‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ : नाट्यविश्वातल्या एका तत्त्वनिष्ठ आणि झपाटलेल्या माणसाचे परिपूर्ण चरित्रनाट्य
ग्रंथनामा - झलक
कमलाकर नाडकर्णी
  • ‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 26 June 2023
  • ग्रंथनामा झलक बादल सरकार Badal Sircar बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी Badal Sircar : Ek Janvadi Natyakarmi अविनाश कदम Avinash Kadam तिसरी रंगभूमी Third Theatre

भारतीय आधुनिक रंगभूमीचे चार शिलेदार मानले जातात - बादल सरकार (बंगाली), गिरीश कार्नाड (कन्नड), मोहन राकेश (हिंदी) आणि विजय तेंडुलकर (मराठी). बादल सरकारांनी ‘तिसरी रंगभूमी’ ही संकल्पना मांडून नाटक आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर पुसणारे विविध प्रयोग केले. अशा या बादल सरकार आणि त्यांच्या तिसरी रंगभूमीची ओळख करून देणारे ‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ हे पुस्तक अविनाश कदम यांनी लिहिले आहे. नुकतेच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

..................................................................................................................................................................

काही वर्षांपूर्वी छबिलदासच्या प्रायोगिक नाट्यगृहात बादल सरकार यांच्या नाटकांचा एक महोत्सव आयोजित केला गेला होता. नाट्यप्रयोगानंतर होणाऱ्या चर्चेमध्ये मी बादलबाबूंना विचारले ‘तुम्ही तुमच्या तिसऱ्या रंगभूमीवरील नाटकांसाठी नटांची निवड कशी करता?’ त्यावर बादलदा म्हणाले होते, “मी नाटकातून जे मांडू पाहतोय, त्याच्याशी सहमत असणाऱ्यांचीच मी निवड करतो. त्याची नटपणाची कुशलता ही नंतरची गोष्ट आहे... माझ्या नाटकातील कलावंतांनाही तेच म्हणायचं असेल तरच ते प्रभावी होऊ शकतील.”

अविनाश कदम यांचं ‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ हे पुस्तक पाहिल्यानंतर वरील विधानाची तीव्रतेने आठवण झाली. या पुस्तकाने त्यांनी नाट्यसाहित्यातील एक त्रुटी भरून काढली आहे.

कमानी रंगमंच नाकारणारे बादलदा आणि त्यांच्या तिसऱ्या रंगभूमीची संकल्पना समजून घ्यायची असेल, तर अगोदर कमानी रंगमंचावर होणारी नाटकं, शहरी आणि ग्रामीण नाटकांचा स्वभावधर्म परिचित व्हायला हवा. आणि त्याचबरोबर बादलदांच्या जीवनदृष्टीचीही ओळख करून घ्यायला हवी. लेखकाने ती पुरेशा तपशीलवारपणे मांडली आहे. बादलदांची जडणघडण कशी झाली, हे त्यांच्या चरित्रावरून समजते आणि नाटक या संस्थेकडे ते कोणत्या हेतूने पाहतात, हे लक्षात येते

बादलदांची ‘शताब्दी’ ही नाट्यसंस्था पूर्वी कमानी रंगभूमीवरचीच नाटकं करायची. पण बादलदा परदेश फिरून आले आणि तिकडे पाहिलेल्या रंगभूमीचा त्यांच्यावर विलक्षण परिणाम झाला. नोकरीच्या निमित्ताने आणि शिक्षणासाठी त्यांना युरोप, अमेरिका, नायजेरिया, लंडन, पॅरिस या देशांत जावं लागलं. तिथली रंगभूमी, ग्रोटोस्कीची गरीब रंगभूमी हे सगळं सगळं त्यांनी पाहिलं आणि ते कमालीचे प्रभावित झाले. नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषेचा झगमगाट, तांत्रिकतेचा वापर यांच्याशिवाय नाटक किती परिणामकारक होऊ शकतं, याचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

