महाराष्ट्रात म. जोतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं किंवा तामिळनाडूमध्ये पेरियार यांचं जे योगदान आहे, तेवढंच केरळमध्ये अय्यंकाली यांचं आहे!
पडघम - सांस्कृतिक
ओमप्रकाश कश्यप
  • डावीकडे केरळमधील चेराई येथील आंबेडकर-अय्यंकाली समुद्र किनाऱ्यावरील शिल्पं, उजवीकडे अय्यंकाली
  • Tue , 28 December 2021
  • पडघम सांस्कृतिक अय्यंकाली Ayyankali म. जोतीबा फुले Jotiba Phoole डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar पेरियार Periyar

सुनो, सुनो, सुनो—गीत मेरा सुनो

विपन्न, निढाल गरीबी में घिसटते हुए लोगो सुनो

‘यहां से जाएं, तो कहां जाएं?’

वे रो रहे हैं, बिलख रहे हैं, आंसू बहा रहे हैं

हमारा न कोई घर है, न देश

न ही सिर छिपाने को जंगल

दिन के उजाले में जंगलों की सफाई करना

रात्रि को वहीं निढाल पड़ जाना

बीज बोने के बाद

पेड़ जब देने लगते हैं फल

मालिक आकर कब्जा लेता है उन्हें

हमारे पास अब केवल रोना ही बचा है

हमारे हिस्से है श्रम, केवल श्रम

ढेर सारा, बल्कि सारे का सारा श्रम

हम सड़कों पर चल नहीं सकते

बाजार में प्रवेश करने की अनुमति नहीं है हमें

लेकिन हम बढ़ेंगे….बढ़ेंगे

बढ़ते रहेंगे, बढ़ते ही रहेंगे।

हे गाणे जवळपास १०० वर्षे जुने आहे. अय्यंकली यांनी स्थापन केलेल्या ‘साधूजन परिपालन संघा’च्या सभांमध्ये गायले जाणारे गाणे. केरळमधील दलित आणि आदिद्रविडांमध्ये आधुनिक भावना जागृत करण्यात या गाण्याचे मोठे योगदान आहे. चक्कोला कुरुम्बम दिविथन हे गाणे म्हणायचे. इतक्या मार्मिक स्वरात की, श्रोत्यांचे डोळे पाणवायचे. यावर अधिक चर्चा करण्यापूर्वी अय्यंकलीच्या जीवनाबद्दल जाणून घेऊ या.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

बैलगाडीच्या माध्यमातून क्रांती

वर्ष १८९१ (काही विद्वान १८९३ मानतात). सुमारे ३० वर्षांचा एक मजबूत आणि देखणा तरुण. अगदी नवीन बैलगाडी, पांढर्‍या शुभ्र बैलांची जोडी. त्यांच्या गळ्यात मोठ्या पितळी घंटा—त्याने खास आजच्यासाठी त्या विकत घेतल्या होत्या. याशिवाय चमकदार कॉर्सेट्स, आलिशान पगडी आणि स्वतःसाठी आकर्षक बूट. बैलांना गाडीला जुंपण्यापूर्वी तो त्यांना प्रेमाने कुरवाळतो. त्यांच्या गळ्यात घंटा बांधून त्यांना बैलगाडीला जुंपतो. मग तो मोठ्या अभिमानाने बैलगाडीत बसतो. कासऱ्याचा झटका मिळताच बैल चालू  लागतात. कर्णमधुर वाजवणाऱ्या घंटा ८५ मीटर अंतरावरून त्याच्या आगमनाचा अंदाज देतात. घंटांचा आवाज ऐकून लोक बाहेर येतात. स्त्रिया आणि मुलं खिडक्या-दारांतून डोकावू लागतात.

तो तरुण ज्या जातीतला होता, तिला बैलगाडीत बसण्याचा अधिकार नव्हता. चांगले कपडे घालायचे नाहीत. तसेच त्याचे बैल ज्या रस्त्यांवरून चालत होते, त्यावरून चालण्याचाही अधिकार नव्हता. त्या तरुणाचा तोरा पाहून त्याच्या जातीच्या लोकांची छाती मोठ्या अभिमानाने फुगते. मात्र इतर जातीच्या लोकांना त्याचा द्वेष वाटतो. काहींच्या डोळ्यांतून आग ओकली जाते. म्हणून जात्यंध लोक घरातून लाठ्या-काठ्या घेऊन बैलगाडीचा मार्ग अडवतात. हे घडणार आहे, याचा त्या तरुणाला अंदाज होताच. त्यामुळे तो येणार्‍या परिस्थितीशी मुकाबला करण्यास सज्जच होता. दररोज अपमान सहन करत बसण्यापेक्षा त्याचा मुकाबला करणेच जास्त चांगले, असे त्याच्या मनाने घेतले होते. विरोधकांची धडपड पाहून तो आपली कुकरी काढतो. त्याचे उग्र रूप पाहून मार्ग अडवणारे घाबरून पळून जातात. या विजयाचा आनंद साजरा करत बैलगाडी पुढे चालू लागते. या पूर्वी जगात अनेक महापुरुष झाले. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी मोठ्या लढाया लढल्या, पण बैलगाडीतून क्रांती घडवणारा मात्र तो एकमेव होता.

