गीतांजलीच्या कविता अगदी साध्या आहेत. कल्पनारम्य विलास नाही. अभासी जीवनाचा स्पर्श नाही. म्हणून ही खरी कविता आहे.
ग्रंथनामा - झलक
फादर जो. मा. पिठेकर
  • ‘गीतांजलीच्या कविता’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 August 2020
  • ग्रंथनामा झलक गीतांजलीच्या कविता Gitanjalichya Kavita गीतांजली घै Gitanjali Ghai

गीतांजली घै या १६व्या वर्षी कॅन्सरने मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कविता काही वर्षांपूर्वी इंग्रजीमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. त्याचा नुकताच ‘गीतांजलीच्या कविता’ या नावाने मराठी अनुवाद करण्यात आला आहे. रांची येथील ‘झेवियर पब्लिकेशन’ यांनी प्रकाशित केलेल्या आणि फादर अशोक ओहोळ यांनी भावानुवाद केलेल्या या संग्रहाला फादर जो. मा. पिठेकर (एस. जे. मणिकपूर, वसई) यांनी प्रस्तावना लिहिली आहे. ती ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी...

..................................................................................................................................................................

गीतांजलीच्या कविता मी प्रथम १९८०च्या सुमारास इंग्रजीतून वाचल्या. एक शाळकरी मुलगी एवढ्या अर्थपूर्ण कविता लिहू शकते, यावर माझा विश्वासच बसेना. मी त्या कविता सिस्टर लोकांना (ख्रिस्ती साध्वी) रीट्रीट (साधारण एक आठवड्याचे आध्यात्मिक सत्र) देताना वापरू लागलो.

गीतांजलीचे नाव टागोरांच्या ‘गीतांजली’ या नोबेल पारितोषिक विजेत्या पुस्तकावरून दिले होते. त्या नावास मी सार्थ ठरेन का, अशी तिच्या मनात शंका होती. पण सर्व कविता वाचल्यावर आपल्या मनात ती शंका मुळीच राहत नाही. त्यासाठी तिने केलेली प्रार्थना देवाने ऐकली. इंग्रजीतील प्रसिद्ध कवी, पत्रकार प्रीतीश नंदी यांनी म्हटलंय की, ‘कठीण प्रसंगांना, आजारांना तोंड देताना लहान मुलांना ती धीटपणा देऊन तिच्या कवितांतून त्यांना सूक्ष्म दृष्टी देऊ करील.’ (गीतांजली भाषांतर, सुनील शामसुंदर आढाव, सिग्नेट पब्लिकेशन, पुणे, २०१४).

गीतांजलीच्या कविता पहिल्यांदा कविता वाचल्या, तेव्हा तिचे दु:ख जाणवले. पण त्या दु:खामागची सखोलता, तिची देवावरील श्रद्धा, जीवनाविषयीची विशेष आस्था, माणसांविषयीची कळकळ या सखोल भावना मला जाणवल्या नाहीत. आपल्या दु:खामध्येही तिचा आत्मा देवाच्या इतका जवळ होता की, त्याची कल्पना तिच्या शब्दांद्वारे होऊ शकत नाही.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

फक्त १६ वर्षाची मुलगी, शाळेत शिकणारी. कॅन्सरने आजारी. दु:ख सहन होत नाही आणि बरे होण्याची शक्यता तर मुळीच नाही. तीच म्हणते-

‘एक तर शेवट कर माझा

या मेणबत्तीच्या वातीचा

किंवा प्रकाशू दे तिला

आणखी काही वर्षे’

(‘त्यांच्या डोळ्यात खात्री नव्हती’)

ती पुढे म्हणते, ‘काय केलंय मी हे भोग माझ्या वाट्याला आले’ (इवलीशी प्रेमपत्रं’), तरीपण ती खचलेली नाही, ‘तरीही खंबीर आहे मी मृत्युला सामोरे जायला (‘माझी प्रार्थना’).

गीतांजलीला आपल्या मानसिक व शारिरीक दु:खांची जाणीव आहे. आपले दु:ख, वेदना ती आपल्या आईला किंवा इतरांना दाखवू इच्छित नाही. ‘कारण मी खूप ग्रासलेय वेदनांनी’ (‘माझ्या भेटीला ये), ‘अशक्य होतंय आता लपवणं दु:ख माझं’ (‘निरव शांततेत), ‘खोल तीव्र वेदना अन् व्याकूळ करणाऱ्या यातना अनुभवल्यात मी’ (‘आठवणीच तेवढ्या उरल्यात’), ‘माझ्या हृदयाच्या तळाशी खोल लाटा दु:खाच्या’ (‘खोल लाटा दु:खाच्या’)…

हे सर्व वाचताना मन जड व्हायचे. पुढे जाणे कठीण व्हायचे. माझ्या मनाला जाणवायचे की, ही मुलगी कोवळी आहे. तिने अजून जग पाहिले नाही. उलट ती आपल्यालाच धीर देते. ‘वेदनांतही मी हसमुख असण्याचा सर्वतोपरी प्रयास करते’ (‘वेदनातही हसतमुख’) म्हणून तिची देवाकडे प्रार्थना आहे, ‘वाहून जाऊ देऊ नकोस मला आत्मदयेच्या महापुरात’ (‘सहनशीलता’).

वेदना असह्य आहेत, मरण अटळ आहे तरी तिचा देवावर अमाप, अढळ विश्वास आहे. असह्य दु:खामुळे आईच्या मनात अस्वस्थता आहे. तिचेही मन अस्थिर आहे. अशा परिस्थितीत ती म्हणते, ‘देवाची कुजबुज मला ऐकू द्या’ (नि:श्वास). जणू ती आपल्याला प्रश्न विचारते- ‘का थांबावं गायचं मी केवळ बरी नाही म्हणून?’ (‘पक्षीगाणं). ‘नका, नका, नका अश्रू ढाळू नका ते नकोत मला केवळ तुमची स्मितहास्ये हवीत (येते मित्रांनो’)…

ती आपल्याला अमर सत्याची ओळख करून देते. दु:ख, वेदना यातून शिकण्यासारखे खूप आहे. ‘दु:खामुळे घडतं दर्शन सत्याचं’ (दर्शन सत्याचं).

..................................................................................................................................................................

हेही वाचा : मुरलीधर शिंगोटे : ‘मुंबई नावाच्या विद्यापीठा’त शिकलेला मातब्बर संपादक-मालक

..................................................................................................................................................................

गीतांजलीच्या वेदना केवळ शारिरीक नाहीत. आपले कोवळे जीवन मरणाने नष्ट होणार आहे, याविषयी तिच्या मनात तिळमात्र शंका नाही. तिचे वडील जवळ नाहीत. ‘प्रिय पपा मला भेटायला या’ (‘नको उशीर एवढा’) ही तिची आर्त मुकी आरोळी आहे. आपल्याला त्या मूक आरोळीची कल्पना करवणार नाही. कारण त्याच कवितेत ती पुढे प्रेतयात्रेविषयी म्हणते, ‘त्यांच्यात तुम्हीही माझ्या मागे चालाल याची मला शंका वाटते’. पण मरणापूर्वी वडील तिला भेटतात. दिवस-रात्र आईच तिच्यासोबत असते. आईच्या हृदयाची कालवाकालव तिला जाणवते. आईचा रात्रंदिवस पहारा आहे, जागरण आहे. 

बरं होऊन जीवन मनासारखं जगण्याची तिची इच्छा आहे. तिचं भव्य स्वप्न असं आहे. ‘माझ्या हाताने दुबळ्या-गरिबांना भरवणं, त्यांचे अश्रू पुसणं, त्यांना आनंदी उत्साही पाहणं’ (‘मोजलेले दिवस’). पण हे स्वप्न तिला जगता येणं शक्य नाही. या अतिव निराशेत तिच्या आईचा सहभाग आहे. याविषयी ती अतिसंवेदनशील आहे. ती स्वत:च्या दु:खातच बुडालेली नाही. ‘उज्ज्वल आशेची.... स्वप्नं आता अंधुक झालीत’ (‘आशा). तीच आपल्या मनात शंका निर्माण करते. ते वाचून आपलंही हृदय खचतं. ‘होतील का माझी स्वप्नं खरी जगेल का मी ती उमलताना पहायला’ (‘स्वप्न मरणासन्न हृदयाची’).

नियती किती निष्ठूर आहे असे आपल्या हृदयाला जाणवतं. या सर्व भग्न स्वप्नात तिची आई, खुशी बद्रुद्दीन, सहभागी आहे. ‘ते डोळे प्रेमाच्या प्रतिमा परावर्तीत करतात, अनेक वर्षांच्या दु:खाने कोमेजलेल्या हृदयातले’ (‘माझी आई’). आईचं दु:ख तिला पहावत नाही. ‘न ढाळलेले अश्रू औषधांनी सुजलेल्या डोळ्यात जड होतात, त्यामागच्या वेदनांसह आवर घालते मी त्यांना तुला आणखी यातनातून वाचवण्यासाठी’ (‘क्षमा कर मला’).

आईसाठी ती प्रार्थना करते. ‘दया कर देवा झोप दे तिला आज रात्री’ (‘आठव’). आईबद्दल तिच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. ‘सर्वांशी समरस होणारी तुझ्यासारखी आई लाभणं हे वरदान आहे. (‘तुझ्यावर प्रेम करते’). तीच आपल्या आईला आधार देते. ‘तुम्ही वर पहाल तर इंद्रधनुष्य दिसेल मी ढाळलेल्या आश्रूंचं (‘मित्रांनो’), म्हणून आई गीतांजलीच्या शब्दांत शेवटचा निरोप देते - 

‘जा, माझ्या जीवलग मुली, जा....

दु:खी झाले एकाकी झाले तुझ्यावीन

पण त्या दयाघनाचीच ऋणी व आभारी आहे,

अखेरीस तू माझ्या बाळा विसावलीस’ (‘सत्याचे क्षण’).

शालेय वयात कॅन्सरसारखा असाध्य आजार स्वीकारणे सहजसोपे नाही. गीतांजलीच्या मनात रागाची फार मोठी लाट आली असेल. कदाचित आपल्याला बरा न होणारा आजार झाला आहे, हे तिने सुरुवातीला नाकारलेलंही असेल. सर्व स्वप्ने धुळीला मिळणार, हा विचार वारंवार येत असावाच. कालांतराने ती या आजाराला शरण जाते. ‘स्वप्नं मरणासन्न हृदयाची’ याची तिला आतून जाणीव झालेली आहे. ती बेजार झाली आहे. ती म्हणते, ‘निद्रा, आपली कधी भेट झाली तू अन् मी’ (‘निद्रा’)

झोप नाही. विश्रांती नाही. म्हणून ती वैतागाने म्हणते, ‘सौंदर्य झडून गेलेली गीतांजली’ (‘जबरदस्त धक्का’). देवाकडे प्रार्थना करते, ‘मला झोपू दे कायमची’ (‘करुणा कर हे देवा’)... ‘देवा कृपा कर आणि मला एक शांत रात्र दे’ (‘एक शांत रात्र’)… ‘जीवनाच्या काळोख्या मार्गावर मी प्रवास करते’ (शुभेच्छा’). 

आता तिचा आजाराचा शेवटचा टप्पा येतो. ती आजार स्वीकारते. मरणही स्वीकारते. हा तिचा मरणावर विजय आहे. ‘कधी तुझी भयंकर भीती वाटते तर कधी वाट पहाते मी तुझी’ (‘मृत्यू जरा हळूच’)… ‘केवळ वाट पहाते मरण दंशाची’ (‘निरव शांततेत’). शेवटी ती म्हणते, ‘मी मृत्यूला सोबत ठेवून घेतलंय’ (‘मृत्यू अन् मी’). केवढे हे धैर्य आणि परलोक जीवनावरील श्रद्धा!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गीतांजलीचा जन्म १२ जून १९६१ रोजी झाला. ती कॅन्सरने मुंबईत १२ ऑगस्ट १९७७ रोजी देवाघरी गेली. या निरागस बालिकेच्या कविता अगदी साध्या आहेत. शब्दांची अडचण कुठेही जाणवत नाही. कल्पनारम्य विलास नाही. अभासी जीवनाचा स्पर्श नाही. पण भावना वारंवार जाणवतात. म्हणून ही खरी कविता आहे. त्या कुणीही वाचाव्यात, डोळ्यात अश्रू यावेत, गळा दाटून यावा. हीच तुमची गीतांजलीला श्रद्धांजली!

या सुंदर कवितांचा मनाला भावणारा भावानुवाद केल्याबद्दल फादर अशोक ओहोळ यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. त्यांना त्यांच्या पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा.

..................................................................................................................................................................

गीतांजलीच्या कविता - गीतांजली घै,

भावानुवाद - डॉ. अशोक ओहोळ,

झेवियर पब्लिकेशन, रांची,

मूल्य - ५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 14 August 2020

काय बोलणार यावर. तिच्या वेदना संपून ती पुढील मार्गाला लागावी. यापलीकडे काही बोलणं शक्य नाही. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा!
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......