मी अनेक वाटांवरून प्रवास केला, तो करताना ‘रस्ते’ जरी बदलले, तरी ‘दिशा’ मात्र कधी बदलली नाही!
पडघम - सांस्कृतिक
राजा शिरगुप्पे
  • सामाजिक कार्यकर्ते व लेखक राजा शिरगुप्पे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Fri , 03 November 2023
  • पडघम सांस्कृतिक राजा शिरगुप्पे Raja Shirguppe राष्ट्र सेवादल Rashtra Seva Dal

तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते आणि हरहुन्नरी लेखक राजा शिरगुप्पे यांचं ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कोल्हापुरात वयाच्या ६४व्या वर्षी निधन झालं. त्यांचं हे एक अप्रकाशित भाषण. ऑक्टोबर २०२०मध्ये राष्ट्र सेवादलातल्या कार्यकर्त्यांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजा शिरगुप्पे यांनी संवाद साधला होता. त्या भाषणाचं हे शब्दांकन…

.................................................................................................................................................................

ज्या संघटनेत मी घडलो, मला माझ्यातलं ‘माणूसपण’ अधिक विकसित करता आलं, त्या संघटनेतील जुन्या आठवणींना उजळा देताना, खूप आनंद होत आहे.

खरं तर राष्ट्रसेवा दल माझ्या आयुष्यात कधी आलं, हे नेमकेपणानं सांगणं अवघड आहे. माझं बालपण सिंधुदुर्ग जिल्यातील समुद्र किनाऱ्याजवळच्या वेंगुर्ला गावात गेलं. तिथं माझं वडील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. ते सेवादलाचे कार्यकर्ते होते. अनेक समाजवाद्यांशी त्यांची घनिष्ट मैत्री होती.

त्यामुळे बॅ. नाथ पै म्हणजे नाथकाका आणि मधु दंडवते ही दोन माणसं लहानपणीच माझ्या आयुष्यात आली. त्यांचा माझ्या एकूण जगण्यावर, वाढीवर खूप प्रभाव पडलेला आहे. मी १०-१२ वर्षांचा असल्यापासून सेवादल शाखेमध्ये जात होतो. अर्थात तेव्हा सेवादल शाखा म्हणजे नेमकं काय हे माहीत नव्हतं, पण तिथं खूप गाणी म्हणायला मिळतात, गोष्टी ऐकायला मिळतात, खेळायला मिळतं, या तिथं जाण्यामागच्या भावना होत्या.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ही शाखा गावातल्या एका महाविद्यालयाचे हेडमास्तर वासुकाका देशपांडे चालवायचे. आमचा चाळीस-पन्नास मुलांचा ग्रुप होता. त्याचं वासुकाकांनी खूप छान पद्धतीनं ‘सोशलायझेशन’ केलं. समाजामध्ये कसं वागावं, इतरांशी कसं कौटुंबिक नातं निर्माण करावं, याचे नकळत संस्कार त्यांनी केले. इथूनच माझी जडणघडण होत गेली; साहित्य, कला, क्रीडा, अभिनयाशी ओळख होत गेली, पुढे जगाची ओळख होत गेली.

त्या काळात सेवादल शाखेत जाऊन आम्ही खेळाची, गोष्टींची, करमणुकीची हौस भागवत होतो. पाचवी-सहावीत गेल्यानंतर ‘बालवीर पथका’शी (त्या वेळी ‘स्काउट’ नावाची चळवळ जोरदार होती.) संपर्क आला. आज मी जो कोणी आहे, त्याची पायाभरणी या सेवादल शाखेनं आणि ‘बालवीर पथका’नं केली आहे. आज माझी ओळख ‘कार्यकर्ता’ आणि छोटासा ‘साहित्यिक’ अशी आहे, त्याची बांधणी सेवादलानेच केली, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

माझ्यातला कार्यकर्ता लेखक जागा करण्याचं काम राजाभाऊ मंगळवेढेकर, ‘साधना’चे सुरुवातीचे संपादक यदुनाथकाका यांनी केलं. यातील बरीचशी मंडळी आमच्या शाखेवर यायची, आमच्या घरीही थांबायची. त्यांच्याकडून अनेक गोष्टी ऐकायला मिळायच्या. त्या नुसत्या परीकथेच्या किंवा करमणुकीच्या नव्हत्या, तर त्यातून आपल्याला माणूस म्हणून नेमक कसं वाढायचंय, कशासाठी वाढायचंय, भविष्यात काय करायचंय, याचा बोध देणाऱ्या होत्या. 

..................................................................................................................................................................

राजा शिरगुप्पे यांचे ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झालेले लेख : 

करोनाने केलेल्या दुर्दशेपेक्षा राज्यकर्त्यांनी केलेली दुर्दशा अधिक भयावह आहे!

काश्मीर समजून घेताना... (भाग १)

काश्मीर समजून घेताना... (भाग २)

काश्मीर समजून घेताना... (भाग ३)

..................................................................................................................................................................

या लोकांकडून मी मोठमोठ्या पुढाऱ्याच्या गोष्टी ऐकल्या. मला आठवतंय, क्रांतिकारकांच्या, विशेषतः भगतसिंग, सुखदेव, राजगुरूपासून ते अगदी अर्जेंटिनाचा चे गव्हेरापर्यंतच्या गोष्टी आम्ही सेवादल शाखेवरच ऐकल्या. त्यातून आम्हाला त्यांच्याबद्दल विलक्षण आकर्षण निर्माण झालं. आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे, ते केवळ आपल्यासाठी न करता देशासाठी, समाजासाठी केलं पाहिजे, असं वाटायचं.

मला आठवतं, आपल्या देशात गरिबी प्रचंड आहे, ती निसर्गनिर्मित नसून, आपल्यातल्याच माणसांनी निर्माण केलेली आहे, कोणालाच गरीब राहण्याचा अधिकार नाही, अशी आमची भावना त्या वयातच तयार झाली होती.

‘बालवीर पथका’त ‘खरी कमाई’ हा उपक्रम चालत असे. त्यात आम्ही दररोज संध्याकाळी गावात जाऊन श्रम करायचो. त्याचे जे काही पैसे मिळायचे, ते संघनायकाकडे जमा करायचो. त्यातून सिनिअर मंडळी आम्हाला पुस्तकं, चित्रकलेचं साहित्य घेऊन द्यायची. वासुकाका आम्हाला आजूबाजूच्या गावात सहलीला आणि वनभोजनाला नेत.

या सगळ्यातून आपण जी गोष्ट करतो, ती दुसऱ्याच्याही फायद्याची झाली पाहिजे, समाज आहे म्हणून आपण आहोत, अशी सुंदर भावना नकळतपणे राष्ट्र सेवादलाने रुजवली. त्या काळात साने गुरुजी यांच्या गोड गोष्टी, कथा आमच्या वाचनात आल्या. त्या वाचत असताना साने गुरुजी म्हणजेच सेवादल आणि सेवादल म्हणजेच साने गुरुजी असा माझा समज झाला होता. वैचारिक अर्थानं तो फारसा चुकीचाही समज नाहीये.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अलीकडे मी जेव्हा सेवादलाचा इतिहास सांगणारं पुस्तक लिहायचं ठरवलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, साने गुरुजी फार नंतर सेवादलामध्ये आलेले आहेत. १९२५ साली सेवादलाची स्थापना झाली. काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीत एक पथक निर्माण करायचं काम होतं. पण नंतरच्या काळामध्ये सेवादलाला केवळ सेवाभावी संघटना न ठेवता समाज घडवणारी संघटना बनवण्याचा प्रयत्न गुरुजींनी केला.

जरी साने गुरुजी कागदोपत्री संस्थापक नसले, तरी त्याअर्थानं सेवादलाचे संस्थापक साने गुरुजीच आहेत, असं मला प्रामाणिकपणे म्हणावंसं वाटतं. त्यांचा स्पर्श सेवादलाला झाला, त्यातून माझ्यासारखे कार्यकर्ते निर्माण झाले. केवळ कार्यकर्तेच नाही, तर लेखक, अभिनेते, कलावंतही.

नंतर सेवादलात निळूभाऊ फुले, राम नगरकर यांच्याशी संपर्क आला. त्या वेळी माझ्या असं लक्षात आलं की, सेवादल किती व्यापक मैदान आहे, जिथं फक्त कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर तुम्ही जे कोणी आहात, तुमच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत, ते विकसित करण्याची संधी सेवादलामार्फत होते. तुमचं खऱ्या अर्थानं ‘सामाजिकीकरण’ होतं, पण तुमच्यात जे काही अद्भुत लपलेलं आहे - मग तुम्ही लेखक असाल, खेळाडू असाल, कवी असाल, आणखी काही असाल - ते विकसित होण्याचं माध्यम म्हणूनही सेवादल उपयोगी पडतं. आणि तसं अनेकांना उपयोगी पडलेलंही आहे.

त्यामुळे आजचा मी जो कोणी राजा शिरगुप्पे आहे, तो १०० टक्के सेवादलामुळेच आहे. अनेक गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. माझ्या वाढण्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. माझी सामाजिक, राजकीय वाटचाल खूप वेगळी आहे. राष्ट्र सेवादल ही माझ्या आयुष्यातील पहिली संघटना. दुसरी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’, एकदम डाव्या विचारांची, कम्युनिस्टांच्या जवळ असणारी… त्यानंतर आणीबाणीच्या काळातील विद्यार्थी संघटना, या सगळ्यातून मी जरी घडत गेलो, तरी मला जाणवतं की, या प्रत्येकाचा मूळ जो स्तर आहे, तो सेवादलानेच विणलेला आहे, तिथंच तयार झालेला आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

समाजवादी विचारधारेपासून विद्रोही विचारधारेपर्यंत, असा मोठा प्रवास मी केला आहे. तो करताना ‘रस्ते’ जरी बदलले, तरी ‘दिशा’ मात्र कधी बदलली नाही. ही दिशा न बदलण्याचं कारण राष्ट्र सेवादलच आहे. ते जर माझ्या आयुष्यात नसतं, तर माझी नौका कुठल्या दिशेनं वाहत गेली असती, हे सांगता येत नाही. सेवादलामुळे माझा संपूर्ण जीवन प्रवास वंचित आणि सर्वसामान्य माणूस केंद्री राहिला. त्या दृष्टीने अतिशय नीटसपणे मी वाढत राहिलो, त्याबद्दल माझ्या मनात सेवादलाबद्दलची कृतज्ञतेची भावना आहे.

मधल्या काही काळामध्ये सेवादलाशी संपर्क पूर्ण तुटला होता. मी अति डाव्या संघटना म्हणजे नक्षलवाद्यांपर्यंत जाऊन पोहोचलो होतो, पण मला बहकू न देण्याचं, नीट रस्त्यावर ठेवण्याचं काम सेवादलानेच केलं.

नंतर डॉ. नरेंद्र दाभोलकरांमुळे ‘साधना’शी आणि ‘साधना’मुळे पुन्हा एकदा सेवादलाशी जोडलो गेलो. बाकीच्या संघटनांनीही मला खूप दिलेलं आहे, ते घेत असतानाच माझ्यातील विवेक, माणूसपण शाबूत ठेवण्याचं काम मात्र सेवादलाने केलं आहे, हे जेव्हा त्या काळातील आठवणी आठवतो, तेव्हा लक्षात येतं.

साधारण वयाच्या १०व्या-११व्या वर्षांपासूनचा माझ्या आयुष्याचा काळ सेवादलाच्या छायेत गेलेला आहे. त्या काळात मी शिबिरं केली, गावामध्ये वेगवेगळी सामाजिक कामं केली. आज मी ‘नाटककार’ म्हणून ओळखला जातो, थोडाफार ‘अभिनेता’ म्हणून ओळखला जातो, याची पेरणी राष्ट्र सेवादलानेच केलेली आहे.

शब्दांकन – सौरभ बागडे

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा