शरद पवार नावाच्या ‘सत्तेच्या गुलामा’चा ‘संशयकल्लोळ’!
पडघम - राज्यकारण
विनय हर्डीकर
  • शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, संजय राऊत
  • Thu , 21 November 2019
  • पडघम राजकारण विनय हर्डीकर Vinay Hardikar शरद पवार Sharad Pawar उद्धव ठाकरे Uddhav Thackeray देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis सोनिया गांधी Sonia Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi संजय राऊत Sanjay Raut काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP भाजप BJP शिवसेना ShivSena

शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वांत प्रभावशाली समजले जाणारे राजकीय नेते. पवार नेहमी बोलतात एक आणि करतात दुसरंच. त्यांच्या पोटात नेमकं काय आहे, हे त्यांच्या ओठावर कधीच येत नाही, असंही म्हटलं जातं. २४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा, तर उर्वरित जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदावरून भाजपसोबतची युती तोडली, तेव्हापासून ‘महाशिवआघाडी’ची स्थापना मराठीसह इंग्रजी, हिंदी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी करून त्यांचं सरकार स्थापन होणार असं जाहीरही करून टाकलं. मात्र आजअखेर चर्चेची गुऱ्हाळं आणि पवारांची उलटसुलट विधानं सर्वसामान्य जनतेसह भल्याभल्या राजकीय पत्रकार-संपादकांचीही भविष्यवाणी निकाली काढण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत पवारांचं राजकारण, मुख्य म्हणजे त्यांच्या राजकारणाची रीत समजून घेण्यासाठी या लेखाचा उपयोग होऊ शकतो.

त्यानिमित्तानं हा पुनर्मुद्रित लेख संपादित स्वरूपात. हा लेख पत्रकार-लेखक विनय हर्डीकर यांच्या ‘जन ठायीं ठायीं तुंबला’ या मार्च २०१७मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातून घेतला आहे. हा लेख शरद पवार यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त म्हणजे १२ डिसेंबर २०१० रोजी लिहिलेला आहे. त्यातले काही तात्कालिक संदर्भ वगळले तर हा लेख आजही तितकाच वाचनीय, मननीय आणि विचारणीय आहे.

.............................................................................................................................................

या वर्षी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला पन्नास वर्षे झाली. आणि त्याच सुमाराला (१९६०) शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीलाही सुरुवात झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शरद पवार सक्रिय होते की नाही हे माहीत नाही. त्यांना एकेकाळी यशवंतराव चव्हाणांचे ‘मानसपुत्र’ म्हणण्याची पद्धत होती. हे खरं असेल तर पवार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नसणार हे उघड आहे. मात्र, त्यांचे एक बंधू- वसंत पवार हे शेकापमध्ये कार्यरत होते. त्यामुळे कदाचित त्यांनी या चळवळीकडे थोडंफार सहानुभूतीनं पाहिलं असण्याची शक्यता आहे.

अशा पवारांना तेव्हापर्यंतचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून मराठी जनतेनं स्वीकारलं. यशवंतराव भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी त्यांच्या महाराष्ट्रातल्या समर्थकांची आणि विरोधकांचीही इच्छा होती. तीच अपेक्षा शरद पवारांच्या बाबतीतही मराठी जनतेची होती. १९९१ साली पवारांनी पंतप्रधानपदावर दावा मांडण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करून पाहिला; पण तो विषय त्यांनी स्वत: कधी काढला नाही. चरणसिंगांच्या- बहुमत सिद्ध न करू शकलेल्या सरकारमध्ये यशवंतराव उपपंतप्रधान झाले. यावरून या दोघांचं केंद्रातलं स्थान आणि एकूण देशाच्या राजकारणातलं स्थान स्पष्ट होतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शरद पवार १९६४मध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सहचिटणीस म्हणून प्रकाशात आले. म्हणजे त्यांनी ६०च्या सुमारास राजकारणाला सुरुवात केली असावी. कारण त्यांच्या मागे अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासारखी राजकीय संपदा नव्हती. गेली पन्नास वर्षे शरद पवार महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत. ६७ साली ते पहिल्यांदा निवडून आले, म्हणजे गेली ४७ वर्षे लोकप्रतिनिधी आहेत. चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात दोन वेळा कृषिमंत्री, त्याआधी संरक्षणमंत्री, वाजपेयींच्या एक वर्षाच्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेते... हे सगळं एकत्र केलं तर असं दिसतं की ५० पैकी ४० वर्षे शरद पवार कुठल्या ना कुठल्या सत्तेच्या पदावर आहेत. कदाचित जास्तच असतील. कारण वाजपेयींच्या दुसऱ्या चार वर्षांच्या सरकारमध्ये शरद पवार हे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून नेमले गेले! तेव्हाही त्यांना मंत्रिपदाचा दर्जा असणार!!

राजकारणात नेत्यांना आपुलकी दाखवणारी काही नावं असतात. म्हणजे ‘दादा’ असतात, सध्याचे मुख्यमंत्री ‘बाबा’ आहेत, पण असं आपुलकी दर्शवणारं कुठलंही बिरूद गेल्या पन्नास वर्षांत शरद पवारांना चिकटलेलं नाही. हे त्यांच्या शैलीचं वैशिष्ट्य आहे. यशवंतरावांनासुद्धा ‘यशवंतराव’ असंच म्हटलं जायचं. ‘चव्हाणसाहेब’ असंही म्हणत असत. शरद पवारांच्या वाट्याला ‘पवारसाहेब’ असा उल्लेख येतो. पण ‘शरदराव’ असा उल्लेख क्वचितही होताना दिसत नाही. असं का झालं असावं, हे त्यांना सत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तपासून घेणं गरजेचं आहे.

याचं कारण पवारांच्या राजकारणाची त्यांची अशी शैली आहे. इथं हाही उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही की, कधीतरी ‘शरदचंद्रजी पवार’ असा उल्लेख होतो. पण पवारांचं व्यक्तिमत्त्व, राजकारण, त्यांची जोरकस पण अतिशय धारदार अशी बोलण्याची पद्धत, या पार्श्वभूमीवर ‘शरदचंद्रजी’ हा काव्यमय लडिवाळ उल्लेख कायमच विसंगत वाटतो. असं का झालं असावं?

शरद पवारांची राजकारणाची शैली सत्ताकारणाची आहे. त्यांच्या राजकारणाला विचारांचं वा आयडियॉलॉजीचं अधिष्ठान आहे असं काही दिसत नाही. त्यांनीही तसा दावा केलेला नाही. उलट ‘फास्ट फॉरवर्ड’ (स्पर्धा काळाशी) या त्यांच्या पुस्तकात त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘पूर्वी राजकीय अजेंडा मांडणं आणि प्रत्यक्ष सत्ता हस्तगत करून त्याची अंमलबजावणी करणं ही कामं वेगवेगळ्या माणसांकडे होती. विचार असलेले, अभ्यास असलेले, तत्त्वज्ञानी वृत्तीकडे कल असलेले लोक अजेंडा मांडत होते आणि निवडणुका लढणारे लोक त्यांच्या प्रभावाखाली राहत होते.’ त्यात त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की, ‘आता ही दोन्ही कामं निवडणुका लढवणाऱ्यांनाच करावी लागतात आणि त्यांना ती झेपत नाहीत.’ हे पुस्तक येऊनही आता दोन-तीन वर्षे झाली, पण या मधल्या काळात पवारांनी या अजेंडा मांडणाऱ्या लोकांशी आपण होऊन काही संपर्क केला आहे, त्यांना नियमित भेटताहेत, वा त्यांचा एखादा मंच त्यांनी स्थापन केला आहे असंही काही घडलेलं दिसलं नाही. म्हणजे राजकारणात राहायचं असेल तर जनतेची कामं केली पाहिजेत, ती करायची असतील तर सतत सत्ता हस्तगत केली पाहिजे, सरकारमध्ये आपण असू किंवा नसू; पण प्रशासनात आपलं अस्तित्व वा प्रभाव असला पाहिजे याची काळजी घ्यायची. शरद पवारांचं राजकारण सत्ताकारणासाठी जे जे काही करता येईल ते ते करायचं अशा पद्धतीचं राहिलेलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

गेल्या काही वर्षांत त्यांच्या बोलण्यातली स्पष्टता कमी झाली असली तरी धार कमी झालेली नाही. आवाज न चढवता किंवा किंचित चढउतार करून किती धारदार बोलू शकतात याचे दोन नमुने सांगतो. पवार जेव्हा काँग्रेससोबत आले तेव्हा पुण्यातल्या काँग्रेस भवनामध्ये दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा एकत्र मेळावा झाला. पण मोहन जोशी ग्रूप आणि कलमाडी ग्रूप या दोघांनाही हे झेंगट नको होतं. त्यामुळे वातावरणामध्ये प्रचंड तणाव होता. आमची अपेक्षा अशी होती की, हे सामोपचाराने घेतील आणि हा तणाव जरा कमी होईल. परंतु पवारांच्या भाषणातलं पहिलंच वाक्य होतं, ‘आता मागचं सगळं विसरायचं आणि पुढे बघायचं.’ हे वाक्य ऐकल्यावर त्यांना जो अपेक्षित प्रतिसाद होता, तो मिळाला नाही. दुसरा एखादा राजकारणी दोन पावलं मागे गेला असता. पवारांचं पुढचं वाक्य होतं, ‘जे हे विसरणार नाहीत, त्यांना आपण विसरू.’

दुसरं उदाहरण. निवडणुकीच्या काळात एकदा शंकरराव चव्हाण असं म्हणाले, ‘शरद पवारांना काही प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्रिपदी वा कुठल्याही मंत्रिपदाचे लायक दावेदार असू शकत नाहीत.’ दुसऱ्या दिवशी पवारांनी एका सभेत सांगितलं, ‘मला नसेल अनुभव. शंकररावांना प्रशासनाचा अनुभव केव्हा मिळाला पहिल्यांदा? मी पुलोदचा मुख्यमंत्री असताना ते माझ्या हाताखाली मंत्री होते, तेव्हा मला प्रशासन करता येत नाही ही गोष्ट शंकररावांच्या का लक्षात आली नाही?’ याच्यापुढे त्यांनी काही भाष्य केलेलं नाही. त्यांचे वाग्बाण इतके मोजूनमापून असतात!

…अशी पवारांची शैली. विरोधकांचे दात काढून टाकण्यात ते प्रचंड निष्णात आहेत. त्यामुळे त्यांना कधी सभा-संमेलने गाजवणारी भाषणं करण्याची गरज पडलेली नाही. निवडणुकीत तर ते आपली ऊर्जा वाचवतात आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात. पवारांच्या शैलीचा लोकांनी धसका घेतलेला आहे. शरद पवारांना कायमच त्यांच्या पक्षात शत्रू जास्त असतात आणि इतर मित्रपक्षात त्यांचे मित्र जास्त असतात! हेही उल्लेखनीय आहे. १९७८ साली जनता पक्षाला हाताशी धरून आणि शेकाप व कम्युनिस्ट यांना त्यात सामील करून पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा पुलोदच्या तिकिटावर निवडून गेलेले नव्हते. त्यांनी काँग्रेस फोडली.

काँग्रेस आणि काँग्रेसच्या बाहेर शरद पवारांबद्दल एक संशयाचं वातावरण असतं. हा धुरंधर राजकारणी कोणत्या क्षणी कोणती भूमिका घेईल याविषयी अनेकांच्या मनात शंका असते. ते ‘संशयकोळी नाटक’ आजही संपलेलं नाही. त्या दहा-पंधरा वर्षांतल्या घटना तपासून पाहिल्या तरी हे लक्षात येईल. नरसिंहराव ज्या वेळेला पंतप्रधान झाले, तेव्हाही शरद पवारांनी त्या पदावर दावा सांगितला होता. त्या वेळेला त्यांचं वय साधारण पन्नाशीच्या आसपास होतं. गांधी-नेहरू घराण्यातील व्यक्ती नसेल तर इतका तरुण पंतप्रधान भारतमातेला चालत नाही, हे बहुधा त्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं नसावं! किंवा असंही असेल की पुढेमागे त्या पदावर दावा सांगण्यासाठी आपणही त्या शर्यतीत आहोत, हे त्यांना त्यातून सूचित करायचं असावं. त्यात त्यांनी नरसिंहराव यांचा विश्वास गमावला. राजीव गांधींशी जी त्यांनी मैत्री केलेली होती, तीही त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करून बाजूला सारली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

राजकारणाची गती अशी विचित्र की, हेच पवार पुन्हा वाजपेयींच्या काळात केंद्रीय मंत्र्याचा दर्जा असलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्षही होतात आणि मनमोहनसिंग यांच्या पहिल्या व दुसऱ्या मंत्रिमंडळात केंद्रीय कृषिमंत्री म्हणूनही त्यांची वर्णीही लागते! म्हणजे पवारांची देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही उपयुक्तता निर्विवाद आहे.

दोन अपवाद सोडले तर पवारांचं राजकीय चारित्र्य कधी संशयास्पद ठरलेलं नाही. नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोन संशयास्पद व्यक्ती बसलेल्या होत्या हा पहिला. आणि दुसरा, मुंबईत बॉम्बस्फोट झाले, तेव्हा पवारांच्या पाठिंब्यांनी बॉम्बस्फोट झाले असं तेव्हा बोललं गेलं. हा दुसरा अपवाद जास्त महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या आरोपाला त्यांनी जास्त भीक घातली नाही. पण दुसऱ्या वेळी मात्र विधानसभेत बोलताना पवारांचा आवाज भावनिक झाला होता. असं वार्तांकन करणाऱ्या काही पत्रकारांनी सांगितलं होतं. हा प्रसंग सोडला तर पवार भावनाप्रधान झाल्याचं कुणी कधी पाहिलेलं नाही. ते फार उंच व मोठ्या आवाजात बोलल्याचं वा त्यांनी आपला संयम सोडल्याचं कधी कुणी ऐकलेलं नाही. इथेसुद्धा त्यांच्याबद्दल मनात असलेला संशय जात नाही. हा संशय आणि हा धसका सगळ्याच राजकारण्यांना वाटत आला आहे.

‘सत्ता एके सत्ता’ या समीकरणामध्ये पवारांनी बुद्धिमत्ता ओतलेली आहे आणि चाणाक्षपणा दाखवलेला आहे. पण त्यांनी राजकारणाला वैचारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न कधीच का दाखवला नाही, हा प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येतो.

आता त्यांची सत्तरी उलटतेय. आता तरी त्यांना अंतर्मुख होण्यासाठी योग्य वातावरण आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत माझी खात्री आहे की, सगळ्या पक्षांची तिकिटं, म्हणजे कोणाला कुठलं तिकिट द्यायचं हे ठरवण्यामध्ये शरद पवारांचा कुठे ना कुठे हात असतो. त्यातली मूठभर मंडळी सोडून द्या की, त्यांची त्या-त्या पक्षातील केंद्रीय व्यक्तीशी अगदी वैयक्तिक समीकरणं असतात. दुसरं असं की, कुठल्याही पक्षातला माणूस बंडखोरी करण्यापूर्वी शरद पवारांचा सल्ला घेतो. तिसरं म्हणजे सुरेश कलमाडी पडले तर काय बिघडलं म्हणून डी. एस. कुलकर्णी यांच्यासारखा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतो. त्यात कलमाडी पडत नाहीत, पण त्यांची आघाडी खूपच खाली येते, हेही घडत असतं!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

दुसरीकडे पवारांचा प्रशासनामध्ये वचक आहे. त्याचंही कारण हेच आहे. त्यांच्याकडे सगळ्यांच्या कुंडल्या असतात. कुठल्या अधिकाऱ्याला कुठल्या पदाची आकांक्षा आहे याची माहिती त्यांनी मिळवलेली असते. आणि ते पद आपल्याला पवारांच्या विरोधात जाऊन मिळणार नाही हेही त्या अधिकाऱ्याला माहिती असतं. पवारांना हव्या त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात किंवा त्यांना बढत्या मिळतात. राजकीय सत्ता आणि प्रशासनाची सत्ता या दोन्हींवर त्यांची पकड आहे. जनतेचं प्रेम ही तिसरी सत्ता असते. ते मात्र पवारांना मिळालेलं नाही. त्यांनी कधी जनतेनं डोक्यावर घेतलेलं, त्यांच्यासाठी कुणी बेभान झालेलं, कुणाच्या आठवणीत असेल असं मला वाटत नाही.

काही सर्जन हे ब्लडलेस सर्जरी करत असतात. शरद पवार हेही ब्लडलेस सर्जरी करणारे निष्णात राजकीय सर्जन आहेत. शेतकरी संघटनेमध्ये असताना मी हे फार जवळून पाहिलेलं आहे. शरद पवार यांना कल्पना होती की अनिल गोटे आणि शरद जोशी यांच्यामध्ये बेबनाव आहे. तेव्हा गोटे-जोशी यांच्यातील संघर्ष शेतकरी संघटनेअंतर्गत विकोपाला जाईल अशी व्यवस्था शरद पवारांनी केलेली आहे. शेवटी तो विकोपाला गेला (त्यालाही २३-२४ वर्षे झाली. या काळात गोटे-जोशी यांनी एकमेकाचं तोंडही बघितलेलं नाही.) एवढं करून पवार थांबलेले नाहीत. १९८९च्या लोकसभा निवडणुकीआधी डोक्यात शेतकरी संघटनेच्या रणनीतीबद्दल वैचारिक गोंधळ झाल्यामुळे शरद जोशी उपोषणाला बसले होते. तेव्हा मतदानाच्या तीन-चार दिवस आधी शरद पवार जोशींना भेटून गेले आणि त्यांनी जोशींना काँग्रेसच्या बाजूला वळवलं. मी त्या भेटीच्या वेळी उपस्थित नव्हतो. पण त्याविषयी मी ऐकलं ते असं की, ‘राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यात फरक आहे. त्यामुळे राजीव गांधी सगळ्या प्रश्नांकडे ओपन माइंडेड, खुल्या दिलाने बघायला तयार आहेत. आणि मी दिीत आहे, अशा वेळेला तुम्ही राजीव गांधींच्या विरोधात उभे आहात, असं चित्र निर्माण झालं तर शेतकऱ्याच्या प्रश्नांसंबंधी मी फारसं काही करू शकणार नाही,’ अशी भूमिका शरद पवारांनी मांडली होती. त्या एका घटनेमुळे शरद जोशींची विश्वसनीयता ५० टक्के संपुष्टात आली. कारण त्याच्या आधीची दहा वर्षे शेतकरी संघटना ‘काँग्रेस आय’ या पक्षाला शत्रू नंबर एक हे सूत्र वा रणनीती घेऊन चालली होती. पवारांनी ही सर्जरी इतक्या कुशलतेने केली की, काय होतंय हे कळायच्या आत शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर गेली. पण त्यानंतर पवारांनी कधीही शरद जोशींवर जाहीर टीका केलेली नाही. जोशींनी कितीही टीका केली तरी कधी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं नाही. दिल्लीमध्ये तर ते शरद जोशींना पूर्णपणे सहकार्य करत असत. म्हणजे त्या माणसाचं काम संपवल्यानंतर तो माणूस संपवण्याची गरज नसते, ही पवारांच्या राजकारणाची रीत आहे!

१९८६ साली शरद पवार काँग्रेसमध्ये परत निघाले होते. तेव्हा ते शरद जोशींना भेटायला आले होते. जोशी त्यांना म्हणाले होते की, ‘आमच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पुलोद चालवणं अवघड आहे. त्यात मानसिक त्रास पुष्कळ आहे. तरी काँग्रेसमध्ये जाण्याची गरज नाही. नाही तर तुम्हीही आमचे शत्रू व्हाल.’ तेव्हा पवारांनी असं समर्थन केलं होतं की, ‘काँग्रेसमध्ये गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण या सत्ताधारी पक्षात जनता पक्षवाले जास्त आहेत. हे सरकार चालवणं मला शक्य नाही. आमच्या (समाजवादी काँग्रेसमधल्या) लोकांना कसं सांभाळायचं, त्यांची त्यांची काय कुवत आहे हे आम्हाला कळतं, मात्र या जनता पक्षवाल्यांना सांभाळणं अवघड आहे. शिवाय त्यांची आपसातली भांडणं मलाच सोडवावी लागतात.’ यातसुद्धा त्यांच्या राजकारणाचं सूत्र दिसतं. प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची कुवत असते. प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांची किंमत असते आणि प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला एका विशिष्ट पदापर्यंतच महत्त्वाकांक्षा असते. तिथपर्यंत त्या कार्यकर्त्याला पोहोचू दिलं तर तो आयुष्यभर आपला अंकित म्हणून राहतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गेली दहा वर्षे राष्ट्रीय राजकारणात पवार जी लाइन घेऊन चालले आहेत, तिला काही भविष्य नाही. कारण सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा हास्यास्पद ठरला आहे. काँग्रेसमधल्या घराणेशाहीवर पवारांचा आक्षेप होता. पण आता पवारांच्या घराणेशाहीनं महाराष्ट्रात पक्के पाय रोवले आहेत. त्यामुळे ते वेगळा पक्षात कशासाठी चालवतात?

पवारांनी खूप काम केलं. त्यासाठी त्यांच्याकडे कायम सत्ता होती, पण त्यांनी ते ज्या पद्धतीनं केलं तसंच करायला हवं होतं का? हे प्रश्न शरद पवार सत्तरीत तरी स्वत:ला विचारतील का?

शेवटी पवारांना माझ्या शुभेच्छा अशा आहेत की, इतकी वर्षे सत्ताकारण केल्यानंतर आता उतारवयात त्यांच्यावर कुठे राज्यपाल बनण्याची वेळ येऊ नये. तसं झालं तर काय अवस्था होते, हे मी वसंतदादा पाटील राजस्थानचे राज्यपाल असताना जवळून पाहिलेलं आहे. पवारांचं पंतप्रधानपद हुकलं, लोकसभेचं सभापतिपद त्यांच्या बोलण्यावर मर्यादा आल्यामुळे चुकलं तरी राष्ट्रपती-उपराष्ट्रपती हे मनसुबे त्यांच्या मनात असू शकतात; पण त्यामध्ये प्रत्यक्ष सत्ता नाही! चाळीस वर्षे राजकारणात राहून आणि गेली दहा वर्षे आजाराशी, वेदनेशी सामना करूनही पवारांनी आपला प्रभाव कायम ठेवलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्या चार मंत्र्यांत त्यांचा क्रमांक असणं आणि तरीही पंतप्रधानपदाची शक्यता संपलेली असणं यातच पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं सगळं यशापयश सामावलेलं दिसतं.

.............................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत.

त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.

vinay.freedom@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......