आजवरचे पाक सत्ताधीश लष्कराच्या तालावर नाचणारे कळसुत्रे बाहुलेच ठरले, नवा ‘पोस्टरबॉय’ही तसाच असणार!
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
देवेंद्र शिरुरकर
  • इमरान खान
  • Mon , 30 July 2018
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इमरान खान Imran Khan पाकिस्तान Pakistan

कधीकाळी क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीमुळे आणि त्यानंतरच्या काळात अतरंगी करामतीमुळे प्रकाशझोतात आलेले इम्रान ऊर्फ तालिबान खान आता पाकिस्तान या इस्लामिक देशाचे पंतप्रधान झाले आहेत. जगभरात सर्वत्र लोकशाही सुखनैव नांदायला हवी खरी. पण प्रत्यक्षातील वस्तुस्थिती वेगळी आहे. काही देशांत लोकशाही दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित होताना दिसते, तर काही गैरलोकशाही देशांत (नॉन डेमॉक्रॅटिक रिजिम्स) हुकूमशहांची अनिर्बंध सत्ता चालते. 

या दोन्हींच्या संमिश्रणाचा देखावा करणारी  एक व्यवस्था असते. ज्यात भारताच्या सख्ख्या शेजाऱ्याचा नामोल्लेख करावा लागतो. पाकिस्तानची खरी सत्ता लष्कराच्या हातात सामावलेली आहे. १९४७ सालापासून सुरू असलेली ही परंपरा अद्याप एकदाही खंडित झालेली नाही. लोकशाही  संरचनेच्या चौकटीतून सत्ताधीश झालेले राजकारणी हे लष्कर आणि आयएसआयच्या तालावर नाचणारे कळसुत्रे बाहुले ठरलेले आहेत.

केवळ धार्मिक आधारावर निर्माण झालेल्या राष्ट्राच्या वाटचालीच्या दिशा आणि दशा कशा होतात? याचे जिवंत उदाहरण म्हणूनच आज जग पाकिस्तानकडे अंगुलिनिर्देश करते.

पाकिस्तानच्या अंतर्गत घडामोडींसाठी एक बोलका पोपट लागतो. हा पोपट आणि त्याचा बोलविता धनी जगाला ज्ञात असला तरी भारताला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. इतर अनेक नेत्यांप्रमाणेच लष्कराचे प्रणयाराधन करत आणि राजकारणाचे गांभीर्य नसल्यासारखी फुटकळ विधाने करत इम्रान खान व त्यांचा पाकिस्तान-तहरीक-ए-इन्साफ हा पक्ष सत्तेवर आला आहे.

१९९७ साली प्रथमच निवडणुकीच्या आखाड्यात उतरून सुरू केलेल्या सत्ताप्राप्तीच्या प्रयत्नांची सांगता २२ वर्षांनंतर होत आहे. नवाज शरीफ आणि बिलावल भुत्तो या प्रस्थापितांच्या प्रभावाला आव्हान देत इम्रान आता पाकिस्तानचे वजिर-ए-आझम बनले आहेत. नव्या पाकिस्तान उभारणीचे स्वप्न दाखवतानाच इम्रान यांनी कायदे आझमच्या स्वप्नातल्या पाकिस्ताननिर्मितीचा उद्घोषही केला आहे. निवडणूकपूर्व जाहीरनाम्यातील विकासवाद, प्रगती, शांतता, स्थैर्य असल्या पोकळ बडबडीसोबतच लष्कराला आवडतील अशी धोरणे राबविण्याची मनीषा बोलून दाखवली आहे. त्याशिवायच का त्यांना पाकिस्तानची सेवा करण्याची संधी मिळाली आहे?

 सार्वत्रिक निवडणुकीतून बहुमत मिळवत ते सत्ताधीश झाले आहेत. आता पाकिस्तानात लोकशाही चळवळींना बळ मिळेल अशा भ्रामक समजुतीत असणाऱ्यांचा कळवळा किती निरर्थक आहे, हे येत्या काळात उघड होईलच. आपले अनिर्बंध वर्चस्व अबाधित राखण्यासाठी कळसुत्री बाहुले नाचवणाऱ्या लष्कराला प्रसन्न करण्यासाठी आजवर तिथल्या सत्ताधीशांना काय यातायात करावी लागलेली आहे, हे या आशावादी लोकांना कसे कळणार?

धर्मांधता, दहशतवाद, सार्वजनिक व्यवहारातील भ्रष्टाचार जोपासणाऱ्या लष्कराला लोकशाही चौकटीसाठी कोणीतरी कुंकवाचा धनी लागतो. आपल्या देशातल्यासारखे घुसखोरी करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तिथे लष्कराला लोकप्रतिनिधीगृहाची, सत्ताधारी पक्षाची संमती घ्यावी लागत नाही. कारण तिथे लष्करच या संस्था चालवते. अशा संस्थांचा चेहरा म्हणून आपल्याला हवा तसा व्यक्ती गादीवर बसवायचा आणि दहशतवादविरोधी कारवायांच्या नावाने अमाप पैसा बाहेर काढायचा उद्योग पाकिस्तानी लष्कराने अव्याहतपणे सुरू ठेवला आहे.

जेव्हा कळसुत्री बाहुले अथवा हा नावापुरती धनी याबाबत आक्षेप घ्यायला लागतो, त्यानंतर ठराविक काळाने हा कुंकवाचा धनी बदलला जातो, एवढाच या बदलाचा मतितार्थ आहे. हा धनी गरजेपेक्षा जास्त अधिकार गाजवायला लागला की, त्याची गत भुत्तो, शरीफ यांच्याप्रमाणेच होते.

म्हणूनच लष्कराने यावेळी इम्रान खान या तालिबानसमर्थक नेत्याला सर्वोच्च नेतृत्वाची संधी दिली आहे. देशांतर्गत विकासाचे स्वप्न जागवताना इम्रान यांनी स्वच्छ, पारदर्शक व विश्वासार्ह सरकार देण्याची ग्वाही दिली आहे. त्यांची ही घोषणा आपल्या ‘सबका साथ सबका विकास’ आणि केजरीवालांनी झाडूरूपी प्रतीकाने निर्माण केलेल्या पारदर्शकतेसारखीच आहे.

पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी ४६ दशलक्ष मतदाते हे वय वर्षे १८ ते ३५ यादरम्यानचे आहेत. सनातनी आणि आधुनिक, शहरी आणि ग्रामीण अशा सर्वांसाठी सर्व काही देण्याची इच्छा इम्रान यांनी व्यक्त केली आहे. शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात सुधारणा करण्याचेही वचन मतदात्यांना दिले आहे. या सगळ्या अंतर्गत क्षेत्रातील सुधारणा ते करतील, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. पण परराष्ट्र धोरण हा विषय त्यांच्या अखत्यारीतील निश्चितच नाही. व्यक्तिगत पातळीवर दिसायला जरी इम्रान उदारमतवादी भासत असले तरी प्रत्यक्ष धोरणात हिंसाचाराचे समर्थक असलेल्या इम्रान यांच्या हाती सत्ता जाणे भारतासाठी डोकेदुखीचाच विषय आहे.

पाकिस्तानसाठी क्रिकेटचा विश्वचषक आणणारे आक्रमक धर्मवीर अशी त्यांची प्रतिमा आहे. या प्रतिमेला साजेसा आक्रस्ताळेपणा आजवर त्यांनी जाणीवपूर्वक जोपासला, तेव्हा कुठे या पदावर बसण्याची संधी त्यांच्या हाती लागली आहे. बरे त्यांचे समर्थक दावा करतात त्यानुसार इम्रान उदारमतवादी कसे असतील? ज्यांच्या निवडीतच तालिबान, लष्कर आणि आयएसआयचे आशीर्वाद आहेत असा व्यक्ती नंतर स्वतंत्र बुद्धधीने प्रश्न हाताळेल? पाकिस्तानच्या राजकीय चौकटीला आणि दहशतीच्या सावटाला छेद देण्याचे धाडस दाखवेल, ही अपेक्षाच मुळात व्यर्थ आहे. व्यक्तीगत आयुष्यात जोडीदार बदलण्याएवढे सोपे नाहीच ते!

या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर नवाज शरीफ आणि बिलावल भुत्तो यांचे कार्यकर्ते निवडणूक प्रक्रियेबाबत संशय व्यक्त करत आहेत, कारण इम्रान यांच्या विजयात तालिबान, लष्कर आणि आयएसआय यांचा हस्तक्षेप असल्याचे वास्तव त्यांना ज्ञात आहे. तालिबानविरोधी कारवायांना उघड विरोध करणारा आणि भारताच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर नवाज शरीफ यांची भ्याड अशी निर्भर्त्सना करणारा नेता दहशतवाद्यांसह सर्वांचाच लाडका ‘पोस्टरबॉय’ झाल्याशिवायच का हे सत्तापरिवर्तन घडले आहे? 

असा धर्मांध नेता भारतासोबत शांततेचे संबंध प्रस्थापित करू शकतो, यावर कोण विश्वास ठेवणार? असा नेता भारतासाठी डोकेदुखीच ठरेल. कदाचित पाकिस्तानसोबतच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या घडामोडी अधिकच रेंगाळतील. सत्तास्थापनेपूर्वीच प्रथेप्रमाणे इम्रान यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यास प्राधान्य असा उच्चार केला आहे. मात्र काश्मीर प्रश्नाबाबत जुना सूर आळवण्यास ते विसरलेले नाहीत.

जमात उद दवाह, जैश-ए-मोहम्मद अशा अनेक राज्यपुरस्कृत संघटनांची हिंसाचाराची दुकाने आता तेजीत चालायला लागतील. कारगिल विजय दिनाच्या दिवशी पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल घोषित व्हावेत हा योगायोग आहेच. पण इम्रान यांनी भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा प्रदर्शित करावी, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘जैश’ आणि ‘लष्कर’चे दहशतवादी भारताच्या राजधानीत घुसल्याचे वृत्त गुप्तचर यंत्रणांनी उघड करावे, हा योगायोग कसा असू शकेल? 

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Nikkhiel paropate

Mon , 30 July 2018

अत्यंत सुरेख व योग्य मांडणी..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......