ही जी काही हिडीस दमनशाही चाललीय, त्यात कसं ‘असायचं’ आहे आपण?
पडघम - देशकारण
स्पृहा जोशी
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 19 April 2018
  • पडघम देशकारण कथुआ kathua उन्नाव Unnao असिफा Asifa

काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर?

मला जे काही वाटतंय त्यानं तसाही कसला बदल घडणार आहे? कुठली क्रांती येणार आहे? आठ वर्षांचं ते ‘असिफा’ नावाचं लेकरू तडफडून मेलं. माझ्यापासून कित्येक किलोमीटर दूर काश्मीर नावाच्या देशात. हो देशच! पण मेली ती पोर. हाल-हाल होऊन मेली. मेल्यानंतर पण तिच्या चिंधड्या चिंधड्या करत राहिलो आपण सगळे... #JusticeForAsifa असे हॅशटॅग्स येत राहिले फक्त. बाकी सगळं चालूच राहिलं तसंच. माझं शेड्युल, मिटिंग्ज, शुटिंग्ज, डिनर्स, इन्स्टा स्टोरीज, नॅशनल अवॉर्ड्स... सगळं… रोजचंच.. रोजच्यासारखंच.

पण या सगळ्यामध्ये ही बातमी ज्या क्षणी वाचली, तेव्हापासून जो काय भीतीचा गोळा आलाय पोटात, तो जाता जात नाहीये. बलात्कार, वासनाकांड, लिंगपिपासा ही कधीही घृणास्पदच. त्याचं कुठलंही समर्थन असूच शकत नाही. कधीच! पण त्याला जो आणि ज्या पद्धतीचा सपोर्ट मिळतो आहे, ते ज्या पद्धतीनं पाठीशी घातलं जातंय, तिरंग्याची देशप्रेमाच्या नावाखाली जी काय अंतयात्रा काढली जातीय, किंवा एकुणातच ही जी काही हिडीस दमनशाही चाललीये, त्यात कसं ‘असायचं’ आहे आपण? मुजोरपणाची किती टोकाची परिसीमा? आणि हा कसला बेशरम नंगानाच चाललाय आसपास??

मी खूप ठरवलं की, यावर आपण बोलायचं नाही. व्यक्त व्हायचं नाही. काय फरक पडतो इतके सगळे लोक बोलत असताना मी नाही बोलले तर? आणि त्यातून सोशल मीडियावर तर नकोच. उगाच कशाला नसते वाद अंगावर घ्या! खूप प्रयत्न केला शांत बसायचा. पण खरं सांगू, ते फोटोमधले हसरे मोठे मोठे डोळे ना झोपूच देत नाहीयत. विचित्र पाठलाग करतायत असं वाटतं सारखं.

काल एक ट्विट वाचलं, “अच्छा हुआ असिफा मर गई, बडी होती तो वैसे भी आतंकवादी ही बनती." मी शप्पथ सांगते मला रडू आलं एकदम. यापेक्षा जास्त काय करू शकणार म्हणा? रडूच शकतो फक्त. पण हे रडू घाणीचं होतं. रागाचं, तिरस्काराचं, हताश वाटण्याचं, भीतीचं, सगळ्याचं. ही कुठली विषारी गोळी गिळलीय आपण समाज म्हणून? सगळ्यांनी, एकत्र? असिफाला गोळी देऊन गुंगीत असताना बलात्कार केला तिच्यावर. आपलंही फार काही वेगळं नाहीय. ही गुंगीची गोळी देऊन अख्ख्या समाजावर वर्षानुवर्षं बलात्कार झालाय आणि ते मेंदू दगड घालून फोडलेत कोणीतरी! कुठलाही विषय आपण बेसिक संवेदनशीलतेनं पाहू शकतच नाही! फक्त ओंगळवाणी, बीभत्स, किळसवाणी प्रदर्शनं मांडू शकतो. आपल्या भक्तीची, श्रद्धांची, देवाची. नुसती प्रदर्शनं… नुसत्या आराशी!

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

साधं खरचटलं तरी दोन दिवस जोंभाळतो आपण स्वतःचा जीव. त्या एवढ्याशा पोरीला काय झालं असेल? किती किती दुखलं असेल. शरीराच्या त्या भागाशी ‘शू’ करण्याव्यतिरिक्त ओळखही न होण्याचं वय ते... आपल्यासोबत हे काय होतंय कळायच्या आतच संपली ती. आणि संपली नाही सीधेपणानं… गळा दाबून, दगडाने डोकं ठेचून संपवली तिला....

मला खरंच खूप भीती वाटतीय की, मी या अशा जगात राहतेय जिथं हे सगळं खूप नॉर्मल वाटतंय सगळ्यांना. किंवा माझ्या आसपासचे सगळेच पोटात ही भीती घेऊन वर नॉर्मलसीचा मुखवटा घालून जगतायत. हे तर फारच भीतीदायक आहे. आपल्याला सगळ्यांना या सप्रेशननं वेड लागेल कदाचित. किंवा लागलंही आहे ऑलरेडी! ‘आपले – त्यांचे’, ‘माझ्या जातीचे - त्याच्या जातीचे’ या सगळ्यात माझ्या बाई असण्याची आणि माणूस असण्याची जी ‘लक्तरं’ निघतायत; त्यानं मी उभी-आडवी नासवली जातीये. दररोज.

मला झोप नाही लागतेय नीट रात्रीची. या अशा वातावरणाची, त्याच्याशी जुळवून घेण्याची आणि काही पर्याय नाही, म्हणून पाय ओढत जगत राहण्याची मला खरंच खूप, खूप जास्त भीती वाटतीय!

.............................................................................................................................................

लेखिका स्पृहा जोशी मराठी सिने-नाट्य कलावंत आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Anand Pawar

Fri , 20 April 2018

स्पृहा जोशी यांचा लेख चांगला व योग्य आहे. परंतु त्यावरील प्रतिक्रिया देणारे गामा पैलवान यांनी वरील विषयात धर्म जात पात याऐवजी स्त्री व पुरूष संबध व सामाजिक भान या दृष्टीने विचार करणे आवश्य आहे. पुर्वी त्यांनी केले म्हणून आता आम्ही तसे वागणार यातून परिस्थिती कशी सुधारणार.


Gamma Pailvan

Fri , 20 April 2018

स्पृहाताई, तुम्ही लिहाच. काय फरक पडतोय असं म्हणून अजिबात गप्प राहू नका. त्याचं काये की तुम्ही तुमच्या आईच्या पोटांत होतात ना (इ.स. १९८९ बरंका), त्याच्याही आधीपासनं काश्मिरात हिंदू बायकांवर नृशंस अत्याचार होत आलेत. तेव्हा जर वेळच्या वेळी वृत्तपत्रांनी आवाज उठवला असता तर आज असिफावर हा प्रसंग ओढवला नसता. आज जे असिफाच्या नावाने ऊर बडवीत रडताहेत ते १९९० साली हिंदूंवर अशीच भीषण परिस्थिती ओढवली असतांना डोळ्यांवर कातडं ओढून बसले होते. तुम्ही मात्र अशी चूक आजिबात करू नका. लिहा. व्यक्त व्हा. आणि त्या रोहिंग्या मुस्लिमांना जम्मूतनं हाकून लावायच्या कार्यात योगदान द्या. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......