या सर्व प्रकारच्या अवलोकनातून प्रेरणा घेऊन, भारतीय संस्कृतीच्या मुशीतून त्यांनी एक वेगळेच नाट्यनिधान सिद्ध केले. जे नाटक हाडामांसाच्या माणसांचे होते, माणसातले होते, न भूतो न भविष्यती होते. तिसऱ्या रंगभूमीचा हा जन्म होता. कुठलाही आणि कसलाही जामानिमा न करता एका ग्रीक राजा-राणीची शोकांतिका प्रेक्षकातच उभी राहते आणि प्रेक्षकांना हादरवून टाकते, तर हे आपल्याकडेही शक्य का नाही होणार? कितीतरी ज्वलंत प्रश्न आपल्याकडे आहेत. ते याच पद्धतीने लोकांना भिडवता येतील. नाटक आणि समाजकारण यांच्या कळा असह्य झाल्या आणि तिसऱ्या रंगभूमीचा जन्म झाला.

केवळ पहिल्या आणि दुसऱ्या रंगभूमीच्या चौकटी मोडणे, एवढंच उद्दिष्ट तिसऱ्या रंगभूमीसमोर नव्हतं. लेखक म्हणतो, “ग्रामीण व शहरी नाटक या दोघांना पर्यायी असलेलं हे नाटक होतं, म्हणून बादलदांनी त्याला ‘तिसरी रंगभूमी’ म्हटलं. पण तिसरी रंगभूमी हा एका बदलत्या काळातील सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीवर नव्या परिवर्तनशील नाटकाचा व्यापक पातळीवर घेतलेला शोध होता.”

या संदर्भात बादलदा म्हणतात, “अशा प्रकारचं नाटक उभं राहायचं, तर ती एक नव्या नाटकासाठीची चळवळ असायला हवी. तो एक व्यवसाय असून चालणार नाही. ज्यांना केवळ नाटकासाठी नाटक करण्यात रस आहे किंवा नाटक ज्यांच्या उपजीविकेचे साधन आहे, त्यांना अशा प्रकारची नाट्यचळवळ करता येणार नाही. एका व्यापक बदलाची जे अपेक्षा करतात आणि बदल घडवण्याच्या शक्तीमध्ये नाट्यकलेचेही योगदान असावे, असे ज्यांना वाटते, तेच अशा प्रकारच्या नाट्यचळवळीमध्ये येतील, पण असे लोक जास्त नाहीत.” तिसऱ्या रंगभूमीबाबतची बादलदांची वैचारिक स्पष्टता यावरून लक्षात येते.

या पुस्तकात दिलेलं बादलदांचं चरित्र फार महत्त्वाचं आहे. ते वाचल्यानंतर त्यांची भूमिका कुठल्या मुशीतून आणि वातावरणातून तयार झाली, हे चटकन लक्षात येतं. त्यांना केवळ नाटकाचं वेड नव्हतं, तर समाजाबद्दलही आत्यंतिक जिव्हाळा होता. समाज आणि नाटक यांच्यात ते अद्वैत निर्माण निर्माण करू पाहत होते, एक अतूट नातं निर्माण करू पाहत होते. समाजपरिवर्तनाचं एक साधन म्हणून ते नाटकाकडे पाहत होते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

सामूहिक सहभागातून, कार्यशाळांतून नाटकं कशी उभी राहत गेली, नाटकाचे संवाद कसे म्हणायचे, हालचाही, नेपथ्य, देहबोलीतून कसे निर्माण झाले? हे सारे बादलदांनी अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. त्याचा तितकाच सुबोध अनुवाद लेखकाने केला आहे. त्यांची नाटकं केवळ कवायती झाली नाहीत. त्याचे कारण देताना ते म्हणतात, “आम्ही भर आशयावर दिला आणि त्यानुसार आकृतिबंध ठरवले ... अगोदर आकृतिबंध आणि मग त्यावर आशय लावला नाही.”

देहबोलीवर नाटक करणारे आपल्याकडचे बरेच जण आकृतिबंधाचेच बळी ठरले आणि त्यांच्या नाटकांची संचलने झाली... आंधळ्या अनुकरणाने मूळ संकल्पनाच मोडीत काढली. बादल सरकार जे सांगतात, त्याचा प्रत्यय जाणकारांनी, समीक्षकांनी त्यांच्या नाटकांचा जो प्रयोगानुभव कथन केलाय आहे, त्यावरून येतो आणि कसल्याही बाह्य तांत्रिक मदतीशिवाय त्यांचे नाट्यप्रयोग विलक्षण प्रभावी कसे झाले, याचे कारण कळते.

आपल्या नाटकातील अनुभवाबद्दल बादलदा लिहितात - “या नाटकातील प्रेक्षकांचा अनुभव वास्तवाच्या आभासापेक्षा प्रत्यक्ष वास्तवाचा अनुभव असावा असा भासतो आणि केवळ प्रेक्षक क्षेत्र आणि अभिनय क्षेत्र यांच्या बदललेल्या रचनेमुळे हे घडलं असं नाही, तर कलाकार व प्रेक्षक या दोन व्यक्तीसमूहांच्या मानवी नात्यात घडलेल्या मूलभूत बदलामुळे हे घडलं.”

नाटकाच्या बाजारू व्यवहाराबाबतही बादलदांनी आपले विचार मांडले आहेत. “मुक्त किंवा मोफत नाटकाकडे आम्ही वळलो, याचे कारण केवळ आपल्या देशातले गरीब लोक आणि नाटकाचे तिकीट काढणे त्यांना परवडणार नाही, एवढेच नव्हते... तर आमची अशी धारणा होती की, नाटकामध्ये कलाकार व प्रेक्षक यांचा दर्जा समान असायला हवा. तो विक्रेता व ग्राहक असा नसावा. नाटकासाठी जेव्हा तिकीट विक्री-खरेदी केली जाते, तेव्हा साहजिकच खरेदीदार व विक्रेता हे नातं निर्माण होणं अपरिहार्य ठरतं. खरेदीदाराचा अनुनय करणंही मग अपरिहार्य ठरतं. त्यामुळे नाटकात तुम्हाला जे सांगायचं आहे, ते परखडपणे सांगणं कठीण होऊन बसतं.”

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..............................................................................................................................................................

बादलदांनी देशभर नाट्यशाळा घेतल्या. पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, ब्रिटन अशा देशांत जाऊनही कार्यशाळा घेतल्या. तिसऱ्या रंगभूमीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी झपाटून काम केलं. एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात मैलोनमैल चालायचं आणि पुढच्या गावात नाटक करायचं, कलाकारांचे अनेक चमू त्यांना सामील झाले. लोककला गाणी पोवाडे अशा सगळ्या रांगड्या कलांचं साहाय्य घेत त्यांनी आठ वर्षे ही नाटकांची ‘ग्रामपरिक्रमा’ चालवली.

बादलदांनी आपल्या नाट्यप्रयोगातून जे आकृतिबंध मूर्तिमंत केले, त्याचा अर्थ आणि अन्वयार्थं पुस्तकात अगदी जाताजाता आला आहे. बादलदाच आपल्या नाटकाचे दिग्दर्शक असल्यामुळे ही महत्त्वाची बाब ठरते. आपल्याकडेही नाटककार-दिग्दर्शकाची परंपरा आहेच. देवल, खाडिलकर, दारव्हेकर, आळेकर, मतकरी ही नावं सहज आठवतात या संदर्भात. पुस्तकात फक्त ‘स्पार्टाकस’ नाटकाचं एकच उदाहरण आहे. अधिक उदाहरणे आली असती, तर प्रयोगाची प्रभाव शक्ती वाचकांना अगदी टोकदारपणे उमजली असती.

चळवळ म्हणजे काय आणि नाट्यचळवळ कशी उभी राहते, हे ज्यांना मनापासून जाणून घ्यायचे असेल, त्यांनी बादलदांची ही कहाणी वाचायलाच हवी. एका छोट्या नाट्यगृहात सातत्याने वेगळी नाटकं करत राहणं, याला चळवळ म्हणता येत नाही. चिकाटीनं विशिष्ट नाट्यकार्य करत राहणे एवढेच विशेषत्वाने सांगता येईल आणि तेवढ्यासाठीच ते कार्य करणारी संस्था लक्षणीय ठरेल.

मराठी रंगभूमी आणि बादलदांची जनवादी रंगभूमी वा तिसरी रंगभूमी यांची तुलनाच होऊ शकत नाही. प्रेक्षकांसाठी नाटक करणं, हा दोघांतला समान दुवा असला, तरी त्या परस्पर विरोधी संकल्पना आहेत. सांगलीचे राजे पटवर्धन यांना विष्णुदास भाव्यांच्या नाट्यचमूला पदरी ठेवायचं होतं. पण त्यांच्या अकाली निधनामुळे ते शक्य झालं नाही. राजपुत्र बालवयाचा असल्यामुळे नेमलेल्या व्यवस्थापकानं नटमंडळीला फक्त दीर्घमुदतीची रजा मंजूर केली. सांगलीकर हिंदू नाटक मंडळी स्वारीवर म्हणजेच दौऱ्यावर निघाली. आपोआपच नाटक कंपनी सरंजामदारीतून भांडवलदारीत पडली...

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

आणि बादलदा तर नाटक घेऊन भांडवलशाहीच्या विरोधातच उभे होते. सांगलीकर नाटक मंडळीचा पहिला मुक्कम तासगावला पडला. सात-आठ खेळ केले.. नाटक तिकीट काढून येणाच्या प्रेक्षकांसाठी झाले. अभिजन वर्गाचे झाले. मध्यमवर्गाचे झाले. भावे दौऱ्याला ‘स्वारी’ म्हणतात ते यथार्थच आहे. सांगलीकरांनी मराठी रसिक मनावर स्वारीच केली. हा रसिक वर्ग बुद्धिवादी होता, ब्राह्मण होता.

तिकीट काढून नाटक बघण्याची चैन त्या वेळच्या कष्टकऱ्यांना परवडण्याजोगी नव्हती. आजपर्यंतचे आपले नाटक मध्यमवर्गीयच राहिलेले आहे. रंगमंचावर प्रथम कामगारविश्व यायला १९३१ साल उजाडावे लागले. (सोन्याचा कळस - मामा वरेरकर) याचा अर्थ तिसरी रंगभूमी सर्वश्रेष्ठ आहे, असं मुळीच नाही. तिन्ही रंगभूमी गुणाढ्य आहेत, यात शंकाच नाही. फक्त प्रत्येकाची ‘खेळा’ची मैदानं वेगवेगळी आहेत, हे लक्षात घ्यायला हवं

चरितार्थाचे साधन म्हणूनच ज्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला, त्यांच्याकडून ‘कमिटेड थिएटर’ होऊ शकत नाही, हे तर बादलदांनीच लिहून ठेवलंय. कम्युनिस्ट असूनही त्यांनी पक्षाचा प्रचार कधी केला नाही. सत्तेने निर्माण केलेल्या परिस्थितीवर, दमनशक्तीवर, शोषणावर मात्र त्यांनी जोरदार हल्ले चढवले. त्यामुळेच सरकारी पुरस्कारापासून आणि पक्षाच्या पाठिंब्यापासून ते नेहमीच वंचित राहिले. ‘ ‘तिसरी रंगभूमी’ हे माझं कार्य नसून ते माझं तत्त्वज्ञान आहे’, असं ते नेहमी म्हणायचे.

कॅन्सर झालेला असतानाही वयाच्या ८६ वर्षांपर्यंत ते सतत कार्यरत होते. नाट्यविश्वातल्या एका तत्त्वनिष्ठ आणि झपाटलेल्या माणसाचे हे परिपूर्ण चरित्रनाट्य मराठी वाङ्मयात मोलाची भर टाकणारे आहे.

आज निर्माण झालेल्या परिस्थितीत तिसऱ्या रंगभूमीची आणि जनवादी नाट्यकर्मी बादलदा यांची तीव्रतेने आठवण येते. तीच तारणकर्ती असू शकेल.

‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ - अविनाश कदम

लोकवाङ्मय गृह, मुंबई | पाने - १८८ | मूल्य - २५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......