प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि न अनुभवलेल्या मराठी साहित्य संमेलनांच्या काही आठवणी…
पडघम - साहित्यिक
कामिल पारखे
  • पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत
  • Wed , 01 December 2021
  • पडघम साहित्यिक साहित्य संमेलन Sahitya Sammelan पु.ल. देशपांडे Purushottam Laxman Deshpande दुर्गा भागवत Durga Bhagwat

खरे तर आतापर्यंत मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजेरी लावलेली नाही. इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून गोव्यात आणि नंतर पुण्यात मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन किंवा समारोपाचे भाषण कव्हर करण्यासाठी मी हजर राहिलो, ते केवळ बातमी करण्यासाठी.

विशेष म्हणजे तत्कालिन उद्घाटक किंवा मुख्य पाहुण्यांनी आम्हा वार्ताहरांना कधीही निराश केले नाही. मराठी भाषा आणि साहित्य याव्यतिरिक्त इतर विषयांवर त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आमच्या वृत्तपत्राच्या अमराठी वाचकांसाठीसुद्धा त्यांचे मत महत्त्वाचे ठरायचे.

कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन म्हणून ‘स्वामी’कार रणजित देसाई यांचे भाषण माझ्यासाठी असेच विस्मरणीय ठरले. दक्षिण गोव्यातल्या या संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी केले होते. त्यांचे कानडी ढंगाचे कोकणी समजून घेताना आम्हा बातमीदारांची त्रेधातिरपीट झाली होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मालवणला १९९४ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला एक ख्रिस्ती आणि वाचक म्हणून मी हजर होतो. संमेलनाध्यक्ष होते कवी निरंजन उजगरे, तर तत्कालिन शिवसेना नेते नारायण राणे प्रमुख पाहुणे. संमेलनाध्यक्ष उजगरे यांनी आपल्या भाषणात ‘दलित ख्रिस्ती’ या शब्दप्रयोगाविषयी नापसंती व्यक्त केली आणि अनेकांचा रोष ओढवून घेतला. वाढत्या विरोधामुळे नंतर त्यांना आपले विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली.

मालवणच्या मिलाग्रिस चर्चचे पॅरीश प्रीस्ट म्हणजे प्रमुख धर्मगुरू फादर ग्रॅब्रिएल डिसिल्वा या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. या तीन दिवसीय संमेलनातल्या जेवणात मासळीचा मुबलक वापर असल्याने आलेले पाहुणे व रसिक जाम खूष होते.

उदगीर (जि. लातूर) येथे भरलेल्या ‘मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलना’त मी पहिल्यांदा एक साहित्यिक म्हणून हजर होतो. हे संमेलन लक्षात राहिले, ते त्या वेळी तेथे निर्माण झालेल्या तणावामुळे. ‘हे संमेलन ख्रिस्ती धर्मांतरासाठी भरण्यात आले आहे’, असा आरोप करून ते उधळून लावण्याची धमकी एका स्थानिक दलित समाजघटकाने दिली होती. त्यामुळे जमलेल्या आम्हा पाहुण्यांच्या धड भोजनाचीसुद्धा व्यवस्था नीट झाली नव्हती. शेवटच्या दिवशी तर आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या एका पाळकाने म्हणजे पास्टरने सर्व पाहुण्यांना भरपेट नॉनव्हेज जेवण देऊन आयोजकांची अब्रू वाचवली होती.

श्रीरामपूर येथे अनुपमा डोंगरे-जोशी यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली झालेल्या ‘नवव्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलना’चे स्वागताध्यक्ष जेसुईट फादर जेम्स शेळके यांनी मात्र पाहुण्यांची शाही बडदास्त राखली होती. 

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

मात्र काही साहित्य संमेलनांना थेट हजर नसतानाही ती स्मरणात राहिली आहेत. ही संमेलने झाली, त्या वेळी म्हणजे सत्तरच्या दशकात मी शालेय विद्यार्थी होतो. तरीसुद्धा त्या संमेलनाआधी, दरम्यान आणि नंतर झालेले कवित्व, वाद आणि घडामोडी आजही आठवतात.

त्यातील पहिले म्हणजे इचलकरंजीत पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आणि त्यापाठोपाठ लगेच कराड येथे दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली ऐन आणीबाणीच्या काळात झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

इचलकरंजीचे संमेलन पन्नासावे (१९७४) असल्याने साहित्यविश्वात खूप उत्साह होता. या काळात मी शाळेत शिकत असलो तरी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली होती. तो जमाना वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा ‘सुवर्ण काळ’ होता, असे म्हटले तरी चालेल. याचे कारण म्हणजे त्या वेळी साक्षर झालेल्या लोकांची पहिली किंवा दुसरी पिढी दैनिके, विविध नियतकालिके आणि मासिके भरपूर, अगदी पुरवून पुरवून वाचत असे. या दैनिकांसाठी आणि इतर नियकालिकांसाठी ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ म्हणजे मोठी पर्वणीच होती.

मला वाटते, पुलंच्या अध्यक्षतेखाली भरलेले इचलकरंजीचे साहित्य संमेलन पहिलेच मोठे गाजलेले संमेलन. ते होण्यापूर्वी कितीतरी दिवस आधी नियकालिकांची पानेच्या पाने व रकाने त्याविषयीच्या मजकुराने भरत होती. संमेलनाध्यक्षांचे संपूर्ण भाषण पान एकवरून आतल्या पानावर आणि उद्घाटकांच्या भाषणाचा वृत्तान्त पान एकवरची पहिली बातमी म्हणजे लीड न्यूज होती. त्याशिवाय दैनिकांची इतर सर्व पाने संमेलनाविषयीच्या बातम्यांनी भरलेली होती.

कराडचे ५१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (१९७५) भरण्याआधी त्याभोवती वादाचे ढग जमायला सुरुवात झाली होती. संमेलनाध्यक्षा होत्या विदुषी दुर्गा भागवत आणि स्वागताध्यक्ष होते कराडचे सुपुत्र व तत्कालिन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे संमेलन होणार होते, त्या वेळचा काळ आणि परिस्थिती. हा काळ होता पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशभर लादलेल्या आणीबाणीचा. देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे बहुतेक नेते तुरुंगात होते. प्रसारमाध्यमांवर ‘सेन्सॉरशिप’ होती.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

तरी या संमेलनातल्या सर्व बातम्या वाचकांपर्यंत पोहोचत होत्या. मावळते संमेलनाध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी संमेलनाध्यक्षा दुर्गा भागवत यांच्याकडे सूत्रे सोपवताना केलेल्या भाषणाच्या वृत्तांताने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले होते. “खूप वापर झाला तर मेलेल्या कातडीपासून बनवलेले वहाणसुद्धा कुरकुरायला लागते,” अशा आशयाचे या संमेलनात पुलंनी म्हटलेले आणि दैनिकांत वाचलेले एक वाक्य अजून आठवते.

हे संमेलन अनेक कारणांनी आणि अर्थांनी आतापर्यंतचे सर्वांत गाजलेले आणि ऐतिहासिक म्हणता येईल. ते पार पडल्यानंतरसुद्धा त्याचे कवित्व लगेच संपले नाही. संमेलनानंतर काही दिवसांनी दुर्गाबाईंना अटक झाली आणि आणीबाणी शिथिल झाल्यावरच त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पु.ल. देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत हे सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या विरोधात हिरिरीने उतरले आणि काँग्रेसचे पानिपत झाल्यावर दोघेही पडद्याआड झाले.

हे संमेलन प्रत्यक्ष संमेलनस्थळी न जाताही अशा प्रकारे वृत्तपत्रांच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले. योगायोगाने केवळ एका वर्षांतच जेसुईट ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी मला कराडलाच जावे लागले. तिथे टिळक हायस्कूलात अकरावीचे शिक्षण घेताना नुकत्याच पार पडलेल्या संमेलनाची आठवण येणे साहजिकच होते. त्या वेळी आणीबाणीही चालूच होती.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कराडचे हे संमेलन केवळ मराठीच नाही तर सर्व भारतीयांनी सदा स्मरणात ठेवावे असे आहे. आणीबाणीच्या काळात हे संमेलन होत होते, तरीसुद्धा ‘सर्व काही अलबेल आहे’ असे मानणारे आणि सांगणारे बहुसंख्य लोक होते.

सध्याच्या विविध क्षेत्रांतील अनेक अर्थांनी भरकटलेल्या परिस्थितीत तर कराडचे ते संमेलन एखाद्या दीपगृहासारखे दिशा दाखवणारे झाले आहे. आणि सध्याच्या काळात पु.ल. देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या कणखर, राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावणाऱ्या, स्पष्टवक्त्या साहित्यिकांची कमतरता तर खूपच जाणवते आहे.

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......