अरुणा ढेरे सध्याच्या भयग्रस्त वातावरणात आपली जबाबदारी कशी निभावतात, हे महत्त्वाचं!
पडघम - साहित्यिक
कुणाल रामटेके
  • अरुणा ढेरे आणि त्यांची निवडक ग्रंथसंपदा
  • Mon , 05 November 2018
  • पडघम साहित्यिक अरुणा ढेरे Aruna Dhere साहित्य संमेलन Sahitya Sanmelan

गेल्याच आठवड्यात अरुणा ढेरे यांची निवड यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झाल्याची बातमी आली. मुळात दर वर्षी होणाऱ्या वाद - प्रवादांना फाटा देत संमेलनाध्यक्षांची सन्मानपूर्वक निवड करण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे फलित म्हणून अरुणाजींची ही निवड निश्चितच नव्या बदलांची नांदी म्हणून बघण्यास हरकत नसावी. त्यांच्या या निवडीने मराठी साहित्य विश्वात एक नवे पर्व सुरू होत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांमधून व्यक्त होते आहे. या निवडीवर सोशल मीडियावरही अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया उमटल्या. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर आदींवर शुभेच्छा देणारी रीघ लागली. माझ्या फेसबुक पेजसाठी मीही अरुणाजींबरोबरचे जुने फोटो शोधत होतो आणि मनात मात्र त्यांना भेटल्याच्या, त्यांच्याशी बोलल्याच्या आठवणी जाग्या होत होत्या.

मी पुण्याच्या ‘आबासाहेब गरवारे महाविद्यालया’त असतानाची गोष्ट. पत्रकारिता विभागाचा एक विद्यार्थी म्हणून त्यावेळी मी तिथे शिकत होतो. सांस्कृतिक समृद्धी ही पुण्याची ओळख. अर्थातच, आमचं महाविद्यालयही त्याला अपवाद नव्हतं. त्या वेळी बरेचसे मान्यवर आमच्या महाविद्यालयाला भेट देत असत. त्यातून त्यांच्या व्याख्यानाची, त्यांच्याशी भेटण्या-बोलण्याची संधी आम्हा विद्यार्थ्यांना मिळत असे. त्यावेळी पत्रकारिता विभागातील आम्ही काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या उपक्रमांमध्ये आवर्जून सहभाग घेत असू. एकदा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातील वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनसाठी अरुणाजी आमच्याकडे येणार असल्याची बातमी मराठी विभागाच्या प्राध्यापकांनी आम्हाला सांगितली. आम्ही आनंदून गेलो. मुळात, ज्यांच्याविषयी, ज्यांच्या साहित्याविषयी नेहमी वाचायला मिळतं, त्यांनाच साक्षात भेटण्याची ही संधी आम्हाला चालून आली होती.

कार्यक्रमाच्या दिवशी जरा तास-दीड तास आधीच आम्ही काही निवडक विद्यार्थी मराठी विभागात दाखल झालो आणि अरुणाजींच्या येण्याची वाट बघत बसलो. त्या आल्या. त्यावेळी त्यांना भेटणं आमच्यासाठी सुवर्णसंधीच होती. त्यांची फार काही पुस्तकं वाचली होती असं नाही, पण एक अनामिक आकर्षण साहित्य क्षेत्रातल्या या हस्तीबद्दल आमच्या मनात होतं. त्या आल्या त्यावेळी नेमकं काय बोलायचं? सुरुवात कुठून करायची? असं काहीच सुचत नव्हतं. आमच्या मनातलं बहुतेक अरुणाजींनी ओळखलं असावं. त्यांनीच स्वतःहून आमच्याशी बोलायला सुरुवात केली आणि मनावरचा भार हलका झाला. मुळातच त्यांच्या आवाजात एक प्रकारचा आश्वासक असा मातृत्वाचा आधार आहे. खूप छान वाटलं. आम्ही फुलत गेलो.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

त्यांच्या साहित्यातलं फार काही वाचलं नसल्याबद्दल मी सांगितलं. त्यावर त्या छान हसल्या. नंतर मात्र आमच्या गप्पा आणखीच फुलायला लागल्या. अनेक विषयांवर त्यांनी आपलं मत आमच्यासमोर व्यक्त केलं. तेव्हा सहज बोलता - बोलता कुणीतरी माझ्या मित्रानं मी विदर्भातल्या ‘रिद्धपुर’ गावाचा असल्याचं त्यांना सांगितलं. त्यावर अगदी आतुरतेनं त्यांनी गावाबद्दल विचारलं. मराठी साहित्याचा आद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ माहिमभट्टांनी याच आमच्या ‘रिद्धपुर’ गावात लिहिला. मराठी भाषेची आद्य कवयित्री महदंबा हीनही ‘धवळे’ या भूमीवर रचलं. महानुभाव मराठी साहित्याची काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव. त्यांनाही या साऱ्या विषयाची मुळातच गोडी असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं.

माझ्या गावाविषयी, महानुभावांच्या मराठी साहित्यातील योगदानाविषयी त्यांच्याकडून ऐकून एक वेगळा जिव्हाळा आमच्यात निर्माण झाला. पुढे कार्यक्रमाची वेळ झाली. आणि आम्ही त्यांना कार्यक्रम स्थळी घेऊन आलो. त्यावेळी त्यांनी स्नेहसंमेलन आणि वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून खूप सुंदर भाषण केलं. त्यांच्या विद्यार्थिदशेतले वक्तृत्व स्पर्धेतले अनुभवही आम्हाला सांगितले. ते सारं काही प्रेरणा देणारं होतं. कार्यक्रम संपला. आम्ही त्यांना सोडायला आलो. त्यावेळी घेतलेली त्यांची सही मी अजूनही तशीच जपून ठेवली आहे.

पुढे मात्र, अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं सातत्यानं त्यांच्याशी संपर्क आला. पुण्यात पत्रकारिता करत असताना बऱ्याच विषयांवर त्यांचे विचार जाणून घेण्याची संधी मला मिळाली. आजही फोन वरून कधीतरी त्यांच्याशी बोलणं होतं. तो मायेचा आवाज नवं काहीतरी करण्याची, धडपडण्याची प्रेरणा देतो.

आज जेव्हा अरुणाजी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या, तेव्हा मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या कुणाही इतका आनंद मलाही झाला. मुळात साहित्य संमेलनाच्या निवडणुका, त्यातील घाणेरडं राजकारण, गठ्ठा मतं आणि त्यातून साहित्य बाह्य आरोप-प्रत्यारोपातून कलुषित होणारं वाङमय विश्व यातून उच्च दर्जाच्या साहित्यिकांना अध्यक्षपदापासून दूर राहावं लागलं आहे. त्यातून साहित्यिक, उपसाहित्यिकाही नसणारे लोक अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून स्वनामधान्य झालेत. या साऱ्या प्रक्रियेत कुठे तरी खंड पडावा आणि अत्यंत मानाचं, महत्त्वाचं असं हे पद सन्मानानं देण्यात यावं याविषयी मराठी साहित्य विश्वात सातत्यानं चर्चा होत होती.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/ya2ydx3u

.............................................................................................................................................

याविषयी सहज एकदा प्रा. सदानंद मोरे सरांना विचारलं असता, “लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रणाली स्वीकारली की हे जय-पराजय होणारच,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. ते ही खरंच आहे. मात्र, महामंडळाच्या आजच्या या निवड प्रक्रियेनेॉं नवा मार्ग पुढे आणला आहे. काळाच्या कसोटीवर कोणत्याही साहित्य प्रवाह आणि साहित्यिकांवर अन्याय न होता हे सारं सुरू राहिलं तरच ते प्रासंगिक ठरेल.

अखिल भारतीय साहित्य महामंडळानं यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सन्मानपूर्वक निवडीचा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय निश्चितच मोलाचा मानावा लागेल. अरुणाजी या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडल्या गेल्या आहेत. तब्बल १८ वर्षांनी एक महिला साहित्यिक संमेलनाध्यक्षपदी विराजमान होणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. संमेलनाच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच महिलांना आजवर संमेलनाध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. पाचव्या महिला संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना मिळालेला हा मान मोलाचा आहे. अध्यक्षीय भाषणातून त्या आता नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सध्याच्या भयग्रस्त वातावरणात साहित्य आणि साहित्यिकांची जबाबदारी त्या कशी निभावतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

.............................................................................................................................................

लेखक कुणाल रामटेके हे टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई इथं दलित – आदिवासी अध्ययन व कृती विभागात शिक्षण घेत आहेत.

ramtekekunal91@gmail. com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 10 November 2018

लेख चांगला आहे. शेवटच्या वाक्यातल्या 'भयग्रस्त' या शब्दामुळे आश्चर्य वाटलं. एव्हढी कशाने फाटली आहे, असा प्रश्न मनी तरळला. -गामा पैलवान


ramesh singh

Tue , 06 November 2018

"गेल्याच आठवड्यात अरुणा ढेरे यांची निवड यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झाल्याची बातमी आली." सदरहू वाक्य पुढीलप्रमाणे लिहिल्यास वाचकांना कोडी सोडवत बसावे लागणार नाही: "यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड झाल्याची बातमी गेल्याच आठवड्यात आली". संपादकमहाशय झोपा काढत आहेत काय! अथवा वाचकांशी प्रतिक्रियांमधून उथळ झटापट करण्यात मग्न असावेत!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......