‘टिपंवणी’ : सामाजिक इतिहासाचा आणि धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचा ऐवज
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कामिल पारखे
  • ‘टिपंवणी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 22 October 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो टिपंवणी Tipanvani सिसिलिया कार्व्हालो Cecilia Carvalho

पालघर जिल्ह्यातील वसई हे माझे एक आवडते सुट्टीचे ठिकाण. वर्षांतून किमान दोन-तीन दिवस माझा तेथे मुक्काम असतोच. याचे एक कारण म्हणजे माझ्याशी अत्यंत जवळचे, स्नेहाचे संबंध असलेली कुटुंबे तेथे आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे वसईचे गोव्याशी अनेक बाबतीत असलेले साम्य. या दोन्ही किनारपट्टीवरील प्रदेशांमध्ये एकेकाळी पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. वसईतली नारळांची झाडे, अनेक गावांत अजूनही राहिलेली हिरवाई, फळझाडे आणि फुलझाडांमध्ये असलेली टुमदार घरे, अरुंद रस्त्यांच्या चौकाचौकांत असलेले क्रूस आणि या क्रुसांसमोर दररोज संध्याकाळी तेवणाऱ्या मेणबत्त्या, बाजारांत आणि रस्त्यांवर विक्रीला असलेली मासळी, यामुळे आपण क्षणभर गोव्यातच आहोत, असे मला अनेकदा वाटते.

गोव्याचे आणि वसईचे ख्रिस्ती लोक यांच्या संस्कृतीतही खूप साम्य आहे. सिसिलिया कार्व्हालो यांचे ‘टिपंवणी’ हे आत्मचरित्र वाचताना वसईच्या या आगळ्यावेगळ्या समाजजीवनात खोलवर डोकावण्याचा अनुभव आला.

कार्व्हालो या मराठी साहित्यक्षेत्रात एक कवयित्री आणि विविध विषयांवर संशोधनपूर्ण लिखाण करणाऱ्या प्रतिभावान साहित्यिक म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रभर होणाऱ्या अनेक सभासंमेलनांत\कार्यक्रमांत हजेरी लावत असल्याने आणि अनेक चळवळींत सहभाग असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांना परिचित आहे. ख्रिस्ती समाजाच्या मर्यादित वर्तुळाबाहेर मराठी सारस्वतात ज्यांना साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून मान्यता आहे, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिसिलिया कार्व्हालो, अनुपमा उजगरे आणि गझलकार रमण रणदिवे यांचा समावेश होतो.

मात्र देशात आणि राज्यातही अल्पसंख्य असलेल्या ख्रिस्ती समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाबद्दल बहुसंख्य समाजाला माहिती नसते. मराठी साहित्याच्या सुरुवातीच्या इतिहासापासून ख्रिस्ती व्यक्तींनी अत्यंत मोलाचे साहित्यिक योगदान दिलेले असतानाही अशी परिस्थिती आहे. सतराव्या शतकातील ‘ख्रिस्तपुराण’कार फादर थॉमस स्टीफन्स, मराठी मुद्रणकलेचा पाया घालणारे रेव्ह. विल्यम कॅरी, मराठीतील आद्य कादंबरीकार बाबा पद्मनजी, ‘स्मृतिचित्रे’ लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, मराठी पंचकवींपैकी एक असलेले रेव्ह. नारायण वामन टिळक, मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून बायबल मराठीत आणणाऱ्या पंडिता रमाबाई अशी खूप मोठी यादी देता येईल. मात्र यापैकी कुणाच्याही साहित्यातून खास मराठी ख्रिस्ती समाजजीवनाचे व भावनांचे प्रतिबिंब उमटते, असे म्हणता येणार नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

कार्व्हालो या वसईतील ख्रिस्ती कुटुंबात वाढल्या. ख्रिस्ती धर्माच्या संस्कारांत त्यांची जडणघडण झाली. ख्रिस्ती मंदिरांतील अनेक चालीरीतींत आणि सांक्रामेंतांत सहभाग घेत असतानाच यापैकी काही कालबाह्य रूढी-परंपरांशी त्यांनी फारकत घेतली. शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या कार्व्हालो काही वर्षांपूर्वी वसईतील सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या प्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. लहानपणापासून अलीकडच्या काळापर्यंत कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक आणि भावनिक विश्वांतील अनेक प्रसंगांना कार्व्हालो यांनी आपल्या आत्मचरित्रात शब्दबद्ध केले आहे. ख्रिस्ती समाजजीवनाविषयी, चालीरीतींविषयी आणि श्रद्धांविषयी पूर्णतः अनभिज्ञ असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुसंख्य समाजाला आणि मराठी वाचकांना हे ३३२ पानांचे पुस्तक एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.

कार्व्हालो यांनी समाजजीवनातील बदलांबरोबरच चर्चमधील बदलांचीही या पुस्तकात नोंद घेतली आहे. १९७०च्या दशकापर्यंत जगभर चर्चमध्ये लॅटिन भाषेत मिस्साविधी आणि प्रार्थना व्हायच्या. १९६०च्या दशकात भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने सुधारणा अंमलात आल्याने सगळीकडे स्थानिक भाषांत धार्मिक विधी होऊ लागले. लेखिकेने लिहिले आहे – “आम्ही चर्चमध्ये जात असू, तेव्हा लॅटिन भाषेतून धार्मिक विधी चालत. धर्मगुरू त्यांची भरजरी वस्त्रे घालून वेदीकडे तोंड व लोकांकडे पाठ करून मिस्साबलिदान साजरे करत. ते वेदीवरील देवाशी पुटपुटत, लॅटिनमध्ये ते काय बोलतात तेच कळत नसे. पण त्या भाषेतला गोडवा आणि संगीत आपले लक्ष विचलित होऊ देत नसे. ‘सांतुम... सांतुम... सांतुम...’ असे शब्द उच्चारताच सारे वातावरण ‘पवित्र’ होऊन जात असे.”

वरील वर्णन केवळ वसईतील चर्चलाच नाही, तर १९७०च्या आधीच्या जगभरातील सर्वच चर्चमधील भाविकांसाठी लागू होईल.       

मात्र लॅटिन भाषा समजत नसली तरी भक्ताचा भाव महत्त्वाचा, तो कोणती प्रार्थना म्हणतो ते महत्त्वाचे नाही, हे लेखिकेने ‘टोपल्यावर टोपली, शंभर टोपली’ अशी प्रार्थना म्हणणाऱ्या एका साध्या बाईचे उदाहरण देऊन सांगितले आहे. आश्चर्य म्हणजे परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला हवे ते मिळाले, असे सांगून कार्व्हालो लिहितात – “तात्पर्य, असे की, कोणी अडाणी असो की, पंडित पण मनापासून केलेली प्रार्थना महत्त्वाची. मनातला भाव महत्त्वाचा. भाषा महत्त्वाची नाही.”      

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

................................................................................................................................................................. 

वसईच्या आपल्या ख्रिस्ती घरातील धार्मिक वातावरण, नियमितपणे कम्युनियन आणि कुमसार (प्रायश्चित किंवा कन्फेशन) घेण्याबद्दल मनावर झालेले संस्कार याबद्दल लेखिकेने लिहिले आहे. नियमितपणे चर्चला जाणारे मुले-मुली नंतर ‘फादर’ (धर्मगुरू) आणि ‘सिस्टर’ (धर्मभगिनी किंवा नन) होऊ शकतात, अशी भावना त्या काळात केवळ वसईतच नव्हे, तर जगभरातील सर्वच धार्मिक ख्रिस्ती समाजात असायची. धार्मिक कुटुंबातील पालक आपले एकतरी मूल फादर किंवा सिस्टर व्हावे अशी इच्छा बाळगत असत. कार्व्हालो यांनी आपणही एकेकाळी नन होण्याचा विचार केला होता, असे लिहिले आहे. मात्र नंतर त्यांनी आपला विचार बदलला आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द निवडली. ‘सुवार्ता’ मासिकाचे त्यावेळचे संपादक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी याबाबत दिलेल्या एका सल्ल्याने आपले मतपरिवर्तन झाले असे कार्व्हालो यांनी लिहिले आहे. “नन झालीस तर दिवसभराच्या नेमून दिलेल्या कामाच्या व्यापात तू तुझी लेखनातली निर्मितीशीलता गमावून बसशील,” असे फादर दिब्रिटोंनी त्यांना सांगितले होते.

लहानपणी चर्चमधील मिस्सेला दररोज जाणे, नंतर दर रविवारी आणि सणासुदीला जाणे वगैरे धार्मिक प्रथा पाळण्यापासून आपल्या आणि वसईतील इतरांच्याही सामाजिक व धार्मिक जीवनांत झालेले बदल कार्व्हालो यांनी टिपले आहेत. 

एके ठिकाणी त्यांनी लिहिले आहे - ‘‘दारासमोरच्या कुडीत दोन डुकरे होती. घरातलं उरलंसुरलं किंवा भाताची पेज यात कुंडा कालवून आय डुकरांना घालीत असे. घराघरात डुक्करपालनाचा जोडधंदा होता. ज्यांच्या घरी डुकरं नसत ते त्यांच्या घरातली भाताची पेज शेजाऱ्यांना देत वा कधी शेजाऱ्यांकडून मागितली जात असे. काही बाया तर दारोदार पेज मागत फिरत असत. सणावाराला, लग्न व इतर सोहळ्यांसाठी डुकर मारणे हे प्रतिष्ठेचे समजले जाई.”

हे वाचल्यावर गोव्यात आमच्या हॉस्टेलमध्ये दिवसातून दोनदा भाजीपाल्याचा टाकून दिलेला भाग आणि खाद्यपदार्थांचा उरलेला भाग मोठ्या डब्यातून नेणारा आमचा शेजारी ख्रिसमसला व ईस्टर सणाला आमच्यासाठी खास वेगळे डुक्कर आम्हाला आधी दाखवून राखून ठेवत असे आणि या डुकरांच्या मांसापासून बनवलेले विंदालू आणि सोरपोतेल आणून देत असे, हे आठवले.       

“सणावाराच्या दिवशी बहुतेक घरात डुक्कर, कोंबडीचे मटण शिजत असे. इंदियाला, सरपोतेल, टेपरात असे विनीगर घालून तयार केलेल्या डुकराच्या मटणाच्या पदार्थांच्या वासावर सारा गाव झुलत असे,” हे कार्व्हालो यांनी केलेले वर्णन वाचले आणि गोव्यात सणावारानिमित्त अत्यंत लोकप्रिय असलेल्या खास पोर्तुगीज वळणाच्या भरपूर तेल आणि मसाले घालून रटरट शिजवलेल्या विंदालू, सोरपोतेल आणि भरपूर नारळ घालून केलेल्या चिकन आणि बिफ शाकुतीची आठवण आली. वसईतील ख्रिस्ती समाज हा मराठी समाजाचाच एक भाग असला तरी ही खाद्यसंस्कृती तशी मराठी समाजाला पूर्णपणे अनोळखी आहे.

कार्व्हालो २०००मध्ये नाशिक येथे भरलेल्या अठराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांदरम्यान झालेल्या अनेक वादांबाबत कार्व्हालो यांनी परखड भूमिका घेतली. त्याबाबत त्या म्हणतात – “एकमेकांच्या विषयीचा आकस आणि मनाचा कोतेपणा व संकुचितपणा सोडून देण्याचीही आवश्यकता असते. त्यासाठी पुढे येऊन स्पष्ट आणि सत्य बोलण्याचीही गरज असते. ते काम अनेकदा मला करावे लागले आणि ख्रिस्तविचाराच्या पावलावर पाऊल टाकून आपण चाललो आहोत, याची जाणीव तीव्र होत गेली. तीही कोणा ‘गॉडफादर’विना!”

कार्व्हालो हे नाव असलेली ख्रिस्ती महिला मराठी कशी बोलते, मराठीत कविता आणि इतर लिखाण कशी करते, याचे महाराष्ट्रातील अनेकांना कायम आश्चर्य आणि अप्रूप वाटत आले आहे. त्याविषयी कार्व्हालो लिहितात – “आम्हा वसईतील कॅथॉलिकांची नावं पोर्तुगीज होती. त्यामुळे आम्हाला मराठी बोलता येत नाही असे लोकांना वाटे. कुठेही गेलं तरी इंग्रजीत बोलायला सुरुवात करत आणि आम्हाला तर इंग्रजीही धड येत नसे.”

एकदा कार्व्हालो नाशिकला काव्यवाचनाला गेल्या होत्या, तेव्हा एक बाई आपल्या शाळकरी मुलीला घेऊन त्यांना भेटायला आल्या. ‘ख्रिस्ती लोकांना मराठी येते का?’ असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा कार्व्हालो म्हणाल्या- ‘‘धर्म आणि भाषा यांचा संबंध काय? कोणत्याही धर्माच्या कोणीही, कोणतीही भाषा, बोलायला- शिकायला कसलेही बंधन नाही.’’ हे ऐकताच ती शाळकरी मुलगी एकदम गांगरली. ती मुलगी आणि तिची आई एकदम ‘मॉडर्न’ वाटत होत्या आणि मी साडी नेसलेली, कपाळावर कुंकू लावलेली, केसाचा अंबाडा घातलेली अशी ‘काकूबाई’ दिसत होते.”

वसई येथील आपल्या वाडवळी बोलीभाषेतील अनेक शब्दांचा, संज्ञांचा आणि वाक्प्रचारांचा कार्व्हालो यांनी या आत्मचरित्रात भरपूर वापर केला आहे. ‘टिपंवणी’ या शीर्षकाविषयी त्या लिहितात – “ ‘टिपं’ म्हणजे थेंब आणि ‘वणी’ म्हणजे ‘पाणी’. ‘टिपंवणी’ म्हणजे थेंब थेंब पाणी. तसेच ‘टिपं’ म्हणजे अश्रूंचे थेंब. थेंबाथेंबाने अश्रू ढाळणे म्हणजे  ‘टिपं’ गाळणे. प्रतिभाशक्तीने जे देणं-लेणं दिलं, त्याचं विविध प्रकारचं साहित्य झालं आणि हृदयात जे साचलं होतं, साचत राहिलं, किंबहुना पाण्यासारखं वळत राहिलं ते ‘टिपंवणी’त मांडावंसं वाटलं. या साऱ्या आठवणी डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि पाणीदार अशाही!”   

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जगभरातील ख्रिस्ती समाज एकजिनसी आहे, असा काहींचा गैरसमज असतो, मात्र त्यात तथ्य नाही. ख्रिस्ती समाजात कितीतरी पंथ आहेत, त्यापैकी मी स्वतः केवळ दहा-बारा नावेच सांगू शकेल. भारतात तर सर्वच राज्यांमध्ये जातिव्यवस्थेने ख्रिस्ती समाजाचीही अनेक शकले केली आहेत. वसईतील ख्रिस्ती समाज त्याला कसा अपवाद असू शकेल? कॉलेजच्या प्राचार्यपदावरचा आपला हक्क एकदा डावलला गेला होता, याचे कारण म्हणजे ‘सामवेदी ख्रिस्ती आणि वाडवळ ख्रिस्ती हा भेद आडवा आला’ असे त्यांनी लिहिले आहे.   

ख्रिस्ती साहित्यिकांनी केवळ ख्रिस्ती विषयच हाताळावे की, इतर विषयांत सखोल अभ्यास करावा, याविषयी कार्व्हालो यांनी केलेली एक मार्मिक टिपणी मला आवडली. त्या लिहितात – “काही विषय दुर्लक्षित राहतात म्हणून ख्रिस्ती संशोधकांनी ख्रिस्ती समाजातील लेखकांकडे आणि त्यांच्या साहित्याकडे वळावे हे खरे आहे. परंतु फादर डलरी, फादर मॅथ्यू लेदर्ले, फादर कामिल बुल्के यांच्यासारखे अनेक धर्मगुरू जसे हिंदू दैवतांचा अभ्यास करण्याकडे वळले, तसा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन बळावयाला हवा. अनेक मराठी संशोधकांनी अत्यंत तर्कशुद्धपणे ख्रिस्ती धर्मीय मराठी लेखकांच्या साहित्यावर संशोधनात्मक मांडणी केली आहे.”

‘टिपंवणी’ लिहून कार्व्हालो यांनी ख्रिस्ती धर्मातील एक वेगळी बोलीभाषा आणि भिन्न चालीरीती असणाऱ्या एका छोट्याशा समूहाची ओळख करून दिली आहे. हे आत्मचरित्र सामाजिक इतिहासाचा आणि धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचा ऐवज आहे.    

‘टिपंवणी’ - डॉ. सिसिलिया कार्व्हालो

ग्रंथाली, मुंबई

पाने - ३३२, मूल्य - ४०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 28 October 2020

नमस्कार कामिल पारखे!

सिसिलिया कार्व्हालो या नावाने लोकसत्तेत लेख यायचे ते मला आठवतं. त्या सदराच्या लेखिकेने ( की लेखकाने? ) टोपणनाव घेतलंय, असा माझा समज झाला होता. कारण की ठाण्याला गडकरी रंगायतनच्या समोर समर्थ शाळेच्या जवळ सिसिलिया नावाचा बार सुरु झाला होता. अर्थात, सगळे नियम धाब्यावर बसवून! त्यामुळे सिसिलिया कार्व्हालो हे एका फटाकड्या तरुणीचं नाव वाटायचं. पण आज तुमच्या लेखामुळे अनपेक्षित माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद.

वसईच्या ख्रिस्ती पब्लिकशी इंग्रजीतनं संवाद साधणं हा एक भयाण विनोद आहे. बरीचशी मराठी हिंदू लोकं ख्रिस्ती आणि अँग्लो इंडियन यांच्यात गल्लत करतात. युरोपीय धाटणीची नावं दिसली की त्यांना अँग्लो इंडियन समजून इंग्रजीत व्यवहार साधायला जातात. ख्रिस्ती हा येशूचा भक्त असतो. तो शुद्ध मराठी नाव-आडनावाचा असू शकतो. अशी चंदू बोरडे, विजय हजारे, निरंजन उजगरे, इत्यादि नावं चटकन आठवली. याउलट अँग्लो इंडियन माणसाचे किमान एक पूर्वज इंग्लिश व किमान एक पूर्वज भारतीय असतो. बरेचसे अँग्लो इंडियन ख्रिस्ती आहेत. काही हिंदूही आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली ही अँग्लो इंडियन हिंदू आहे.

सिसिलिया ताईंनी ज्या तडफेने आपलं मराठीपण टिकवून ठेवलंय त्यास तोड नाही. खरंतर याबाबत सगळ्याच मराठी ख्रिस्ती वसईकरांचं कौतुक आहे. सिसिलिया ताईंची मराठीतून व्यक्त व्हायची मनीषा पाहून संतोष वाटला. भाषा टिकते ती अशा प्रेमातून.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......