बाजारात जाण्याचे स्वातंत्र्य

‘जातीवाद’ हा या देशाला फार मोठा कलंक आहे. तो जन्माच्या आधारावर माणसामाणसांमध्ये फरक करायला शिकवतो. हा जातीयवाद ‘द्विज, ब्राह्मण’ म्हणून मूठभर लोकांना भरपूर अधिकार देतो, तर दुसरीकडे समाजातील एका मोठ्या विभागाला शूद्र व अस्पृश्य ठरवून त्यांचे सर्व अधिकार हिरावून घेतो. त्यांचा संपूर्ण आत्मसन्मान, सुख समाधान व लहानसहान आनंदाच्या बाबीपासूनसुद्धा त्यांना वंचित केले जाते. अशी ही वर्ण-जातीव्यवस्था केरळसह संपूर्ण दक्षिण भारतात फारच विकृत स्वरूपात अस्तित्वात होती. त्यामुळे १८९२मधील आपल्या दौर्‍यात स्वामी विवेकानंद यांनी केरळला ‘जातींचा पागलखाना’ असे म्हटले होते. विसाव्या शतकात तेथे सवर्ण लोक पुलाया, पारया, कुरुवा यांसारख्या जातींच्या सावलीपासूनही दूर राहत होते. दलितांचे शोषण ही सार्वत्रिक बाब होती. त्यांना सार्वजनिक मार्गावरून चालण्याचे, बाजारात जाण्याचे आणि चांगले कपडे घालण्याचेसुद्धा स्वातंत्र्य नव्हते. गुलामासारखे त्यांचे जीवन होते. आमचा महानायक १८९८मध्ये पुन्हा एकदा नवीन जोशाने उभा राहिला होता. या वेळेचा संघर्ष बाजारात जाण्याच्या स्वातंत्र्यासाठी होता.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

त्याने आपल्या मित्रमंडळींना एकत्र केले. त्याचा उद्देश आरालूमुद्द गावाच्या बाजारात प्रवेश करण्याचा होता. आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्याने पठाणकाडापासून पुढे जाण्यास सुरुवात केली. सर्वच जण मोठ्या उत्साहात होते, परंतु त्यांच्या मनात भीतीही होती. कारण त्यांचे विरोधक कधीही आणि कोणत्याही दिशेने त्यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता होती. म्हणून ते मोठ्या सावधपणे पुढे पुढे जात होते. जसा त्यांचा जत्था चिटिया रस्त्यावर पोहोचला, तेव्हा उच्च जातींची तरुण मुले शस्त्रांसह त्यांना आडवी झाली. दोन्हींकडून हल्ल्या-प्रतिहल्ल्यास सुरुवात झाली. वाढता वाढता संघर्ष वाढतच गेला.

दलितांसाठी हा जीवनमरणाचा प्रश्न होता. पाहता पाहता मनाकुडू, नेय्याट्टीकर, नेमोन, अमरविला, परसाला, कोझाकुट्टम, कनियापुरम्म इत्यादी भागांतून विद्रोहाचे स्फुल्लिंग पेटले. पूर्वी जे अस्पृश्य लोक सवर्णांना पाहून जाग्यावरच थांबत होते, ते आता नव्या जागृतीने आणि आत्मविश्वासाने त्यांचा मुकाबला करू लागले. त्यांच्या नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्यावर ते काहीही करायला तयार होते. पूर्ण त्रावणकोरमध्ये गृहयुद्धासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. काही विद्वान १८५७च्या विद्रोहाला ‘पहिले स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणतात, परंतु स्वातंत्र्याची खरी लढाई तर  दलित आणि आदीद्रविड लढत होते! एक आठवड्यानंतर स्थिती पूर्वपदावर आली. तोपर्यंत या संघर्षाची ‘चेलीयार विद्रोहा’च्या नावाने आपल्या इतिहासात नोंदही केली होती. 

केरळला आधुनिक राज्य बनवण्यात या आंदोलनाची मोठी महत्त्वपूर्ण भूमिका आहे. महाराष्ट्रात महात्मा जोतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं किंवा तामिळनाडूमध्ये पेरियार यांचं जे योगदान आहे, तेवढंच केरळमध्ये अय्यंकाली यांचं आहे.

अय्यंकाली यांचा जन्म २८ ऑगस्ट १८६३ रोजी तामीळनाडूमधील त्रावणकोर जिल्ह्यातील तिरुअनंतपुरमपासून १३ किलोमीटर उत्तरेकडे असलेल्या वेंगणूर गावी झाला. आठ भावाबहिणीमध्ये ते सर्वांत मोठे होते. त्यांची जात पूलाया होती. त्या जातीचे लोक सर्वसाधारणपणे गुलामाप्रमाणेच काम करत होते. अय्यंकाली यांचे वडीलसुद्धा एका जमीनदारांकडे गुलामी करत होते. परंतु त्यांची मेहनत आणि प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन त्या जमीनदाराने त्यांना पाच एकर जमीन भेट म्हणून दिली होती. म्हणून त्यांच्या जातीतील लोकांमध्ये अय्यंकाली कुटुंबाची प्रतिष्ठा इतरांपेक्षा थोडी बरी होती. त्यांचे वडील पुलाया वस्तीचे प्रमुख होते.

त्या वेळचा समाज पूर्णपणे जातिव्यवस्थेने जखडलेला होता. अशा परिस्थितीत राहणार्‍या मुलांना समाजातील जे शोषण, टोमणे आणि जो तिरस्कार सहन करावा लागत होता, तो सर्व अय्यंकाली यांच्याही वाट्याला आला. ते दिसायला अतिशय सुंदर होते. त्यांचे शरीर पिळदार आणि प्रकृती चांगली होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. ते एक वेगळ्याच प्रकारची छाप पाडत. त्यांना फुटबॉल खेळण्याचा शौक होता. एकदा फुटबॉल खेळत असताना त्यांचा चेंडू नायर जातीच्या एका व्यक्तीच्या वाड्यात जाऊन पडला. ते चेंडू घेण्यासाठी त्या वाड्यात गेले असता नायर यांनी त्यांचा अपमान केला आणि त्यांना ताकीद दिली की, भविष्यामध्ये चेंडू वाड्यात येऊ देऊ नये. या अपमानाने अय्यंकाली यांना बराच त्रास झाला. काही सवर्ण मुलेसुद्धा त्यांच्याबरोबर फुटबॉल खेळत असत. परंतु जेव्हा त्यांना अय्यंकाली यांच्या जातीची माहिती समजली, तेव्हापासून त्यांनी त्यांच्याबरोबर खेळणे सोडून दिले. अय्यंकाली दुखावले गेले. म्हणून त्यांनीसुद्धा भविष्यात त्या मुलांबरोबर कधीच न खेळण्याचा निर्णय घेतला.

अय्यंकाली लहानपणापासूनच विधायक प्रवृत्तीचे होते. त्यांना गीतगायनाचा व वाद्य वाजवण्याचाही शौक होता. आपल्या जातींची मुले गोळा करून त्यांनी एका नाटक मंडळीची स्थापना केली होती. सुरुवातीला ते परंपरागत नाटके बसवत. हळूहळू ते आपल्याच नाटकातून अभिनय करत असत. त्यांच्या नाटकांतून काही संदेश दिला जात असे. परिणामी लोक त्यांच्या नाटकाकडे आकर्षित व्हायला लागले. लहानपणापासून ते मोठे हिंमतवान आणि धडाडीचे होते. त्यामुळे कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून सवर्णांबरोबर त्यांचा नेहमीच वाद होई. असे वाद निपटण्यासाठी विद्रोही अय्यंकाली यांनी आपल्या मित्रमंडळींना संघटित करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी त्यांना कुस्ती आणि लाठी-काठी चालवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी त्यांनी कलारी असान नावाच्या एका प्रशिक्षकाला बाहेरून बोलावून आणले होते. त्यामुळे पूलाया तरुणांमध्ये आत्मसन्मानाची भावना वाढीला लागली. कारण या बदलाच्या मुळाशी अय्यंकाली यांची प्रेरणा आणि कष्ट होते. त्यामुळे त्यांचे प्रशंसक त्यांना मोठ्या सन्मानाने ‘ऊरपिल्लई’, ‘मुथापिल्लई’ म्हणू लागले. 

१८८८मध्ये त्यांचे लग्न चेलम्माबरोबर झाले. पती-पत्नीमध्ये अगाध प्रेम होते. उभयतांना सात अपत्ये झाली. त्यांनी स्वतःला एक चांगले गृहस्थ म्हणून सिद्ध केले होते, परंतु त्यांचा उद्देश केवळ तेवढ्यापुरताच मर्यादित नव्हता. अस्पृश्य असल्याकारणाने त्यांच्यावर अनेक प्रकारची बंधने होती.

शिक्षणासाठी केलेला संघर्ष

ब्रिटिश अधिकारी मेकॉलेच्या सल्ल्यानुसार तत्कालीन व्हाईसराय विलियम बेंटिंग यांनी ७ मार्च १८३५ रोजी एक परिपत्रक जाहीर केले. त्याचा उद्देश खालच्या जातीतील मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचा होता. हजारो वर्षांपासून ज्ञानाच्या नावावर पसरवण्यात आलेल्या अंधकाराची भरपाई करण्याचा त्या परिपत्रकाचा उद्देश होता. परंतु कायदा बनवणे ही एक बाब झाली आणि गरजवंतांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवणे, ही पूर्णपणे वेगळी बाब होती. बहुसंख्य शाळांतील व्यवस्थापन ब्राह्मणांच्याच हातात होते. कायदा बनल्यानंतरसुद्धा ते त्याची अवहेलना करत असत. महात्मा फुले यांचा विचार होता की, आपल्या वाईट परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी शूद्र आणि अतिशूद्रांना जागृत करणे आवश्यक होते. त्यांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांच्यातूनच प्रभावी नेता निर्माण होणे आवश्यक आहे, आणि हे सर्व शिक्षणाशिवाय अशक्य होते. म्हणून १८४८पासूनच ते शूद्र-अतिशूद्र यांच्यासाठी वेगळ्या शाळा निर्माण झाल्या पाहिजेत, यासाठी झटत होते. पुढच्या तीन वर्षांमध्ये १८ शाळांची स्थापना करून त्यांनी एक प्रकारचा उच्चांकच गाठला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

याच मार्गावर पुढे चालत असताना अय्यंकाली यांनी १९०४मध्ये वेंगणुर येथे पहिल्या शाळेचा - कुदी पल्लिकुदंम - पाया रचला. परंतु सवर्णांना हे मुळीच सहन झाले नाही. शाळा उभारणीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी त्या शाळेला आग लावूली. अय्यंकाली यांनी अजिबात उशीर न करता स्वजातीच्या लोकांच्या सहकार्याने पुन्हा नव्याने शाळा उभारणीचे काम सुरू केले. परंतु त्यांचे विरोधक त्यांना जुमानायला तयार नव्हते. त्यांनी पुन्हा त्या शाळेला आग लावली. दुसरा कोणी असता तर कदाचित त्याने हार मानली असती. परंतु लहानपणापासूनच जिद्दी असलेल्या अय्यंकाली यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शाळेचे बांधकाम चालू केले गेले. शेवटी शाळा बनली. विद्यार्थी शाळेत जाऊ लागले. अशी ही शाळा, केरळमध्ये एका दलिताद्वारे दलित मुलांसाठी शिक्षण देणारी पहिली शाळा ठरली!

इंग्रजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबतचा नियम १८६० सालीच केला होता. परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती. कारण सवर्णांच्या दबावामुळे त्रावणकोरच्या दिवानांनी त्या आदेशाला दडपून ठेवले होते. आपल्या संघटनेच्या माध्यमातून अय्यंकाली हे त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. शेवटी सवर्णांच्या वर्तणुकीबद्दल पूर्णपणे निराश होऊन त्यांनी आरपारची लढाई करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अस्पृश्यांना सांगितले की, जोपर्यंत त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत अस्पृश्यांनी नायरांच्या शेतामध्ये काम करणे बंद करावे. आणि तसेच घडलेसुद्धा. अस्पृश्य पुलायांनी संपाची घोषणा केली. सुरुवातीला नायरांनी ही ‘गिधाडांची’ धमकी असल्याचे सांगितले. त्यांना वाटले की, उपासमारीमुळे बेहाल होऊन गरीब पूलाया, कुरुवा इत्यादी अस्पृश्य लवकरच त्यांच्या शेतात काम करण्यासाठी मजबूर होतील. परंतु अस्पृश्यांनी पाहिलेली स्वप्ने त्यांच्या भुकेपेक्षा कितीतरी मोठी होती! संप लांबतच गेला. सवर्णांनी अस्पृश्यांना दम देऊन घाबरवणे सुरू केले. अय्यंकाली आणि त्यांच्या मित्रमंडळींनी त्याचा समर्थपणे मुकाबला केला.

पेरणीचा हंगाम सुरू झाल्यावर काही नायरांनी स्वतःच आपल्या शेतात पीकपेरणीचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्यांच्या श्रमावर जीवन जगणाऱ्या आणि आळशी बनलेल्या नायरांसाठी हे काम करणे सोपे नव्हते. एक पुलाया जेवढे काम एका दिवसात करत होता, तेवढेच काम करण्यासाठी त्यांना पाच-सहा दिवस लागत होते. संप लांबत चालल्याने गरीब पुलायासमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले होते. त्या वेळी अय्यंकाली यांनी मोठ्या दिमाखाने नवीन काम हाती घेतले. त्यांनी त्या परिसरातील मच्छीमारांशी अशी तडजोड केली की, प्रत्येक मच्छीमाराने मासे पकडण्यासाठी आपल्याबरोबर एका फुलायाला सोबत ठेवावे. हा फार्मुला उपयोगाचा ठरला. त्यामुळे नायर समाज आणखीच चिडला. तर संपाची व्याप्ती वाढवण्यासाठी अय्यंकाली यांनी जुन्या मागण्यांत काही नवीन मागण्या जोडल्या. त्यात मजुरांना कायम करणे, खोट्या आरोपाखाली फसवून दंड न लावणे अथवा चाबकाचे फटके मारणे बंद करण्यात यावे, सार्वजनिक रस्त्यावरून येण्या-जाण्याचे स्वातंत्र्य असावे, आठवड्यातून एक दिवसाची सुट्टी मिळावी, यांसारख्या काही मागण्या होत्या.

अय्यंकाली यांच्या नेतृत्वाचाच हा परिणाम होता की, शतकानुशतके बैलासारखी मान खाली घालून कष्ट करणारे अस्पृश्य पहिल्यांदाच जमीनदारांच्या डोळ्याला डोळा भिडवून, छाती ताणून उभे होते. परिस्थिती बिघडत चालली होती. पुलायासमोर उपासमारीचे संकट उभे होते, तर जमीनदारांचीही परिस्थिती चांगली नव्हती. चिडून जाऊन त्यांनी पुलायांच्या झोपड्यांना आगी लावणे सुरू केले. त्याबदल्यात अय्यंकालीच्या लढाऊ दलांनी जमीनदारांच्या वाड्यांनाही आगीच्या हवाली करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जमीनदार नायरांच्या रागाला पारावार राहिला नाही. त्यांनी विचार केला की, या सगळ्या भानगडी मागे अय्यंकालीच आहे. आपल्या नीच क्रुरतेची पातळी गाठत त्यांनी अय्यंकाली यांना जिवानिशी मारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या एका गुंडाला सुपारी दिली. अय्यंकाली यांना जिवंत पकडून आणल्यास २००० रुपये आणि जर त्याचे प्रेत आणले तर १००० रुपये इनाम देऊ केला.

जीवे मारण्याच्या धमक्या आणि आणि खूनखराब्यानंतरसुद्धा अय्यंकाली आपल्या मित्रमंडळींबरोबर ठामपणे उभे होते. नायरांनी अय्यंकाली तसेच त्याचे अंगरक्षक असलेल्या याकूबच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी याकूबला अटक केली. अय्यंकाली ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि जोपर्यंत पोलिसांनी याकूबला सोडून दिले नाही, तोपर्यंत ते तेथेच थांबून राहिले. शेवटी पोलिसांनी याकूबला सोडून दिले.

अस्पृश्यांचा हा संप जवळ जवळ एक वर्षभर (१९०७-०८) चालला. यदरम्यान शिक्षण खात्याचे निर्देशक मिशेल यांनी त्रावणकोरच्या दिवानांना १८६०च्या सरकारच्या धोरणात्मक आदेशावर ताबडतोब अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला. चोहीकडून येत असलेल्या दबावामुळे त्रावणकोरच्या दिवानांनी १९१०मध्ये अस्पृश्य मुलांना सरकारी शाळेतून प्रवेश देण्यासंबंधीचा आदेश जारी केला. त्या वेळच्या अनेक बुद्धिजीवींनी याचा विरोध केला. त्यामध्ये स्वतःला प्रगतिशील समजणारे ‘स्वदेशाभिमानी’चे संपादक रामकृष्ण पिल्लई हेसुद्धा होते. अस्पृश्य मुलांना सरकारी शाळेतून प्रवेश देण्याबाबत त्यांनी लिहिले की, ‘हा आदेश म्हणजे पिढ्यानपिढ्यांपासून ज्ञान-विज्ञानाची शेती करत आलेल्या लोकांच्या मुलांना, त्यांच्याच शेतात पिढ्यानपिढ्या मजुरी करत असलेल्या लोकांच्या मुलांबरोबर ठेवणे म्हणजे ‘घोडा आणि म्हैस’ यांना एकत्रच जुंपण्यासारखे आहे.’

या आदेशाची खरोखरच किती प्रमाणात अंमलबजावणी होते, हे पाहण्यासाठी अय्यंकाली पुजारी अय्यपण यांची आठ वर्षांची मुलगी पंजामीला घेऊन उरुट्टमबलंम गव्हरमेंट गर्ल्स स्कूलमध्ये पोहोचले. त्यांच्याजवळ डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन मिशेल यांचे विशेष आदेश होते. मुख्याध्यापकांनी मुलीला वर्गात प्रवेश देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. अय्यंकाली यांनी मिशेल यांचा विशेष आदेश दाखवल्यानंतर ते त्या मुलीला वर्गात बसवण्यासाठी तयार झाले. परंतु ती बसल्याबरोबर त्या वर्गातील नायर समाजाच्या विद्यार्थ्यांनी त्या वर्गावर बहिष्कार टाकला. मुख्याध्यापक परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कंडाल गावातून काही नायर तेथे येऊन पोहोचले. ते लाठ्या-काठ्यांनी सज्ज होते. अय्यंकाली यांच्यासोबतसुद्धा त्यांचे साथीदार होते. वाद वाढत गेला. हळूहळू गावागावातून सुरू झालेला हा संघर्ष लगेचच आसपासच्या जिल्ह्यांनाही आपल्या कक्षेत ओढू लागला, इथपर्यंत की दक्षिणी त्रावणकोरसुद्धा या आंदोलनाच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकला नाही. दलितांच्या मुलांना प्रवेश देण्याविरुद्ध नायर इतके संतप्त झाले होते की, ज्या शाळांमध्ये अय्यंकाली आपल्या समाजाच्या मुलांना प्रवेश देण्यासाठी गेले होते, त्या दोन्ही शाळांना त्यांनी आगीच्या हवाली केले. 

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

भूक, दारिद्र्य, सर्वच बाबींची टंचाई आणि  गुलामासारखे जीवन जगणार्‍या या लोकांना अय्यंकाली यांनी नवीन संस्थात्मक नाव दिले- ‘साधू जन’. आपल्या आंदोलनाला संघटनात्मक स्वरूप देण्यासाठी त्यांनी १९०४मध्ये ‘साधू जन परिपालन संघ’ (गरीब रक्षणार्थ संघ) या संघटनेची स्थापना केली होती. त्यांच्या काही चरित्रकारांच्या मते या संघटनेची स्थापना १९०७मध्ये झाली. या संस्थेचे सरचिटणीस अय्यंकाली होते. इतर सदस्यांमध्ये मुलाइल काली, थॉमस वाडियार, गोपालन इत्यादींचा समावेश होता. या संघटनेची सदस्यता सर्वच अस्पृश्य जातींसाठी खुली होती. या संघटनेचा प्रमुख उद्देश पुलायासहित सर्वच अस्पृश्य जातींना आपल्या अधिकारांसाठी संघटित करणे हा होता. त्यांच्यातील अंधश्रद्धा, गरिबी, निरक्षरता, गुलामी आणि सवर्णांच्या दहशतीपासून मुक्ती देण्याचा होता. या संघटनेच्या प्रचार-प्रसारासाठी ठिकठिकाणी सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आधार घेतला जात होता.

सवर्ण लोक मात्र या संघटनेच्या स्थापनेमुळे नाराज झाले. म्हणून सुरुवातीला या संघटनेच्या बैठका वस्तीपासून दूर असलेल्या झाडाखाली किंवा टेकड्यांच्या मागे गुप्त ठिकाणी घेतल्या जात होत्या. हळूहळू लोकांच्या मनातली भीती कमी व्हायला लागली. ‘साधू जन परिपालन संघ’ या संघटनेचा उद्देश पूलाया, पारया यांसारख्या अस्पृश्य जातींचा उद्धार करणे हे होते. याशिवाय त्यांनी आपल्या या संघटनेला धर्म आणि जातीसंबंधीच्या दुराग्रहापासून वेगळे ठेवले होते. त्यामुळे त्यांना अस्पृश्य जातींचे राजकारण करण्यासाठी फायदा झाला.

संघटनेचे व्यवस्थापन मोठ्या सुनियोजितपणे केले जात होते. जवळपास प्रत्येक गावातून तिची शाखा उघडली गेली. संघटनेची वार्षिक सभा तिरुअनंतपुरममधील ‘व्हिक्टोरिया जुबली हॉल’मध्ये घेतली जात होती. त्यात केरळच्या वेगवेगळ्या गावांतले आणि शहरांतले आलेले लोक सहभागी होत होते. संमेलनाच्या दिवशी तिरुअनंतपुरमच्या सडका अस्पृश्यांच्या अलोट गर्दीने वाहून जात होत्या. या सभेत संघटनेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांशिवाय वेगवेगळे सरकारी अधिकारी आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रित केले जात होते. सरचिटणीस अय्यंकाली यांना वर्षभरात मिळवलेल्या सोयी-सवलती आणि विविध मागण्या या संमेलनासमोर सादर करण्याची जबाबदारी पार पाडावी लागत होती. ते स्वतः अशिक्षित होते. परंतु संस्थेचे संचालन अशा प्रकारे करत होते की, लोक त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यापुढे नतमस्तक होत होते.

याशिवाय त्यांनी ‘साधू जन परिपालन’ संघटनेच्या कार्यक्रमाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘साधूजन परीपालिनी’ नावाचे मासिक सुरू केले होते. काली कोदीकुरुप्पण यांना त्याच्या संपादकपदी नियुक्त करण्यात आले होते. पुढच्या ३० वर्षापर्यंत ही संघटना व्यवस्थितपणाने काम करत राहिली.

नेदमंगाडू विद्रोह

चेलीयार विद्रोहानंतर अनेक बाजारांतून पूलायांना जाण्या-येण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते. तरीही काही बाजारांत अजूनही त्यांच्यावर प्रतिबंध कायम होते. जे पुलाया आपले सामान विकण्यासाठी बाजारात येत, त्यांनासुद्धा मुख्य बाजारात येण्यापासून रोखले जाई. सवर्णांनी त्यांना बाजारात वेगळे स्थान दिले होते. १९१२मध्ये अय्यंकाली यांनी पुन्हा एकदा आपल्या मित्रमंडळींना गोळा केले. या वेळी त्यांच्या या मोहिमेत स्त्रिया व मुलेसुद्धा सामील झाली. जसजसा पुलायांचा जत्था पुढे जात होता, तसतसे त्यांना साथ देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी दुसऱ्या अस्पृश्य जातींचे लोक त्यांना येऊन मिळत होते. त्यांनी आपली ही मोहीम त्रिवेन्द्रमपासून सुरू केली, नेदमंगाडूपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी धनदाट जंगलाचा रस्ता निवडला. परंतु बाजारापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सवर्णांनी त्यांच्यावर हल्ला केला. दोन्ही समुदाय पक्क्या इराद्याने आले होते. त्यामुळे वाद-विवाद पुन्हा एकदा संघर्षात बदलला. अय्यंकाली यांनी डावपेच आखून पूलायांतील एका वेगळ्या जमावाला दुसऱ्या दिशेने बाजारात प्रवेश करण्यासाठी पाठवून दिले. घनदाट जंगलाच्या रस्त्यातून वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत, हा जत्था शेवटी नेदमंगाडू बाजारात प्रवेश करण्यामध्ये यशस्वी झाला.

श्री मूलम् प्रजा सभेचे सदस्यत्व

अय्यंकाली यांच्या संघर्षामुळे त्यांची ख्याती ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचली होती. लोक त्यांच्यामुळे प्रभावित झाले होते. परिणामस्वरूप १९१२मध्ये त्यांना ‘श्री मुलम प्रजा सभे’चे सदस्यत्व बहाल करण्यात आले. या सभेच्या समक्ष त्यांचे पहिलेच भाषण लहान परंतु प्रभावशाली झाले. आपल्या भाषणात त्यांनी पुलायांची गरिबी व निरक्षरता दूर करण्याबरोबरच त्यांना राहण्यासाठी घरे आणि शेतीसाठी जमीन देण्याची मागणी केली. त्यांची घोषणा होती - ‘कसेल त्याची जमीन’. त्यांनी या सभेत सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे सर्वांचे लक्ष वेधत म्हटले – “आमच्या कित्येक कुटुंबियांना श्रीमंत जमीनदारांनी असे आश्वासन देऊन त्यांच्या घरापासून वंचित केले की, ते त्यांना घर बनवण्यासाठी वेगळी जमीन देतील. आता वनविभागाचे कर्मचारी जमीनदाराबरोबर साटेलोटे करून माझ्या लोकांवर त्यांची घरे खाली करण्यासाठी दबाव आणत आहेत. त्याबरोबरच हे अधिकारी जमीनदारांना वन खात्याच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठीसुद्धा मदत करत आहेत. मी हा प्रश्न सोडवण्याची आपणाला विनंती करत आहे.”

अय्यंकाली यांच्या आवाहनावर दिवानांनी पुलायांना जमेल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले. दिवानांच्या मनात त्यांच्याबद्दल किती आदर होता, हे पुढील एका घटनेवरूनही सिद्ध होते. एकदा अय्यंकाली प्रजा सभेच्या सदस्याच्या नात्याने दिवानांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले असता, तेथे दारावर असलेल्या दरबानांनी त्यांना आज जाण्यास मनाई केली. त्यांनी अय्यंकालीबरोबर उद्धट वर्तणूकसुद्धा केली. त्यांचे नाव घेऊन त्यांना संबोधले. अय्यंकाली तेथून चालले गेले. बाहेर गेल्यानंतर त्यांनी टेलिग्राम पाठवून दिवानांना सर्व हकीकत सांगितली. दिवानांनी तात्काळ अय्यंकाली यांना आपल्या कार्यालयात येण्याचे निमंत्रण पाठवले. ते जेव्हा दिवानांच्या कार्यालयात गेले, तेव्हा ते दोन्ही दरबान येथे उपस्थित होते.

‘मिस्टर अय्यंकाली, तुमच्याबरोबर यांनी केलेल्या उद्धट वर्तणुकीबद्दल आपण यांना काय दंड देऊ इच्छिता,’ असे दिवानांनी त्यांना विचारले. हे ऐकून अय्यंकाली आश्चर्यचकित झाले. काही क्षण विचार केल्यानंतर त्यांनी म्हटले की, “या लोकांनी जी काही वर्तणूक केली ती नासमजातून केली. त्यांना माफ करून टाका.”

अय्यंकाली यांच्या या विधानाने दिवाण प्रभावित झाले. शेवटी त्या दोन्ही दरबानांनी अय्यंकाली यांचे पाय पकडून माफी मागितल्यानंतर, त्यांना माफ करण्यात आले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अय्यंकाली नेहमी कोट घालत असत. त्यांच्या जवळपास सगळ्या छायाचित्रांतही ते दिसते. ही वेशभूषा त्यांनी सवर्णांनी घालून दिलेल्या बंधनांना आव्हान देण्यासाठीच निवडली होती. त्यांचा जन्म ज्या जातीत झाला होता, त्याचा दर्जा गुलामासारखा होता. एका पुलायाला केवळ जुनंपुराणं लंगोटीसदृश कपडा गुंडाळता येत असे. अय्यंकाली यांनी त्याविरोधात बंड पुकारलं. कोट घालण्याचा अधिकार त्या काळी फक्त शिकल्या-सवरलेल्या लोकांनाच होता आणि अय्यंकाली तर निरक्षर होते. कुन्नुकुझी एस. मणि यांच्या मतानुसार ‘श्री मूलम प्रजा सभे’च्या सदस्यपदी अय्यंकाली यांची निवड झाल्यानंतर जॉन हेन्री या ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांना एक कोट भेट दिला होता. सभेच्या पुढच्या सत्रात ते तो कोट घालून हजर झाले. पुढच्या सत्रांसाठीही अजून काही कोट शिवून घेण्याची त्यांची इच्छा होती, पण त्या काळात तिरुवनंतपुरुममध्ये कोट शिवू शकेल, असा एकही शिंपी नव्हता. त्यामुळे अय्यंकाली यांनी कोट्यमच्या एका शिंप्याकडे दोन कोटांची ऑर्डर दिली. ‘श्री मूलम प्रजा सभे’च्या पुढच्या सत्रात अय्यंकाली ते कोट घालून सहभागी झाले. त्यांना पाहून नायरांचा जळफळाट होत होता. पण आता ते काहीही करू शकत नव्हते.

केरळच्या इतिहासात अस्पृश्यता, निरक्षरता आणि गुलामगिरी यांच्या विरोधात संघर्ष करून त्यांना संपुष्टात आणणारे अय्यंकाली १८ जून १९४१ रोजी मृत्यु पावले. एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारलं होतं, ‘तुमचं स्वप्न काय आहे?’ त्यावर अय्यंकाली उत्तरले होते, ‘डोळे मिटायच्या आधी मला माझ्या समाजातील दहा-बारा विद्यार्थ्यांना पदवीधर झाल्याचं पाहायचं आहे…बस्स!’

मल्याळी कवी पी. जी. बिनॉय त्यांच्याविषयी एका कवितेत म्हणतात –

तुम्हीं ने जलाया था प्रथम ज्ञानदीप

बैलगाड़ी पर सवार हो

गुजरते हुए प्रतिबंधित रास्तों पर

अपनी देह की यंत्रशक्ति से

पलट दिया था, कालचक्र को

.................................................................................................................................................................

मूळ हिंदी लेखाचा संक्षिप्त मराठी अनुवाद - कॉ.भीमराव बनसोड

मूळ हिंदी लेखासाठी इथं क्लिक करा 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा