शेतकरी विजयी होऊन परतत आहेत… यालाच तर ‘क्रांती’ म्हणतात…
पडघम - देशकारण
तसलीम खान
  • दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेले शेतकरी आज आंदोलन संपवून घरी परत निघाले आहेत... त्याची ही दोन प्रातिनिधिक छायाचित्रं
  • Sat , 11 December 2021
  • पडघम देशकारण शेतकरी आंदोलन Farmers Protest शेती Farming शेतकरी Farmer शेती सुधारणा बिल Farm Reform Bill

३८० दिवसांपूर्वी हातांत तिरंगा, डोक्यांवर आत्मसन्मानाची साफा-पगडी-टोपी, चेहऱ्यांवर कष्टकऱ्यांचं तेज, डोळ्यांत दृढनिश्चय, देहबोली सेवाभावी आणि वळलेल्या मुठ्ठींनी सत्तेच्या नशेत डुंबलेल्या निरंकुश आणि अहंकारी सरकारला आव्हान देत शेतकऱ्यांचा मोर्चा जेव्हा दिल्लीच्या सीमांवर येऊन धडकला, तेव्हा क्वचितच कुणी कल्पना केली असेल की, हे शेतकरी इथून जिंकून परततील म्हणून…

लेकिन वे जीत कर ही लौट रहे हैं...

वे गाते-बजाते-गूंजते लौट रहे हैं किसी शबद की तरह,

किसी आयत की तरह,

किसी कीर्तन की तरह...

(कवी वीरेंदर भाटिया यांच्या एका कवितेच्या ओळी)

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

हा विजय केवळ शेतकऱ्यांचा आहे? केवळ पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांचा आहे? (तसे तर या आंदोलनात सबंध देशातील शेतकरी होते, पण या तीन राज्यांतील शेतकरी मुख्यत: सरकारशी सर्वांत जास्त प्रमाणात संघर्ष करत होते.) त्यांच्या या विजयानं लोकशाहीची झोळी भरून टाकली आहे. त्यांनी आपल्या विजयानं लोकशाहीच्या ढासळत्या आणि खिळखिळ्या होत चाललेल्या चिऱ्यांना पुन्हा मजबूत केलं आहे.

ते दिल्लीच्या सीमांवर येऊन धडकले होते, तेव्हा त्यांना हे माहीत होतं की, त्यांचा सामना एका निरकुंश सत्ताधाऱ्यांच्या अहंकाराशी आहे. त्याची कल्पना त्यांना दिल्लीत पोहचण्याआधीच करून देण्यात आली होती. नोव्हेंबरच्या थंडीत त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला, त्यांना थोपवण्यासाठी निर्दयी लाठीमार करण्यात आला, त्यांच्या डोळ्यांत उभ्या ठाकलेल्या दृढनिश्चयाला अश्रुधुरांच्या गोळ्यांनी धूसर करून टाकण्यात आलं होतं. पण ते तर जमिनीची छाती चिरून पीक घेणारे शेतकरी, ते या सगळ्याला कसले घाबरणार, मागे हटणार!

सरकारने ठरवलं होतं की, या शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू द्यायचं नाही. त्यामुळे दिल्लीतल्या सत्तेचा पाया डगमगू शकतो. त्यामुळे त्यांना मेंढ्याच्या झुंडीसारखं हाकून शहराबाहेरच्या एका बंदिस्त मैदानात जायला सांगितलं. दिल्लीत जाणाऱ्या रस्त्यांवर खंदक खोदण्यात आले, खिळे अंथरण्यात आले. पण जे हवामानाच्या प्रत्येक बदलाला निसर्गाचं वरदान समजून नमस्कार करतात, वादळ-पावसात, उन्हाच्या झळा सोसत कष्ट आणि घामाच्या जोरावर जमिनीला उपजावू बनवतात, ते कसले थांबणार! ते दिल्लीच्या सीमांवर दटून राहिले.

त्यांचा सामना फक्त बहुमताच्या नशेत बेहोश झालेल्या सरकारशी नव्हता. त्यांच्यासमोर कॉर्पोरेट होतं आणि कॉर्पोरेट व सरकार यांच्या धोकादायक एकीच्या कुबड्यांवर चालणारी प्रसारमाध्यमंही. पोलीस तर होतेच. पण इंटरनेट आणि सोशल मीडिया नावाचा माफियाही त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभा होता. पण माघारी परतायचं नाही, या इराद्यानं घरंदारं-शेत सोडून आलेल्या शेतकऱ्यांना माहीत होतं की, ही संकटं आपला रस्ता थांबवण्याचा प्रयत्न करणारच आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्लीच्या सीमांनाच शहर बनवलं. एक असं शहर, जिथं सगळे एकसमान होते, सगळ्यांचं सरकार होतं, सर्वांसाठी जेवण होतं, सर्वांसाठी सारखे नियम होते, सर्वांसाठी सोयीसुविधा होत्या, सर्वांच्या आरोग्याची काळजी होती.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

त्यामुळे स्वत:ला तिरमारखाँ समजणारं सरकार बेचैन झालं. जोर-जबरदस्तीचा काही उपयोग होत नव्हता. परिणामी शिव्याशाप, कटकारस्थानं, बदनामी करण्याचा आणि ‘आतंकवादी-पाकिस्तानी-खलिस्तानी’ ठरवण्याचा सरकारपुरस्कृत कार्यक्रम सुरू करण्यात आला. पण दटून राहिलेला अन्नदाता बेफिकीर होता. त्याला माहीत होतं- तो हक्काची लढाई लढतोय आणि शेवटी विजय हक्कांचाच होतो.

