फाळणीचा खरा आरोपी माउंटबॅटनच, असं बहुतेक भारतीय, ब्रिटिश आणि अमेरिकन लेखक मानतात!
पडघम - देशकारण
कॅ. मिलिंद परांजपे
  • फाळणीचं प्रातिनिधिक चित्र आणि लॉर्ड माउंटबॅटन
  • Tue , 17 August 2021
  • पडघम देशकारण फाळणी Partition भारत India पाकिस्तान Pakistan लॉर्ड माउंटबॅटन Lord Mountbatten सिरील रॅडक्लीफ Cyril Radcliffe राम मधवानी Ram Madhvani धीस ब्लडी लाईन This Bloody Line

अखंड हिंदुस्तानचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड लुई माउंटबॅटन दुसऱ्या महायुद्धातल्या ब्रिटिश आरमाराचे हिरो आणि आग्नेय आशियातल्या दोस्त राष्ट्रांचे सरसेनापती होते. जितक्या लढाया झाल्या, त्याच्यापेक्षा जास्त पदकं त्यांच्या गणवेशावर लावलेली असायची. ब्रिटिश राजघराण्याचे ते जवळचे नातेवाईकही होते. एकदाचा बॅ. जीनांच्या मनाप्रमाणे भारताची फाळणी करायची, असा निर्णय झाल्यावर माउंटबॅटननी सर सिरील रॅडक्लीफ या बॅरिस्टरला इंग्लंडहून बोलावून घेतलं. रॅडक्लीफ आधी इंग्लंडच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संचालक होते. त्यांना भारताबद्दल काडीचीही माहिती नव्हती. ते पॅरिसच्या पूर्वेलाही कधी गेले नव्हते. माउंटबॅटननी ४० कोटी जनतेचं भवितव्य धर्मावरून ठरवून उपखंडाच्या चिरफाडीची रेषा आखण्याचं काम त्यांच्यावर सोपवलं. त्यासाठी त्यांना सिमल्याला पोलीस बंदोबस्तातला एक प्रशस्त बंगला राहायला दिला आणि रॅडक्लीफ जास्त वेळेचा आग्रह धरत असताना फक्त पाच आठवड्यांची मुदत दिली.

कामाला सुरुवात करायच्या आधी रॅडक्लिफनी नकाशे शाळेत असताना भूगोलाच्या तासालाच तेवढे पाहिले असतील. सिमल्यात त्यांना दिलेले नकाशे आणि लोकसंख्येची माहिती जुनी आणि कालबाह्य होती, असं बहुतेक माहितगार म्हणतात. दोन मुस्लीम आणि दोन हिंदू सल्लागारांच्या मदतीनं रॅडक्लीफनी फाळणीची रेषा मारण्याचं काम १५ ऑगस्टपूर्वीच पूर्ण केलं आणि दुसऱ्या दिवशी ते विलायतेला चालू पडले. माउंटबॅटननी मात्र तो अहवाल कडीकुलुपात स्वतःजवळच ठेवला.        

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

१४ ऑगस्टला कराची आणि १५ ऑगस्टला दिल्लीत हस्तांतरणाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडल्यावर दोन दिवसांनी म्हणजे १७ तारखेस लॉर्डसाहेबांनी तो अहवाल उघड केला. तोपर्यंत अनेक हिंदूंना वाटत होतं, त्यांचं गाव भारतात असणार आहे आणि मुसलमानांची समजूत होती की, ते पाकिस्तानात असतील. अहवाल जाहीर झाल्यावर भ्रमाचा भोपळा फुटून दोन्ही धर्मियांना जो धक्का बसला, तो आयुष्यभर पुरणारा होता. त्यानंतर भीतीनं जी पळापळ सुरू झाली ती अभूतपूर्व होती.

रणजितसिगांची राजधानी असलेलं लाहोर पाकिस्तानला दिलं जाईल, असं कोणालाच वाटलं नव्हतं. नंतर झालेल्या दंगली आणि हिंसाचारात सुमारे दहा लाखांहून अधिक माणसं मारली गेली. कित्येक तरुण स्त्रिया बेपत्ता झाल्या. बेघरांची तर गणतीच नाही. फाळणीनंतर झालेल्या हत्येची वर्णनं वाचून अस्वस्थ आणि निराश झालेल्या रॅडक्लीफने त्यांची चाळीस हजार रुपयांची फी घ्यायलाही नकार दिला.

पूर्व बंगाल तोडून त्याचा पूर्व पाकिस्तान केल्यावर पलीकडचा आसाम एका बारा का पंधरा मैल रुंदीच्या पट्टीनं - तिला ‘चिकन नेक’ म्हणतात - उर्वरित भारताला जोडलेला राहिला. आर्थिक आणि सामाजिक दृष्टीनं तो कमकुवत राहणार हे उघडच होतं, पण परकीय आक्रमणासाठी त्याच्या सीमा पूर्णपणे असुरक्षित होणार होत्या. त्यावेळेस चितगांव बंदर जर भारताला मिळालं असतं किंवा ते भांडून घेतलं असतं तर निदान समुद्रमार्गे आसामशी संपर्क ठेवणं शक्य झालं असतं. पण नकाशे आणि फाळणीची रेषा माउंटबॅटननी अतिशय गुप्त ठेवल्यामुळे अशी मागणी भारतीय नेत्यांनी फाळणीपूर्वी करणं शक्य नव्हतं. नंतर केल्याचं कुठे कधी वाचनात आलं नाही.

सामरिकदृष्ट्या भारत फार मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत कायमचा अडकला. माउंटबॅटनचा तोच उद्देश होता. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आज ७०-७५ वर्षांनी कच्छच्या रणापासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित टेकड्यांपर्यंत ‘फाळणीची रेषा’ काटेरी तारांचं दुहेरी कुंपण, त्यामध्ये मुद्दाम पेरलेले हजारो सुरुंग आणि प्रखर प्रकाशाचे असंख्य दिवे यामुळे अवकाशातूनही दिसते. असल्या अनुत्पादक पण गरजेच्या झालेल्या गोष्टींवर दोन्ही गरीब देशांचा कोट्यवधींचा पैसा व्यर्थ खर्च होतो.

अमृतसर-लाहोर दरम्यान असलेल्या रस्त्यावर एकच प्रवेशद्वार या हजारो मैलांच्या सीमेवर आहे. भारताच्या बाजूस अत्तारी आणि पाकिस्तानच्या बाजूस वाघा या दोन गावांमधल्या क्रॉसिंगचं फाटक रोज संध्याकाळी बंद करताना दोन्ही देशांचे कडक इस्त्रीचे गणवेश परिधान केलेले ऐटबाज सैनिक आपापले झेंडे धीमेपणे एकेक इंचानं उतरवतात. त्या वेळची लष्करी कवाइत म्हणजे नाटकाचा प्रयोगच झाला आहे. तो पाहायला दोन्ही बाजूंना शेकडो पर्यटक जमतात. त्यांच्या आरोळ्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात आपापल्या देशाचा अभिमान आणि शेजारील देशावरचा राग, द्वेष दोन्ही दिसून येतो.         

पूर्वेला फाळणीच्या वेळेस अखंड बंगालमध्ये मुस्लीम लीगची सत्ता आणि सरकार होतं. फाळणीच्या आधीच तिथल्या नोआखालीत पद्धतशीरपणे शेकडो हिंदूंची कत्तल झाली. हिंदूंची घरं, व्यवसाय जाळून हिंदू स्त्रियांवर अत्याचार आणि जबरदस्तीनं धर्मांतरं केली गेली.

फाळणीनंतर बांगलादेशाच्या हद्दीपलीकडे भारताचे अनेक लहान लहान भूभाग आहेत, ज्यात सर्व प्रजा हिंदू असून ते भारतीय नागरिक आहेत. भारताच्या हद्दीच्या आत काही बांगलादेशचे भूभाग आहेत, ज्यात सर्व प्रजा मुस्लीम आणि बांगलादेशी आहे. पण त्यांना आपापल्या देशात जात येत नाही, कारण त्यांच्याकडे व्हिसा नाही आणि तो काढायला त्या भूभागाच्या बाहेर जात येत नाही, अशी चमत्कारिक स्थिती होती.

त्या भूभागांना बंगालीत ‘चितमहाल’ म्हणतात. बांग्लादेशातल्या काही भारतीय चितमहालांच्या आत पुन्हा बांगलादेशी चितमहाल होते. अशा एका चित्तमहालाच्या आत तर पुन्हा एक भारतीय चितमहाल होता. इतकी गुंतागुंत जगात कुठल्याही सीमाभागात नसेल. हा प्रश्न अनेक वर्षं तसाच होता. नेहरू आणि सर फिरोझखान नून यांनी तो सोडवायचा प्रयत्न केला, पण त्यासाठी घटनादुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली, तेवढ्यात पाकिस्तानबरोबरचे संबंध बिघडले आणि प्रश्न तसाच राहिला.

बांगलादेश युद्धानंतर इंदिरा गांधी आणि शेख मुजिबूर रहमान यांनी १९७४ साली पुन्हा प्रयत्न चालू केले. पंतप्रधान मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना मे २०१५मध्ये ढाक्क्यात भेटायला गेले असताना झालेल्या चर्चेत दोघांनी तो मिटवून टाकला. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यावर बांग्लादेशातले भूभाग बांग्लादेशचे भाग झाले, भारताच्या हद्दीतले भूभाग भारताला मिळाले. एकंदर १६२ भूभागांची अदलाबदल झाली. भूभागातील प्रजेला त्यांना ज्या देशाचं पाहिजे होतं, ते नागरिकत्व मिळालं. बांगलादेशी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं. बांग्लादेशातल्या भारतीय चितमहालातल्या ३५००० हिंदूंनी बांगलादेशी नागरिकत्व घेतलं आणि फक्त १००० हिंदू भारतात आले, हे आश्चर्यच होतं.

भारतात येणारे कुठे राहणार हा प्रश्नच होता. सतरा-अठराव्या शतकातील मोगल-कुचबिहार राज्यांच्या लढाया आणि नंतर झालेल्या तहाची कलमं, हे चितमहालांच्या निर्मितीचं मूळ कारण होतं. भारताची बांग्लादेशाबरोबर ४००० किमी लांबीची सीमा आहे, तर पाकिस्तानबरोबर ३३५३ किमी लांबीची.

राम मधवानींनी दहा मिनिटांचा एक माहितीपट तयार केला आहे. त्यात १९६६ साली डब्ल्यू. एच. ऑडेन (W.H. Auden) या प्रसिद्ध कवीनं रॅडक्लीफवर काव्य केलं आहे. ते तोवर जवळ जवळ आंधळा झालेल्या रॅडक्लीफला त्याची पत्नी वाचून दाखवते असं दृश्य आहे. ते वाचून पूर्ण होईपर्यंत रॅडक्लीफसारखा एक सामान्य सत्शील मनुष्य मानसिकदृष्ट्या कसा खचून जातो, हे पाहायला मिळतं. ऑडेनचं काव्य अवश्य वाचण्याजोगं आहे. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

फाळणीचा खरा आरोपी माउंटबॅटनच आहे, असं बहुतेक भारतीय, ब्रिटिश आणि अमेरिकन लेखक मानतात.

माउंटबॅटन मनानं इतका दुष्ट होता की, माहितीपटात रॅडक्लीफच्या पत्नीचा अभिनय करणारी लेडा हॉजसन नटीनं म्हटलं आहे, ‘त्यांनी जर लोखंडी खिळा गिळला तर त्याचा कॉर्कस्क्रू होऊन शरीरातून बाहेर येईल.’ स्वतःच्या राज्यात झालेल्या भयानक नरसंहाराचं त्याला कुठलंच सोयरसुतक नव्हतं. भारतापासून काश्मीर आणि हैदराबाद संस्थानं वेगळी करण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न इतिहासकार कधीच विसरणार नाहीत. १९७९ साली माउंटबॅटन आयर्लंडमध्ये सुटीसाठी गेला असताना आयरिश राष्ट्रवादींनी त्याच्या लहान बोटीत उडवलेल्या बॉम्बस्फोटात त्याचा १४ वर्षांचा नातू मेला, इतर कुटुंबीय जखमी झाले आणि माउंटबॅटनही मेला.       

                     

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

जर ‘त्या’ तीन पारशी बावांनी, किंवा त्यांच्यापैकी एकाने आपल्या व्यावसायिक नीतिमत्तेवरील निष्ठा पातळ केली असती तर…

काश्मीर प्रश्न सोडविण्याचे मार्ग

..................................................................................................................................................................

लेखक कॅ. मिलिंद परांजपे निवृत्त नौदल अधिकारी आहेत.

captparanjpe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......