‘तोंडी लावायला बुद्ध, शिव, शाहू आणि उद्याचे उद्या पाहू...’
पडघम - सांस्कृतिक
संतोष पद्माकर पवार
  • दिनकर मनवर यांची वादग्रस्त ठरवलेली कविता ‘पाणी कसं अस्तं’ आणि त्यांचा कवितासंग्रह
  • Thu , 04 October 2018
  • पडघम सांस्कृतिक दिनकर मनवर Dinkar Manvar पाणी कसं अस्तं दृश्य नसलेल्या दृश्यात

आजकाल शिक्षकाची तशात भाषेच्या शिक्षकांची जबाबदारी खूप वाढली आहे. असे असताना दिवसेंदिवस आपण त्यात अनुत्तीर्ण होत चाललो आहोत.

शिक्षकीपेशा ही केवळ नोकरी समजणारे लोक हे विसरत आहे की, त्यांच्या खांद्यावर त्याच्या संवर्धनाचीही जबाबदारी आहे.

तुम्ही भाषा शिकवता, तेव्हा तीच तुमची जात आणि धर्म होत असते.

तुम्ही चुकलात तर पुढचे सगळेच चुकत असते. भाषेचा संबंध संवेदनेशी आणि भावनेशी असतो. त्यातच बिघाड झाला तर पुढच्या मोठ्या सामाजिक बिघाडाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल.

साहित्य कसे वाचावे, आस्वादावे, हे काही वेगळे शिकवले जात नाही. परंपरेने आपण वाचन करत ते उन्नत करत चाललो असताना साहित्यवाचन आणि अर्थनिर्णयाच्या क्षेत्रात अराजक निर्माण होणार नाही यासाठी कार्यरत असले पाहिजे.

तथापि जात, वर्ग अस्मिता टोकदार होण्याच्या काळात आपण अधिक सजग होण्याऐवजी जर स्वतः सगळ्याचा आधी ‘चला सारे मिळून खड्ड्यात जाऊ या’ यावृत्तीचे असू तर हा आपल्या पेशाशी द्रोह आहे.

भाषेचा शिक्षक हा केवळ पगारपासरी नसावा. तर तो ज्ञानरचनेच्या अतिशय उच्चासनावर बसणारा असावा.

समाज बिघडला आहे म्हणताना आपण तर त्यात काडी टाकणारे नाही आहोत ना, हे तपासायची वेळ आलीय.

महाराष्ट्रातअलीकडे झालेले अनेक वाद या पेशातल्या लोकांमुळे आणि त्यांच्या अभ्यासातल्या गलथान ढिलाईमुळे झाले आहेत.

साऱ्या विद्यापीठातून हे दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्री, महानगरी असली जी साहित्य आकलनाची खोकडी आहेत, ती आधी फोडून टाकून केवळ माणूस आणि त्याचे समग्र आकलन शिकवायला घेतले पाहिजे. आणि शिवाय त्याला साहित्यप्रकाराच्या आकलनाची बूजही असली पाहिजे. ऐंशीच्या दशकानंतर किती असे प्राध्यापक आहेत की, जे निर्विवाद ज्ञानरचनेच्या आणि केवळस्वतःच्या संशोधनासाठी ओळखले जातात? कुठल्याही अर्थानं शब्द, वाक्य तोडून अपवाचन करू शकणारी माणसं हीच या क्षेत्राची हानी करत आहेत.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

विद्यापीठाच्या एकेका शिक्षकाकडे त्याच्या जातीच्या अभ्यासाची जंत्री आणि त्याच्याच जातीची पोरं समोर बसलेली असणं, हे किती भयावह आहे! त्यातून इतरांविषयी ठासून द्वेष भरलेला दिसतो आहे.

शिक्षकांचे आपसात वाद आणि यांचे विद्यार्थी एकमेकांच्या बोकांडी बसलेले अशी परिस्थिती झाली आहे.

एखादा शिक्षक निवृत्त होतो तर त्याचा सत्कार होणार कसा नाही इथपासून त्याच्या पाटीची मोडतोड करून त्यावर मलमूत्रविसर्जन करणाऱ्या घटना या काळात घडल्या आहेत. आणि त्याचं निर्लज्ज समर्थन काहीजणांनी केलं आहे.

एकमेकांच्या विद्यार्थ्यांना पाण्यात पाहणं, त्यांच्या संशोधनात अडथळे आणणं, त्यांच्या निवडीत भ्रष्टाचार करणं, जातीच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्याची निवड करणं, बोर्ड ऑफ स्टडीचे खेळ करणं, पुस्तक नेमण्यात राजकारण करणं, स्वतःचे गौरवग्रंथ प्रसवणं, त्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांकडून निधी जमवणं, यातच या मूर्खांचा वेळ जातोय. शिवाय जातीच्या मोर्चात मिरवणं, हे कोणत्या शिक्षकपणाचं लक्षण आहे?

तथाकथित पुरोगामी म्हणवणारी शिक्षक मंडळी जातीच्या संरक्षणाचं काम करत आहेत. आणि चळवळीतील सहभाग संशयास्पद आहे. विशिष्ट जात हीच एखाद्या प्रवाहाची वाहक आहे. इतर जाती आपोआप शत्रू ठरवून विरोधी बाजूत लोटून मोकळं होणं, ही थोर कार्ये यांचीच. साहित्याचे सोयीचे इतिहास लिहिण्याची दुष्कृत्यं या प्रवाहाच्या खोकडांनी आजवर चालवलेली आहेत.

निखळ वाड्मय आणि त्याची रचना यांनी कुणी शिकवली असावी काय हा मोठाच प्रश्न आहे.

दलित साहित्याच्या जोरकस अभिव्यक्तीनंतर त्याची भ्रष्ट नक्कल सर्वांनी चालवली आहे. आणि आता त्यातून भ्रष्ट आवृत्या, अस्मिता टोकदार करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

एका मराठी विभागात तर रंगनाथ पठारे यांच्या कादंबऱ्या अश्लील आहेत म्हणून मी त्या शिकवणार नाही, तुम्ही तुमचा अभ्यास करा असं विद्यार्थ्यांना बजावणारी शिक्षिका यातूनच पुढे आली आहे. आणि खरोखर त्यांनी तासच घेतले नाहीत.

यात जातीपातीच्या नियतकालिकांनीदेखील कहर माजवले आहेत, विभागात त्याच्या पावत्या फाडणारे तथाकथित शिक्षक-संपादक हे कोणती चळवळ चालवत आहे की बंगल्यावर मजले चढवत आहेत?

यात जातपात विरहित विचार बाळगून जीवापाड मेहनत घेऊन शिकवणारे शिक्षकदेखील आहेत, पण ते अगदीच हाताच्या बोटावर मोजता येतील.

विषयाचं आकलन आणि अभ्यास या बाबतीत तर दिवसेंदिवस आपल्या विषयात निरक्षर होत जाण्यात  लोक धन्य होत आहेत.

अजिबात वाचन न करणं, फुकट पुस्तकं मिळण्याची वाट पाहणं, स्वतःच्या अभ्यासाचा विस्तार करता न येणं, अशा अनेक समस्यांनी हे सारे ग्रस्त आहेत.

९ जुलै २०१६ च्या दै. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत डॉ. शकुंतला क्षीरसागर या विषयाकडे सर्वांना आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून कोणी बोध घेतलाय असं दिसत नाही. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?

इतका विखार आणि द्वेष करण्याचं कोणतं साहित्य शिकवतं? पूर्वी ज्या उच्चवर्णीय लोकांनी चुका केल्या त्याचे दाखले देऊन आपण करत असलेल्या नव्या असंवेदनशील वर्तणुकीचे तुम्ही काय करणार आहात ?

त्यातून निर्माण झालेली पिढीदेखील पूर्वग्रहदूषित निर्माण करण्याचा पराक्रम यांनी केला आहे. कडू झाडाला गोड फळे कशी येणार? त्यांची दुसरी पिढी आता आणखी माजली असून मराठी भाषेचं आणखी मोठं अराजक यातून निर्माण होत आहे. ‘तोंडी लावायला बुद्ध, शिव, शाहू आणि उद्याचे उद्या पाहू...’ अशी यांची घोषणा आहे काय हे समजत नाही. साऱ्या नव्या साहित्याची कोनशीला ही भारतीय राज्यघटनेत स्थापन करून पुढची वाटचाल होणं गरजेचं असताना देशाच्या शत्रूंना संधी उपलब्ध करून देण्याचं पातक निदान कोणी करू नये.

.............................................................................................................................................

लेखक संतोष पद्माकर पवार  मान्यवर कवी आहेत.

santoshpawar365@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Ajinkya Koliwa

Thu , 04 October 2018

मुळात 'पाणी कसं अस्तं' ही कविता, 'कविता' म्हणूनच भिक्कार आहे. ;)


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......