सुब्रमण्यम स्वामी हसतमुख असले, तरी डोक्याने ‘सटकू’ आहेत. ते कुणावर घसरतील, याचा काही नेम नाही. लेकीन स्वामी को गुस्सा क्यो आता हैं?
पडघम - देशकारण
सुहास कुलकर्णी
  • सुब्रमण्यम स्वामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Sat , 16 September 2023
  • पडघम देशकारण सुब्रमण्यम स्वामी नरेंद्र मोदी

सुब्रमण्यम स्वामी हे एक थोर उद्योगी गृहस्थ आहेत. ते सतत काहीतरी बोलत असतात, करत असतात; कुणाच्या ना कुणाच्या मागे लागलेले असतात. कोर्टात केसेस करून कुणाला तरी जेलमध्ये टाकण्याच्याही प्रयत्नात असतात. ते ज्याच्या मागे लागतात त्याचं ‘जिणं’ हराम करून टाकतात.

हा सिलसिला गेली पन्नास वर्षं चालू आहे. हल्ली त्यांनी आपला मोहरा खुद्द नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवला आहे. खरं पाहता काही वर्षांपूर्वी हे दोघे एकमेकांच्या ‘गुड बुक्स’मध्ये होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवा, अशी सूचना करणारे स्वामी पहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे जुने संबंध. त्याचा उपयोग करून स्वामींनी मोदींचं नाव पुढे रेटलं, असं ते स्वत:च सांगतात!

त्याची परतफेड म्हणून की काय, मोदींनी स्वामींना भाजपतर्फे २०१६मध्ये राज्यसभेत खासदार बनवून पाठवलं. त्यानंतर चारेक वर्षं त्यांच्यातील संबंध चांगले राहिले. पण गेल्या दोनेक वर्षांपासून सुब्रमण्यम स्वामींनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली आहे. टीका करताना ते ज्या भाषेत बोलत आहेत, ती जिव्हारी लागणारी आहे. त्यांचं बोलणं मोदींच्या समर्थकांना अपमानजनक आणि बदनामीकारकही वाटेल, इतकं थेट आणि कडक शब्दांत असतं. त्यांची विधानं ऐकली-वाचली, तर ती विरोधी पक्षातील कुणा धाडसी नेत्याने केलेली असावीत, असं वाटावं.

खरं तर स्वामी ज्या शब्दांत कठोरपणे टीका करत आहेत, ती भाषा आजचे विरोधी पक्षाचे नेतेही बोलत नाहीत; पण स्वामी बिनदिक्कतपणे बोलतात.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

वसुंधरा राजेंचं काय करायचं? हा प्रश्न हिंदीत म्हणतात तसं ‘ना उगलते बनता हैं, ना निगलते बनता हैं’ टाईपचा आहे

‘इंडिया’ आघाडीची बैठक महाराष्ट्रात यशस्वीरित्या पार पडत असली, तरी ‘इंडिया’च्या झोळीत महाराष्ट्र किती जागा टाकणार?

मागच्याला ठेच लागली, तरी पुढचा शहाणा होतो असं नाही. ज्योतिरादित्य सिंधिया हे त्याचं ताजं उदाहरण आहे!

मागच्या आठवड्यात उत्तर भारतातल्या कच्च्या, अर्धकच्च्या बातम्या बघितल्या. या वेळी दक्षिण भारतातल्या बघूयात...

.................................................................................................................................................................

गेली पन्नास वर्षे स्वामींचं तोंड कुणी दाबू शकलेलं नाही, त्यामुळे आताही कुणी त्या फंदात पडणार नाही. ते असेच बोलत राहिले, तर जास्तीत जास्त त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. पण त्यांच्या मागे लागण्याचा अविचार कुणी करणार नाही. स्वामी हे हसतमुख असले, तरी डोक्याने ‘सटकू’ आहेत. ते कुणावर आणि का घसरतील, याचा काही नेम नाही.

हार्वर्डमधून अर्थशास्त्राची डॉक्टरेट घेऊन आल्यावर स्वामी आयआयटी दिल्लीत प्राध्यापक बनले. तेव्हा त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींशी पंगा घेतला आणि त्यांच्या आर्थिक धोरणांवर टीका करून स्वत:ची नोकरी गमावली. तेव्हा ते फक्त ३४ वर्षांचे होते. पुढे ज्या चंद्रशेखर यांनी पंतप्रधान असताना स्वामींना केंद्रात मंत्री केलं, त्यांच्याच विरोधात ते जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे ठाकले. पराभूत झाल्यावर चंद्रशेखर गैरमार्गाने निवडणूक जिंकले, असं म्हणत त्यांनी चंद्रशेखरांवर जी टीकेची झोड उठवली होती, त्यातून त्यांनी पक्षातून स्वत:ची हकालपट्टी ओढवून घेतली होती.

असंच काहीसं त्यांनी जयललितांबाबत केलं होतं. १९९८मध्ये जयललिता यांच्यासोबत युती करून ते स्वत: मदुराईमधून लोकसभेत गेले, पण त्यांच्याविरुद्धच बेहिशेबी मालमत्तेविषयीची केस करून त्यांना तुरुंगात टाकण्याची व्यवस्था स्वामींनी केली होती.

१९९८मध्ये देशातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक भरवून त्यांनी वाजपेयींचं केंद्रातलं सरकार एका मताने पाडलं होतं. वाजपेयी आणि स्वामी हे दोघेही मूळचे जनसंघाचे असूनही त्यांनी दयामाया दाखवली नव्हती. स्वामींनी बोलावलेल्या बैठकीत सोनिया गांधीही उपस्थित होत्या आणि सरकार पाडल्यामुळे त्यांचंही नेतृत्व प्रस्थापित व्हायला मदत झाली होती. पण त्याच सोनिया आणि राहुल गांधी यांनी ‘नॅशनल हेरॉल्ड केस’मध्ये हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत स्वामी कोर्टात गेले होते. चिदंबरम आणि टुजी केस घोटाळा प्रकरणी ए. राजा यांनाही स्वामींनी पळता भुई थोडी केली होती.

आयुष्यभरात स्वामी असे अनेकांवर सटकले आहेत आणि त्यांनी संबंधितांना हैराण करून टाकलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आता नरेंद्र मोदींची पाळी आलेली दिसतेय. मोदींनी प्रयत्नपूर्वक स्वत:ची प्रतिमा कार्यक्षम, धडाकेबाज निर्णय करणारा, दूरदृष्टीचा आणि भ्रष्टाचाराची चीड असणारा नेता, अशी केली आहे. त्यांच्या या प्रतिमेचं भंजन भारतातील राजकीय पक्ष अजूनपर्यंत तरी करू शकलेले नाहीत. आरोप अनेक केले जातात, पण अजूनही मोठ्या प्रमाणात मोदींचं गारुड टिकून आहे. राहुल गांधी वगळता मोदींबद्दल स्पष्टपणे बोलणारा विरोधी नेता दुसरा कुठला नाही. पण राहुलही बोलू शकणार नाहीत, अशा तिखट शब्दांत स्वामी मोदींचा समाचार घेताना दिसत आहेत.

तसं पाहता स्वामी हे स्वतंत्र विचाराचे नेते आहेत. त्यांना जे वाटतं ते बोलण्याची त्यांची पद्धत आहे. ते मोदींच्या समर्थनार्थ बोलत, तेव्हा त्यांचा कुणी हात धरू शकत नसे; आणि आता विरोधात बोलत आहेत, तेव्हाही कुणी धरू शकत नाही. ते भाजपचे खासदार असतानाही सरकारच्या कारभारावर टीका करत होते. पण तेव्हा त्यांचा रोख मोदींवर नसे. ‘मोदी भोवतालच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर विसंबून आहेत आणि त्यांचे मंत्री अर्थव्यवस्थेबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत नाही’, अशा शब्दांत २०१९मध्ये ते टीका करत.

अरुण जेटलींनी अर्थमंत्री असताना जीएसटीचं पाऊल टाकलं, तेव्हा ‘एकविसाव्या शतकातला हा सर्वांत मोठा मूर्खपणा आहे’, असं स्वामी म्हणाले होते. पण मोदींनी नोटबंदी जाहीर केली, तेव्हा हे पाऊल आवश्यक आहे, असं म्हणत त्यांनी मोदींची पाठराखण केली होती. पण ‘अर्थखात्याच्या अकार्यक्षमतेमुळे अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान झालंच, शिवाय काळ्या पैशावर नियंत्रण मिळवता आलं नाही’, अशी मल्लीनाथी त्यांनी केली होती.

या काळात त्यांच्या ‘टार्गेट’वर प्रामुख्याने अरुण जेटली आणि निर्मला सीतारामन हे अर्थमंत्री होते. सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प ‘बोगस’ आहे, असं म्हणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. पण ही टीका करत असताना ते मोदींबद्दल फारसं बोलत नसत.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

वसुंधरा राजेंचं काय करायचं? हा प्रश्न हिंदीत म्हणतात तसं ‘ना उगलते बनता हैं, ना निगलते बनता हैं’ टाईपचा आहे

‘इंडिया’ आघाडीची बैठक महाराष्ट्रात यशस्वीरित्या पार पडत असली, तरी ‘इंडिया’च्या झोळीत महाराष्ट्र किती जागा टाकणार?

मागच्याला ठेच लागली, तरी पुढचा शहाणा होतो असं नाही. ज्योतिरादित्य सिंधिया हे त्याचं ताजं उदाहरण आहे!

मागच्या आठवड्यात उत्तर भारतातल्या कच्च्या, अर्धकच्च्या बातम्या बघितल्या. या वेळी दक्षिण भारतातल्या बघूयात...

.................................................................................................................................................................

२०२१मध्ये त्यांनी थेट मोदींबद्दल बोलायला सुरुवात केली. ‘मोदी आणि अर्थमंत्री या दोघांनाही अर्थशास्त्रातलं काही कळत नाही,’ असं विधान करून त्यांनी सगळ्यांना अचंबित केलं होतं. ‘आर्थिक विकासाची उद्दिष्ट गाठण्यात सरकारला अपयश येत आहे. २०१६पासून वाढीचा वेग मंदावला आहे. भाववाढ नियंत्रणाबाहेर आहे’, वगैरे बऱ्याच गोष्टी ते बोलू लागले.

अर्थव्यवस्था बळकट करायची तर आयकर सरसकट बंद करणे, बँकेतील ठेवींवर ९ टक्के व्याज देण्याची व्यवस्था करणे वगैरे पावलं उचलावी लागतील, असं ते म्हणत. त्यावर  ‘तुम्ही या गोष्टींबद्दल मोदींना मार्गदर्शन का करत नाही?’ असं त्यांना विचारलं गेलं. त्यावर ‘ज्ञान अशा लोकांना द्या, जे श्रद्धेने ग्रहण करतील असं आपले ऋषिमुनी सांगून गेलेत’, असं उत्तर स्वामींनी दिलं होतं.

याचा अर्थ २०२१पासून स्वामींचा मोदींबाबत भ्रमनिरास होऊ लागला होता. त्यानंतर मात्र स्वामींनी मोदींवर खुलेआम टीका करायला सुरुवात केली आणि आता ते टीकेची धार आणखीनच वाढवू लागले आहेत. मोदींची चीनविषयीची भूमिका आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची त्यांनी केलेली हाताळणी, हे त्यांच्या टीकेचे प्रमुख विषय आहेत.

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची क्षमता १० टक्के आहे. पण आपली वाढ जेमतेम तीन-चार टक्क्यांनी होते आहे, पण मोदींच्या धोरणामुळे वाढ तर सोडाच, उलट अर्थव्यवस्थाच गोत्यात आली आहे, असं ते म्हणत आहेत. ‘मोदींनी परदेशातून काळा पैसा आणण्याचं दिलेलं वचन पाळलं नाही. जगातील ७१ बँकांमध्ये तीन ट्रिलियन डॉलर्स काळा पैसा ठेवला गेला आहे. पण तो परत आणण्यासाठी मोदींनी काहीही पावलं टाकली नाहीत’, असं ते नुकतंच म्हणाले आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘मोदींचं शिक्षण अगदीच किरकोळ झालं आहे; त्यामुळे ते असुरक्षित भासतात. ते हुशार लोकांकडे जबाबदाऱ्या सोपवत नाहीत. कामराज अशिक्षित होते, पण बुद्धिमान लोकांवर जबाबदाऱ्या सोपवून ते लीलया काम करत,’ असं निरीक्षण स्वामींनी नोंदवलं आहे. मोदींच्या अल्पशिक्षित असण्याबद्दल इतक्या खात्रीने बोलणारा नेता दुसरा कुणी नाही.

एका मुलाखतीत बोलताना ‘मोदींना अर्थव्यवस्थेतलं काहीही कळत नाही. त्यामुळे ते भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणं, शेतीचं उत्पन्न दुप्पट करणं वगैरे अशक्य गोष्टी बोलतात. या गोष्टी साधायच्या तर विकासदर किती लागेल वगैरे बाबी त्यांना कळत नाहीत. त्यामुळे ते असं काही बोलू लागले की लोकही हसतात,’ असा थेट हल्ला स्वामी सध्या करत आहेत.

अदानीच्या नावाभोवती जे वादळ हल्ली उठलं आहे, ती मोदी आणि भाजपची दुखरी नस आहे. ती अर्थातच स्वामींनी पकडली आहे. ‘मोदी अदानींबद्दल काहीतरी लपवत आहेत, अशी लोकभावना झालेली आहे,’ असं म्हणत असतानाच ‘मोदींच्या मर्जीशिवाय अदाणींनी काही केलेलं नसणार’, असंही ते सुचवत आहेत. त्यामुळे ‘अदानी प्रकरण नीटपणे हाताळलं जायचं असेल तर सर्वप्रथम मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा,’ असा थेट हल्लाबोल स्वामींनी केला आहे.

याउपर ‘अदानी उद्योगसमूहाच्या मालमत्तेचं राष्ट्रीयीकरण करा, त्याचा लिलाव करा आणि मिळणाऱ्या पैशातून लोककल्याणाची कामं करा’, असा सल्लाही ते देत आहेत.

मोदींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचं इतकं नुकसान झालं आहे की मोदी पुन्हा पंतप्रधान बनता कामा नयेत, असं स्वामी खुलेआम म्हणत आहेत. एवढंच नव्हे तर मोदींनी स्वत:हून निवडणूक लढवू नये, अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी ते संघाच्या सर्वोच्च नेत्यांच्याही कानावर घालणार आहेत म्हणे!

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

वसुंधरा राजेंचं काय करायचं? हा प्रश्न हिंदीत म्हणतात तसं ‘ना उगलते बनता हैं, ना निगलते बनता हैं’ टाईपचा आहे

‘इंडिया’ आघाडीची बैठक महाराष्ट्रात यशस्वीरित्या पार पडत असली, तरी ‘इंडिया’च्या झोळीत महाराष्ट्र किती जागा टाकणार?

मागच्याला ठेच लागली, तरी पुढचा शहाणा होतो असं नाही. ज्योतिरादित्य सिंधिया हे त्याचं ताजं उदाहरण आहे!

मागच्या आठवड्यात उत्तर भारतातल्या कच्च्या, अर्धकच्च्या बातम्या बघितल्या. या वेळी दक्षिण भारतातल्या बघूयात...

.................................................................................................................................................................

भाजप म्हणजेच मोदी आणि मोदी म्हणजेच भाजप असं स्वामी मानत नाहीत. मोदींना पर्याय नाही असंही ते मानत नाहीत. उलट मोदींशिवायचा भाजपच जास्त योग्य आहे, असं त्यांना वाटतं. येती निवडणूक भाजप जिंकेल, पण मोदींच्या नेतृत्वाशिवाय असं ते म्हणत आहेत.

स्वामी मोदींवर रागावले आहेत, याचं दुसरं कारण दिसतं, ते चीनसोबतच्या व्यवहारात. चीनने एलएसी (लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल) ओलांडलेली नाही, अशी भूमिका मोदींनी अधिकृतपणे घेतल्यामुळे स्वामी संतापले आहेत. ‘भारताची जमीन चीनने बळकावली नाही, असं म्हणणं हे महापाप आहे’, असं त्यांचं म्हणणं आहे. ‘चीनने भारताची ४०२४ चौरस किलोमीटर जमीन बळकावली असताना मोदी चूप का आहेत’, असा प्रश्न स्वामी विचारत आहेत.

गेल्या वर्ष दोन वर्षांत इतर घटनांवरूनही स्वामी मोदींवर तोफा डागत आहेत. ‘रामाच्या भारतात पेट्रोल ९३ रुपये, सीतेच्या नेपाळमध्ये ५३ रुपये, आणि रावणाच्या श्रीलंकेत ५१ रुपये’ असं ट्विट मागे त्यांनी केलं होतं. ‘रामसेतू’ला ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून जाहीर करण्याबद्दल सरकारकडून हलगर्जीपणा होत आहे, याबद्दलही त्यांनी टीका केली होती. संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये मोदींनी जायला हवं, अशीही भूमिका त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन घेतली होती.

अलीकडे ओरिसात बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला, तेव्हा ‘मोदींनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा घ्यायला हवा’ असं तर त्यांनी म्हटलंच शिवाय, ‘संथवेगाने जाण्यासाठी बनवलेल्या रेल्वेमार्गावरून अतिवेगाने गाड्या पळवण्याच्या मोदींच्या निर्णयाची किंमत आपण मोजतो आहोत’, असंही ते म्हणाले होते. ‘मोदींच्या ‘न्यू इंडिया’मध्ये माध्यमांची अवस्था दयनीय झाली असून प्रधानमंत्री कार्यालयातील एक दुय्यम दर्जाचा अधिकारी माध्यमांना जाब विचारून सरकारी जाहिराती थांबवण्याच्या धमक्या देतो’, असा आरोपही त्यांनी केला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे नरेंद्र मोदींच्या गळ्यातील ताईत मानले जातात. पण त्यांना हटवलं नाही, तर येत्या काळात मोदींनाच राजीनामा द्यावा लागेल, असं सनसनाटी विधान स्वामींनी केलं होतं. डोवाल यांच्याबद्दल असं बोलण्याची हिंमत स्वामींमध्ये कुठून येते, हे त्यांचं त्यांनाच माहीत!

२०२४च्या निवडणुकीच्या दृष्टीने अयोध्येतील राममंदिर हा प्रचाराचा मोठा मुद्दा असणार आहे. स्वत: स्वामींनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन मंदिर उभारणीसाठी परवानगी मागितली होती. पाठपुरावा केला होता. त्यामुळेच ‘मोदींनी राममंदिरासाठी काहीच केलं नाही, फक्त सर्व श्रेय ते लाटतात’, असा शालजोडीतला त्यांनी नुकताच हाणला आहे.

स्वामी असे अनेक छोटे-मोठे फटाके उडवत आहेत. शिवाय ‘मोठा बॉम्ब लवकरच फोडेन’ असंही म्हणत असतात. स्वामींचा गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास बघितला, तर ते सध्या जे बोलत आहेत, करत आहेत, ते अनपेक्षित नाही. जे त्यांच्या जवळ गेले आहेत त्या प्रत्येकाच्या विरोधात ते गेले आहेत. अशा संघर्षात दरवेळी त्यांना नेस्तनाबूत करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे. पण प्रत्येक वेळी स्वामी सर्वांना पुरून उरले आहेत. मोदींसोबतच्या सामन्यात मात्र त्यांचा कस लागणार आहे. कारण मोदीही कच्च्या गुरूचे चेले नाहीत.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

वसुंधरा राजेंचं काय करायचं? हा प्रश्न हिंदीत म्हणतात तसं ‘ना उगलते बनता हैं, ना निगलते बनता हैं’ टाईपचा आहे

‘इंडिया’ आघाडीची बैठक महाराष्ट्रात यशस्वीरित्या पार पडत असली, तरी ‘इंडिया’च्या झोळीत महाराष्ट्र किती जागा टाकणार?

मागच्याला ठेच लागली, तरी पुढचा शहाणा होतो असं नाही. ज्योतिरादित्य सिंधिया हे त्याचं ताजं उदाहरण आहे!

मागच्या आठवड्यात उत्तर भारतातल्या कच्च्या, अर्धकच्च्या बातम्या बघितल्या. या वेळी दक्षिण भारतातल्या बघूयात...

.................................................................................................................................................................

मोदींनी सुब्रमण्यम स्वामींना अर्थमंत्री केलं नाही, म्हणून ते त्यांच्या एवढे विरोधात गेले आहेत, असं बोललं जातं. खरंखोटं आपल्याला माहीत नाही. दुसरी गोष्ट, मोदींच्या प्रतिमेला धक्का बसेल एवढी विश्वासार्हता स्वामींच्या पाठीशी नाही. त्यामुळे स्वामींचं रागावणं हा फुसका बारही ठरू शकतो. पण स्वामी ज्याच्या पाठी लागतात, त्याला हैराण करून सोडतात हाही इतिहास आहे. त्यामुळे ऐन निवडणूक वर्षात स्वामींचा ससेमिरा मागे लागणं अर्थातच मोदींना परवडणारं नाही.

ता. क. : ‘जी20’च्या निमित्ताने मोदी जागतिक नेते बनून पुढे आल्याचा प्रचार चालू असताना त्यासमोर सर्व विरोधक निष्प्रभ झालेले आहेत. पण ‘दोन वर्षांपूर्वीच भारताला हे संमेलन भरवायला मिळणार होतं, पण येत्या निवडणुकांत त्याचा फायदा मिळवण्यासाठीच मोदींनी हे संमेलन आत्ता भरवलं’, असा दावा सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे. थोडक्यात, स्वामी गप्प बसतील असं दिसत नाही.

.................................................................................................................................................................

लेखक सुहास कुलकर्णी ‘अनुभव’ मासिकाचे आणि ‘समकालीन प्रकाशना’चे मुख्य संपादक आहेत.

samakaleensuhas@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा