रा. ना. चव्हाण हे ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्या ज्ञानपरंपरेतील ‘विचारनिष्ठा’ असलेलं महत्त्वाचं नाव!
ग्रंथनामा - झलक
सुशील धसकटे
  • ‘विचारशलाका या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 August 2020
  • ग्रंथनामा झलक विचारशलाका Vicharshalaka रा. ना. चव्हाण R. N. Chavhan

रा. ना. चव्हाण हे मराठीतील एक विवेकशील, संयमी आणि समन्वयवादी, पण तरीही परखडपणे लिहिणारे अभ्यासक, कार्यकर्ते. त्यांच्या निवडक लेखांचा ‘विचारशलाका’ हा संग्रह रा. ना. चव्हाण प्रतिष्ठा, वाई यांनी नुकताच प्रकाशित केला आहे. या संग्रहाला लिहिलेले हे प्रास्ताविक...

..................................................................................................................................................................

अनेक वर्षं मनात खदखदणारा एक प्रश्न, रा. ना. चव्हाण यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने मांडणं मला अतिशय सयुक्तिक आणि औचित्यपूर्ण वाटतं. म्हणून त्या प्रश्नाच्या अनुरोधानेच प्रास्ताविक करतो.

महाराष्ट्रात विचारांच्या व अभ्यासाच्या क्षेत्रात ‘अ‍ॅकेडेमिशियन असलेले’ आणि ‘अ‍ॅकेडेमिशियन नसलेले’ असे दोन प्रवाह समांतरपणे चालताना दिसतात. रूढार्थाने ‘अ‍ॅकेडेमिशियन’- त्यातही विद्यापीठीय ‘अ‍ॅकेडेमिशियन’ असण्याला महाराष्ट्रात अलीकडे बौद्धिकक्षेत्रात (पूर्वीपेक्षा अधिक) महत्त्व प्राप्त झाले आहे. बहुतांश साहित्यसंस्था, वृत्तपत्रे, नियतकालिके, विद्यापीठे, विद्यार्थी असे समाजातील विविध घटक शिक्षक किंवा प्राध्यापकाने लिहिलेल्या, मांडलेल्या विचारांना डोळे झाकून प्राधान्य देताना वा मान्यता देताना दिसतात. ज्ञानदानाच्या प्रक्रियेतील शिक्षक-प्राध्यापक यांच्यावरील समाजाचा असलेला हा विश्वास वा धारणा पूर्वीपासून चालत आलेली आपण पाहतो.

‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्यांनी लिहिलेल्या वा केलेल्या मांडणीला फार महत्त्व न देणं किंवा त्या व्यक्तीला डावलणं, किंबहुना तिची निर्भर्त्सना करणं, कमी लेखणं, अनुल्लेखाने मारणं, असे ‘बौद्धिक/बुद्धिवादी’ प्रकारही समांतरपणे चालताना दिसतात. शिवाय तथाकथित ‘अ‍ॅकेडेमिशियन’ असलेल्यांना विद्यापीठे, यूजीसी, शासकीय योजनांकडून भरघोस शिष्यवृत्त्या, अनुदाने व सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतात, आर्थिक सुबत्ताही असते. त्या तुलनेत ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्यांना सुविधा, शिष्यवृत्त्या, विद्यापीठीय सरंजाम वगैरे यातलं काही नसतं. एका अर्थाने कसल्याच सुविधा वा आर्थिक लाभ नसताना, ‘स्व-कष्ट’, ‘स्व-वेळ’, ‘स्व-खर्च’ करून समाजासाठी ‘व्रत’ आणि ‘जीवननिष्ठा’ म्हणून लिहिणं, हा त्याग शैक्षणिक विश्वात दखल घेण्याजोगा का ठरू नये?

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

यासंबंधाने ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ या ग्रंथात स्वत: शरद पाटील हे खूप मार्मिकपणे ‘आतलं’ लिहितात, “दिवसा ग्रामीण गोरगरीब व अतिशूद्र यांच्यासाठी लढणे आणि रात्री त्यांच्या देशाचा इतिहास जाणण्यासाठी पुस्तकांशी. मी अ‍ॅकेडेमिशियन नाही. म्हणून अ‍ॅकेडेमिक सोयी अनुपलब्ध. त्यात मी अवैतनिक जीवनदानी कार्यकर्ता. चळवळीसाठी उपासमार, पुस्तके मिळवण्यासाठी अजीजी व खरीदण्यासाठी भीक. सहाफुटी तरुण देह; म्हणून सामान्य भारतीयापेक्षा जास्त भुकेला. एक शूद्र म्हणून जेवढे जाणायचे - नवब्राह्मणी कम्युनिस्ट नेतृत्वाच्या कटाक्षानुसार - त्यापेक्षा जास्त जाणायची हाव. पण, माझ्याविषयी, किंबहुना माझ्या ज्ञानोपासनेविषयी ज्यांना सहानुभूती - त्यातले बहुसंख्य कम्युनिस्टेतर -त्यांच्याकडून पुस्तके वा पैसे वा अन्न वा निवारा. त्यांच्या नावांची यादी मोठी.”

रूढार्थाने ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्या अशा अस्सल ज्ञानव्रतींची शासन, सामाजिक संस्था, विद्यापीठे आणि तत्सम शैक्षणिक संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनास्था-उपेक्षा झालेली दिसून येते. ‘ज्ञाननिर्मिती’कडे पाहण्याची आपली दृष्टी किती हेळसांडपणाची, वरवरची आणि गैरलागू नियमांच्या चौकटीत ठोकून बसवण्याची आणि (आणि म्हणूनच मला ती ‘अशैक्षणिक’ व ‘अनुत्पादक’ ज्ञानिर्मितीचा स्त्रोत वाटते) आहे, हे लक्षात येते.

महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकातील जोतीराव फुले यांच्यापासून ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्या मंडळींची एक स्वतंत्र व अतिशय समृद्ध परंपरा दाखवता येते. त्यात महर्षी विठ्ठलराव रामजी शिंदे, अनेक वर्षे कष्टून ज्ञानकोश तयार करणारे श्रीधर व्यंकटेश केतकर, सत्यशोधक प्राच्यविद्याविद् शरद पाटील, लोकसाहित्याचे अभ्यासक रा. चिं. ढेरे, किंवा अलीकडेच शिवाजी विद्यापीठाने ज्यांचा ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ हा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित केला ते कोल्हापूरचे मारुती जाधव तळाशीकर गुरुजी यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी आहेत. वाईचे सत्यशोधक रा. ना. चव्हाण हे एक याच ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्या ज्ञानपरंपरेतील ‘विचारनिष्ठा’ असलेलं महत्त्वाचं नाव!

..................................................................................................................................................................

हेही वाचा : गीतांजलीच्या कविता अगदी साध्या आहेत. कल्पनारम्य विलास नाही. अभासी जीवनाचा स्पर्श नाही. म्हणून ही खरी कविता आहे.

..................................................................................................................................................................

रा. ना. चव्हाण हे तथाकथित ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नव्हते. मात्र आयुष्यभर त्यांनी फुले आणि शिंदे यांच्या विचारनिष्ठेने महाराष्ट्रीय समाजाला जातपात-पंथधर्म आदींमुळे विलगता येऊ नये म्हणून सतत विचारप्रवण ठेवलं. सतत विचारविवेक दिला. असं असलं तरी रा.नां.च्या संदर्भातही वर उल्लेखिलेला - अ‍ॅकेडेमिशियन नसल्याचा - मुद्दा अनौपचारिक चर्चेत उपस्थित केला जातो. वास्तविक हाही जातिभेदाप्रमाणे किंवा इतर भेदांप्रमाणेच ज्ञानाच्या, अभ्यासाच्या क्षेत्रात सुशिक्षितांकडून केला जाणारा ‘भेद’ वाटतो. हा भेद ओलांडून रा.नां.च्या एकूण विचारकार्याकडे पाहिलं म्हणजे त्यांच्यातील निरलस विचारक, निरलस ज्ञानव्रती, निरलस अभ्यासक आणि निरलस समाजशिक्षक दृष्टीस पडतो.

या संदर्भात सदर पुस्तकात एकेठिकाणी रा.नां.नीच याचे उत्तर दिले आहे, “पुस्तकी पंडित पोथीपुस्तक यातला किडा बनतो व त्याला सामाजिक व्यवहारज्ञान अवघड जाते किंवा तो दूर राहतो. हा प्रकार अपरिहार्य नसला तरी अनिष्टच होय. संत, पंडित नव्हते तरी प्रत्यक्ष जनसंबंध वाढवून त्यांनी सामाजिक अद्वैत सिद्ध केले.”

किंवा,

“शिक्षण व शहाणपण हातात हात घालून कसे पुढे जाईल, हा आजचा प्रश्न आहे.”

असे कितीतरी वर्षांपूर्वीच त्यांनी लिहून ठेवलं आहे. तरल बुद्धिचापल्य आणि भूतकाळ-वर्तमानाचं सूक्ष्म आकलन असल्याशिवाय काळाच्या पुढं जाणारा असा विचार मांडणं अशक्य असतं, याचा प्रत्यय सदर पुस्तकाच्या पानोपानी येतो. 

‘विचारशलाका’ हा रा. ना. चव्हाण यांच्या प्रबोधनात्मक निवडक निबंधांचा संग्रह आहे. शिवछत्रपती, जोतीराव फुले, भाषा-साहित्य-संस्कृती-समाजजीवनापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंतचा एक व्यापक विचारांचा पैस या निबंधांत सामावलेला आहे.

या संग्रहातील ‘साहित्य, संस्कृती व समाजजीवन’; ‘वैचारिक समन्वय आणि सामाजिकतेचा विकास’; ‘आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय’; ‘महर्षी कार्ल मार्क्स व फुले’; ‘डॉ. आंबेडकर व एम. एन. रॉय’ आदी निबंध हे लक्षवेधक व अभ्यासाला चालना देणारे, तसेच एकूण भारतीय जीवन कुठे चालले आहे, याचा अभ्यासपूर्ण पडताळा घेणारे आहेत.

सत्यशोधन हा पाया, विचारांची क्षमता, समतोल व व्यापक दृष्टिकोन, समाजाप्रती वाटणारी प्रचंड आस्था व तळमळ, निरपेक्ष भावना, अशा रा.नां.च्या लेखकीय व्यक्तित्वाशी संबंधित अनेक बाबींचा उलगडा ‘विचारशलाका’मधून होतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

वास्तविक, फळाची अपेक्षा न धरता समाजहितैषी विचार सातत्याने मांडणार्‍या रा.नां.च्या एकूण विचारकार्याची तरुणांच्या दृष्टीने प्रस्तुतता काय, याचा कानोसा घेतल्यास त्यांच्यातील ‘संवादोत्सुक’ तरुणही भेटतो. त्या दृष्टीने पाहता ‘व्यायामप्रिय महात्मा फुले यांचा अल्प परिचय’ हा रा.नां.नी इयत्ता सातवीमध्ये असताना लिहिलेला निबंध (१९३३) महत्त्वाचा आहे. त्यातून जोतीरावांच्या विचारांकडे जाणारा रस्ता दाखवणारा १९ वर्षांचा तरुण ‘रामचंद्र चव्हाण’ भेटतो.

रा.नां.च्या समग्र लेखनातील असे अनेक निबंध किंवा लेख तरुणांशी त्यांची नाळ जुळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटतात. उदा. ‘विकृती नाहीशी करून संस्कृती शुद्ध करणे, हादेखील साहित्याचा उद्देश असावा’, ‘बुद्धीविक्रय बंद होऊन बुद्धिवाद बळावला पाहिजे, बौद्धिक स्वातंत्र्य हेच सर्वश्रेष्ठ आहे’, ‘माणसाला पिळणारे व पिळून घेणारे असे दोन प्रकार राहतील तोपर्यंत तरी मार्क्स व फुले मार्गदर्शक राहतील म्हणजे नेतृत्व करतील,’ इत्यादी इत्यादी या पुस्तकातून अशी शेकडो उदधृते वेचून काढली तर तरुण पिढीसाठी सुविचारांचे नवे पुस्तक होईल. तरुणांशी संवादी असणारे किती तरी विचार रा.ना. सहजगत्या मांडून जातात.

शेवटी, रा.नां.च्या शब्दांचा आधार घेऊन ‘पक्षातीत राहून नि:पक्षपातीपणे विवेक करणारे विवेकवंत फारच दुर्मीळ असतात’ आणि ‘अभ्यास-मनन-चिंतनाद्वारे प्रश्नांचे चालू स्वरूप व पुढील परिणाम यांचे भविष्यकालीन स्वरूप विचारवंत व्यक्त करू शकतात’ हे पाहता रा. ना. चव्हाण यांच्यासारख्या नि:स्पृहपणे विचार मांडणी करणाऱ्या विचारकाच्या विचारांची आजच्या समाजातील दांभिक कोलाहलात किती आवश्यकता आहे, याची खात्रीच पटते.

..................................................................................................................................................................

विचारशलाका - रा. ना. चव्हाण,

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई

पाने - १९२, मूल्य - २५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 14 August 2020

सुशील धसकटे, लेखाबद्दल धन्यवाद. चव्हाणांचं हे वाक्य महत्त्वाचं वाटलं :

“शिक्षण व शहाणपण हातात हात घालून कसे पुढे जाईल, हा आजचा प्रश्न आहे.”
माझ्या मते हा प्रश्न कधीच सुटणार नाहीये. कारण की वर ज्याला शिक्षण म्हटलंय ते शिक्षण नाहीच्चे मुळी. आपण जे शाळाकॉलेजात शिकतो ते केवळ प्रशिक्षण आहे. कसलं प्रशिक्षण आहे ते बरं?
ते आहे कारकून बनायचं प्रशिक्षण. भले पदवी काहीही असो, विद्यार्थी कारकूनच बनणार. बदल तिकडे पाहिजे.
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......