंदू खतरें में’ आहेत हे तुम्हाला समजत कसं नाही?’ त्यांनी त्रागायुक्त स्वरात विचारलं.

‘या देशात बहुसंख्य असणारे ‘खतरें में’ येतील की अल्पसंख्य?’ असा प्रतिप्रश्न मी त्यांना विचारला.

त्यांनी खवचटपणे विचारलं, ‘तुम्ही नक्की हिंदूच आहात नं?’

मी उत्तरलो, ‘नक्की, मी हिंदूच  आहे आणि माझ्या धर्म किंवा जातीची मला लाज नाही आणि माज तर मुळीच नाही.’

ते करवदले, ‘विचित्रय ब्वा तुमचं हिंदुत्व.’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मी म्हणालो, ‘त्यात विचित्रबिचित्र काहीच नाही. माझं हिंदुत्व समतावादी आहे, लोकशाहीवादी आहे, अन्य धर्माचा आदर करणारं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणताही धार्मिक किंवा जातीय रंग नसणारं निर्भेसळ मानवतावादी आहे.’

‘तुमच्यासारख्यांशी वाद घालणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे’, अशी बडबड करत आणि मला ‘दगडा’ची उपमा बहाल करत त्या हिंदुत्ववाद्यांनी काढता पाय घेतला.

‘अशा’ हिंदुत्ववाद्यांचं पीक सध्या फोफावलं आहे. त्यामुळे वातावरण भयाचं झालेलं आहे . म्हणून १९८५-८६ ते ९५-९६चे दिवस आठवले आणि जीवाचा थरकाप उडाला... 

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......