एखाद्या शतकासारख्या लांबलचक असलेल्या एका वर्षांत शेतकऱ्यांनी काय सहन केलं नाही? ऋतूंचे तडाखे, सहकाऱ्यांचे मृत्यु, अपमान, बदनामी… पण त्यांनी हार मानली नाही. उलट त्यांनी आपल्या वर्तनातून देशातल्या नागरिकांपुढे एक आदर्श ठेवायला सुरुवात केली. या संपूर्ण आंदोलनाची खासीयत आणि वैशिष्ट्यं होतं- सिंघु, टिकरी आणि गाजीपूर सीमांवर पावलोपावली लागलेले लंगर. या आंदोलनानं दाखवून दिलं की, कुणीही उपाशीपोटी झोपणार नाही. जे आंदोलनात सहभागी आहेत ते आणि जे केवळ टेहळणी करायला आले आहेत तेही. सेवाभावी वृत्तीनं या संपूर्ण आंदोलनाचं मनोबल मजबूत केलं. आंदोलनातले लंगर तर एरवीच्या लंगरपेक्षाही बरेच पुढारलेले होते. तिथं कुणीही लहान-मोठं नव्हतं, कुठली जात वा धर्म पाहिला जात नव्हता, जो पंगतीत बसला, त्याला जेवण दिलं गेलं. सर्व एकाच पंगतीत जेवण करत आणि आपापल्या देवाच्या प्रार्थनाही.

एक ही सफ में बैठ गए महमूद-ओ-अयाज़

न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज़

पण या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी एक सुनियोजित कार्यक्रम आखला गेला. मात्र शेतकऱ्यांनी माध्यमांचा हा चेहरा फार आधीच ओळखला होता. त्यामुळे त्यांनी तीन कृषी कायद्यांची वकिली करणाऱ्या, शेतकऱ्यांना ‘गुंड’ म्हणणाऱ्या आणि अशाच कुठल्या कुठल्या विशेषणांनी संबोधित करणाऱ्या ‘गोदी मीडिया’वर जाहीर बहिष्कार टाकला. तटस्थ पत्रकारांचं आगत-स्वागत केलं. सोशल मीडियाची ताकद आणि त्याचा प्रसारही या शेतकऱ्यांनी वेळीच ओळखला होता. त्यांनी माध्यमांना उत्तर देण्यासाठी स्वत:चं ‘ट्रॉली टाइम्स’ हे वर्तमानपत्रं सुरू केलं. किसान मोर्चाच्या नावानं सोशल मीडियावरील सगळ्या व्यासपीठांवर आपली उपस्थिती केवळ दाखवूनच दिली नाही, तर कितीतरी शेतकऱ्यांना त्याचा कसा वापर करायचा हेही शिकवलं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या एका वर्षात शेतकरी राजकीय कटकारस्थानांचा सामना करणं, माध्यमांना सडतोड उत्तर देणं, संकटाच्या काळात हिंमत न हरता त्यावर उपाय शोधणं, खूप काही शिकले. ते हेही शिकले की, राजकारणाच्या गुळगुळीत गप्पा आणि लबाड्यांकडे कसं पाहायचं. केंद्र सरकारशी चर्चेच्या ११ फेऱ्यानंतरदेखील कुठलंही समाधान निघालं नाही, तेव्हाही ते हताश झाले नाहीत. उलट ती हिंमत त्यांनी एखाद्या शिकवणीसारखी समाजासमोर ठेवली.

आता ते परतत आहेत, तेव्हा त्यांच्याकडे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच्या एका कठीण प्रशिक्षणाचा अनुभव आहे. शांततेच्या मार्गाचा अवलंब करत अहंकारात बुडालेल्या सरकारला ‘यू-टर्न’ घ्यायला लावण्याचं कौशल्य आहे.

हेच कौशल्य हे शेतकरी लोकशाहीच्या अस्तित्वाची काळजी असलेल्या समाजांत वाटतील. त्यालाच तर ‘क्रांती’ म्हणतात!

अनुवाद - टीम अक्षरनामा

.................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://www.navjivanindia.com या हिंदी पोर्टलवर ९ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://www.navjivanindia.com/opinion/farmers-returning-victoriously-this-is-called-the-revolution

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा