स्वामी विवेकानंद : धर्माचे वेड पांघरलेला ज्ञानी पुरुष
पडघम - सांस्कृतिक
सुशील सूर्यकांत लाड
  • स्वामी विवेकानंद यांच्या काही प्रतिमा
  • Fri , 13 January 2017
  • पडघम स्वामी विवेकानंद Swami Vivekananda हिंदू धर्म Hinduism युवक दिन Yuvak Din हिंदुत्व Hindutva

छत्रपती शिवाजी महाराज, शहिद भगतसिंग हे जसे भारतीय युवकांचे प्रेरणास्थान आहेत, तसेच स्वामी विवेकानंददेखील भारतीय युवकांचे प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. म्हणूनच देशभरात १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जयंती दिवस ‘युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे न्यावा, अशी अपेक्षा असते. पण आपल्या देशात नेहमीच महामानवांच्या विचारांपेक्षा त्यांच्या मूर्तीपूजनातच धन्यता मानली जाते. शिवाय काही स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांनी महामानवांच्या विचारांचा विकृत पद्धतीने प्रसार करून, आपल्या सोयीचा विचारच पोचवण्याचे काम केल्याने, बरेचसे महामानव काही ठराविक लोक, समाजाकडून ‘हायजॅक’ झाल्याचे चित्र दिसून येते. दुर्दैवाने विवेकानंदांच्या बाबतीतही हेच आढळून येते.

स्वामी विवेकानंद म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर भगवी कफनी परिधान केलेल्या व्यक्तीची छबी येते. विवेकानंद म्हटले की, ज्वलंत हिंदुत्वाचे प्रेरणास्थान, भारतातच नव्हे, तर जगभरात भारतीय संस्कृती, अध्यात्म पोचवणारा अवलिया अशी विभूषणे लावून त्यांना गौरवले जाते. गेल्या तीन-चार वर्षांपासून काही संस्था-संघटनांनी विशेष अभियान राबवत स्वत:च्या सोयीसाठी विवेकानंदांचा केवळ आध्यात्मिक चेहराच समाजासमोर आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. खरंच विवेकानंद केवळ एक आध्यात्मिक पुरूष होते? त्यांनी केवळ मठांची स्थापना करून धर्मप्रसाराचेच कार्य केले का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना विवेकानंद हे केवळ अध्यात्म आणि धर्मप्रसारक नव्हते, तर शोषणमुक्त समाजासाठी झटणारे, समाजवादी विचारांचा पुरस्कार करणारे एक द्रष्टे समाजसुधारक होते असे आढळेल.

१२ जानेवारी १८६३ साली जन्माला आलेल्या स्वामी विवेकानंदांचे जीवन उलगडून दाखवणारे अनेक चरित्रग्रंथ उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आपल्या ‘शोध खऱ्या विवेकानंदाचा’ या पुस्तकात विवेकानंदांच्या विचारांची मांडणी करून त्यांचा चिकित्सक अभ्यास केला आहे. या पुस्तकांबरोबरच स्वामी विवेकानंदांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना, सहकाऱ्यांना लिहिलेली पत्रे अभ्यासली तर त्यांचे नेमके विचार काय होते, याचा उलगडा होण्यास मदत होते.

१ नोव्हेंबर १८९६ रोजी मेरी हिल्स यांना पाठवलेल्या पत्रात विवेकानंद स्पष्टपणे म्हणतात, “मी समाजवादी आहे. समाजवाद ही परिपूर्ण व्यवस्था आहे, असे मी म्हणत नाही. पण ही व्यवस्था समाजातील प्रत्येकाची दोनवेळच्या जेवणाची हमी देते व म्हणून ही व्यवस्था मला मान्य आहे.”

रशियात १९१७ साली समाजवादी राष्ट्राची उभारणी झाली. त्याअगोदरच २१ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद समाजवादी विचारांचा पुरस्कार करत होते, हे ध्यानात घ्यायला हवे. याच वेळी त्यांनी असाही विचार वर्तवला होता की, रशियामध्ये प्रथम कष्टकऱ्यांची सत्ता येईल आणि त्यानंतर चीनमध्ये येईल. समाजवादाची लाट कोणालाही रोखता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते. त्याच वेळी साम्यवादी व्यवस्थेतील उणिवा शोधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता.

सुमारे २१ वर्षांपूर्वीच समाजवादी राष्ट्राचे भविष्य वर्तवण्याचे ज्ञान हे विवेकानंदांना काही आध्यात्मिक तपसाधनेतून मिळालेले नव्हते, तर त्यासाठी त्यांनी संपूर्ण राष्ट्रातील, जगातील घडमोडींचा, समाजजीवनाचा सखोलतेने अभ्यास केला होता. विवेकानंदांनी जेव्हा आपल्या कार्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांनी ज्या देशात आपल्याला कार्य करायचे आहे तो देश स्वत:च्या डोळ्यांनी पाहून, समजावून घेण्याचे ठरवले.

त्यानुसार भारतात सुमारे १३ हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी येथील समाजव्यवस्था, रूढी-परंपरा, जात-धर्मव्यवस्थेचा अभ्यास केला. जमीनदार वर्गाची श्रीमंती आणि दलितांच्या दारिद्रयाचाही त्यांनी आपल्या प्रवासात अनुभव घेतला. यातूनच त्यांनी आपल्या कार्याची दिशा ठरवली. समाजातील मागे पडलेल्या समूहाच्या उत्थानासाठी, उत्कर्षासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय या ज्ञानी महापुरुषाने केला.

पण मग ते भगव्या कफनीकडे आणि मठांकडे कसे वळले, असा प्रश्न अनेकांना पडेल. त्याचा संदर्भ विवेकानंदांचे बंधू महेंद्रनाथ यांनी नोंदवला आहे. एके दिवशी विवेकानंद आपल्या विचारात गढून गेले होते. सोबत महेंद्रनाथही होते. अचानक भानावर येऊन विवेकानंद म्हणाले, ‘मी सेंट पॉलचा विचार करत होतो. त्याने ख्रिस्ताची शिकवण आत्मसात केली आणि प्रचंड विरोधाला न जुमानता त्या शिकवणीचा प्रसार केला. तो हे करू शकला कारण तो धर्माचे वेड पांघरलेला ज्ञानी पुरुष होता. मीसुद्धा धर्माचे वेड पांघरलेला माणूस आहे आणि मला कार्यकर्त्यांचा गट उभारायचा आहे.’ या प्रसंगावरून विवेकानंदांच्या भगव्या कफनीचे रहस्य उलगडण्यास मदत होते.

धर्माबद्दल विवेकानंदांनी परखड मते नोंदवली आहेत, हेदेखील विसरता कामा नये. ते म्हणतात, ‘धर्मवेड हा मेंदूला झालेला रोग आहे. ज्यामुळे समाजाची फार मोठी हानी झाली आहे.’ ५ मे १८९७ रोजी कोलकत्याहून आपल्या शिष्या ओली बुल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘आता माझी खात्री झाली आहे की, लोक ज्याला आज हिंदू धर्म म्हणतात तो घृणास्पद गोष्टींनी भरलेला आहे.’ ते म्हणत, ‘जो धर्म विधवांचे अश्रू पुसत नाही, अनाथ बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही, त्या धर्मावर आणि त्या देवावर माझा विश्वास नाही. मग त्या धर्मातील तत्त्वे कितीही सुंदर असोत.’      

स्वामी विवेकानंदांचे हे विचार पाहिले की, त्यांचा प्रतीक म्हणून वापर करणाऱ्या हिंदुत्ववादी प्रवृत्तींचे पितळ उघडे पडते. विवेकानंदांचे बंधू महेंद्रनाथ यांनी नोंदवलेल्या प्रसंगानुसार विवेकानंद हे धर्माचे वेड पांघरलेले ज्ञानी पुरुष होते. समाजातील उच्चनिचता, वर्गविषमता दूर करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक धर्माचा आणि भगव्या कफनीचा मार्ग स्वीकारला. समग परिवर्तनाचा विचार डोळ्यांसामेर ठेवूनच त्यांनी मठांची निर्मिती केली. पण अवघे ३९ वर्षांचे (मृत्यू ४ जुलै १९०२) आयुष्य लाभलेल्या या ज्ञानी महामानवाचे शोषणमुक्त समाजाचे ध्येय्य अपुरेच राहिले. त्यांचे हे ध्येय्य पूर्ण करण्याचा संकल्प करणे आणि त्यांच्या प्रतीकाचा आपल्या सोयीने उपयोग करू पाहणाऱ्या प्रवृत्त्तींपासून विवेकानंदांची सुटका करणे हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल.

 

लेखक प्रसारमाध्यम व जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत. 

sushillad1@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......