‘हे राम, आणखी किती आसाराम?’
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • स्वयंघोषित भोंदू आध्यात्मिक गुरू आसारामबापू
  • Sun , 29 April 2018
  • पडघम देशकारण आसारामबापू Asaram ‌Baapu

पत्रकारितेच्या निमित्तानं झालेल्या दिल्लीच्या वास्तव्यात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा अस्त, तर भाजपात लालकृष्ण अडवाणी युगाचा अस्त आणि नरेंद्र मोदी युगाचा उदय यांसह अनेक राजकीय घडामोडी आणि काही खळबळजनक घटनाही अनुभवाच्या पोतडीत जमा झाल्या. खळबळजनक घटनांत ‘तहलका’च्या तरुण तेजपाल आणि स्वयंघोषित भोंदू आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांना लैंगिक शोषणाबद्दल झालेल्या अटकांचा समावेश आहे. तरुण तेजपालच्या अटकेनंतर ‘और कितने तेजपाल...’ अशी चर्चा जोरात रंगली होती. त्याबद्दल माहिती घेतल्यावर दिल्लीतील मुद्रित, प्रकाश वृत्तवाहिन्या आणि डिजिटल पत्रकारितेचं जे उघडं-नागडं रूप पाहता, तसंच त्याबद्दल जे काही ऐकता आलं त्यामुळे लाज वाटली. त्याच काळात देशातील प्रमुख भ्रष्ट पत्रकार आणि माध्यम समूह यांची एक यादी एका वेबसाईटवर प्रकाशित झाल्यावर तर माध्यमांचा बाजारबसवेपणा बघून भयकंपितही झालो...

आसारामबापू यांच्याबद्दल अनेक बाबी कानावर पडत होत्या आणि त्यात आश्चर्य वाटावं असं त्यात काहीच नव्हतं. कुणी तरी ठोस तक्रार केली की त्याच्या अशा मुसक्या बांधल्या जातील की, तो सुटू शकणार नाही, असं अनेक बडे पोलीस अधिकारी खाजगीत बोलत असत. आजन्म सक्तमजुरीची शिक्षा झाल्यापासून समाजमाध्यमांवर आसारामबापू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील जवळीकीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. पण आपण हे विसरता कामा नये की, ‘जेन्युईन’ आध्यात्मिक गुरू किंवा ‘आसारामी’ वृत्तीचे बुवा/बाबा आणि राजकारणी यांचे निकटचे संबंध भारतीयच काय जागतिक राजकारणालाही काही नवीन नाहीत. गुरू आणि बुवा/बाबा मुळात हाडामांसाचे माणूस असल्यानं त्यांच्यापैकी काही चांगले तर काही भ्रष्ट आणि काही तर चक्क बदफैलीही होते... आहेतही.

इंदिरा गांधी, नरसिंहराव, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, कपिल सिब्बल, कमलनाथ, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचीही नावं कोणत्या ना कोणत्या कथित गुरु किंवा बाबाशी जोडली गेलेली आहेत. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शपथविधी समारंभाच्या वेळी अशा वादग्रस्त बाबांची जत्राच भरवली होती की! (आवर्जून गौरवास्पद उल्लेख करायचा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार आणि राजीव गांधी यांची नावं या संदर्भात कधीच चर्चेत आलेली नाहीयेत!)

गंभीर बाब म्हणजे असे सर्व धर्मीय बुवा म्हणा की, धर्मप्रसारक की नीतीमत्तेचे ठेकेदार आणि सर्व पक्षीय बहुसंख्य राजकारणी यांची सत्ता प्राप्तीसाठी अभद्र युती झालेली आहे. या गुरू आणि बुवा/बाबांचा वापर राजकारणी करतात आणि हे भोंदू बाबा/बापू त्यांचे भ्रष्ट व्यवहार आणि लैंगिक शोषणाचे व्यवहार लपवण्यासाठी ढाल म्हणून राजकारण्यांचा वापर करतात. एक नि:संशय खरं, बुवाबाजी वाढवण्यात बहुसंख्य राजकारण्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. बुवाबाजीला सरकार दरबारी मान्यता मिळवून देण्याबद्दल आपल्या देशात सर्वपक्षीय ‘राष्ट्रीय एकमत’ आहे आणि त्याला भारतीय जनतेचाही भक्कम पाठिंबा आहे. या दुष्टचक्रापासून आपण सावध असलं पाहिजे, हाही इशारा या आसारामबापूला शिक्षेतून पुन्हा एकदा मिळाला आहे.

गेल्या चार दशकांच्या पत्रकारितेत राजकारण्यांशी जवळीक ठेवणारे धीरेंद्र ब्रम्हचारी, भोंडशी बाबा, चंद्रास्वामी, सत्य साईबाबा, रामपाल, स्वामी नित्यानंद, गुरमित रामरहीम, आसारामबापू, भैय्यू महाराज, श्री श्री रविशंकर अशी किती तरी नावं आठवतात. यापैकी चंद्रास्वामी, रामपाल, गुरमित राम रहीम, नित्यानंद अशा काही बाबांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गजाआड व्हावं लागलेलं आहे. चंद्रास्वामी यांच्यावर तर हवाला, शस्त्रास्त्र दलाली आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा कट असेही आरोप लागलेले आहेत. या बाबा लोकांच्या या कुकृत्यांना राजकारणातील नेत्यांची मान्यता होती किंवा आहे किंवा त्या राजकारण्यांच्या सांगण्यावरून ही कृत्यं त्यांनी केली, असं समजणं हा मात्र शुद्ध दुधखुळेपणा आहे. हे भोंदू बुवा/बाबा आणि सर्वपक्षीय राजकारणी ते बहुसंख्य जनता हे श्रद्धा, अंधश्रद्धा, भाबडेपणा, मानसिक कमकुवतपणा, अस्मिता असे अनेक पैलू असलेलंही एक दुष्टचक्र आहे. म्हणूनच आसारामबापू तो सिर्फ झांकी है...

आपल्या देशात सर्वधर्मीय संत आणि ऋषींची मोठी उज्ज्वल अशी परंपरा आहे. धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची कामगिरी संत आणि ऋषींनी समर्थपणे पार पाडली आहे. सामाजिक सुधारणांसाठी धर्माचं जे काही विपरीत स्वरूप समोर मांडलं गेलं, त्यावर तसंच समाजातील अन्यायपूर्ण चालीरीती, परंपरा यावर काही संतांनी कठोर आघात केलेले आहेत. काही संतांनी सदवर्तनाचे धडे दिले तर तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यासारख्या संतांनी सामाजिक सुधारणासाठी आयुष्य झोकून दिलं. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की, कोणत्याची मूळ धर्मग्रंथात अन्य कोणत्याही धर्माचा अनादर किंवा द्वेष करण्यास सांगितलेलं नाही. मात्र स्वार्थप्रेरित बुवा/बाबा, धर्म प्रसारक, प्रचारक तसंच कथित विश्लेषकांनी आणि धर्माच्या नावावर सत्ता राबवणाऱ्या शासकांनी समाजाची कायम अशी दिशाभूल करत करत समाजाला धार्मिक नशेच्या अंमलाखाली ठेवलेलं. (आता राहुल गांधी यांनीही ‘टेंपल रन’ सुरू केलीये!).

दुसरं म्हणजे, धनसंचय आणि कामवासना वर्ज्य करून सद्वर्तनानं समाजासमोर आदर्श उभा करावा असं सात्त्विक वर्तन ऋषी आणि संतानी ठेवलं पाहिजे असेच धार्मिक परंपरेत सांगितलं गेलेलं आहे. प्रत्यक्षात समाजाला धार्मिक संमोहनात ठेवत आसारामबापूसारख्या तथाकथित बुवा/बाबा/संतांनी अमाप धनसंचय करून लैंगिक स्वैराचार माजवला. मद्यविक्रेता ते संत असा जीवनप्रवास असलेले आसारामबापू स्वत:ला संत म्हणवून घेतात आणि त्यांचं ही म्हणणं बहुसंख्य समाज निमूटपणे स्वीकारतात हे संमोहनच आहे.   

विविध ‘लीलां’नी वादग्रस्त ठरलेल्या आसारामबापूना अखेर आता कायम कारागृहाची हवा खावी लागणार आहे, हे स्पष्टच आहे. आसारामबापूचा हा प्रवास अपेक्षितच होता! लैंगिक शोषण ते वाममार्गानं केलेला धनसंचय असा आसारामबापू यांच्या ‘लीलां’चा व्यापक घृणास्पद पट असून या देशातला कायदा आपलं काहीही बिघडवू शकत नाही, या आसारामबापूंच्या उद्दामपणाची त्याला जोड होती. उजेडात आलेल्या माहितीनुसार आसारामबापूची देशात (अजूनही बिनधास्तपणे सुरू असलेली) २६ गुरुकुलं असून आसारामबापू यांना अटक झाली त्याआधीच्या पाच वर्षांत त्यातील २० मुलींनी आत्महत्या केल्या आणि ९८६ मुलींनी गुरुकुल सोडून परत घर गाठलेलं आहे. या सर्व मुली इयत्ता १० वी ते १२वीच्या म्हणजे, ज्या मुलीच्या बलात्काराच्या तक्रारीवरून आसारामबापूंना अटक झाली, त्या मुलीच्या वयोगटातील होत्या हे लक्षात घेता त्या मुली घरी का परत गेल्या आणि त्या मुलींनी आत्महत्या का केल्या असाव्यात याची कारणं स्पष्ट आहेत. या खटल्याच्या सुनावणीत आसारामबापूचा एकेकाळचा सहकारी आणि फिर्यादी पक्षाचा राहुल सचर या साक्षीदारानं दिलेल्या साक्षीतून त्याला दुजोराच मिळतो आहे. म्हणून आता त्या सर्व प्रकरणांची तड पोलिसांनी लावली पाहिजे.

एका अंदाजानुसार किमान सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा धनसंचय असणारे ७९ वर्षीय आसारामबापू कारागृहात गेल्याने आणखी काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या मुलीच्या तक्रारीवरून आसारामबापू तुरुंगात गेले, तिचे व्यापारी असलेले वडील आसारामबापूचे शिष्य होते. शिष्यकन्येसोबत अभद्र व्यवहार झाल्याने गुरू-शिष्य परंपरा कलंकित झाली आहे. असे आरोप लागले तेव्हा ‘विश्वास बसला नाही इतका माझा गुरूवर अढळ विश्वास होता’, असं या पित्यानं म्हटलेलं असल्याच्या बातम्या वाचनात आलेल्या होत्या. म्हणजे, गुरूनं शिष्याचा विश्वासघातही केलेला आहे, गुरू-शिष्य परंपरेला काळिमा फासला आहे.

देशातील महिला या अशा संत/बुवा/बाबांपासून जास्त असुरक्षित आहेत, हे आसारामबापूमुळे पुन्हा एकदा समोर आलेलं वास्तव अतिदाहक आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील अदृश्य सीमारेषा ओलांडून अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्यांनी हे दाहक वास्तव विसरता कामा नयेच. सर्वच जाती-धर्माच्या सत्संग कार्यक्रमात महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्याबद्दल नेहमीच संवेदनशील माणसाच्या मनात शंकेची पाल चूकचुकत असते. देशातल्या अनेक धार्मिक स्थळी, मठ-आश्रम-दर्गे-चर्चेस या ठिकाणी झालेल्या आणि होत असलेल्या स्त्रीदेहाच्या शोषणाबद्दल वारंवार क्षीण का होईना आवाज उठलेला आहे हे विसरले जाऊ नये. म्हणूनच अशा आवाजांना भक्कम बळ दिले जायला हवे. शिवाय अशा ठिकाणी जाणाऱ्या महिलांवर सुरक्षा यंत्रणांनी पाळत ठेवून भोंदू बुवा/बाबांचा छडा लावून त्यांना जेरबंद केलं पाहिजे.

बहुसंख्य लोकांच्या मनामनात वसलेले दुर्वर्तनी आसारामबापूसारखे लोक केवळ बलात्कारी नाही, तर सामाजिक आणि धार्मिक या दोन्ही पातळीवरही द्रोही आहेत, म्हणून त्यांचं कुकृत्य अक्षम्य आहे. सीमेपलीकडच्या शत्रूपेक्षा देशातील या अशा सैतानी वृत्तीपासून आपल्या समाजाला वाचवणं जास्त गरजेचं आहे, हा आसारामबापूला न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षेतून मिळालेला स्पष्ट इशारा आहे. तो लक्षात घेतला गेला नाही तर भविष्यात कधी ना कधी गल्लोगल्ली अशा बुवा/बाबांचं पीक दिसेल आणि ‘और कितने तेजपालच्या’ धर्तीवर ‘हे राम, आणखी किती आसाराम?’ म्हणण्याची वेळ भारतीय समाजावर येणार आहे!

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 03 May 2018

प्रवीण बर्दापूरकर, आसारामबापूंनी सोनिया गांधीला भारत छोडो या काँग्रेस छोडो म्हणून ठणकावलं होतं. संदर्भ : https://youtu.be/wYZHiH50kAk?t=1m25s तसेच आसारामबापू मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्मात घरवापसी करायचे. म्हणून सोनिया गांधीने त्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबलंय. आजूनेक गोष्ट म्हणजे त्यांच्यावर बलात्काराचा आरोप (म्हणजे ३७६ कलम लावलेलं) नाहीये. तेव्हा त्यांचा बलात्कारी म्हणून उल्लेख करू नये. वयाच्या बहात्तराव्या वर्षी बलात्कार करणारा म्हातारा तरुणपणी स्वस्थ बसला काय? प्रसारमाध्यमं उगीच आपलं काहीतरी बडबडताहेत ! आपला नम्र, -गामा पैलवान


vishal pawar

Sun , 29 April 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......