अजूनकाही
जगप्रसिद्ध लेखक अल्बेर काम्यू यांच्या ‘दि आऊटसायडर’ या जगविख्यात कादंबरीचा ‘त्रयस्थ’ या नावाने अरुण नेरुरकर यांनी मराठी अनुवाद केला आहे. संधिकाल प्रकाशन, मुंबईतर्फे प्रकाशित झालेल्या या अनुवादाला अनुवादाने लिहिलेल्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
“Given that you have got to die, it obviously doesn't matter, exactly how and when.” - Albert Camus
कादंबरीकार, लघुकथाकार, निबंधकार, नाटककार, पत्रकार, तत्त्वज्ञ, अन्यायाविरोधाचा खंबीर पुरस्कर्ता, ‘अॅब्सर्डिझम’चा तत्त्वनिष्ठ प्रणेता, नोबेलविभूषित महान लेखक, असे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सौजन्यशील अभिमानाने मिरवणाऱ्या अल्बेर काम्यूचा जन्म तेव्हाच्या फ्रेंच अल्जिरियामध्ये, एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. विसाव्या शतकातील महान लेखकांमध्ये मानाचं स्थान असलेला काम्यू अवघ्या सत्तेचाळीस वर्षांचं आयुष्य जगला. यादरम्यान त्याने निर्माण केलेला साहित्यसंभार अभिजात जागतिक साहित्यातील सुवर्णठेव आहे. अर्थात काम्यू, विशेष ओळखला जातो, तो त्याच्या ‘दि आऊटसायडर’ या विलक्षण कादंबरीसाठी.
युद्ध आणि राजकीय उलथापालथ, यांमुळे हतबल झालेल्या जगात राहत असलेल्या काम्यूचा पारंपरिक मानवी मूल्यांवर असीम विश्वास होता आणि ती कायम राहावी, याबाबत तो आग्रही होता. त्याच्या एकंदर साहित्यात उदासीन, अर्थहीन विश्वाचं प्रतिबिंब दिसत असलं, तरीही निरर्थकतेविरोधात बंड करण्याच्या आवश्यकतेचही त्याने आग्रही प्रतिपादन केलं होतं.
निरर्थकता (absurdism) आणि अस्तित्ववाद (existentialism) या आपल्या तात्त्विक विचारधारेचा उपयोग ‘दि आऊटसायडर’ या कादंबरीत त्याने उत्तमरित्या केला आहे. ही कादंबरी वाचल्यावर मनात अनेक प्रश्न उभे राहतात. प्रथमपुरुषी निवेदनात्मक असलेल्या या कादंबरीच्या तरुण नायकाच्या, मेर्सोच्या व्यामिश्र व्यक्तिरेखेतून काम्यू आपापल्या परीने, ही व्यक्तिरेखा ताडून पाहण्याचा, तिचा अन्वयार्थ लावण्याचा नेमकं काय सूचित करू पाहतो आहे? जगभरातील अभ्यासकांनी/समीक्षकांनी, आपापल्या परीने ही व्यक्तिरेखा ताडून पाहण्याचा, तिचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याकडे हे काम विलास सारंग यांनी केले आहे.
मेर्सो स्थितप्रज्ञ आहे का, या प्रश्नाचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. कारण तो सर्वच बाबतीत स्थिरचित्त आहे, असे नव्हे. एकीकडे आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान समाजरूढीनुसार ‘अपेक्षित’ असलेले दुःखाचे प्रदर्शन त्याच्याकडून होत नाही. इतकंच नव्हे तर, दुसऱ्याच दिवशी, तो आपल्या मैत्रिणीसोबत मौजमजा करतो. तिच्यासमवेत समुद्रस्नानाची मजा लुटतो. रविवारच्या दिवशी खाली जाऊन ब्रेड आणण्याचा कंटाळा आला, म्हणून नुसते ऑमलेट खाण्यावर - तेसुद्धा थेट पॅनमधून - वेळ मारून नेतो. समुद्राकडे जाणाऱ्या वाटेवरील दोन्ही बाजूंच्या निसर्गखुणा त्याच्या नजरेतून सुटत नाहीत. रात्रीच्या वेळी कोठडीच्या झरोक्यातून दिसणारे आकाशस्थ तारे पाहून, क्षणभर का असेना, त्याचं बेचैन मन सुखावतं. अशा वेळी त्याला आपल्या आईचं वागणं योग्य वाटतं. स्थितप्रज्ञ व्यक्ती अशी नसते. सुखदु:खाच्या भावनांपलीकडे गेलेली व्यक्ती, कोणत्याही प्रसंगात अविचल राहते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
तो जगापासून पळ काढतो आहे का? त्याला व्यवस्थेच भय वाटते आहे का? ही शक्यतादेखील नाही. कारण माणसाला सर्वाधिक भय वाटते ते मृत्युचे, आणि त्याने तर, येऊ घातलेला मृत्यु शांतपणे स्वीकारला आहे. तो शांतपणे मृत्युची प्रतीक्षा करतो आहे. तो जे काही करतो, ते त्याला स्वतःला वाटतं/पटतं म्हणून. इतरांच्या अपेक्षेनुसार वागणं त्याच्या स्वभावात बसत नाही. म्हणूनच सरकारी वकिलाशी बोलायला, त्याच्याशी सहकार्य करायला तो तयार नाही. धर्मोपदेशकाचा अंतिम उपदेश (sermon) ऐकण्याचे तो नाकारतो. मृत्युदंडाच्या अंमलबजावणीची वाट पाहत असताना, आत्मचिंतन करतो. असा सगळ्यापासून दुरावलेला नायक, समाजासाठी अपरिचित असणारा, ‘त्रयस्थ’ असणार हे स्वाभाविक आहे.
मेर्सोला हृदयशून्यही म्हणता येणार नाही. स्वतः काम्यूनेही आपल्या या जगावेगळ्या कथानायकावर असे काही आरोप केलेले नाहीत. त्यावर भाष्य केले नाही. तो ‘जसा’ आहे, ‘तसा’ त्याला वाचकांसमोर सादर केला आहे. काम्यू मेर्सोकडे एक ‘त्रयस्थ’ म्हणून पाहतो. निवाडाच करायचा तर तो वाचकांनी/ समीक्षकांनी करावा. मेर्सो खरंच कसा आहे, हे ठरवण्याचे दायित्व त्यांचे आहे. काम्यू म्हणाला होता : ‘meursqult is the only christ we deserve’. याचा अर्थ त्याला ‘ईश्वरनिंदा’ (blasphemy) अभिप्रेत होती, असा नव्हे. त्याला हे अधोरेखित करायचे होते की, आजच्या जगातला त्याचा नायक ‘खोटं’ मान्य करण्यापेक्षा, मृत्यु ́स्वीकारायला - ‘die rather than lie’ - तयार आहे.
कादंबरीची सुरुवातच, या कथानायकाची मानसिकता प्रतीत करणाऱ्या अजरामर वाक्याने होते : ‘mother passed died today, or may be yesterday, I don't know. I received a telegram from the old people's home : “mother passed away. Funeral tomorrow. Very sincerely yours.” That doesn't mean anything. It might have been yesterday.’
काम्यू एकएक शब्द विचारपूर्वक योजतो. टेलिग्राममधील शब्दयोजनेत संदिग्धता आहे, जी नायकाच्या अलिप्तपणाशी सुसंगत आहे. ‘टेलिग्राम’ या शब्दाच्या आधी इंग्रजी उपपद- article-‘the’ ऐवजी, ‘a’ हे उपपद योजून, काम्यूने नायकाचा अलिप्तपणा अधिक गहिरा केला आहे. इतर कोणताही टेलिग्राम, तसाच हा. काय फरक पडतो? आयुष्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन पारदर्शी आहे. आपलं आयुष्य स्वतःला पटतं, या पद्धतीने जगायचं आणि जे पटत नाही, ते हरप्रकारे नाकारायचं, हा स्थायीभाव त्याच्यापाशी आहे. त्यानुसार वागण्याचं स्वातंत्र्य त्याला हवं आहे. जगरहाटीनुसार वागणं त्याला मान्य नाही.
म्हणूनच त्याच्याविरोधात चालवला गेलेला खूनाचा खटला आणि त्यासंबंधात त्याने घेतलेली पश्चात्तापविरहीत भूमिका, त्याच्या तटस्थ मानसिकतेचे दर्शन घडवणारे आहे. अनवधानाने हातून घडलेल्या गुन्हाबद्दल माफी मागण्यास तो तयार नाही. धर्मोपदेशकासमोर ‘कन्फेशन’ देण्याचीही त्याची तयारी नाही. तो शिक्षेला सामोरा जाण्यास तयार आहे, मात्र व्यवस्था एवढ्यावर थांबायला तयार नाही. आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्याने दाखवलेला अलिप्तपणा त्याच्याविरोधात ‘पुरावा’ म्हणून वापरला जातो. ‘आईच्या मृत्युउपरान्त आपल्या डोळ्यात टिपूस न येण्याचा, या खटल्याशी संबंध काय?’ या त्याच्या भाबड्या प्रश्नाला, रुक्ष कायद्याची तितक्याच कोरडेपणाने अंमलबजावणी करणाऱ्या न्यायालयाकडे उत्तर असत नाही.
मात्र आपल्या या भूमिकेशी आयुष्यभर ठाम असलेला नायक, शेवटी कोणताही अभिनिवेश न बाळगता वेगळा विचार करतो. वृद्धाश्रमात राहणाऱ्या आपल्या आईला, आयुष्याच्या अखेरच्या वळणावर, सोबतीची गरज का भासावी असा प्रश्न सुरुवातीस पडलेला नायक, मृत्युदंडाच्या अंमलबजावणीची वाट पाहात असताना आलेल्या कोठडीतील एकटेपणाच्या जीवघेण्या अनुभवानंतर, ‘आईचं वागणं योग्यच होतं’, असा विचार करतो. तिच्यासाठी रडण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं म्हणतो.
आपल्या या कादंबरीत, काम्यूने प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरला आहे. नायकाच्या विचारातील बदल त्याने अतिशय तरल शब्दांत उभा केला आहे. कादंबरी दोन भागात असून, पहिला भाग हा तिचा प्राण आहे असे म्हटल्यास, दुसरा भाग तिचा आत्मा आहे, असं निश्चितच म्हणता येईल.
दुसऱ्या भागात, मानवी आयुष्याचं तात्त्विक विवेचन आहे. न्यायसंस्थेवर असलेल्या ख्रिश्चनिटीच्या नीतिवारी प्रभावावर बोलकं भाष्य आहे. त्याचप्रमाणे काम्यूच्या आवडत्या, सूर्यप्रकाशात न्हालेल्या अल्जिरियातील निसर्गाचे अत्यंत सुंदर वर्णन आहे. मानवी जीवनातील निरर्थकतेला सामोरा जाणाऱ्या नायकाचं काम्यूने साकारलेलं हे शब्दचित्र, एक अभिजात अस्तित्ववादी कलाकृती झाली आहे.
‘आऊटसायडर’सारखा विलक्षण अनुभव देणारी कलाकृती इतर कोणाला निर्माण करता आली नाही. खुद्द काम्यूलाही ते जमलं नाही. अशा कलाकृती ठरवून निर्माण करता येत नाहीत. फ्रान्झ काफ्फाच्या शब्दात : ‘त्या विशिष्ट क्षणाचं अपत्य असतात.’ थोड्या वेगळ्या शब्दांत, विलास सारंग हेच सांगतात- ‘ ‘दि आऊटसायडर’ ही कादंबरी युरोपीय वाङ्मयातील एका विशिष्ट्यपूर्ण क्षणाला कायमचा गोठवून ठेवते’.
अशा या मूळ फ्रेंच भाषेतील अतुलनीय कादंबरीचा अनुवाद करण्याचा मोह अनेकांना झाला, याचं नवल वाटायला नको. फक्त इंग्रजी आणि मराठी अनुवादांचा विचार करायचा तर, गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षांच्या (१९४३-२०२३) पाच इंग्रजी आणि चार मराठी अनुवाद पुस्तकरूपात उपलब्ध आहेत. शेवटी परिशिष्टात, त्यांचा तपशील दिला आहे.
एकाच कलाकृतीचे इतके सारे अनुवाद कशासाठी हा प्रश्न उद्भवणं स्वाभाविक आहे. आपल्या मनोगतात, सॅण्ड्रा स्मिथ यांनी हा प्रश्न उपस्थित करून, त्याचे सयुक्तिक उत्तरही दिले आहे. त्या म्हणतात- ‘‘ ‘दि आऊटसायडर’ या कादंबरीचं नवीन भाषांतर कशासाठी हवं? भाषा सातत्याने उत्क्रांत होत असल्याने, इतर भाषांमधील कलाकृती नवनव्या रूपात येणं आवश्यक आहे. मूळ संहितेमध्ये बदल करता येत नाहीत. मात्र, कलाकृतीचं मर्म, तिचा आशय, भाषांतराच्या अशा शैलीत व्हावा, जी आधुनिक वाचकाला सुलभतेने समजेल. खास करून, वाक्प्रचारयुक्त भाग अशारितीने लिहिला जावा जो, कालबद्ध न वाटता, मूळ संहितेला अरूप असेल.”
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मला आणखी एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो. समीक्षकांचा आणि जाणकारांचा असा आग्रह असतो की, भाषांतर थेट स्रोत भाषेतून व्हावं. ते तिसऱ्या भाषेच्या चाळणीतून येऊ नये. म्हणजे असं की, मूळ कलाकृती फ्रेंच भाषेतील असल्यास - जशी की ‘आऊटसायडर’ - ती थेट तिथून मराठीत यावी. कोणा इतर भाषेच्या माध्यमातून नव्हे. कारण, तसे केल्यास, शब्दांच्या अर्थच्छटांमधील नेमकेपणाचा लोप होतो.
हा आग्रह एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतो. जगातील लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोकांची चायनीज् मंदारीन, जापनिज, अरेबिक वा हिंदी ही प्रथमभाषा (मातृभाषा) आहे. या भाषांमधील, हिंदी अलाहिदा, साहित्य थेट वाचून त्याचा आनंद घेण्याइतपत किंवा त्याचं मराठीमध्ये आशयघन भाषांतर करण्याइतपत या भाषांचं ज्ञान आपल्याकडे किती जणांना आहे? मग, या भाषांमधील उत्कृष्ट साहित्यापासून आपण वंचित राहायचं कां?
आपलं सोडा, साहित्याच्या नोबेलसाठी लेखकाची निवड करणाऱ्या स्वीडिश अकादमीकडेही या भाषा थेट आणि उत्तमरित्या जाणणारे तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे अकादमीलाही अशा कलाकृती इंग्रजी भाषेत येण्याची वाट पाहावी लागते. मग, जापनिजमध्ये लिहिणाऱ्या यासुनारी कावाबाता या गुणी लेखकाला अडुसष्ट वर्षं थांबावं लागतं. नगीब माहफूज या अरेबियन लेखकाला अक्याऐंशी वर्षं प्रतीक्षा करावी लागते तर, गाओ झिंगजियान या परखड मतांसाठी व्यवस्थेच्या रोषाला सामोरं जावं लागलेल्या चिनी लेखकाला तब्बल शंभर वर्षं ताटकळावं लागलं. महत्त्वाचं म्हणजे, स्वीडिश अकादमी नोबेलसाठी या आणि अशा लेखकांची निवड करते, कारण मूळ कलाकृती तिच्या इंग्रजी पेहरावातही सरस उतरते, म्हणूनच ना? याबाबत, हेन्री ग्रॅटन डॉयल यांचं हे विधान बोलक आहे – ‘It is better to have read a great work in another culture in translation than never to have read it at all.’
तेव्हा, भाषांतर स्रोत भाषेतून झालं आहे की, तिसऱ्या भाषेच्या चाळणीतून, याचा फारसा बाऊ न करता, ते आशयसंपन्न झाले आहे का, इतकाच विचार व्हावा.
कोणतीही अभिजात कलाकृती आपण पुन्हापुन्हा वाचतो तेव्हा, प्रत्येक वेळी, आपल्याला त्यात काही नवीन सापडतं. आणि हे जे काही नवीन असतं, ते वाचकांसमोर यावं, ही त्या कलाकृतीची इच्छा असते. नवा अनुवाद वाचल्यावर मला हा अनुभव आला. कोणास ठाऊक, यापुढेही एखाद्याला या कादंबरीत आणखी काही वेगळं सापडेल आणि आपल्याला आणखी एक अनुवाद वाचण्याचा आनंद मिळेल. वाचकांना असं गुंतवून ठेवण्याच्या आपल्या अंगभूत गुणवैशिष्यांमुळेच कलाकृती महान होतात. अजरामर होतात.
‘त्रयस्थ’ - अरुण नेरुरकर
संधिकाल प्रकाशन, मुंबई । पहिली आवृत्ती – २५ एप्रिल २०२५ । पाने – १२० । मूल्य – २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment