मराठी ख्रिस्ती साहित्यप्रवाह अजूनही ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरू यांच्याच प्रभावाखाली आहे!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
कामिल पारखे
  • ख्रिस्ती साहित्य संमेलनाची काही प्रातिनिधिक छायाचित्रं
  • Thu , 21 April 2022
  • पडघम साहित्य संमेलन विशेष ख्रिस्ती साहित्य संमेलन मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन

१८७८ साली पुण्यात मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन पार पडले. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुहूर्तमेढ उभारणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडे या संमेलनाचा शुभारंभ करण्याचा मान जातो. नंतरच्या काळात ग्रंथकारांचे संमेलन ‘साहित्य संमेलन’ झाले. त्यानंतर ते ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झाले. कालांतराने विद्रोही, विचारवेध, ग्रामीण, दलित, मुस्लीम, अशी विचारनिहाय आणि कोकण, मराठवाडा अशी प्रदेशनिहाय संमेलने सुरू झाली. मराठी साहित्य संमेलनापासून पहिल्यांदा वेगळी चूल मांडण्याचे धाडस ‘ख्रिस्ती साहित्य संमेलना’ने शंभरेक वर्षांपूर्वीच केले होते, हे मात्र अनेकांना माहीतही नसेल.         

पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८-१९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष होते- रेव्हरंड निकल मॅक्लिकल. या महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांच्या पहिल्या साहित्य संमेलनाला सात ख्रिस्ती पंथांच्या पन्नास प्रतिनिधींसह १५० लोक हजर होते. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

ख्रिस्ती संमेलनाचा हा प्रवाह मध्यंतरीच्या काही दशकांचा अपवाद वगळता आजही खळाळता राहिला आहे. गंमत म्हणजे १९९२ पासून मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने स्वतंत्र चूल मांडली आणि आतापर्यंत १० संमेलने भरवली आहेत.     

विशेष म्हणजे अखिल भारतीय साहित्त्य संमेलनांप्रमाणे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचेसुद्धा दस्तऐवजीकरण झालेले आहे. या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलित करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे काम सुनील श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे. ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या शीर्षकाचा ४१० पानांचा जाडजूड ग्रंथ आढाव यांनी पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. 

या ग्रंथाचा विशेष महत्त्व म्हणजे संमेलनाध्यक्षांच्या भाषणांबरोबरच प्रत्येक संमेलनांची पूर्वपीठिका आणि त्या त्या संमेलनाध्यक्षांनी मांडलेल्या विचारांची समीक्षेचाही यात समावेश आहे. मराठी साहित्यातील ख्रिस्ती साहित्याचे आणि साहित्यिकांचे स्थान, ख्रिस्ती साहित्याची व्याख्या, या साहित्याचा साहित्यिक आणि वैचारिक दर्जा, संमेलनाध्यक्षांचे उपस्थित केलेले मुद्दे, या शतकभरात मराठी ख्रिस्ती साहित्यजगात उमटलेली वादळे वगैरे विषयांचा आढाव यांनी या ग्रंथात उहापोह केला आहे. त्यादृष्टीने हा ग्रंथ केवळ एकंदर मराठी साहित्यक्षेत्रासाठीही एक मौलिक ऐवज ठरतो.    

१९२७ नंतर चार संमेलने सलग झाल्यानंतर १९३३ नंतर पुढचे ख्रिस्ती साहित्य संमेलन भरायला १९७२ साल उजाडावे लागले. त्यानंतर मात्र कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंटपंथीय साहित्यिकांनी अगदी चंग बांधून वेळोवेळी ही संमेलने भरवली. विविध कारणांमुळे या संमेलनांच्या क्रमसंख्यांविषयी मात्र स्पष्टता नाही, हे आढाव यांनी आपल्या ग्रंथात स्पष्ट केले आहे. काही संमेलनांविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तरीही गेल्या शतकभरात एकूण ३५ संमेलने झाली असून त्यात २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने आणि १० मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचा समावेश होतो.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आतापर्यंतच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे : दुसरे - मनोहर कृष्ण उजगरे (मुंबई, १९३०), तिसरे - देवदत्त नारायण टिळक (निपाणी, १९३२) चौथे - लक्ष्मीबाई टिळक (नागपूर, १९३३), पाचवे आणि सहावे-  सत्यवान नामदेव सूर्यवंशी (मुंबई आणि पुणे, १९७२), सातवे - फादर डॉमनिक आब्रिओ (नंतर औरंगाबाद धर्मप्रांताचे पहिले बिशप- मुंबई, १९७३), दहावे - भास्करराव जाधव (बारामती, १९७५), अकरावे - रॉक कार्व्हालो (सोलापूर, १९७७), बारावे - रामकुंवर सूर्यवंशी (अहमदनगर, १९८१), तेरावे - फादर एलायस बी रॉड्रिग्स (मुंबई, १९८४), चौदावे - जयंतकुमार त्रिभुवन, (कोल्हापूर, १९८६), पंधरावे - विजया पुणेकर (मुंबई, १९९०),  सोळावे - फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे, १९९२), सतरावे - निरंजन उजगरे (मालवण, १९९४), अठरावे - सुधीर देवीप्रसाद शर्मा (नागपूर, १९९८), एकोणिसावे - सिसिलिया कार्व्हालो (नाशिक, २०००), विसावे - देवदत्त हुसळे (अहमदनगर, २००१),  एकविसावे -अनुपमा उजगरे (मुंबई, २००५) , बाविसावे  सुभाष पाटील (जालना, २००७ ), तेविसावे - फादर मायकल जी. (वसई, २००९), चोविसावे - अशोक आंग्रे (अहमदनगर, २०११), आणि पंचविसावे- नाझरेथ मिस्किटा (सोलापूर २०१४).      

दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे : पहिले - अरविंद पी. निर्मळ (अहमदनगर, १९९२), दुसरे - सत्यवान नामदेव सूर्यवंशी (जालना, १९९३), तिसरे - अरविंद पी निर्मळ (लोणावळा, १९९४),  चौथे - देवदत्त हुसळे (अहमदनगर, १९९५), पाचवे - बिशप प्रदीप कांबळे (पुणे, २००१), सहावे - सुभाष चांदोरीकर (संगमनेर, २००४),  सातवे - डॉ. गिल्बर्ट लोंढे (नागपूर, २००६), आठवे - वसंतराव म्हस्के (उदगीर, २००८), नववे - अनुपमा डोंगरे-जोशी (श्रीरामपूर, २०११) आणि दहावे - फादर ज्यो गायकवाड (श्रीरामपूर, २०१८).                

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने यांच्यात काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. मराठी साहित्यात महिलांचे योगदान फार पूर्वीपासून आहे. स्त्रीसाहित्याची मोठी परंपरा आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि आता शंभरीच्या जवळ आलेल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान मात्र एका हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच स्त्रियांना मिळाला आहे. याउलट केवळ ३५ संख्येच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या मात्र आतापर्यंत सहा स्त्रिया संमेलनाध्यक्षा झालेल्या आहेत. त्यापैकी पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या आणि एक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापैकी काही संमेलनाध्यक्ष एकाच घरातील वा कुटुंबातले आहेत. लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांचा मुलगा देवदत्त टिळक असे मायलेक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी आणि त्यांच्या बहिण रुपकुंवर सूर्यवंशी असे भाऊ-बहीण, मनोहर कृष्ण उजगरे आणि त्यांच्याच घराण्यातले निरंजन उजगरे आणि अनुपमा उजगरे हे दाम्पत्य इत्यादी.

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन या दोन्ही प्रवाहांतील संमेलनालध्यक्षपद अनेक धर्मगुरूंनी भूषवले आहे. यात कॅथोलिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, बिशप डॉमनिक आब्रिओ यांच्यासह प्रोटेस्टंट रेव्हरंड निकल मॅक्लिकल, रेव्ह. अरविंद पी. निर्मळ आणि बिशप प्रदीप कांबळे यांचा समावेश होतो. मराठी ख्रिस्ती साहित्यप्रवाह अजूनही ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरू यांच्याच प्रभावाखाली आहे, हेच यातून दिसून येते.  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडीबाबत १९७२ पासून एक अलिखित संकेत पाळला जातो, तो म्हणजे एकदा कॅथोलिक आणि त्यानंतर प्रोटेस्टंट असे साहित्यिक या पदासाठी आलटूनपालटून निवडले जातात. या पायंड्याकडे पाहू जाता कॅथोलिक म्हणजे वसईकडचा साहित्यिक आणि प्रोटेस्टंट म्हणजे वसईउर्वरीत महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट संमेलनाध्यक्ष बनलेले आहेत. वसईबाहेरच्या महाराष्ट्रातील एकही कॅथोलिक आतापर्यंत मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष झालेला नाही.  

आगामी २६वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन मे महिन्यात बीड येथे होणार आहे. गेल्या वेळेस नाझरेथ मिस्किटा हे कॅथॉलिक साहित्यिक मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष झाले होते. त्यामुळे बीडच्या संमेलनाध्यक्षपदासाठी अनेक प्रोटेस्टंट साहित्यिक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक आहेत.  

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......