औडकचौडक ताराबाई (‘औडकचौडक’ म्हणजे काय? तर- आडवंतिडवं वाकडंतिकडं कसंही. शिस्तबद्ध किंवा आखून-रेखून असं काही न केलेलं.)
पडघम - सांस्कृतिक
मुकुंद कुळे
  • डॉ. तारा भवाळकर आणि त्यांची निवडक ग्रंथसंपदा
  • Mon , 15 January 2024
  • पडघम सांस्कृतिक डॉ. तारा भवाळकर Tara Bhawalkar महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

‘सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिका)च्या २०२३च्या ‘दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्काराने’ आज १५ जानेवारी २०२४ रोजी पुण्यात लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांना समारंभपूर्वक गौरवण्यात आले. त्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेत प्रकाशित झालेल्या लेखाचं हे पुनर्मुद्रण....

.................................................................................................................................................................

‘औडकचौडक’ हा ताराबाईंचा (डॉ. तारा भवाळकर) आवडता शब्द. आपलं लेखन-वाचन आणि जगणंही औडकचौडक झालंय, असं बोलताना त्या अनेकदा सांगत असतात. त्यांच्या बोलण्यातील हे ‘औडकचौडक’ म्हणजे काय? तर- आडवंतिडवं वाकडंतिकडं कसंही. शिस्तबद्ध किंवा आखून-रेखून असं काही न केलेलं. अर्थात त्याची ताराबाईंना बिलकूल खंत नाही. उलट आपल्या या औडकचौडक लेखन-वाचनाने आणि वागण्या-जगण्यानेच आपल्याला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं, याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे.

किंबहुना त्यांच्या अशा जगण्यामुळेच आजच्या बहुआयामी, बहुपेडी, बहुप्रातिभ ताराबाई मराठी सारस्वताला गवसलेल्या आहेत. केवळ त्यांच्यामुळे मराठी लोकसाहित्यातल्या-लोकसंस्कृतीतल्या अनेक अनवट अशा वाटा मराठी वाचकांना उमजल्या आहेत, आकळल्या आहेत. त्यांच्याप्रमाणे लोकसाहित्याच्या क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्रात इतरही अनेक मान्यवर होते आणि त्यातले काही आजही आहेत. परंतु ताराबाईंचं वेगळेपण हे की, त्यांनी परंपरेनं चालत आलेल्या लोकसंस्कृतीला, मातृसंस्कृतीशी जोडून घेतलं.

लोकसाहित्याचा-लोकसंस्कृतीचा अभ्यास त्यांनी स्त्रीवादी दृष्टिकोनातून केला. परिणामी लोकसंस्कृतीच्या मुळाशी असलेलं स्त्रीतत्त्व नव्यानेच मुखरित झालं. लोकसंस्कृतीच्या अभ्यासाला एक नवा आयाम मिळाला.

आज डॉ. तारा भवाळकर हे नाव जरी उच्चारलं, तरी त्यापुढे त्वरित ‘लोकसाहित्याच्या अभ्यासक’ ही उपाधी आपसूक जोडली जाते, इतकं लोकसाहित्य आणि डॉ. तारा भवाळकर हे समीकरण जुळून आलंय. यावरून कदाचित कुणाला असंही वाटेल की, लोकसाहित्य हा ताराबाईंचा कायमच जिव्हाळ्याचा-प्रेमाचा आणि संशोधनाचा विषय राहिला असावा. परंतु प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. लोकसाहित्य किंवा लोकसंस्कृती हा विषय त्यांच्या आयुष्यात फार उशिरा आला. तोही योगायोगाने. मात्र लोकसाहित्य-लोकसंस्कृतीच्या अंगाने त्यांचं भरणपोषण कळत-नकळत अगदी लहानपणापासून होत गेलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

महाराष्ट्र-भारतातील जुनंपण सरण्याच्या आणि नवंपण येण्याच्या सांध्यावरच्या काळाच्या ताराबाई साक्षीदार आहेत. एकीकडे दुसरं महायुद्ध सरून यंत्रयुगाला प्रारंभ झाला होता. जातं जाऊन गिरणाबाई चालायला लागली होती. ग्रामीण भागातही हे बदल हळूहळू झिरपत होते. तरी त्याचं सार्वत्रिकीकरण झालेलं नव्हतं. त्यामुळे घरातच जात्यावरच्या ओव्यांपासून अंगणात चालणाऱ्या सण-उत्सवातल्या खेळ-गाण्यांपर्यंत त्यांना संथा मिळाली.

त्यात त्यांचं बालपण गेलं पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या वाड्यात. ताराबाईंचं कुटुंब या वाड्यात एक भाडेकरू म्हणून राहायचं. चारही वेदांचं मराठीत भाषांतर करणाऱ्या आणि प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या चित्रावशास्त्र्यांच्या या वाड्यात एकीकडे अखंड ज्ञानयज्ञ सुरू असायचा, तर दुसरीकडे वाड्यातल्या सर्व देवळांत पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत देवांची साग्रसंगीत सेवा सुरू असायची. यातून अगदी आपसूक लोकधाटी ते शास्त्रघाटी असा ताराबाईंचा पिंड घडत गेला...

आणि परंपरेनं चालत आलेलं जसंच्या तसं न स्वीकारता प्रत्येक गोष्टीला शास्त्रकाट्याची कसोटी लावायची त्यांना सवय लागली. अन्यथा जुनं ते सोनं म्हणत परंपरेविषयी गहिवर काढणाऱ्यांची आपल्याकडे कमतरता नाही. परंतु लोकसाहित्याचा-लोकसंस्कृतीचा अभ्यास करताना ताराबाई या ‘गहिवर संप्रदाया’त रमल्या नाहीत. लोकसंस्कृतीचा अभ्यास करताना केवळ भावभिजलेपण उपयोगाचं नाही हे त्यांना सुरुवातीलाच उमगलं आणि त्यांनी लोककथा-लोकगीतांपासून ते लोकविधी-लोकश्रद्धांपर्यंत प्रत्येक बाबतीत विवेकवादाचा आधार घेतला.

मराठीत लोकसाहित्याच्या शास्त्रीय अभ्यासाची पायाभरणी करणाऱ्या दिवंगत विदुषी दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याच्या अभ्यासकांना एक इशारा देऊन ठेवला होता. त्या म्हणाल्या होत्या- ‘‘लोकसाहित्याचा खूप मोठा भाग अत्यंत हिडीस, कंटाळवाणा व जनतेच्या बुद्धीस मागे खेचून धरणारा आहे. लोकसाहित्याचा कृत्रिम उमाळा केवळ त्या विषयालाच नव्हे, तर आमच्या अभिरुचीला व प्रगतीला अंती मारक ठरणारा आहे. तेव्हा लोकसाहित्याची छाननी, त्याचे सर्व घटक अलिप्तपणे तपासून व्हायला हवी.”

ताराबाईंनी दुर्गाबाईंचा हा इशारा केवळ शिरोधार्य मानला नाही, तर त्या त्यापेक्षा एक पाऊल पुढेच गेल्या. म्हणून तर त्या म्हणतात- “पारंपरिक जीवन हा माझा जिव्हाळ्याचा विषय असला तरी तो माझ्या अंधश्रद्ध उमाळ्याचा विषय कधीच नव्हता. उलट मी त्याकडे सतत चिकित्सक वृत्तीनेच पाहत आले आहे. जुने ते सर्व सुंदर आदर्श असे जे एक स्वप्नचित्र उभे करण्याची प्रथा आहे ती चिकित्सक विवेकाच्या विरोधात जाणारी आहे.’’

संस्कृतीचं उत्खनन आणि विश्लेषण हा ताराबाईंचा स्थायीभाव आहे. महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार हा एकप्रकारे डॉ. तारा भवाळकर यांच्या अशा विलक्षण आणि विचक्षण अभ्यासवृत्ती-संशोधनवृत्तीला दाद देणाराच आहे. तसंच ताराबाईंचा हा गौरव म्हणजे लक्ष्यार्थाने लोकसाहित्य-लोकसंस्कृतीचा गौरव आहे नि ताराबाईंच्या औडकचौडक जगण्याचाही!

ही विवेकाची भूमिका ताराबाईंच्या एकूणच जगण्याच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे. खरं तर ताराबाईंचं बालपण काहीशा परंपरावादी वातावरणात गेलेलं. टोकाचं सनातनी वातावरण त्यांच्या कुटुंबात नसलं, तरी परंपरेनं चालत आलेले सर्व धार्मिक सण-उत्सव रितसर करण्याची पद्धत त्यांच्या घरात होती. लहानपणी त्या जेव्हा पुण्यात होत्या, तेव्हा चित्रावशास्त्र्यांच्या वाड्यात राहायला असल्या तरी एकूण पुणं कर्मठच होतं.

या प्रकारच्या सांस्कृतिक भवतालामुळे ताराबाई परंपरावादी व्हायला वेळ लागला नसता. पण त्यांच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांनी त्यांना आयुष्यभरासाठी शहाणं करून सोडलं, पहिला प्रसंग चित्रावांच्या वाड्यातला होळीदहनाचा. एकदा होळी पेटवण्याच्या आधी वाड्यातील सर्व मुलगे तोंडावर मूठ पालथी ठेवून बोंब मारायला लागले.

तेव्हा लहानग्या ताराबाईंनीही त्यांचं अनुकरण केलं आणि त्याही बोंब मारायला लागल्या. त्यासरशी त्यांच्या आईने दणकन् त्यांच्या पाठीत धपाटा घातला. पण त्याच वेळी विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव ताराबाईंच्या आईला म्हणाले- ‘मारू दे तिला बोंब, नाहीतरी मुळात बायकांनीच बोंब मारायची असते.’

दुसरा प्रसंग ताराबाईंना लहानपणी शिकवणाऱ्या बोकीलमास्तरांचा. ताराबाईंच्या दारासमोर एकदा कुणीतरी विड्याची पानं आणि गूळ-खोबरं ठेवून त्यावर गुलाल टाकला होता. तसंच टाचण्या टोचलेलं लिंबूही ठेवलं होतं. अशा परिस्थितीत सर्वजण घाबरलेले असताना समोरच राहणारे बोकीलमास्तर पुढे झाले आणि त्यांनी ते सर्व साहित्य उचलून आपल्या घरी नेलं. नंतर पानं धुऊन चंचीत टाकली. आणि गूळ-खोबरंही धुऊन स्वतःही खाल्लं नि शिकवणीला आलेल्या लहान ताराबाईंनाही खाऊ घातलं. तेव्हा लहानग्या ताराच्या मनात आलं, आपण कुणीतरी मंतरलेलं गूळ-खोबरं खाल्लं. आता मास्तर आणि आपण दोघेही मरणार. तेव्हा मास्तर म्हणाले होते- ‘कसला मंत्र अन् कसलं काय... अगं भित्यापाठी ब्रह्मराक्षस! अशी मंत्रांनी माणसं मरत असती तर लढाईवर मंत्रच नसते का पाठवले? बंदुकांची आणि तोफांची गरजच काय होती?’

गंमत म्हणजे चित्रावशास्त्री आणि बोकीलमास्तरांप्रमाणे विवेकाची शिकवण देणारी, थेट नास्तिकच म्हणता येईल अशी एक व्यक्ती ताराबाईच्या घरातच होती. मुद्दाम यमाच्या दक्षिण दिशेला पाय करून झोपणारी. आलाच यम न्यायला तर त्याला लाथेने उडवता तरी येईल, असं म्हणणारी.

या साऱ्या अनुभवांच्या प्रभावातूनच ताराबाईंनी पुढील आयुष्यात विवेकवादी भूमिका जपली आणि निभावलीही. 'सुगावा प्रकाशन'चे विलास वाघ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, नरहर कुरुंदकर, नारायण सुर्वे यांच्याशी ताराबाईंचं मैत्र जुळलं ते या त्यांच्या विवेकवादी भूमिकेतूनच. म्हणूनच त्यांनी एके ठिकाणी म्हणून ठेवलंय- “बोकील मास्तरांनी शिकवलेले पाढे आणि गणितं मी कधीच विसरले. पण त्यांनी दाखवलेला विवेकाचा दिवा मात्र पुढे आयुष्यभर वाट दाखवत राहिला आहे. केवळ कोणीतरी म्हणतं म्हणून एखाद्या गोष्टीचा विनातक्रार स्वीकार करायला पुढं मन कधीच तयार झालं नाही. प्रश्न, शंका, फाटे फोडणं हे होतंच राहिलं. त्यात भरकटणं, त्रास होणं अटळ होतं. राजमार्ग सोडून विचार करणारांना जे एकाकीपण येतं तेही आलं. पण पुन्हा प्रत्येक वाटेवर एकेक प्रकाशदाता भेटत गेला!”

लोकसाहित्याची अशी स्त्रीवादी अंगाने प्रथमच मांडणी केली गेल्यामुळेच ताराबाईंचं या अभ्यासक्षेत्रातील काम विशेष दखल घेण्यायोग्य आहे. अलीकडेच त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या ‘सीतायन’ या पुस्तकाने त्यांची ही स्त्रीवादी मांडणी अधिकच अधोरेखित झालेली आहे. अभिजात परंपरेने रामायणाचा स्वीकार केलेला असताना लोकपरंपरेतील स्त्रीच्या मनात मात्र 'सीतायन'च कसं आहे, ते त्यांनी लोकपरंपरेतील लोकरामायणांच्या आधारे या पुस्तकात सिद्ध केलं आहे. अर्थात ताराबाईंनी केवळ लोकसाहित्य वा लोकसंस्कृतीबद्दलच लेखन केलंय असं नाही. कथालेखन, ललितलेखन, विनोदीलेखन असं त्यांनी विपुल लेखन केलं आहे.

आता या क्षणी ताराबाईंकडे पाहिलं की, त्या कृतार्थतेच्या एका टप्प्यावर पोचलेल्या दिसतात. वापरून वापरून मऊसूत झालेल्या साडीचा लाघवी मुलायमपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्राप्त झालेला आहे. पण प्रत्यक्षात ताराबाईंचं आयुष्य इतकं साधं-सरळ कधीच नव्हतं. सातत्याने स्वतःला सिद्ध करतच त्या आताच्या टप्प्यावर पोचलेल्या आहेत. लहानपणी घरातील ज्येष्ठ अपत्य म्हणून त्या जरा लवकरच जाणत्या झाल्या. आपली कोणत्याही प्रकारची जबाबदारी कुटुंबावर पडू नये शालेय वयातच त्या शिकवण्या घेऊ लागल्या.

गंमत म्हणजे रीतसर शिक्षण त्यांनी फक्त एसएससीपर्यंतच घेतलं. पुढलं महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण त्यांनी बाहेरूनच पूर्ण केलं. त्यांनी नोकरी करणं ही त्यांच्या कुटुंबाची गरज नसेलही कदाचित, पण आपल्या आत्मसन्मानासाठी त्यांनी कायम नोकरी करूनच शिक्षण घेतलं. त्यासाठी त्यांनी कधी हिंदी राष्ट्रभाषेची परीक्षा दिली, तर कधी पीटी शिक्षिका म्हणूनही शिकवलं. ताराबाई महाविद्यालयात गेल्या त्या थेट प्राध्यापक म्हणून शिकवायलाच.

एवढंच कशाला आपला पीएच.डी.चा अभ्यासही त्यांनी एकप्रकारे स्वतःच केला आणि त्या प्रबंधासाठी त्यांना पुणे विद्यापीठाचा (आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचा पुरस्कारही मिळाला. त्या जेव्हा म्हणतात मी औडकचौडक जगले, त्यामागे हा संदर्भ असतो.

लहानपणी चित्रावशास्त्र्यांच्या वाड्यात राहिल्यामुळे तेथील मंदिरात होणाऱ्या देवाच्या सर्व धार्मिक विधी-विधानांतील नाट्यात्मकता ताराबाईंना लहानपणीच भावली होती. पुढच्या काळात कदाचित त्यांतूनच त्या नाटकाच्या अभ्यासाकडे वळल्या. केवळ अभ्यासाकडे नाही, तर त्या नाट्यचळवळीत सामील झाल्या. नाट्यलेखन-दिग्दर्शनापासून ते थेट अभिनयापर्यंत त्यांनी रंगभूमी गाजवली. नोकरीच्या निमित्ताने पन्नास वर्षांपूर्वी सांगलीत येऊन स्थिरावल्यावर त्यांनी सांगलीतच एक प्रायोगिक नाट्यसंस्थाही सुरू केली.

विशेष म्हणजे त्यांना राज्यस्तरावरील नाट्यस्पर्धेत अभिनयासाठी पुरस्कारही मिळाले आहेत. नाटकाच्या या आवडीतूनच त्यांनी पीएच.डी.साठी ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण : प्रारंभापासून १९२०पर्यंत’ हा विषय निवडला. पीएच.डी.साठी या विषयाचा अभ्यास करतानाच त्यांची गाठ पौराणिक मिथकांपासून लोकरंगभूमीवरील विविध घटकांशी पडली आणि त्यांच्यासमोर अभ्यासाचं एक वेगळंच क्षेत्र अवचितपणे खुलं झालं. त्यानंतर मग त्यांचा पीएच.डी.चा अभ्यास कधीच पूर्ण झाला, लोकसाहित्य-लोकसंस्कृतीचा अभ्यास मात्र आजतागायत सुरू आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लोकसाहित्याच्या क्षेत्रात काम करणारे, करू इच्छिणारे त्यांच्याकडे कायमच मार्गदर्शक म्हणून पाहतात. ताराबाई मात्र आजही स्वतःला लोकसाहित्याची विद्यार्थिनी समजतात. कारण लोकसाहित्य-लोकसंस्कृती ही प्रवाही गोष्ट आहे. ती कधीच थांबत वा संपत नाही. काळाच्या ओघात वेगवेगळी समकालीन रूपं धारण करून वाहत राहते. तेव्हा त्या त्या काळात लोकसंस्कृतीचा मागोवा घेऊन तिचा समकाळाशी सांधा जोडणं ताराबाईंना महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच आजही त्या लोकगीतं-लोककथा-लोकश्रद्धा यांची आधुनिक काळाशी सांधेजोड करीत असतात.

लोकसाहित्याचा-लोकसंस्कृतीचा अभ्यास ताराबाईंनी त्यांचा त्यांनी केला, आणि तो करताना तो अगदी शास्त्रीय पद्धतीने केला. म्हणजे आज लोकसाहित्य ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा मानली जाते. मात्र या ज्ञानशाखेच्या अंतर्गत येणाऱ्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी विविध ज्ञानशाखांचा (मल्टी डिसिप्लिनरी) आधार घ्यावा लागतो. त्यानुसार ताराबाई इतिहासापासून ते थेट मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, दैवतशास्त्र, भूगोल अशा साऱ्या ज्ञानशाखांच्या क्षेत्रात मनःपूत रमलेल्या असतात. त्यांच्या या संशोधन वृत्तीमुळेच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोशात लोकसाहित्याबद्दलच्या नोंदी लिहिण्यासाठी त्यांना खास पाचारण केलं होतं.

महत्त्वाची बाब म्हणजे ताराबाई कुठलीही गोष्ट अंधपणाने स्वीकारत नाहीत, मग ती गोष्ट प्राचीन असो वा अर्वाचीन. म्हणूनच जेव्हा १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्त्री-मुक्ती वर्ष भारतातही जोरदारपणे साजरं होत होतं, तेव्हा ‘स्त्री-मुक्तीची कल्पना निदान आपल्याकडे तरी नवीन नाही’ असा मुद्दा त्यांनी मांडला होता आणि त्यासाठी मध्ययुगात होऊन गेलेल्या संत स्त्रियांचे दाखले दिले होते. विठ्ठलाकडे आई-बाप-भाऊ या नात्यांपलीकडे जाऊन सखा, प्रियकर म्हणूनही पाहणाऱ्या संत स्त्रियांच्या क्रांतिकारकत्वाची त्यांनी नव्यानेच महाराष्ट्राला ओळख करून दिली.

त्यातूनच आकाराला आलेलं ‘स्त्री-मुक्तीचा आत्मस्वर’ हे त्यांचं पुस्तक मध्ययुगातील स्त्री-मुक्ती संकल्पनेची स्त्रीवादाच्या अंगाने अभ्यासपूर्ण मांडणी करणारं आहे. पण केवळ संत स्त्रियांपुरता स्त्री-मुक्ती किंवा स्त्रीवादाचा पुरस्कार करून ताराबाई थांबल्या नाहीत. नंतरच्या काळात त्यांनी एकूण लोकसंस्कृतीचाच त्या अंगाने मागोवा घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की- ही लोकसंस्कृती खरं तर मातृसंस्कृती आहे. ‘लोकसाहित्यातील स्त्री-प्रतिमा’ ‘लोकसंचित’, यांसारख्या पुस्तकांतून त्यांची लोकसाहित्याची स्त्रीवादी मांडणी पाहायला मिळते.

ताराबाईंच्या दारासमोर एकदा कुणीतरी विड्याची पानं आणि गूळ-खोबरं ठेवून त्यावर गुलाल टाकला होता. तसंच टाचण्या टोचलेलं लिंबूही ठेवलं होतं. अशा परिस्थितीत सर्वजण घाबरलेले असताना समोरच राहणारे बोकीलमास्तर पुढे झाले आणि त्यांनी ते सर्व साहित्य उचलून आपल्या घरी नेलं. नंतर पानं धुऊन चंचीत टाकली. आणि गूळ-खोबरंही धुऊन स्वतःही खाल्लं नि शिकवणीला आलेल्या लहान ताराबाईंनाही खाऊ घातलं. तेव्हा लहानग्या ताराच्या मनात आलं, आपण कुणीतरी मंतरलेलं गूळ-खोबरं खाल्लं. आता मास्तर आणि आपण दोघेही मरणार. तेव्हा मास्तर म्हणाले होते- ‘कसला मंत्र अन् कसलं काय... अगं भित्यापाठी ब्रह्मराक्षस! अशी मंत्रांनी माणसं मरत असती तर लढाईवर मंत्रच नसते का पाठवले? बंदुकांची आणि तोफांची गरजच काय होती?’

ताराबाई एके ठिकाणी म्हणतात- “लोकपरंपरेतील स्त्री कायमच कालसंवादी राहत आलेली आहे. सुख-दुःख, आनंद असमाधान, वेदना-विद्रोह हे सारेच भाव लोकपरंपरेतील स्त्री व्यक्त करीत आली आहे. परंतु कालौघात आदिम स्त्रीसत्ताकाच्या खुणा पुसून तर टाकल्या गेल्याच, पण अनेकदा त्याच प्रथांची-कथांची स्त्रीला परवश करणारी मांडणी केली गेली. कधी भय दाखवून, तर कधी गौरवाचा मुलामा देत. म्हणूनच संपूर्ण संस्कृतीच्या प्रवाहात-प्रवासात दिसणाऱ्या स्त्रीच्या खुणाच शोधण्याचा प्रयत्न मी आजवर करीत आले आहे.”

लोकसाहित्याची अशी स्त्रीवादी अंगाने प्रथमच मांडणी केली गेल्यामुळेच ताराबाईंचं या अभ्यासक्षेत्रातील काम विशेष दखल घेण्यायोग्य आहे. अलीकडेच त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या ‘सीतायन’ या पुस्तकाने त्यांची ही स्त्रीवादी मांडणी अधिकच अधोरेखित झालेली आहे. अभिजात परंपरेने रामायणाचा स्वीकार केलेला असताना लोकपरंपरेतील स्त्रीच्या मनात मात्र 'सीतायन'च कसं आहे, ते त्यांनी लोकपरंपरेतील लोकरामायणांच्या आधारे या पुस्तकात सिद्ध केलं आहे.

अर्थात ताराबाईंनी केवळ लोकसाहित्य वा लोकसंस्कृतीबद्दलच लेखन केलंय असं नाही. कथालेखन, ललितलेखन, विनोदीलेखन असं त्यांनी विपुल लेखन केलं आहे. त्यांची सुमारे पंचेचाळीसेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यातही त्यांचा एक अलक्षित राहिलेला पैलू म्हणजे, त्या उत्तम अनुवादकही आहेत. प्रसिद्ध दिवंगत हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या कवितासंग्रहाचा त्यांनी उत्तम मराठी अनुवाद केलेला आहे आणि तो प्रकाशितही झालेला आहे.

मात्र असं विविधांगी लेखन ताराबाईंनी केलेलं असलं, तरी त्यांची खरी ओळख लोकसाहित्य-लोकसंस्कृतीच्या भाष्यकार अशीच मराठी जनमानसात रुजलेली आहे. कारण त्यांच्या प्रकाशित साहित्यावर नजर टाकली तर त्यांची ‘यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा’, ‘लोकनागर रंगभूमी’, ‘मिथक आणि नाटक’, ‘लोकसंचित’, ‘लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा’, ‘स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’, ‘लोकसाहित्य वाङ्मयप्रवाह’, ‘मायवाटेचा मागोवा’, ‘लोकपरंपरा आणि स्त्री-प्रतिभा’, ‘पायवाटेची रंगरूपे’, ‘लोकांगण’, ‘लोकसाहित्याच्या अभ्यास दिशा’, ‘मातीची रूपे’, ‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा’, ‘कथा जुनी तरी नवी’, ‘मुक्ती मार्गाच्या प्रवासिनी’ आणि ‘महामाया’ (रा. चिं. ढेरे यांच्यासह) ही लोकसाहित्य-लोकसंस्कृतीवर मूलगामी प्रकाशझोत टाकणारी पुस्तकं पटकन नजरेत भरतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

संस्कृतीचं उत्खनन आणि विश्लेषण हा ताराबाईंचा स्थायीभाव आहे. महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार हा एकप्रकारे डॉ. तारा भवाळकर यांच्या अशा विलक्षण आणि विचक्षण अभ्यासवृत्ती-संशोधनवृत्तीला दाद देणाराच आहे. तसंच ताराबाईंचा हा गौरव म्हणजे लक्ष्यार्थाने लोकसाहित्य-लोकसंस्कृतीचा गौरव आहे नि ताराबाईंच्या औडकचौडक जगण्याचाही!

या पुरस्काराने ताराबाईंना नक्कीच आनंद झाला असेल; तसा तो त्यांच्या चाहत्यांनाही झालेला आहे. अन् तरीही ताराबाईसाठी कोणत्याही पुरस्काराच्या दशांगुळे वर असलेल्या एका पुरस्काराचा उल्लेख इथे केल्याशिवाय राहवत नाही. व्यवसायाने घरात कुलकर्णीपण असल्यामुळे ताराबाईंच्या घरातल्या सगळ्यांचंच आडनाव कुलकर्णी आहे. फक्त ताराबाईच एकमेव ज्यांचं आडनाव भवाळकर आहे. कारण पहिल्यांदा शाळेत नाव घालताना त्यांचं नाव तारा भवाळकर असं घातलं गेलं. आपण आता कुलकर्णीपण करत नाही, तर ते आडनाव कशाला लावा, असं बाईंच्या शाळाप्रवेशाच्या वेळी त्यांच्या काकाच्या मनात आलं. म्हणून त्याने ताराबाईंच्या नावापुढे भवाळकर हे आपलं मूळ आडनाव लावलं.

मात्र कालांतराने इतर मुलांच्या शाळाप्रवेशाच्या वेळी या गोष्टीचं विस्मरण झालं आणि बाकीची सगळी भावंडं-कुटुंबीय कुलकर्णीच राहिले. साहजिकच ताराबाईंची आई देखील कुलकर्णी हेच आडनाव लावायची. पण पुढे कधी तरी वयाची पन्नाशी उलटल्यावर थोरल्या लेकीच्या म्हणजेच ताराबाईंच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटून त्यांच्या आईने आपल्या कुलकर्णी आडनावाऐवजी भवाळकर आडनाव लावायला सुरुवात केली. आज वडिलांऐवजी किंवा त्यांच्यासोबत आपल्या आईचंही नाव लिहिणाऱ्यांची कमी नाही, पण मुलीचं नाव आईने लावण्याचं हे बहुधा एकमेव उदाहरण असावं!

ताराबाई अखंड लोकसाहित्यातील मातृसंस्कृतीचा स्त्रीसंस्कृतीचा गौरव करतात. आईने आपल्या लेकीचं नाव लावावं, यापेक्षा स्त्री-त्वाचा महान गौरव दुसरा कुठला असू शकतो?

.................................................................................................................................................................

लेखक मुकुंद कुळे मुक्त-पत्रकार व लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.

mukundkule@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा