टीव्हीवर होणारा तमाशा हा नियोजनपूर्वक आखलेला कट आहे, जनतेचा आक्रोश रोखण्यासाठीची अफू आहे!
पडघम - देशकारण
ज़फ़र आग़ा
  • चित्र - मंजुल
  • Tue , 15 September 2020
  • पडघम देशकारण सुशांतसिंग राजपूत Sushant Singh Rajpu रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty

‘न खुदा ही मिला न विसाले सनम’! उर्दूमधील या म्हणीचा अर्थ काहीसा असा आहे की – ‘ना ईश्वर मिळाला, ना जगाचा आनंद मिळाला’. सध्या देशाची स्थिती काहीशी अशीच आहे. कारण हा लेख लिहिताना माझ्यासमोर जी वर्तमानपत्रं आहेत, त्यात दोन मोठ्या बातम्या आहेत. पहिल्या बातमीनुसार या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये (एप्रिल ते जून) भारताची अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी घसरली आहे.

असं भारताच्या सांख्यिकीय इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. राष्ट्रीय सांख्यिकीय विभागाने जे आकडे जाहीर केले आहेत, त्यानुसार इमारती बांधकामामध्ये ५०.३ टक्क्यांची, कारखान्यांच्या उत्पादनांमध्ये ३९.४ टक्क्यांची आणि खरेदी-विक्री, हॉटेल उद्योग यांसारख्या इतर सेवाक्षेत्रामध्ये ४७.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. केवळ शेती हा एकच विभाग असा आहे, ज्यात ३.४ टक्के इतकी वाढ झाली आहे.

हे मोठे आकडे अर्थतज्ज्ञ चांगल्या प्रकारे समजू शकतात. पण तुमच्या-माझ्यासारखे सामान्य लोक सरकारी आकड्यांच्या आधारावर असे म्हणू शकतात की, मागच्या तीन महिन्यांत शहरं आर्थिक बाबतीत डबघाईला आली आहेत. केवळ खेडेगावांत शेतीच्या कामामुळे जनजीवन चालू आहे. आता प्रश्न असा पडतो की, हे का झालं? त्याचं सरळ उत्तर असं आहे की, मार्चपासून आतापर्यंत करोना महामारी रोखण्यासाठी सरकारने जवळपास जूनपर्यंत जे लॉकडाउन घोषित केलं, त्यामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

आता दुसरा प्रश्न असा आहे की, करोना महामारीची काय स्थिती आहे? तर वर्तमानपत्रांतल्या दुसऱ्या बातमीनुसार त्याची स्थिती अशी आहे – फक्त ऑगस्ट महिन्यात जवळपास २० लाख भारतीय या महामारीच्या कचाट्यात सापडले आहेत. हा जागतिक पातळीवर एक विक्रम आहे. आता लक्षात आलं असेल की - ‘न खुदा ही मिला न विसाले सनम!’

ना महामारीचा प्रकोप कमी झाला, ना अर्थव्यवस्था सावरली गेली. म्हणजे स्वर्गही गेला आणि जगणंही गेलं. थोडक्यात सामान्य भारतीयांसाठी आता केवळ एक मार्ग शिल्लक राहिलाय. ते म्हणजे मरण. कारण आता सामान्य माणूस एक तर करोनाच्या कचाट्यात सापडून मरू शकतो किंवा अर्थव्यवस्थेच्या जंजाळात फसून उपाशीपोटी मरू शकतो. या दोन्हीतून देवाच्या कृपेनेच वाचू शकतो, वाचलाच तर.

भारतात हे काय घडत आहे? सहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सत्तेत येण्याआधी भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर होती. भारत ही जगातली सर्वांत मोठी बाजारपेठ होती, ज्यावर सर्वांचा डोळा होता. आता सरकारी आकड्यांनुसार भारतातील १२ कोटी तरुण गेल्या तीन महिन्यांत बेरोजगार झाला आहे. तो संकटांमुळे घाबरून जाऊन नाउमेद होत आहे आणि रोज आत्महत्येच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

भारतीय महामारीच्या कचाट्यात सापडताहेत किंवा बेरोजगारी व भूकेची शिकार होत आहेत, हाच मोदींचा ‘न्यू इंडिया’ आहे का? सत्य हे आहे की, मोदींच्या ‘न्यू इंडिया’चं हेच होणार होतं. कारण त्याचा भर ‘द्वेषा’वर आहे. त्यात इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीनुसार जनतेला हिंदू-मुस्लीम ‘द्वेषा’ची अफू रोज पाजली जात आहे. मात्र त्यांना रोजगार देण्यापेक्षा तो काढून घेतला जात आहे. एकीकडे देशात भूकमारी पसरत आहे, तर दुसरीकडे लूट चालू आहे.

मागच्या आठवड्यात जीएसटी कौन्सिलची बैठक झाली. त्यातून हे उघड झालं की, केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे काही राज्य सरकारांना आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार देता आलेला नाही. अशी अवस्था आहे की, केंद्र सरकार पिढ्यांपासूनची संपत्ती म्हणजे सरकारी कंपन्या विकून आपला खर्च भागवत आहे. सरकार त्याला वाट्टेल ते विकतंय, वाट्टेल तिथला माल हपापा करतंय, बँकामधला जनतेचा पैसा भांडवलदारांना कर्ज देऊन बँका बुडवतंय. आणि जनतेच्या वाट्याला काय? काहीच नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत जवळपास २४ टक्क्यांनी अर्थव्यवस्थेची घसरण झाली आहे.

पण दुसरीकडे एक अजब स्थिती आहे, ती प्रत्येकाच्या कल्पनेबाहेरची आहे. अशा परिस्थितीत सरकारविरोधात मोठा असंतोष निर्माण व्हायला हवा होता. पण भारतातल्या रस्त्यांवर शांतता आहे. कुठेही धरणं, निदर्शनं नाहीत. त्याचं सर्वांत मोठं कारण असं आहे की, टीव्हीच्या माध्यमातून जनतेला रोज अफू पाजली जात आहे. त्यामुळे ही जनता आपल्या समस्या विसरून टीव्हीवर चालणाऱ्या एक तासाच्या ‘सोप ऑपेरा’च्या जंजाळात अडकत आहे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : रिया चक्रवर्तीला ‘चेटकीण’ ठरवणारे आणि ‘सती’ देऊ पाहणारे उतावीळ लोक

..................................................................................................................................................................

सध्या सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्येला ‘सोप ऑपेरा’ बनवण्यात आलंय. ‘रिपब्लिक टीव्ही’ आणि ‘इंडिया टुडे टीव्ही’ यांवर रोज एक एपिसोड येतो, त्याच्या जाळ्यात रोज प्रत्येक माणूस अडकून पडतो. फिल्मी दुनिया हे सामान्य माणसांसाठी नेहमीच रहस्यमय जग राहिलं आहे. बॉलिवुडची चमक-धमक, संपत्ती, ऐश्वर्य प्रत्येक व्यक्तीला प्रभावित करतं. प्रत्येकाच्या हे लक्षात येत नाही की, हे जग चालतं कसं? इथं संपत्ती आणि तारुण्य या दोन माणसांच्या सर्वांत मोठ्या मर्यादांचा सतत धबाधबा चालू असतो.

प्रत्येकाला हे जाणून घेण्याची इच्छा असते की, बॉलिवुडमध्ये काय चाललंय. कारण सामान्य माणसाच्या निशिबात ना ती संपत्ती, ना ते ऐश्वर्य, ना ते तारुण्य असतं. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की, सामान्य माणसाला या फिल्मी दुनियेबद्दल केवळ कुतूहलच नाही तर काहीशी ईर्ष्याही असते.

भारतीय टीव्हीने सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला ‘बॉलिवुड एपिसोड’ बनवून टाकलंय. सगळ्या बॉलिवुडला सेक्स, ड्रग्ज, षडयंत्र यांची गटारगंगा बनवून टाकलंय. सध्या त्याचा हिरो सुशांतसिंग राजपूत आहे आणि खलनायिका आहे रिया चक्रवर्ती. टीव्हीवर रोज त्यांची कहाणी एका भागानंतर एक अशा प्रकारे सादर केली जाते, जणू काही साऱ्या भारताला त्यातच स्वारस्य आहे. त्यामुळे जनतेला याचंही भान नाहीये की, ती करोना महामारी आणि बरबाद होत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या जंजाळात फसली आहे.

अर्णब गोस्वामीसारखा चतुर अँकर जनतेच्या मनात भरलेला आक्रोश त्याच्या टकमक टोकावर घेऊन जातोय. आपल्या ओरड्याने, फटक्याने रोज एखाद्या खलनायकाचा वध करून जनतेच्या आक्रोशाचं पानिपत करतोय. इंग्रजीत याला ‘कॅथार्सिस’ म्हणतात. अशा प्रकारे टीव्हीच्या माध्यमातून जनतेचं मन रोज हलकं केलं जातंय.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

रोज तुम्ही टीव्हीवर जो वेडाचार आणि आरडाओरड पाहता, तो वेडाचार नाही तर ‘नियोजनपूर्वक आखलेला कट’ आहे. त्यामागचा उद्देश आहे की, रोज एका खोट्या शत्रूचा वध करून प्रत्यक्षातल्या समस्यांवरून पसरणाऱ्या असंतोषाचा स्फोट होण्यापासून जनतेला परावृत्त करणं. एका ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिकेने मला फोनवर विचारलं की, हा वेडाचार आहे का? आपण कुठल्या जगात वावरतोय?

एका विचार माणसासाठी नक्कीच हा वेडाचारच असायला हवा. पण नरेंद्र मोदी जो ‘न्यू इंडिया’ बनवू पाहताहेत, त्यात द्वेषच द्वेषच आहे, रोज कुणातरी शत्रूची हत्या आहे. ती ‘मॉब लिचिंग’ही असू असते किंवा ‘टीव्ही लिचिंग’ही असू शकते. कारण त्यामुळे सामान्य जनता आपली आर्थिक-सामाजिक दुर्दशा विसरून आपल्या खोट्यानाट्या शत्रूच्या हत्येचा आनंद घेत राहते आणि सरकार मजेत देशाची गंगाजळी ओरबाडत राहतं. नक्कीच हा वेडाचार आहे, पण तो यशस्वी वेडाचार आहे. त्याची शिकार तुम्हीआम्ही आहोत. पण जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत हा वेडाचार चालू राहील… आणि यशस्वीही होत राहील.

अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख दै. ‘नवजीवन’च्या पोर्टलवर ४ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा - 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा