नको उश्रामे आणि नको उन्मादही...  
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • नरेंद्र मोदी
  • Thu , 23 May 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah भाजप BJP संघ RSS काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi

लोकसभा निवडणुकीचा निकाल आलाय. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष अपेक्षेपेक्षा मोठ्या बहुमताने विजयी झालेले आहेत. मतदान यंत्रांविषयी शंका, विजेत्यांनी साम-दाम-दंड भेदाचा अवलंब केला, जनमत अलोकशाहीवादी आहे, हा नॉन सेक्युलर विचारांचा विजय आहे, असा कोणताही कांगावा न करता समजूतदारपणे, तसंच कोणताही नाहक वाद निर्माण न करता हा निकाल सर्वच पक्षांनी स्वीकारायला हवा आणि संघटित होऊन भाजपच्या राजकीय भूमिकेला विरोध करण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायला हवं.

भारतीय लोकशाहीच्या अंतर्गत घटना आणि कायद्यानं जी चौकट आखून दिलेली आहे, त्या चौकटीत राहून आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये ज्या पक्षांनी ज्या पद्धतीनं विजय संपादन केलेले आहेत, त्याच चौकटीत राहून भारतीय जनता पक्षानं हा विजय संपादन केलेला आहे. आजवर जे भलेबुरे मार्ग विजय संपादन करताना वापरले गेले, तेच वापरत भाजपने हा सलग दुसरा विजय संपादन केलेला आहे.

त्या विजयाला असंवैधानिक, अनीतीपूर्ण अशी लेबल्स लावण्याची गरज नाही. राजकारणात जय-पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जयाचा उन्माद बाळगायचा नसतो, नैराश्य येऊ द्यायचं नसतं आणि पराजयातून शिकायचं असतं. (या संदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दाखवलेली मॅच्युरिटी दाद देण्यासारखी आहे. लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी जनमताच्या आदेशाचा स्वीकार करताना दाखवलेला उमदेपणा प्रशंसनीय आहे.)

भारतीय जनता पक्ष धर्मांध आहे हे खरं, पण त्याचा अर्थ आज निवडणुका लढवलेल्या सर्वच पक्षांचा निवडणुकीय इतिहासही जात-धर्म बघूनच उमेदवारी देण्याचा आहे, हे विसरता येणार नाही. सिंधुदुर्ग मतदारसंघातून बंदिवाडेकर यांना उमेदवारी देणं ही धर्मांधताच होती. नागपूर मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर नाना पाटोले अशी लढत झाली. नितीन गडकरी यांचा विजय निवडणुकीआधीच निश्चितच होता, मात्र नाना पाटोले यांच्या उमेदवारीमुळे त्यात माध्यमांनी काहीशी रंगत भरली तरी ही लढत एकतर्फीच होती. या लढतीला काँग्रेसकडून आणि विशेषत: नाना पाटोले यांच्याकडून शेवटच्या आठवड्यात दिला गेलेला जातीय रंग जास्त चिंताजनक होता. राजकारणविरहित विकास ही भूमिका घेणारे नितीन गडकरी आणि त्यांच्याविरुद्ध वापरलं गेलेलं जातीचं कार्ड, यामुळे भाजपच्या गोटात शेवटच्या क्षणी जरा चिंता निर्माण झाली, ती गडकरी यांच्या विजयाचं मताधिक्य वाढणार की कमी होणार याबद्दल. जात महत्त्वाची की कर्तृत्व हा मुद्दा निमित्ताने समोर आला आणि मतदारांनी विचलित न होता गडकरी यांच्या बाजूने कौल दिला, हाही नागपूरच्या विजयाचा एक अर्थ आहे. त्यामुळे कोण किती जास्त धर्मांध ही चर्चा फिजूल आहे. साध्वी प्रज्ञा हा चेहरा असलेल्या भारतीय जनता पक्षाची धर्मांधता हिंस्त्र आहे आणि त्याला रोखायचं कसं, याचा विचार कोणत्याही उखाळ्या-पाखाळ्या न काढता आता व्हायला हवा आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4864/Vivekachya-Watewar

.............................................................................................................................................

भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक लढवताना संघटना उभारण्याचा कोणता प्रयोग केला, हा अभ्यासाचा विषय आहे. काँग्रेस आणि आणि पक्षांनी जात आणि धर्मांचा आधार घेत ज्या व्होट बँक तयार केल्या. त्याला शह देण्यासाठी छोट्या-छोट्या गटांना एकत्र करून वेगळ्या व्होट बँक आणि नवा जनाधार कसा तयार केला हा अभ्यासाचा विषय आहे. ‘इट का जबाब पत्थर’से देण्याचे कोणते नवीन फॉर्म्युले पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील प्रदेशात भाजपने वापरले हा अभ्यासाचा विषय आहे.

आमच्याकडे पैसा नाही म्हणून संघटना नाही म्हणून कार्यकर्ते नाहीत, असे बहाणे भाजपने कधी दिले नाहीत. तसे ते काँग्रेसने देऊ नयेत. इतकी वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या भरवशावर नवश्रीमंत राजकारण्यांची जी नवी जमात उदयाला आलेली आहे, त्यातील हजार नवश्रीमंतांनी नुसते उश्रामे न टाकता प्रत्येकी फक्त दोन कोटी रुपये दिले तरी काँग्रेस पक्षाची आर्थिक चणचण दूर होऊ शकते. त्यासाठी हवी आहे इच्छाशक्ती. भाजपचे कार्यकर्ते उन्ह, पाऊस, थंडी असे कोणतेही बहाणे न देता जी वणवण करत पक्ष वाढवतात, तसे कार्यकर्ते घडवणे गरजेचे आहे. दिल्लीच्या अलिशान घरात किंवा वातानुकूलित कार्यालयात बसून फुकाचे सल्ले देणारे नेते-कार्यकर्ते दूर करणं ही काळाची गरज आहे. ही एक प्रदीर्घ प्रक्रिया असून आजचा भाजप एका रात्रीत उभा राहिलेला नाही, हे समजून घेण्याची गरज आहे.

भाजपला उत्तर देण्यासाठी कांगावे करणे बंद करावे लागेल. ‘मुलगी विजयी झाली नाही तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा आणि या लोकशाहीवरचा विश्वास उडेल’ अशी भूमिका घेणार्‍या, प्रचाराचे ‘आऊट सोर्सिंग’ करण्याचा प्रयोग करणार्‍या शरद पवार यांच्यासारख्यांना आता काँग्रेसपासून लांब अंतरावर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘आम्ही म्हणतो तेच खरं, आम्ही म्हणतो तीच लोकशाही’ असा कर्कश्शपणा करणारांना आता ‘गप्प बसा’ असे खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. निवडणूक हरण्याची भीती स्पष्ट दिसत असल्याने मतदान यंत्राविरुद्ध कांगावा (आता हे स्पष्ट झालंय) करणार्‍या ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबूसारख्या नेत्यांपासून काँग्रेसने स्वत:ला दूरच ठेवायला हवे. (या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात ही नीट उमजून घेण्याची तसदी काँग्रेस श्रेष्ठींनी घ्यायला हवी. काँग्रेसी विचाराशी यापैकी एकाही नेत्याला काहीही घेणे-देणे नसून त्यांचा स्वार्थच त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी काँग्रेसचा आधार त्यांना हवा आहे.

आणखी एक मुद्दा म्हणजे समाजात सरकारच्या असणार्‍या असंतोषाचा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या केंद्र आणि राज्य सरकारांच्या या असंतोष/नाराजीविषयी खूप काही बोलले आणि लिहिले गेले. त्यात मीही आघाडीवर होतो, पण ती नाराजी/असंतोष मतांत रूपांतरित झालेली नाही. या आलेल्या अनुभवांची पुनरावृत्ती झाली, हे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मोठ्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आणि ते तिकडे वळलेले जनमत आपल्याकडे कसे वळता येईल, याचा कोणताही ठोस प्लॅन विरोधकांकडे नाही आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक नेता नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.       

समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या मोहिमांतून जनमताचा अचूक अंदाज येत नाही, हा या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा एक अर्थ आहे. जनमताचे कौल आल्यावरही ते प्रकाशित/प्रक्षेपित करणार्‍या माध्यमांना सुळी चढवून समाज माध्यमांवरील ‘थोर’ तज्ज्ञ आणि एकारला कर्कश्शपणा करणारे सर्व भक्त आणि न-भक्त तोंडघशी पडले आहेत. अकोला, सोलापूर, नांदेड, बुलढाणा या जागा काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीमुळे गमवाव्या लागलेल्या आहेत, असा ठपका आता ठेवता येईल आणि आकडेवारी पाहता त्यात तथ्य दिसत असले तरी यासाठी कुणी एक नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी-वंचित आघाडी अशा तिन्ही नेत्यांचा हेकेखोरपणा जबाबदार आहे.

वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत युती झाली असती तर सध्या दिसणारे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. अशी काही आघाडी होऊ नये असंच हट्टी वर्तन आणि स्वत:च्या शक्तीविषयी बाळगलेला फाजील विश्वास, असा या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा अविर्भाव कायम राहिला. पण आता या आणि अशा कोणत्याही चर्चात काहीही अर्थ उरलेला नाही. कारण आघाडीचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही आणि आणि काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचे पुरेसे जबरदस्त नुकसान झालेले आहे. राज्य काँग्रेसचे नेतृत्व समंजस नेत्यांकडे देण्याची गरज आहे, हाही या निकालांचा अर्थ आहे.

या विजयाबद्दल नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे मन:पूर्वक अभिनंदन. मात्र हा विजय भीतीदायक वाटावा असा अभूतपूर्व आहे. गेल्या पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता यापुढे तरी या विजयाचा उन्माद भाजपला चढणार नाही. त्याची भीती समाजाला वाटणार नाही. लोकशाहीचा संकोच करण्याचे प्रयत्न होणार नाहीत. सरकार व पक्षाच्या जनहित विरोधातील लढाई पातळी न सोडता लढण्याच्या असलेल्या कोणाच्याही हक्कावर घाला घातला जाणार नाही, अशी आशा बाळगू यात.

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 24 May 2019

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर, या विजयाचा उन्माद भाजपला चढणार नाही अशी आशा व्यक्त केली आहे. पण माझी चिंता थोड्या वेगळ्या प्रकारची आहे. माझ्या मते जरी भाजपला उन्माद चढला तरी जनता त्याला वठणीवर आणेल. जनता पक्ष नामे कडबोळ्यास तेव्हा असाच उन्माद चढला होता. तो जनतेने १९८० साली इंदिरा गांधींना भरभक्कम बहुमताने निवडून आणवून पार उतरवला. पण जर जनतेलाच उन्माद चढला तर? तर मात्र परिस्थिती भीषण होईल. जनतेचा उन्माद उतरवायला कोणी मसीहा येत नसतो. अशा उन्मदास क्रांती म्हणतात. ती नेहमी रक्तरंजित असते. कोणाची कापाकापी होईल हे मी सांगंत बसंत नाही. प्रत्येकाने आपापली बुद्धी चालवावी. हिंदू अविष्कारासाठी तहानलेले आहेत. मोदी तो पुरवताहेत. बुद्धीजीवी वर्ग ( = intelligentsia ) हिंदूंच्या गळ्यात अपराधगंड बांधून कुठवर आविष्करण थोपवू शकतील? आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......