भंडारा अग्नितांडवात नर्सेसचा बळी...
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर 
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवाचं एक छायाचित्र
  • Sat , 20 February 2021
  • पडघम राज्यकारण उद्धव ठाकरे Uddhav Thackeray राजेश टोपे Rajesh Tope भंडारा अग्नितांडव Bhandara hospital fire नर्स Nurs डॉक्टर Doctor सरकारी रुग्णालय Government Hospital

भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्नितांडव प्रकरणी दोन नर्सेस म्हणजे परिचारिकांवर  गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली आणि राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातलं (ग. दि. माडगूळकर यांचं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या) ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ या गाण्याची आठवण झाली! या अग्निकांडात आधी निरागस बालकांचा आणि आता आगीशी संबंध नसलेल्या दोन नर्सेसचा बळी गेला आहे, असाच या गुन्ह्यांचा अर्थ आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजब नाहीत, लहरी नाहीत, ते अत्यंत सुसंस्कृत आहेत, संवेदनशील आहेत, महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांची त्यांना अतिशय मूलभूत जाण आहे, असं माझं मत आहे. हे मत अर्थातच प्रदीर्घ अनुभवानंतर तयार झालेलं आहे. ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतली, तेव्हापासून त्यांचं राजकारण बघतो आहे आणि तेव्हापासून हे मत मी व्यक्त करत आलेलो आहे.

ठाकरे कार्याध्यक्ष झाले तेव्हा महाराष्ट्रातील बहुसंख्य पत्रकार आणि संपादक त्यांच्या नेतृत्व शैलीबद्दल प्रश्न उपस्थित करत असतानाही मी मात्र त्यांच्यासंबंधी व्यक्त केलेल्या मतांवर ठाम होतो आणि दोन दशकानंतर का असेना माझ्या त्या मताशी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर माध्यमांतील बहुसंख्य ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सहमत झालेत.

हे मी उपरोधिकपणे लिहीत नाहीये, कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब असतानाच पक्षाची सूत्रं ठाकरे यांच्याकडे आली आणि बाळासाहेब यांच्या मृत्यूनंतरही ती सूत्रं त्यांच्याकडेच राहिली. बाळासाहेब यांच्यासारखा करिष्मा असलेल्या नेत्याच्या पश्चातही राजकीय पक्ष कसा टिकवून ठेवावा, याचा एक आदर्श वस्तुपाठच ठाकरे यांनी लिहिला. त्यांनी पक्ष नेतृत्व म्हणून जी काही कामगिरी बजावली, त्याचं फळ म्हणून आज ना उद्या महाराष्ट्राची सूत्रं त्यांच्याकडे येणार, याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नव्हती आणि तसं घडलंही आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

म्हणूनच भंडारा अग्निकांड प्रकरणी दोन परिचारिकांवर भारतीय दंड संहितेच्या ३०४ (२) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, ही बाब काही स्पृहणीय नाही. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभा देणारी तर मुळीच नाही, हे स्पष्टपणे सांगायलाच हवं.

मुळामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये नर्स या पदाला फार मोठे अधिकारच नाहीत, हे मी माईला म्हणजे माझ्या आईला काम करताना जे काही बघितलं त्यावरून सांगतो. मराठवाड्याच्या अत्यंत दुर्गम भागात १९६० ते १९८० या काळामध्ये माईला नर्स म्हणून काम करताना बघितलं. तालुका आणि जिल्हा रुग्णालयातही काम करताना मी तिला बघितलं. त्या काळात नर्सचं जे जग मी अनुभवलं, ते मनावर कायम कोरलं गेलं.

आरोग्य व्यवस्थेच्या यंत्रणेमध्ये नर्सचं कामच मुळी केवळ रुग्णांची शुषुश्रा म्हणजे देखभाल करणं आहे, रुग्णालयाची देखभाल करणं नाही. रुग्णालयाचं प्रशासन सांभाळणंसुद्धा नर्सचं काम कधीच नसतं. त्या कामासाठी तिच्यापेक्षा वरिष्ठ असणारे, अनुभवी आणि तज्ज्ञ लोक असतात. भंडारा रुग्णालयातली आग ही शार्टसर्किटने लागली असं सांगण्यात आलेलं आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, तसं असेल तर त्याला नर्स जबाबदार कशा? विद्युत व्यवस्था सांभाळण्याचीही जबाबदारी नर्सेसवर सोपवण्यात आली आहे का? कुणी सोपवली, कधी सोपवली?

ज्या दोन नर्सेसवर गुन्हा दाखल झाला, त्या आग लागली तेव्हा बाल रुग्णांच्या कक्षात नव्हत्या म्हणे! त्याबद्दल फार फार तर त्यांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवून निलंबनाची शिक्षा देता आली असती. परंतु शार्टसर्किने आग लागते, तिची तज्ज्ञांमार्फत चौकशी केली जाते आणि त्यासाठी नर्सेसला जबाबदार धरल जातं, हे ‘अंधेर नगरी चौपट राजा’सारखं आहे. नर्सेस जर आगीसाठी जबाबदार असतील तर त्या इमारतीची देखभाल करणारे, विद्युत यंत्रणा आणि तत्सम यंत्र इन्स्टॉल करणारे, गुणवत्तेच्या दर्जाच्या निकषांवर ती यंत्रणा आणि संबंधित यंत्रे उत्कृष्ट दर्जाची होती की नाही हे पाहणारी यंत्रणा, त्या रुग्णालयातले प्रशासकीय अधिकारी, त्या रुग्णालयाचे जे सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी, प्रशासनातले अधिकारी, ज्यांच्याकडे त्या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी असते, त्यांच्या नियुक्त्या कशासाठी केल्या आहेत? 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

एक लक्षात घ्या, नर्स हा आरोग्य व्यवस्थेतला तसा उपेक्षितच घटक आहे. वेळप्रसंगी अखंड काम करून, रुग्णांच्या वेदनेच्या क्वचित रुग्णावर घोंगावणाऱ्या मृत्युच्या सावटात राहूनही त्यांच्या श्रमाचं चीज होत नाही, त्यांना कायमच दुर्लक्षित ठेवलं जातं, असा अनुभव आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णावर औषधोपचार करणं याशिवाय दुसरा कोणताही अधिकार नर्सला नाही. कोणत्याही रुग्णाला नर्सला स्वत:च्या मनानं/अधिकारात एखादं इंजक्शनच सोडाच, पण अन्य औषधं-गोळ्या देता येत नाहीत. डॉक्टर लिहून देतील त्याप्रमाणे औषधोपचार करणं आणि रुग्णाची देखभाल करण्यापलीकडे नर्सेसला कोणतेही अधिकार नाहीत.

अशा परिस्थितीमध्ये ती आग प्रतिबंधक यंत्रणा ठीक होती किंवा नाही, त्याची तपासणी व्यवस्थित होत होती का नाही, अचानकपणे आग लागली तर विद्युत पुरवठा आपोआप खंडित व्हावा, अशी यंत्रणा बसवण्यात आली होती की नाही, मुळात या सर्व यंत्रणा आहेत किंवा  नाहीत, याची जबाबदारी नर्सेसवर टाकणं कसं काय समर्थनीय आहे? 

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा. आरोग्यमंत्री म्हणून टोपे यांनी करोनाच्या काळात जोखीम पत्करून प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. या कामगिरीबद्दल त्यांचं मुक्तकंठानं कौतुक झालं आहे. मात्र, भंडारा अग्नितांडव प्रकरणी दोन नर्सेसचा बळी दिला जावा आणि त्याला आरोग्यमंत्री टोपे यांची मान्यता असावी हे काही पटू शकणारं नाही. आरोग्य व्यवस्थेतले म्हणजे भंडारा जिल्हा रुग्णालयातले जे इतर अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्यांना सोडून ज्यांचा या आगीशी प्रत्यक्ष तर सोडाच अप्रत्यक्षही कोणताही संबंध नाही, त्या नर्सेसना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं, हे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्यासारखं आहे.

म्हणूनच ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ हे गाणं आठवलं. हे गाणं भंडारा अग्निकांडाच्या संदर्भात खरं आहे, हा समज जनतेत पसरू नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे तसंच आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्तिश: या प्रकरणात लक्ष घालावं आणि जे कुणी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी असतील त्यांच्यावर कशी कारवाई होईल, याकडे जातीनं लक्ष द्यावं.

दुसरा एक मुद्दा. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरून बरंच वादंग निर्माण झालं. मात्र स्पष्ट सांगायला हवं, राज्यपालांना दिली गेलेली वागणूक खुजेपणाची असून महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्याला असा खुजेपणा शोभणारा नाही. महाराष्ट्राची ती परंपरा नाही. विरोधी पक्षाला आणि त्या पक्षाच्या नेत्याला कायम सन्मानानं वागवणारे, त्यांचा आदर करणारे शरद पवार राज्य सरकारचे ‘मेंटॉर’ असताना राज्यपालांना विमान नाकारलं जावं, ही काही पटणारी बाब नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

राज्यपाल आणि मुख्यमंत्री वाद या देशातल्या कुठल्याही राज्याला नवा नाही. अगदी काल-परवा पाँडेचरीत काय घडलं आणि अखेर पाँडेचरीच्या राज्यपाल किरण बेदी यांची कशी उचलबांगडी करावी लागली, हे आपण वाचलं आहे. महाराष्ट्रातही राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री किंवा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असे वादाचे अनेक प्रसंग कसे ओढवले, ते माझे एकेकाळचे दै. ‘लोकसत्ता’तील सहकारी संदीप प्रधान यांनी ‘लोकमत’च्या तीन-चार दिवसांपूर्वीच्या अंकात विस्तृतपणे लिहिलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या प्रसंगांची पुनरावृत्ती करत नाही.

ठाकरे यांचं सरकार राज्यपाल कोश्यारी प्रकरणात सुसंस्कृतपणे वागलं नाही. ठाकरे यांच्या संदर्भात या विषयावर थेट टीकाटिपणी करण्याचं कारण एकच की, राज्य सरकारचं विमान हा मुख्यमंत्रीच्या अधिकार कक्षेत येणारा विषय आहे. ठाकरे यांचे सल्लागार सध्या कोण आहेत, हे मला माहीत नाही आणि जे जाहीर सल्लागार आहेत, ते अजय मेहता हे काही फार कुशल अधिकारी किंवा सुसंस्कृत माणूस म्हणून प्रख्यात नाहीत. त्यांनी जर हा सल्ला दिला असेल तर माहीत नाही. पण ठाकरेंनी एक लक्षात ठेवावं, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक सुसंस्कृत माणूस अशी त्यांची प्रतिमा आहे. मुख्यमंत्रीपद आलं, पण ते काही वज्रपट नव्हे, कधी ना कधी  एक दिवस ते जाईलच. तरी  सुसंस्कृत म्हणून ठाकरे जनतेच्या कायम स्मरणात राहतील.

करोनाच्या काळात ज्या धीरानं ठाकरे यांनी परिस्थिती हाताळली, महाराष्ट्राच्या जनतेला जो मानसिक आधार दिला, या राज्याचा नेता म्हणून महाराष्ट्राच्या जनतेची जी काळजी घेतली, ती अविस्मरणीय आहे आणि त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणून त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. म्हणून त्यांच्या या सुसंस्कृतपणाच्या प्रतिमेला तडा जाईल, अशा पद्धतीची कोणतीही कृती त्यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......