हिपॅटायटीस : २०३० पर्यंत या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय आहे!
पडघम - तंत्रनामा
स्वाती अमराळे-जाधव
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 29 July 2019
  • पडघम तंत्रनामा हिपॅटायटीस Hepatitis

काल, २८ जुलै रोजी ‘जागतिक हिपॅटायटीस दिन’ होता. त्यानिमित्ताने हा लेख...

.............................................................................................................................................

सार्वजनिक आरोग्य राखण्यात स्वच्छतेच्या सवयींचं महत्त्व अनन्य साधारण आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. उलट्या-जुलाब, कावीळ, हिवताप, डेंग्यू यांसारखे आजार वेळच्या वेळी लसीकरणाचा अभाव, अस्वच्छता आणि सदोष आहार पद्धती यांमुळे उदभवल्याचे अनेक रुग्णांच्या ‘केस हिस्टरी’मधून दिसून येते. हे सर्वच आजार प्रतिबंधात्मक पातळीवर रोखता येऊ शकतील असेच आहेत, मात्र योग्य ती काळजी न घेतल्यास हे सर्वच आजार जीवघेणे ठरू शकतात. कारण या आजारांची लक्षणं जरी साधी दिसत असली तरी ते आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर हल्ला करतात. यकृतावर हल्ला करून काविळीसारखा म्हटलं तर सौम्य, पण म्हटलं तर गंभीर असा आजार निर्माण करणाऱ्या हिपॅटायटीस या विषाणूजन्य आजाराची माहिती ‘जागतिक हिपॅटायटीस दिना’निमित्त जाणून घेऊन या.

हिपॅटायटीस ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ अशा पाच प्रकारात वर्गीकृत होतो.

‘ए’ प्रकारातला हिपॅटायटीस हा फार गंभीर स्वरूपाचा नसतो आणि योग्य उपचारांती तो आटोक्यात येतो. मात्र ज्या रुग्णांचे यकृत आधीच कमजोर आहे, त्यांना झालेली लागण गंभीर स्वरूप धारण करू शकते.

हिपॅटायटीस ‘ए’ आणि ‘ई’ या दोन्ही प्रकारच्या कावीळीस दूषित पाणी व पाणी हेच घटक मुख्यत्वे जबाबदार असतात. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायांच्या कारणांमुळे आज अनेकांना घरापासून दूर राहावे लागते. बाहेरील अन्न खावे लागते. काही खवय्येप्रेमी तर आपणहूनच अशा आजारांस निमंत्रण देत असतात. पावसाळ्याच्या दिवसांत आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या प्रदेशात अशुद्ध पाण्याला पर्याय नसतो. मात्र रुग्णाच्या आजारावर होणारा खर्च आणि त्याची होणारी शारीरिक हानीचा विचार करता पाणी शुद्ध करून पिण्याचं तंत्र नक्कीच स्वस्तात पडतं. स्वच्छेच्या संदर्भातील जनजागृती हे सार्वजनिक अनारोग्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

हिपॅटायटीस ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ हे आजार रक्तसंक्रमणातून पसरतात. आजकाल अद्ययावत तंत्रज्ञानामुळे रक्त चढवताना खूप काळजी घेतली जाते. त्यामुळे रक्तसंक्रमणातून या प्रकारची कावीळ पसरण्याचं प्रमाण आता खूप कमी पाहायला मिळते. असं असलं तरी गोंदणं, एकाच दूषित सुईचा अनेकांकडून वापर यामुळेही या प्रकारची कावीळ पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळतं.

.............................................................................................................................................

सोशल मीडियासंबंधी नवी दृष्टी व नवं भान देणाऱ्या मराठीतल्या या पहिल्याच पुस्तकाचं मन:पूर्वक स्वागत - प्रा. संजय तांबट, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4986/Social-Media?fbclid=IwAR1Fa3_2jO7gy5f-tvrrrGJupZCxtsVVHc_uhdIS608hrd2ufcEtxCP3nK0

.............................................................................................................................................

जगभरात ३२५ दशलक्ष लोकांना दरवर्षी ‘बी’ आणि ‘सी’ प्रकारच्या हिपॅटायटीच्या विषाणूंची लागण होते. जगभरात वर्षागणिक होणाऱ्या मृत्युंमध्ये १.४ दशलक्ष मृत्यु हे या प्रकारच्या काविळीमुळे होत असतात. संसर्गजन्य आजारांमुळे मृत्यु ओढवण्यामध्ये क्षयरोगानंतर याचा दुसरा क्रमांक लागतो. एचआयव्हीपेक्षा नऊ पटीनं अधिक या आजाराचा लोकांना संसर्ग होतो. युवा वर्गात टॅटू गोंदवणं, नशा करणं यांसारख्या थ्रिलिंग वाटणाऱ्या गोष्टी या प्रकारच्या विषाणू संसर्गास होण्यास मुख्य प्रमाणात कारणीभूत आहे. बऱ्याचदा किशोरवयीन व युवा वर्ग याबाबत अनभिज्ञ असतो. त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण केल्यास या संसर्गजन्य आजारास मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकतो.

हिपॅटायटीसच्या कोणत्याही प्रकारच्या विषाणुमुळे संसर्ग झाल्यावर होणाऱ्या काविळीवर अनेकदा सुरुवातीला आपल्याकडे माळ घालणं, पाणी उतरवणं यांसारख्या अशास्त्रीय उपायांवर भर दिला जातो. यामध्ये बराच कालावधी निघून जातो. संसर्ग नेमका कोणत्या प्रकारच्या विषाणुंमुळे झाला आहे आणि लागण झाल्यापासून वैद्यकीय उपचारांमध्ये किती कालावधी गेला आहे, यावर आजाराची तीव्रता ठरत असते. मद्यपान वा अन्य कोणत्याही कारणामुळे जर रुग्णाचे यकृत आधीच इजाग्रस्त असेल तर उपचार अधिकच कठीण होऊन बसतात. उपचारानंतरचा फॉलअपही या आजारात खूप महत्त्वाचा असतो.

विशेषत: आहाराबाबतीत पाळावयाची पथ्यं. उपचारांनंतर योग्य ती काळजी न घेतल्यास आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता वाढीस लागते. हिपॅटायटीसचा आजार हा नक्कीच आटोक्यातील आहे. मात्र याबाबत जनमानसात जागरूकता निर्माण करणं हाच त्यावरील मूलभूत उपाय आहे.

हिपॅटायटीस ‘बी’चं सर्व बालकांना संपूर्ण लसीकरण करून घेणं, युवावर्गास हिपॅटायटीस संक्रमणाविषयी माहिती देणं, अशुद्ध आणि अस्वच्छ अन्न-पाण्याचं सेवन टाळणं आणि हिपॅटायटीसच्या संसर्गानं दिसून येणाऱ्या काविळीवर ताबडतोब रुग्णालयात उपचार करणं, या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर प्रसार-प्रचार केल्यास २०३० पर्यंत या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं ध्येय नियोजित वेळेआधीच पूर्ण होईल.

.............................................................................................................................................

लेखिका स्वाती अमराळे-जाधव सामाजिक विषयाच्या अभ्यासक आहेत.

swasidha@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा