अजूनकाही
पत्रकार अमित इंदुरकर यांचा ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : बुद्धिभेदाची कार्यशाळा’ हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याला लेखकाने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
१९२५मध्ये स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या संघटनेला १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत. या संघटनेच्या भारतीय जनता पक्ष या राजकीय अपत्याने २०१४ला देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने निवडून येऊन लोकशाही संपवू पाहणाऱ्या फॅसिस्ट विचार अधिक बळकट झाला.
या सरकारने देशातील बड्या उद्योगसमूहांच्या मालकांना व अनेक माध्यमसमूहांना हाताशी धरून आपल्या हिंदुत्ववादी विचारांचा अजेंडा राबवण्यास सुरुवात केली आहे. यात ते पूर्णतः यशस्वी होणार किंवा नाही, हे येणारा काळच ठरवेल. परंतु सध्या या प्रवृत्तींनी देशात जो उच्छाद मांडलेला आहे, त्यामुळे देशातील नागरिकांचे आपसांत असणारे सलोख्याचे संबंध बिघडत चाललेले आहेत.
‘गोहत्या बंदी’, ‘हिजाब बंदी’, ‘लव्ह जिहाद’, ‘व्होट जिहाद’ यांसारख्या विषयांवर चर्चा घडवून देशातील विशिष्ट समुदायाप्रती लोकांच्या मनात द्वेषभावना पसरवण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध पद्धतीने होताना दिसून येत आहे. आता तर या धर्मांध शक्तींनी आपला मोर्चा या देशाचा इतिहास बदलण्याकडे वळवलेला आहे. एवढेच नव्हे, तर या देशाचे संविधान बदलण्याची भाषा बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे.
भारतासारख्या वैविध्यपूर्ण संस्कृतींनी नटलेल्या लोकशाही देशात ‘एक देश, एक भाषा, एक नेता, एक निवडणूक’ यांसारख्या गोष्टींचा आग्रह करून त्याला मूर्त रूप देण्यासाठी देशाच्या संसदेत नवनवीन कायदे तयार करून आपला अजेंडा राबवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झालेला आहे. ‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण’ हे यातील पहिले व महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या सर्व विचारांचे उगमस्थान देशातील वर्णवर्चस्ववादी विचारधारा रुजवणाऱ्या ‘मनुस्मृती’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या ‘विचारधन’ (‘बंच ऑफ थॉट’) या पुस्तकात आहे.
सध्या देशाच्या सर्व नागरिकांना आपल्या विचारधारेशी समरस करून घेण्याकरता देशातील अनेक महापुरुषांना स्वतःच्या कवेत घेण्याकरता अनेक पक्षांमध्ये चढाओढ सुरू झालेली आहे. वर्तमान सरकारच्या मातृसंघटनेकडे, देशभरात मान्य असलेला कोणताही महापुरुष नसल्यामुळे या सरकारने काँग्रेस पक्षाचा विरोध करणाऱ्या तत्कालीन नेत्यांना, महापुरुषांना, समाजसुधारकांना आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात त्यांच्या प्रतिमेला, विचारांना नव्हे!
महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांना आपण प्रात:स्मरणीय मानतो, असा वरवर देखावा करताना आतून मात्र आपल्या धर्मांध व देशास घातक असणाऱ्या कालबाह्य, अवैज्ञानिक विचारांना लोकांच्या मनात पेरण्याचा प्रयत्न जोमाने सुरू आहे.
११ वर्षांपासून सतत सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने (एनडीए) घेतलेल्या निर्णयांना योग्य ठरवण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या नेत्यांना विशेषतः नेहरूंना बदनाम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी नथुराम गोडसे या माथेफिरूला पुन्हा जिवंत करून न संपणाऱ्या गांधींना पुन्हा पुन्हा मारण्याचा प्रयत्न होत आहे.
.................................................................................................................................................................
या पुस्तकातील लेख :
१. संघाचे बदलते वारे | २. मतदारांनो! आपले ‘अच्छे दिन’ आलेत का? | ३. विद्यापीठ इतिहास शिकवणार की घडवणार? | ४. संस्कृत भाषेचा आग्रह कशासाठी आणि कुणासाठी? | ५. हिंदूंना बदनाम करणारे आहेत तरी कोण? | ६. ‘गुन्हेगार’ ठरवण्यासाठी पुस्तकांचा आधार ‘निराधार’ | ७. विनायक दामोदर सावरकरांना नक्की कोण बदनाम करतंय? | ८. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमांप्रती द्वेषभावना बाळगत नाही? | ९. सरसंघचालक मोहन भागवतांचे वक्तव्य, एका दगडात अनेक पक्षी मारण्याची कला! | १०. भारतीय संविधानातील रामराज्य : मिथक व सत्य | ११. आंबेडकर, हेडगेवार : विचार व कृतीतील तफावत | १२. प्रसारमाध्यमांची घटती विश्वासार्हता | १३. भाजपचे बेगडी आंबेडकरप्रेम
अनुवादित लेख :
१. नथुराम गोडसे : द्वेषाचा प्रचारक | २. गुरुजींचा खोटारडेपणा | ३. मोठी फसवणूक : हेडगेवार स्वातंत्र्यलढा आणि नेताजी बोस | ४. नेहरूंनी संघाला २६ जानेवारीच्या संचलनासाठी दिलेल्या आमंत्रणाचे सत्य | ५. माजी स्वयंसेवकांच्या नजरेतून ‘संघ’
.................................................................................................................................................................
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना, त्यांच्या नेतृत्त्वात तयार झालेल्या भारतीय संविधानाला नष्ट करण्याची भाषा केली जात आहे. स्वातंत्र्य आंदोलनात काडीचेही योगदान नसणाऱ्या संघटनेतील लोकांकडून गांधी-आंबेडकर या दोन महान व्यक्तींच्या स्वातंत्र्य आंदोलनातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
धर्मांधशक्तींचे हे सर्व उपदव्याप थांबवण्यासाठी आपल्याला नेहमी सत्याची कास धरून वेळीच त्यांचा खोटारडेपणा प्रत्येकाने उघड केला पाहिजे.
या लढाईला देशाला वैचारिक गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई किंवा एक महत्त्वपूर्ण आंदोलन म्हणून याकडे बघितले पाहिजे. अर्थात ही लढाई विचारांची असल्यामुळे यात कोणत्याही धारदार शस्त्रांची गरज पडणार नाही. ही लढाई जिंकण्याकरता या देशातील महापुरुषांचे मानवतावादी विचार आपल्याला शस्त्र म्हणून वापरावे लागतील. ही शस्त्रे समजून घेण्याकरता, ते वापरण्याची कला समजून घेण्याकरता आपणास त्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळ नव्हे, तर त्यांचा विचारांकडे जावे लागेल.
अर्थात त्यांना, त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी आपणास वाचन करावे लागेल. वाचनाने वैचारिक कक्षा रुंदावतात. सत्य आणि असत्याचा फरक कळतो. परिणामी धार्मिक उच्छाद मांडणाऱ्या संस्था, संघटनांचे अस्तित्व आपोआप धोक्यात येते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
२०१४ ते २०२५ या कालावधीत देशाची सूत्रे हाती असणाऱ्या संघटनेने व ज्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या वक्तव्यातून देशात वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्व खोटारड्या लोकांच्या वक्तव्यांचा वेळोवेळी खरपूस समाचार घेणारे माझे काही लेख काही दैनिकांत, साप्ताहिकात, दिवाळी विशेषांक व ‘अक्षरनामा’सारख्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित झाले. हे लेख तत्कालीन राजकीय परिस्थितीवर लिहिण्यात आले असले, तरी या लेखातील प्रासंगिकता मात्र अजूनही संपलेली नाही. त्यामुळे त्या सर्व लेखांचा आणि ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र कुमार झा यांनी ‘कॅरॅव्हॅन’ या इंग्रजी मासिकासाठी लिहिलेल्या चार महत्त्वपूर्ण मराठी अनुवादित लेखांचा समावेश प्रस्तुत लेखसंग्रहात समावेश करण्यात आलेला आहे.
विचारांच्या या लढाईत आपण सर्वांनी आपापल्या परीने योगदान देऊन या धर्मांध शक्तींचा सतत विरोध करण्याची प्रतिज्ञा करू या.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : बुद्धिभेदाची कार्यशाळा’ - अमित इंदुरकर
प्रकाशक - रवी डोंगरे, अकोला | पाने - १३६ | मूल्य - १५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment