सार्वजनिक गणेशोत्सव : नव-धार्मिकता, मनोरंजन बाजार आणि संस्कृतीचे अर्थ-राजकारण
पडघम - सांस्कृतिक
देवकुमार अहिरे | धनश्री जगताप
  • सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीची प्रातिनिधिक छायाचित्रे
  • Tue , 25 September 2018
  • पडघम सांस्कृतिक गणपती Ganpati गणेश Ganesh सार्वजनिक गणेशोत्सव Sarvajanik Ganeshotsav

आधुनिकपूर्व काळात गणपती गाणपत्य, तंत्र आणि शाक्त दर्शनांच्या आणि धर्मांच्या माध्यमातून एक प्रभावी दैवत राहिला आहे. गणपतीच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पौराणिक इतिहासाच्या संदर्भात अनेक अभ्यासकांचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत. वैदिक-अवैदिक, ब्राह्मणी-अब्राह्मणी या सांस्कृतिक संघर्षात आणि झगड्यातसुद्धा गणपतीला ओढले गेले आहे. किंबहुना त्याच्या व्यामिश्र सांस्कृतिक-धार्मिक परंपरेमुळे वेगवेगळ्या गटातील लोक त्याचे अपहरण करतात असेच म्हणावे लागेल. वैनायकीरूपी ‘स्त्रीशक्ती गणेश’ जसे आपले आकर्षणबिंदू बनतो, तसेच तंत्रातील ‘नग्नगणेश’सुद्धा सांस्कृतिकबिंदू ठरतो. बौद्ध, जैन यांच्यासारख्या समन (श्रमण) परंपरेतसुद्धा श्रीगणेश आपणास भेटतो. काहींना वाटेल की, ही नंतर घुसडलेली कथा आहे किंवा विकृत करण्यासाठी केलेले कारस्थान आहे. काहीही असो, हे वास्तव आहे की, श्रीगणेश ही भारतात प्रसिद्ध असलेली देवता आहे. परंतु, हल्ली ‘सार्वजनिक गणेशोत्सवा’चा श्रीगणेशाच्या या सांस्कृतिक, दार्शनिक आणि धार्मिक परंपरेशी संबंध आहे, असे मात्र आपल्याला दिसत नाही. म्हणून आम्ही दोघांनी मागील वर्षी म्हणजे २०१७ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ह्या संदर्भात अभ्यास करण्याचे ठरवले होते. त्यासाठी आम्ही पुण्यातील ८ ढोलताशा पथकातील एकूण २३ युवक-युवतींकडून प्रश्नावली भरून घेतली आणि काहींशी मुलाखती स्वरूपात चर्चा केल्या.

हल्ली महाराष्ट्रभर साजरा होणाऱ्या ‘सार्वजनिक गणेशोत्सवा’ची मुहूर्तमेढ पुणे शहरात झालेली आहे. यावर काही लोकांचा आक्षेप असू शकतो, कारण नवीन अभ्यासाच्या आधारावरून हे स्पष्ट झाले आहे की, पुण्यात गणेशोत्सव साजरा होण्याच्या आधी काही संस्थानांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत होता. त्यामुळे भारतात पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा ‘वासाहतिक भारता’त पहिल्यांदा पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. ‘संस्थानिक भारत’ हा ब्रिटिशांच्या सर्वंकष सत्तेखाली जरी असला तरी व्यावहारिक बाबतीत स्वतंत्र होता.

२०१७ मध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवा वर्षाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने विशेष पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली होती. त्याच वेळी सार्वजनिक गणेशोत्सव पहिल्यांदा साजरा करण्याचा मान टिळकांना दिला जातो, म्हणून काही लोकांनी आक्षेप घेतला. काहींनी भाऊसाहेब रंगारी यांनी पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केल्यामुळे त्यांच्या मंडळाला तो विशेष मान मिळायला हवा अशी भूमिका घेतली. या संदर्भातील वाद सार्वजनिक, वैयक्तिक, सामाजिक आणि न्यायालयीन चर्चेच्या पातळीवर झालेले आहेत. तसेच महाराष्ट्रात प्रभावशाली असलेल्या ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर या वादानेही यावेळी काही प्रमाणात डोके वर काढले होते. त्यात नेहमीप्रमाणे ब्राह्मण लोक ब्राह्मणेत्तरांच्या कृतीचे, मेहनतीचे श्रेय आपणाकडे घेतात, असा सूर लावत भाऊसाहेब रंगारी हे ब्राह्मणेत्तर आहेत म्हणून त्यांना त्यांचा पहिला मान मिळत नाही असा सूर लावला. काहींनी टिळक-रंगारी हे दोन्ही मित्र होते. त्यामुळे त्यांच्यात श्रेयाचे भांडण लावू नये अशी भूमिका घेत कोणीही पहिल्यांदा सुरू केलेला असो, पण तो महत्त्वाचा आहे अशी भूमिका घेतली. आम्ही सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळातच प्रश्नावली भरून घेत होतो. त्यावेळी सार्वजनिक आणि वृत्तपत्रीय पातळीवर अनेक चर्चा झाल्या. त्या सगळ्या आम्ही आमच्या प्रश्नावलीत सामावून घेऊ शकलो नाही. त्यामुळे ती चर्चा समजून घेण्यासाठी स्वतंत्र संशोधन करावे लागेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सार्वजनिक गणेशोत्सवातील ढोल-ताशा पथक

ढोल-ताशा पथक हा पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे आकर्षणबिंदू म्हणून टीव्ही, वृत्तपत्र, सोशल मीडियावर चर्चिला गेला आहे. त्यामुळे हल्ली पुण्याबाहेरसुद्धा ढोलताशा पथके निर्माण झालेली दिसतात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र पातळीवर ढोलताशा पथकांची संस्था, मंच स्थापन झाले आहेत. आम्ही फक्त पुण्यातील ढोलताशा पथकांतील काही तरणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे इथे त्याचीच चर्चा करता येईल. २०१७ साली पुणे, पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांत किमान ४५०-५०० ढोल-ताशा पथके आहेत, असे एका पथकाच्या मालकाने आम्हाला सांगितले. 

ढोल-ताशा पथकांमध्ये काही पथके ही गैरराजकीय पाठिंब्याने स्थापन झालेली दिसतात, काही राजकीय पाठिंब्याने, तर काही छुप्या राजकीय समर्थनाने. ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून अनेक युवक-युवती एकत्र येत असल्यामुळे राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक काम करणारे लोकसुद्धा ढोलताशा पथक स्थापन करतात, तर काही फक्त सेवाभावीवृत्तीने काम करता यावे म्हणून पथक स्थापन करतात. मुलींचे स्वतंत्र पथकही पाहायला मिळते. मुलांचे मात्र स्वतंत्र पथक आमच्या पाहण्यात आले नाही.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या एक-दोन महिन्यांपासून ढोल-ताशा पथकांची पूर्वतयारी चालू असते. त्यामध्ये सदस्य जोडणे, सोबतच, ढोल-ताशा वाजवण्याची तयारी केली जाते. आपल्या पथकाची सदस्यसंख्या वाढावी म्हणून सदस्य नोंदणीची जाहिरात करणारे फलकसुद्धा पुणे शहरात लावलेले दिसतात. सदस्य नोंदणीसाठी काही पथकांमध्ये विशिष्ट रक्कमसुद्धा असते. काही पथके आपल्याला सदस्यांना आयकार्डही देतात. ‘ढोल-ताशा पथक हा हिंदुत्वाचा प्राण आहे’ असे एक हिंदुत्ववादी विचारांशी बांधलकी मानणारा ‘आधुनिक उच्चशिक्षित तरुण’ आम्हाला म्हणाला. 

ढोल-ताशा पथकांचे अर्थ-राजकारण

प्रत्येक पथकामध्ये किमान १०-२० युवक-युवतींपासून ते कमाल १५०-२०० युवक-युवती पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर त्यापेक्षाही अधिक असतात. पथकाच्या स्वरूपानुसार, गरजेनुसार आणि सदस्य संख्येनुसार ढोल-ताशांची उपलब्धता केली जाते. काही वेळा घंटा, मोठमोठ्या काठ्या आणि झेंडेसुद्धा असतात. या सर्व वस्तूंचा खर्च सदस्यांच्या नोंदणी फीमधून केला जातो, तसेच, काही पथकांचा खर्च पथकाच्या कार्यकारिणीचे सदस्य करतात. त्यात बहुतेक सदस्य कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाकडून, सामाजिक संस्था वा संघटनेकडून पैसा उभा करतात. काही ठिकाणी मंदिरांचे ट्रस्ट पैसा देत असतात. आता मंदिरांच्या ट्रस्टमधील लोक कुठल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संस्था आणि संघटनेशी संबंधित असतात, हे काही नव्याने सांगायला नको.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे १० दिवस आणि नवरात्रीचे ९ दिवस असे १९ दिवस ढोल-ताशा पथक सुपाऱ्या घेतात. बहुतेक गणेश मंडळांच्या ठिकाणी ढोल-ताशा पथकाचे लोक वाजवत असतात. त्यात बहुतेक सगळेच पैसे घेऊन वाजवतात. यामध्ये दोन गोष्टींमध्ये फरक करायला हवा. एक म्हणजे गणेश मंडळ आणि दोन म्हणजे ढोल-ताशा पथक. खूपच कमी वेळा गणेश मंडळांचे स्वत:चे पथक असते. आमच्या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, एका पथकाची एका रात्रीची सुपारी किमान ३० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत असते. गणेशोत्सव  आणि नवरात्र अशा १९ दिवसांत २० सुपाऱ्या जरी मिळाल्या तरी ३० हजारांप्रमाणे किती रुपये होतील याचे आकडेमोड तुम्ही करू शकता.

यामुळे दोन प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे एवढा पैसा गणेश मंडळांकडे कुठून येतो? आणि दोन म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे की, धार्मिक-मनोरंजन बाजार?  

नव-धार्मिकता :  एक ‘परंपरेचा शोध’

सार्वजनिक गणेशोत्सवाचा अभ्यास केल्यास आपणास स्पष्टपणे दिसून येते की, यामध्ये पारंपरिक धार्मिक-सांस्कृतिक असा कुठलाही आशय नाही. मुळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करतानाही धार्मिक-सांस्कृतिक वृद्धीसाठी आणि प्रचारासाठी त्याची सुरुवात झाली नव्हती. धर्म आणि संस्कृतीच्या माध्यमातून राजकीय जागृती आणि हिंदू संघटन करणे हाच त्याचा मुख्य हेतू होता.

समाजामध्ये उत्सवांना नेहमी स्थान राहिलेले आहे, किंबहुना मानवाचे सर्व जीवनच कुठला ना कुठला उत्सव, कर्मकांड आणि विधींनी बांधलेले असते. तसेच, धार्मिक-सांस्कृतिक स्वरूपात अनेक उत्सव, कर्मकांड आणि विधी मनुष्य आपल्या जीवनात पाळत असतो. झपाट्याने होणारे शहरीकरण, सांस्कृतिक-सामाजिक स्थित्यंतर, कृषीकेंद्री समाजाचा उद्योगकेंद्री समाजाकडे होणारा प्रवास, या सगळ्यांमुळे उत्सव, कर्मकांड आणि विधी यांच्यामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळे धर्म, संस्कृती यांच्या नावाखाली वेगळ्याच गोष्टी आकाराला येत आहेत आणि त्यांना धर्म, संस्कृती, परंपरा म्हणून जतन केले जात आहे. या प्रक्रियेला ‘परंपरेचा शोध’ घेणे असे म्हटले जाते. धर्माच्या नावाखाली नव-धार्मिकता जोपासली जाते. या नव-धार्मिकतेचा मूळ धर्माशी आणि धार्मिकतेशी बहुतेक वेळा संबंध नसतोच.

सार्वजनिक गणेशोत्सव हे त्याचे चांगले उदाहरण आहे. बहुतेक लोक सार्वजनिक गणेशोत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य म्हणून पाहतात, पण एकोणिसाव्या शतकाच्या आधी अशा प्रकारचा सार्वजनिक व्यवहार कधीच नव्हता, असे इतिहास आपणास सांगतो. 

मनोरंजन बाजार आणि राजकीय उपभोग

पारंपरिक समाजामध्ये जत्रा, उरूस या गोष्टींच्या माध्यमांतून समाजाचे मनोरंजन व्हायचे, पण हल्ली अनेक ठिकाणी गावच्या जत्रांनी आणि उरुसांनीसुद्धा कूस पालटली आहे. तसेच, गावांतून मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये स्थलांतराचे प्रमाण वाढल्यामुळे स्थलांतरित लोकांच्या भावविश्वाचे आणि मनोविश्वाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक स्वतंत्र मनोरंजन व्यवस्था आणि बाजार निर्माण झाला आहे. पुण्या-मुंबईपुरता मर्यादित असणारा सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्रभरातील शहरांचे वास्तव बनला आहे. राज्यातील बहुतेक शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन झाली आहेत. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कार्यक्रमात अनेक मंडळांच्या माध्यमातून सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्नांसंदर्भात देखावे, नाटके, प्रवचन असे कार्यक्रम केले जातात. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सवात का सहभागी होतात, असा प्रश्न आम्ही विचारला होता. त्यावर बहुतेकांनी ‘जल्लोष करण्यासाठी, आनंद, मजा घेण्यासाठी तसेच, एकत्र येऊन संस्कृती, वारसा जतन करण्यासाठी’ असे उत्तर दिले. यातून एक-दोन गोष्टी स्पष्ट होतात. पुण्यासारख्या शहरात ‘सार्वजनिक स्थळे, मैदाने कमी होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यानिमित्ताने ढोल-ताशा पथक हे एक मैत्री करण्याचा, आनंद, मजा लुटण्याचे सार्वजनिक आणि धर्म-संस्कृतीसंमत ठिकाण बनले आहे. ढोल-ताशा वादनात तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात. वादनात तल्लीन होतात. अनेक गणेश मंडळ नृत्यस्पर्धा, नाटकस्पर्धा, देखावे स्पर्धा आयोजित करतात. त्यामुळेसुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव एक मनोरंजन बाजार बनतो.

सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असतो, म्हणून अनेक राजकीय पक्ष, संस्था आणि संघटना आपल्या राजकीय विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या उत्सवाचा वापर करतात. काही ढोल-ताशा पथक आणि मंडळ तर राजकीय पक्षांच्याच मदतीने बसवलेले असतात. काही मंडळ हे पक्षांच्या कार्यकर्त्यांचे असतात. त्यामुळे दहा दिवसांच्या आरतीला बहुतेक वेळा राजकीय लोकांची उपस्थिती असते. त्यातून पक्षाचा विस्तार आणि प्रचार असाही शुद्ध हेतू साधून घेण्याचा डाव असतो. पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय पक्ष आपली हर्डिंग्ज, फ्लेक्स, जाहिराती लावतात. सरकार आपल्या योजनांचा प्रचार या सार्वजनिक उत्सवात करून घेते. या सर्व धार्मिक-सांस्कृतिक उत्सवात लोक मनोरंजनासोबत राजकीय उपभोगसुद्धा घेतात.     

सहभागी होणाऱ्यांची मनोभूमिका

प्रश्नावलीत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात का करण्यात आली होती, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना बहुतेकांनी ‘लोकांनी एकत्र यावे’ असे उत्तर दिले. काहींनी ‘सामाजिक प्रबोधन करण्यासाठी’, तर काहींनी ‘लोकांना संघटित करता यावे’ असे उत्तर दिले. या ठिकाणी ‘एकत्रित येणे’ आणि ‘संघटित करणे’ असे दोन शब्दप्रयोग करण्यात आले आहेत. जे ढोलताशा पथक आणि मंडळ हे हिंदुत्ववादी विचारांशी बांधीलकी मानतात, किंबहुना त्यांनीच ते स्थापन केले आहे. त्यातील लोकांनी ‘लोकांना संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती,’ असे उत्तर दिले, तर बाकीच्यांनी ‘एकत्रित करण्यासाठी’ असे उत्तर दिले. ‘संघटन करणे’ हा शब्द हिंदुत्व चळवळीतील लोक सर्रास वापरताना दिसतात. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव त्यांच्यासाठी ‘हिंदू संघटन’ करण्यासाठीचा एक कार्यक्रम असतो, तर इतरांसाठी फक्त एकत्र येण्याचा.

सार्वजिक गणेशोत्सवामुळे लोकांना त्रास होतो का, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बहुतेकांनी त्रास होतो हे मान्य केले आहे.  काहींनी वर्षात एकदाच गणेशोत्सव असल्यामुळे लोकांनी त्रास सहन केला पाहिजे असे उत्तर दिले, तर काहींनी हिंदूंच्याच सणांचा काहींना त्रास का होतो, असा प्रतिप्रश्न केला. पण तरीही बहुसंख्य तरुण म्हणाले की, डीजे, मोठी वाद्ये यांचा त्रास ज्येष्ठ लोकांना आणि बालकांना होतो. त्रास तर होतो पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे असे वाटणारे तरुण गोंधळात आणि गुंत्यात अडकलेले वाटतात. सार्वजनिक गणेशोत्सवामुळे लोकांना धार्मिक माहिती मिळते का, असा प्रश्न विचारला असता बहुतेक म्हणजे जवळपास ४० टक्के तरुण ‘धार्मिक माहिती मिळते’ असे म्हणाले. पण धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी सार्वजनिक कार्यक्रम झाले पाहिजेत का, असा प्रश्न विचारला असता बहुतेकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, धर्म आणि सार्वजनिक कार्यक्रम यासंदर्भात तरुणांच्या मनामध्ये संभ्रम आहे.

राजकारणी लोक सार्वजनिक गणेशोत्सवाचा गैरवापर करतात का, असा प्रश्न केला असता फक्त एकानेच ‘करत नाहीत’ असे उत्तर दिले. बाकीच्यांनी ‘गैरवापर करतात’ आणि ‘आम्हाला माहिती नाही’ असे उत्तर दिले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तरुण-तरुणींचा मोठा सहभाग असतो. ढोलताशांच्या वादनातही मुलांच्या तोडीस तोड मुली तल्लीन झालेल्या असतात, पण बहुतेक लोकांना मासिक पाळीच्या काळात मुलींनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात सहभागी होऊ नये असे वाटते. यामागे शुद्धी-अशुद्धी आणि विटाळाची कल्पना निश्चितपणे असते, असे म्हणावे लागेल. कारण, पाळीच्या काळात मुली आणि स्त्रिया या अशुद्ध झालेल्या असतात, असा आपल्या समाजाचा समज आहे. हिंदुत्व विचारांच्या ढोल-ताशा पथकातील काही मुलींनी उत्तरच दिले नाही, तर काहींनी ‘सहभागी व्हावे’ असे उत्तर दिले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात ‘शाकाहार करूनच सहभागी व्हावे’ असे बहुतेकांना वाटते. बोटावर मोजण्याएवढ्या लोकांना ‘कुठलाही आहार केला तरी काही फरक पडत नाही’, असे वाटते.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास

प्रश्नावलीत सार्वजनिक गणेशोत्सव कशासाठी सुरू केला होता, असा प्रश्न आम्ही केला होता. त्यावर बहुतेकांनी ‘लोकांना एकत्र करण्यासाठी’ आणि ‘ब्रिटिशांच्या विरोधात समाजमन तयार करण्यासाठी’ असे उत्तर दिले. लोकांनी दिलेले उत्तर ऐतिहासिक वास्तवाला धरून नाही असेच म्हणावे लागते, कारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात हिंदूंचे संघटन वाढवण्यासाठी झालेली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होण्यामागची पार्श्वभूमी सांगताना टिळक चरित्रकार न. चिं. केळकर म्हणतात, “१८९३ च्या गणपत्युत्सवांत म्हणजे मुंबईतील हिंदू-मुसलमानांच्या दंग्यानंतर सुमारे सहा आठवड्यांनी गणपतिउत्सव सुधारून वाढविण्याची कल्पना प्रथम निघाली.” (न. चिं. केळकर, १९२३, पृ. ४२०)

टी. व्ही. पर्वते म्हणतात की, “सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना ही हिंदू-मुस्लीम दंग्यातून आली तसेच, हिंदूंना मुस्लिमांच्या मोहोरमातून लांब ठेवण्याचाही त्याचा प्रयत्न होता.” (टी. व्ही. पर्वते, १९५८, पृ. ११५)

वरील दोन्ही टिळक चरित्रांतून एक गोष्ट स्पष्ट होते की, सार्वजनिक गणेशोत्सव हा हिंदू-मुस्लिमांचे एकत्रीकरण आणि ब्रिटिशांच्या विरोधात निर्माण झाला नसून हिंदूंचे संघटन करण्यासाठी निर्माण झाला होता.

हिंदू-मुस्लिमांच्या दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मोहरममधील ताबुतांवर बहिष्कार टाकण्याची चळवळ पुण्यातील हिंदूंनी हाती घेतली होती, कारण मोहरमच्या ताबुताच्या वेळी मोठ्या प्रमाणात हिंदू समाज सहभागी होत होता. ताबूतवर बहिष्कार टाकण्याच्या चळवळीमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला फायदाच झाला. त्यासंदर्भात केळकर म्हणतात, “मुसलमानांच्या चढेलपणाच्या वृत्तीमुळेच काही अंशी हा उत्सव हाती घेण्याची कल्पना सुचली, व जे हिंदू लोक ताबुतांची पूजा करितात त्यांना सलोख्याने वागवून घेण्यास मुसलमान लोक तयार नसल्याने, हिंदूंना ताबुतांपासून परावृत्त करावे, व उत्साहनिवृत्त केलेल्या या लोकांना स्वधर्माशी संबंध असलेली काही तरी नवीन करमणूक मिळवून द्यावी, असा टिळकांचा बोलून चालून उद्देशच होता.” (केळकर, १९२३, पृ. ४२२) सार्वजनिक गणेशोत्सवाला धार्मिक संदर्भ जरी असला तरी ‘गणेशोत्सव हे सामाजिक संघटना आणि राजकीय जागृती साधण्याचे एक प्रभावी अंग बनले.’ (जोग, वर्ष उपलब्ध नाही, पृ. ४८)

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सार्वजनिक गणेशोत्सवामुळे टिळकांच्या चळवळीचे क्षेत्र फारच विस्तृत झाले. त्यासंदर्भात सर व्हेलेंटाईन चिरोल म्हणतात, “नाटकाचे प्रयोग करायला आणि धार्मिक गाणी गायला या उत्सवामुळे संधी मिळे. या नाटकांतून आणि गाण्यांतून हिंदूंच्या पौराणिक कथांचा विदेशी राज्यकर्त्यांविषयी द्वेषभाव प्रदीप्त करण्यासाठी मोठ्या कौशल्याने उपयोग केला जातो. म्लेंच्छ ही उपाधी मुसलमान आणि युरोपीय दोघानांही सारखीच लागू असे. मुसलमान आणि पोलीस यांच्याशी संघर्ष व्हावा या हेतूनेच वरील उत्सवाच्या मिरवणुकी योजनापूर्वक आखलेल्या असत. अशा संघर्षातून उद्भवणाऱ्या खटल्यांमुळे निषेधाचा गदारोळ उडवून बचावासाठी ज्वलज्जहाल व्याख्याने द्यायला निमित्त सापडे. टिळकांच्या प्रचाराचे क्षेत्र गणेशोत्सवाबरोबरच विस्तार पावत गेले.” (कित्ता, पृ. ४९)

सार्वजनिक गणेशोत्सव जसजसा वाढत गेला, तसतसे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमुळे अनेक ठिकाणी दंगेसुद्धा झाले. दंग्यामुळे हिंदूंचे आणि मुसलमानांचे हाडवैर पुन्हा वाढत गेले. हिंदूंच्या ताबुतावर बहिष्कार टाकण्याच्या चळवळीवर भाष्य करताना ‘दीनबंधू’ म्हणतो की, “पुणे, सोलापूर, नाशिक, सातारा वगैरे ठिकाणच्या पत्रावरून असे समजते की, तेथील हिंदूंनी आपले अंग बऱ्याच अंशी ह्या ताबूतातून काढले आहे. परंतु खेड्यापाड्यांनी म्हणजे जेथे मुसलमानाचे व हिंदूंचे कोणत्याही प्रकारे धर्मासंबंधी तंटे बखेडे झाले नाहीत, तेथे सालाबाद प्रमाणे त्यांजकडून ताबूत साजरे करण्यांत आले.” (दीनबंधू, २२ जुलै १८९४, मुसलमानाचे ताबूत  व आमचे हिंदू लोक)

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या एकूणच कार्यक्रमावर टीका करताना ‘दीनबंधू’ म्हणतो, “सन १८९३ साली मुंबईस हिंदू मुसलमानांत जो भयंकर दंगा झाला, त्याचा वारा दक्षिणेकडील कित्येक शहरात लागून हिंदू लोकांची मने मुसलमान लोकां संबंधाने साशंक होऊन त्यांनी आपले पाऊल मुसलमानांच्या ताबुतांतून काढले, अर्थात ताबुतांमध्ये लोकांस आपले मन रंगविण्यात व खेळण्या कुदण्यास मिळत होते ते बंद झाले. मनुष्यास वर्षातून एक दोन वेळा खेळण्या कुदण्यास व मनोरंजन करण्यास मिळणे अत्यावश्यकतेचे आहे. म्हणून पुण्यांचे लोकांनी ताबुतांतील फकिरांच्या मेळ्यांप्रमाणे आपणात गणपती  मेळे काढण्याचे सुरू केले. ह्या मेळ्यांकरिता स्वतंत्र रीतीने पोशाख व कवणे तयार केली. या कवनांत अज्ञान लोकांचा गैरसमज होण्यासारखी काही कवने आहेत. जे शहाणे व समंजस आहेत ते धर्माचे बाबतीत इतर कोणाकडून अविचारी वर्तन झाले तरी त्याची मने चळणार नाहीत, परंतु अज्ञान लोकांची स्थिती फार भिन्न आहे. यास्तव देशाची किंवा धर्माची ज्यास खरी चाड असेल त्यांनी मेळ्यांची टूम अज्ञान लोकांत न शिरेल असे यत्न केले पाहिजेत.” (दीनबंधू, ८ सप्टेंबर १८९५, गणपती उत्सवांतील नवी टूम)

वरील प्रकारचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास हल्ली अनेकांना माहिती नाही, पण आजही सार्वजनिक गणेशोत्सवाकडे हिंदूंचे संघटन करण्यासाठीचा एक सार्वजनिक कार्यक्रम म्हणून पाहिले जाते. हिंदू संघटनांसोबतच वेगवेगळ्या जातीय, पक्षीय आणि वैचारिक बांधीलकी मानणाऱ्या संस्था, संघटना जनसंपर्कासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग करून घेतात. या उत्सवातून अनेक भांडवली जाहिराती, धार्मिक-सांस्कृतिक देखावे आणि मनोरंजन बाजार निर्माण केला जातो आणि त्यातून एक नवधार्मिकतेचा साधक, उपभोक्ता आणि कार्यकर्ता जन्माला येतो. ह्या सर्व प्रक्रियेमुळे व्यक्तीचे आणि समाजाचे धर्मनिरपेक्षीकरण, इहवादीकरण कठीण बनते.     

.............................................................................................................................................  

देवकुमार अहिरे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इतिहास संशोधक विद्यार्थी आहेत.

धनश्री जगताप या  इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या एमएसडब्लूच्या विद्यार्थिनी आहेत.      

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......