‘आवाज’ : ‘खिडकी चित्रां’चा शिल्पकार, खपाचे विक्रम करणारा हा दिवाळी अंक यंदा ७० वर्षांचा झाला!
पडघम - साहित्यिक
माधव रामचंद्र दामले
  • यंदाच्या ‘आवाज’चं मुखपृष्ठ आणि त्याचे संस्थापक संपादक मधुकर पाटकर
  • Fri , 13 November 2020
  • पडघम साहित्यिक आवाज Aavaj मधुकर पाटकर Madhukar Patkar दिवाळी अंक Diwali Ank

काही दिवसांपूर्वी ‘आवाज’चे संपादक भारतभूषण पाटकर यांचं छायाचित्रं वर्तमानपत्रात पाहिलं. अगदी वडिलांप्रमाणे प्रसन्न आणि हसतमुख. त्यांच्याशी गप्पा मारताना कळलं की, यंदा ‘आवाज’ ७० वर्षं पूर्ण करत आहे. त्या निमित्तानं काही आठवणी जाग्या झाल्या.

१९५१ साली ‘आवाज’ वार्षिक विनोदी दिवाळी अंक म्हणून पहिल्यांदा प्रकाशित झाला. त्या काळात तो संपूर्णपणे विनोदाला वाहिलेला होता. पुढे कित्येक वर्षं आपली परंपरा राखत खेतवाडीतील खेमराज प्रिंटिंग प्रेसमध्ये त्याची छपाई होई. नंतर प्रमुख वितरक बाबुराव बागवे मोठ्या दिमाखात ‘आवाज’ची बंडलं सेंट्रल सिनेमाच्या कोपऱ्यावरील आपल्या कार्यालयात घेऊन जात. अंकाच्या वर्षांइतके ॲटमबॉम्ब तिथं फोडले जात. म्हणजे खास सोहळा साजरा होत असे!

बागवेंकडे मोठ्या फळ्यावर दाखल झालेल्या अंकांची नावं लिहिली जात. अंक संपला की, त्याच्यासमोर फुली पडे. कमीत कमी वेळात फुली पडण्याचा मान ‘आवाज’ने कित्येक वर्षं पटकावला.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

‘आवाज’ने पहिल्या वर्षापासून कटाक्षानं पाळलेली एक गोष्ट आजही सांभाळली जाते. अंकाच्या सुरुवातीच्या २४ पानांमध्ये कोणतीही ‘डोकेदुखी’ किंवा तत्सम आजाराची जाहिरात छापली जात नाही. तसंच अंकाच्या सुरुवातीला इतर तपशील म्हणजे संपादक, सहाय्यक संपादक, प्रकाशनाचे वर्ष, प्रकाशक, अर्थसहाय्य व त्यांचा तात्या छत्रीवाला अवतरे. नंतर लगेचच्या पानावर लेखकांची नामावली असे. पहिलं पान राजकीय विश्लेषण करणाऱ्या व्यंगचित्राचं असे. त्याच्यापाठोपाठ १९७१पर्यंत ‘आवाज’ची नभोवाणी’ असे, नंतर टीव्ही आल्यामुळे त्याचं नाव ‘जवळून दूरदर्शन’ असं झालं. सकाळी साडेसहा ते रात्री बारापर्यंत प्रत्येक विडंबनात्मक कार्यक्रम छापला जाई. पुढच्या पानावर चंद्रशेखर पतकींचं अर्धा पान व्यंगचित्र येई. त्यातील ‘ए फॉर अॅप्पल किपस द डॉक्टर अवे’ किंवा ‘हॉटेल मधुचंद्रमध्ये गेलेल्या नवदाम्पत्याच्या खोलीत स्पीड ब्रेकर लावलेला पलंग’ आजही आठवतात!

सुरुवातीच्या काही काळात ‘आवाज’ला फार प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे संपादक मधुकर पाटकर त्यांच्या सोलापूरच्या गजानन महाराजांकडे गेले. त्यांच्या कानावर प्रत्यक्ष परिस्थिती सांगून यापुढे अंक काढणं खूपच कठीण आहे, असं म्हणाले. पण चार-पाच दिवस राहूनही महाराज काही सांगत नाहीत म्हणून ‘मुंबईतील कामं खोळंबली आहेत’ असं महाराजांना सांगून परत यायला निघाले. टांगा उभा राहून निघायची वेळ झाली, तेव्हा महाराज पुढे आले आणि म्हणाले- ‘इथून पुढे आमचा प्रसाद समजून अंक काढा’.

१९६० साली बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा ‘आवाज’चं मुखपृष्ठ तयार केलं आणि त्यात ‘खिडकी चित्र’ ही भन्नाट कल्पना सुरू केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘आवाज’ची खऱ्या अर्थानं घोडदौड सुरू झाली. एबीसी या संस्थेचं ६०,०००हून अधिक प्रतींची विक्री करणारा अंक म्हणून ‘आवाज’ला सर्टिफिकेट मिळालं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘आवाज’मध्ये विविध विनोदी कथा आणि नामवंत व्यंगचित्रकारांची चित्रं वाचकांना पोट धरून हसायला लावत. त्याच काळात ‘आवाज’ने आपलं असं स्वतःचं स्थान निर्माण केलं. साधारणपणे गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘आवाज’चा पहिला फॉर्म छापायला जाई, नंतर दिवाळीपर्यंत मागे म्हणून बघणं नाही.

‘आवाज’मधील वसंत सबनीस यांच्या दोन कथा दादा कोंडके यांनी आपल्या चित्रपटासाठी निवडल्या आणि ‘सोंगाड्या’ व ‘एकटा जीव सदाशिव’ हे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीचे मानदंड ठरले.

‘आवाज’मध्ये सुरुवातीला पद्माकर डावरे एकांकिका लिहीत. दिवाळीनंतर त्या एकांकिका स्पर्धांमध्ये हमखास बक्षिसं मिळवून देत. पुढे वसंत कानेटकर यांच्याकडून हे काम पाटकर करून घ्यायला लागले. कानेटकरांच्या ‘मराठीने केला मद्रासी भ्रतार’ या एकांकिकेनं मोठी धमाल उडवून दिली. इतरही भाषांमध्ये तिचं भाषांतर होऊन तीच परंपरा राखली गेली.

‘आवाज’मध्ये छापून आलेल्या काही व्यंगचित्रांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. प्रभाकर ठोकळ यांनी काढलेल्या, महाभारत मालिका सुरू असताना, द्रौपदी वस्त्रहरणाच्या चित्राला कोण विसरेल! दुर्योधन दुःशासनला सांगतोय- ‘हे वस्त्रहरण ताबडतोब थांबवा, पांडव आपल्याला गंडवत आहेत. ती द्रौपदी नसून रूपा गांगुली आहे.’

कुटुंब नियोजनाची नर्स समोर उभं राहून सांगते- ‘देवी गांधारी, मला माफ करा. मला यायला उशीर झाला’. ठोकळ यांचं आणखीन एक चित्र पटकन समोर येतं. एका खानावळीत एक सदस्य बेभान होऊन नाचतोय आणि इतरांना सांगतोय ‘आज मला आमटीत तुरीच्या डाळीचा दाणा सापडला!’ एक नवरा आपल्या बायकोला दिवाळीची भेट घेऊन आला आहे आणि मोठ्या कौतुकानं तिच्यासमोर हातातील बॅग धरतो- ज्यातून अजगराची शेपटी बाहेर आलेली वाचकांना दिसते.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

काही वर्षांनी नाशिकचे ज्ञानेश सोनार ‘आवाज’मध्ये जादूई चित्रं काढू लागले. एकदा ‘ईन्ही लोगो ने ले लिया दुपट्टा मेरा’ या गाण्यावर आधारीत एक चित्रमाला छापायला गेली होती. मधल्या काळात त्या चित्रातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे पाटकरांनी ताबडतोब सोनारांना नाशिकला फोन करून नवीन चित्र काढून द्या आणि विमानाने नागपूरला पाठवा. तिथं बाबुराव धनवटे यांच्या छापखान्यामध्ये काही छपाई केली जाईल, असं सांगितलं. मृत व्यक्तीची टिंगलटवाळी नको म्हणून आपण हा निर्णय घेतला असं पाटकर यांनी सांगितलं.

मुकुंद टाकसाळे यांना काही आत्मचरित्रं वाचून एक लेख लिहून द्या, असं सांगताना त्यांना आत्मचरित्रं विकत घेण्यासाठी काही पैसे पाठवले. टाकसाळे यांचा हा लेख खूपच गाजला. आपल्याला हवं असलेलं लेखकाकडून नेमकेपणानं काढून घेणं, ही त्यांची खासीयत होती.

घरामध्ये पाटकरांना ‘भाऊ’ म्हणायचे मुगभाटातील खंबाटा चाळीत माळ्यावरील पोटमाळ्यात पाटकरांचं बिऱ्हाड होतं. स्वतः मधुकर पाटकर, त्यांचे बंधू कमलाकर पाटकर यांचे संसार त्याच जागी झाले. आता ती चाळ पाडून तिथं मोठा टॉवर झाला आहे.

‘आवाज’च्या वाचनाने विनोदी साहित्याची गोडी लागली. त्यामुळे पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, जयवंत दळवी, शन्ना नवरे, रमेश मंत्री, व. पु. काळे शामराव ओक, द. पा. खांबेटे, इंद्रायणी सावकार, मुकुंद टाकसाळे, मधू मंगेश कर्णिक आदींची नव्याने ओळख झाली. साधारणपणे १९५९ ते ६३ या वर्षांत आर्यन शाळेत असल्यामुळे जाता-येता बागवे यांच्या कार्यालयात डोकावण्याची सवय लागली. तिथेच अंकावर ‘फुली पडणे’ ही नवी ओळख झाली.

पाटकरांकडून कल्पना घेऊन ‘वक्त’ चित्रपट निघाला असावा, कारण भाऊंनी आपले तिन्ही चिरंजीव आपल्या अंकाच्या दृष्टीने तयार केले! मोठा उदय जे जे स्कूल ऑफ आर्टमधून जी. डी. आर्ट डिप्लोमा घेऊन अंकाची मांडणी करू लागला. सर्वांत धाकटा मुलगा सुहास हा विल्सन कॉलेजमधून आर्टसचा पदवीधर झाला. दुर्दैवानं उदय आणि सुहास आज हयात नाहीत. सुहासच्या निधनानंतर २०१०पासून नवीन तंत्रज्ञान अवगत करून भारतभूषण आपलं काम चोख करत आहे.

‘आवाज’मध्ये जाहिराती कोणत्याही मोठ्या कंपनीच्या असल्या तरी जाहिरात एजंटला एक प्रत आणि आणि त्या कंपनीला दुसरी प्रत याव्यतिरिक्त आणखीन कॉपी ते देत नसत. एकदा एका अग्रगण्य बँकेने जाहिरात नाकारली. स्वतः पाटकर बँकेच्या जनरल मॅनेजरला भेटायला गेले. जाहिरात नाकारण्याचं कारण जेव्हा समजलं, तेव्हा पाटकरांना हसू आवरेना. ‘आपण अंक बघायच्या आधी आपली पोरं तो पळवतात’ असं मॅनेजरनं सांगितलं.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भाऊंचे आमच्या वडिलांशी म्हणजे रामचंद्र (आर. व्ही.) दामले यांच्याशी खूप जवळचे संबंध होते. ते नेहमी 'स्वच्छ झब्बा आणि लेंगा' अशाच कपड्यांत असत. रस्त्यात भेटले की, खांद्यावर हात ठेवून जेव्हा बोलत, तेव्हा आपली त्यांच्याशी ओळख असल्याचा विशेष आनंद होई. बॉम्बे सेंट्रल इथं अल्लाना कंपाऊंडमध्ये त्यांचे ‘आवाज प्रिंटिंग प्रेस’ या नावाने कार्यालय होते. आमच्या वडिलांच्या व्यवसायामुळे खूप ओळखी झाल्या, परंतु पाटकर, एकबोटे, रायकर या गिरगावकर संपादकांबद्दल विशेष आस्था वाटे.

भाऊंच्या षष्टब्दीला वडिलांनी दिलेले पन्नास रुपये त्यांनी मोठ्या भक्तीनं आपल्या देवापुढे ठेवले. पुढे १९९६ साली भाऊ पाटकरांचं निधन झालं. त्यांचं ‘स्वप्न आणि श्रद्धा’ यांना धक्का न लावता सुरू असलेल्या या ७० वर्षांच्या चिरतरुण ‘आवाज’ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!    

..................................................................................................................................................................

लेखक माधव रामचंद्र दामले हे एक जिज्ञासू आणि अव्याहत वाचक आहेत.

mida_1978@yahoo.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा