आपल्याला जर राष्ट्र व्हायचं असेल वा एकसंध भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर जात-निर्मूलनाची गरज आहे!
पडघम - सांस्कृतिक
सुरेश वाघमारे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या ‘Annihilation of caste’चे मुखपृष्ठ
  • Wed , 03 March 2021
  • पडघम सांस्कृतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar जातिप्रथेचे विध्वंसन Annihilation of caste जात Caste धर्म Religion

‘मराठी समाजशास्त्र परिषदे’तर्फे १ फेब्रुवारी २०२१ रोजी संभाजी महाविद्यालया (मुरुड, जि. लातूर)चे माजी प्राचार्य सुरेश वाघमारे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जाती-निर्मूलनाचा विचार आणि वर्तमान परिस्थिती’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान झाले. त्याचे हे संक्षिप्त स्वरूपातले शब्दांकन...

..................................................................................................................................................................

सध्याच्या सामाजिक अस्वस्थतेच्या व धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात विधायक सामाजिक बदलाची गरज असून परंपराप्रिय व रूढीग्रस्त समाजाला आधुनिकतेकडे नेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यवस्थेत बदल होणे अपेक्षित आहे. कारण विद्यमान समाजात जातीव्यवस्था अत्यंत टोकदार बनत आहे. त्या विरोधात लढणे हे समाजशास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती-निर्मूलनाचा जो विचार दिला, तो विचार देश व समाज बांधणीला महत्त्वाचे योगदान देणारा आहे. जाती-निर्मूलनाच्या माध्यमातून देश खऱ्या अर्थाने एकात्म व मजबूत होऊ शकतो.

आंबेडकरांपूर्वी जाती-निर्मूलनाचा विचार भारतात जोरकसपणे कोणीही मांडला नाही. त्यांनी जातीव्यवस्थेवर परखड भाष्य करून प्रस्थापित विषमताग्रस्त समाजव्यवस्थेच्या विरोधात विचार मांडले. जाती-जातीत व सर्व पातळ्यांवरील विषमता व श्रेष्ठ-कनिष्ठता अंगी मुरलेल्या भारतीय समाजाला नव्या आधुनिक विचारांची गरज त्यांनी प्रतिपादन केली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्यायावर आधारित समाजाची उभारणी जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत भारतीय समाजाचा भविष्यकाळ उज्ज्वल होणार नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

जात आणि जातिव्यवस्था हा आंबेडकरांच्या अभ्यासाचा संशोधनाचा व चिंतनाचा विषय होता. अस्पृश्यतेचे चटके त्यांना बसले होते. पावलोपावली त्यांच्या मार्गात जात आडवी येत होती. जातीने त्यांना अंतर्मुख बनवले होते. जातिप्रथेचे विध्वंसन कसे करावे, हा विचार त्यांच्या मनात आयुष्यभर घोळत होता. विद्यार्थिदशेपासूनच जातीव्यवस्थेचे स्वरूप त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अभ्यासाला व चिंतनाला अनुभवाची जोड होती.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

जात या संस्थेचे त्यांनी सखोल आकलन करून घेतले होते. त्याचबरोबर जातीचे निर्मूलन करण्याचा संकल्पही त्यांनी केला होता. कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना आंबेडकरांनी ‘भारतातील जाती’ या शीर्षकाखाली एक विचारप्रवर्तक शोधनिबंध लिहिला. त्यामध्ये त्यांनी जात या संस्थेची व प्रथेची अतिशय खोलात जाऊन चिकित्सा केली. त्यानंतरही त्यांनी जात व जातीप्रथेवर बरेच लिखाण केले. ‘Annihilation of caste’ या पुस्तकात त्यांनी जातीप्रथेच्या निर्मूलनाची रणनीती सांगितली आहे.

जात आणि जातीव्यवस्था यावर आजपर्यंत अनेकांनी संशोधन केले आहे. पाश्चात्त्य विद्वान आणि भारतीय विद्वान या दोघांनीही तिच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत नेसफील्ड (Nesfield) आणि सर एच.रिस्ले या दोन पाश्चात्त्य विद्वानांचा आंबेडकर विशेषत्वाने उल्लेख करतात. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचेही नाव जातिव्यवस्थेच्या चिंतनासंदर्भात घेतले जाते. आंबेडकरांनी या विद्वानांची मते ग्राह्य मानलेली आहेत.

जात निर्मितीमध्ये विवाह हा महत्त्वपूर्ण घटक आहे. जात समावेशक असते. जात्यांतर्गत विवाह हाच जातीचा आधार आहे. जातींना पवित्र-अपवित्रतेच्या कल्पना चिकटवण्यात आल्या आणि त्यातूनच उच्चनीचता निर्माण झाली. जातीअंतर्गत विवाहामुळेच जात आणि जातीप्रथा टिकून आहे. हा मुद्दा बाबासाहेबांनी आपल्या ‘Caste in India: Their Mechanism, Genesis And Development’ (१९१६) या शोधनिबंधात प्रकर्षाने मांडला आहे.

जन्माधिष्ठित स्तरीकरणातूनच जाती व वर्ग निर्माण होतात आणि त्यांना शाश्वत असे स्वरूप प्राप्त होते. वर्ग जन्माधिष्ठित नाहीत व नसतात आणि म्हणून ते बदलता येतात. भारतीय समाजात जातीही आहेत आणि वर्गही आहेत. म्हणून ‘a caste is an enclosed class’ असे आंबेडकरांनी म्हटले आहे. जातीबाहेर विवाहाऐवजी आंतरजातीय विवाह केले तर जातीप्रथा नष्ट होईल, ही गोष्ट उघड आहे, पण याला लोकांचा विरोध आहे, कारण त्या पाठीमागे त्यांचे हितसंबंध, अज्ञान आणि अंधविश्वास दडून बसलेला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आंबेडकरांनी हाच विषय ‘Annihilation of Caste’ (१९३६) या पुस्तकात चर्चिला आहे. हे पुस्तक पंजाब प्रांतातील जात-पात-तोडक मंडळाच्या १९३५ साली लाहोर येथे आयोजित केलेल्या वार्षिक अधिवेशनासाठी लिहिलेले अध्यक्षीय भाषण आहे. पण त्यातील काही मुद्दे या मंडळींना विवादास्पद वाटल्याने हे नियोजित अधिवेशन झालेच नाही, पण आंबेडकरांनी हे भाषण पुस्तक रूपाने छापले. तसेच ते विविध भाषेत छापले गेल्याने अनेक लोकांपर्यंत पोहोचले.

या संदर्भात आंबेडकर म्हणाले होते- “माझा जो विचार आहे, त्या विचारापासून मी तसूभरही मागे हटणार नाही. एक तर तुम्ही माझ्या विचारांशी असहमत आहात असा ठराव करा अथवा माझ्या निषेधाचा ठराव मांडा. या भाषणातील परिच्छेदच नाही तर स्वल्पविरामही मी बदलणार नाही.”

यावरून ते या भाषणाबाबत किती आग्रही होते हे दिसून येते. यातून त्यांना नवा क्रांतिकारक विचार भारतीय समाजाला द्यायचा होता. या ग्रंथांतील त्यांचे विचार अतिशय स्फोटक व क्रांतिकारक आहेत. जाती पद्धती ही ज्या मूल्यांवर आधारलेली आहे, त्या धार्मिक मूल्यकल्पना नष्ट केल्याशिवाय जाती तोडणे शक्य नाही, हा या भाषणाचा मूळ गाभा आहे.

जातीनिर्मूलनाच्या माध्यमातून भारतीय समाजव्यवस्थेला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा त्यांचा मानस होता. जातीच्या पायावर कोणताही समाज खऱ्या अर्थाने उभा राहू शकणार नाही, म्हणून सामाजिक संरचनेत बदल करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जाती संस्थेत बदल करणे गरजेचे आहे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.

पोटजातीसुद्धा नष्ट केल्या पाहिजेत. विषमता व अज्ञानावर आधारलेल्या रूढी-परंपरेला नाकारले पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू. समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठतेची भावना नष्ट होईल. आंबेडकरांचा आंतरजातीय सहभोजनावर विश्वास नव्हता. सहभागी लोकांची जातीयतेची भावना जोपर्यंत नष्ट होणार नाही, तोपर्यंत याला अर्थ राहणार नाही. त्यासाठी आंतरजातीय विवाह हाच एक प्रभावी उपाय आहे, असे त्यांनी आग्रहाने सांगितले होते.

भारतासारख्या विषमताग्रस्त समाजाला प्रगतिपथाकडे जायचे असेल तर आंतरजातीय विवाह हा खरा उपाय आहे, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली आहे. आंतरजातीय विवाहाला विरोध मोठ्या प्रमाणामध्ये होतात. त्यासाठी समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. आंतरजातीय विवाहामध्ये विविध प्रकारचे अडथळे आहेत. त्यापैकी धर्मशास्त्र हासुद्धा महत्त्वाचा अडथळा आहे. समाजातील बहुसंख्य लोक धर्मशास्त्राचे पालन करतात. त्यासाठी धर्मशास्त्राचे खरे स्वरूप त्यांना समजावून सांगावे लागेल.

लोकांच्या मनात पावित्र्याची कल्पना आहे. त्याला ते प्रमाण म्हणतात. आंबेडकर या पावित्र्याच्या कल्पनेला विरोध करतात. बहुतांश लोकांच्या मनात पुरोहित वर्गाबद्दल आदराची भावना असते आणि हा वर्ग अज्ञान-अंधश्रद्धेच्या नावाखाली समाजाला विषमतेच्या खाईत लोटतो. विषमतेवर आधारलेले धर्मशास्त्र आपल्याला नाकारावे लागेल. ब्राह्मणेतर वर्ग हा विषमतेचा बळी आहे, म्हणून प्रस्थापित पुरोहित वर्गाला त्याने नाकारले पाहिजे.

आंबेडकर धर्माचे विरोधक नाहीत. धर्म हा मानवी जीवनाला आकार देतो, तो माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहे. माणसामाणसांत भेदाभेद निर्माण करणारा धर्म नको, तो समानतेवर आधारलेला हवा. आंबेडकरांना जातीव्यवस्थेमध्ये बदल होईल, ही अपेक्षा होती, कारण कोणतीच गोष्ट अपरिवर्तनीय नाही. परिवर्तन होऊ शकते. परंपरेला चिकटून राहणे, हा आपल्या प्रगतीतला अडथळा आहे. म्हणून मानवताविरोधी परंपरा नाकारल्या तरच नवनिर्मिती होईल, हा जॉन ड्यूईचा विचार आंबेडकर पुढे नेतात.

सामाजिक समता, न्याय, बंधुता यावरच खऱ्या अर्थाने राष्ट्राची उभारणी होईल. आपणाला जुन्या व खुळचट धार्मिक कल्पनेला तिलांजली देऊन समतेवर आधारलेल्या आधुनिक व वैज्ञानिक विचाराचा आधार घ्यावा लागेल. सामाजिक विषमतेचा पुरस्कार करणारे व त्यावर आधारलेले  धर्मग्रंथ आपणाला नाकारावे लागतील. जाती निर्मूलनाचे कार्य हे राष्ट्रीय कार्य आहे. स्वराज्य मिळवण्यापेक्षाही ते अवघड आहे. कारण जातीअंताचा लढा स्वकियांविरोधातच दिला जातो आणि तो लढलाच पाहिजे. राष्ट्रीय समस्या आहे म्हणून ती सोडवली पाहिजे. स्वकीयांशी लढणे हे परकियांशी लढण्यापेक्षा कितीतरी अवघड असते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जातीप्रथेने देशातील सामाजिक व राजकीय पर्यावरण दूषित केले आहे. तिने आमच्या सामाजिक व राजकीय राजकीय जीवनामध्ये विसंगती निर्माण केलेली आहे. जात आंतरजातीय विवाह केल्यानेच बदलू शकेल. आजचे राजकारण जातीवादाचा आधार घेऊन पुढे चालले आहे. संविधानाला अभिप्रेत असलेलं सामाजिक समतेचं, न्यायाचं वातावरण आज दिसून येत नाही. समाजाच्या ध्रुवीकरणासाठी जात वापरली जात आहे. जातीय संघटनांमुळे समाज संघटित होऊ शकत नाही. राष्ट्र तर अजिबात संघटित होऊ शकत नाही, तिचा आधार घेऊन कोणतीही सामाजिक क्रांती होत नाही. मात्र राजकारणी मंडळींना या गोष्टीचं भान नाही. जात माणसांमध्ये अहंकार, न्यूनगंड निर्माण करते. म्हणून अशा या जातीयतेला नष्ट करण्याचं फार मोठं आव्हान आपल्यासमोर उभं आहे.

सुशिक्षित वर्गामध्येही जातिव्यवस्थेचं समर्थन करणारा वर्ग निर्माण झाला आहे. सार्वजनिक व्यवहारांमध्ये दिसत नसली तरी अदृश्य स्वरूपात जातीव्यवस्था दिसून येते. आजही जातीनिहाय वस्त्या, शहरी भागातील उपनगरं दिसून येतात. जातीव्यवस्था सामाजिक व आर्थिक न्याय देण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करते. जातविहीन व वर्गविहीन समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जातीविरुद्ध सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल. आपल्याला जर राष्ट्र व्हायचं असेल वा एकसंध भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर जात-निर्मूलनाची गरज आहे.

 

शब्दांकन : प्रा. प्रियदर्शन भवरे (समाजशास्त्र विभाग, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना.)

priyadarshan1971@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा